Thursday, 7 April 2022

सावध हरिणी, सावध गं !




गेल्या महिन्यात एका १७ वर्षाच्या तरुणीला आर्थिक फसवणुकीच्या आरोपाखाली पोलिसांनी बेड्या ठोकल्या.. या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावताना पुढे आलेली माहिती अतिशय धक्कादायक होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेमजाळ्यात अडकवून विश्वासात घेऊन तिच्याकडून हेतुपुरस्सर काही आक्षेपार्ह कृत्य करून घेण्यात आले होते आणि नंतर त्याचे व्हिडीओ सार्वजनिक रीतीने प्रसारित करण्याची धमकी देऊन, ब्लॅकमेल करत तिच्याकडून पैशांची मागणी केली गेली. ही मागणी पूर्ण करणे जसजसे कठीण होऊ लागले त्या मुलीने इतरांची आर्थिक फसवणूक करणे सुरु केले आणि दुष्टचक्रात खोलवर अडकत गेली.

नागपूर जिल्ह्यातल्या दोन वेगवेगळ्या शहरातील उच्चभ्रू सोसायटीच्या, सुशिक्षित-प्रतिष्ठित कुटुंबातल्या महिला. व्यस्त कुटुंब आणि एकांताला कंटाळून सोशल माध्यमावर हेतुपुरस्सर फुसलावणाऱ्या टोळीतील वेगवेगळ्या इसमाच्या प्रेमात पडल्या आणि भावनेच्या आहारी जाऊन आक्षेपार्ह चॅटींग, फोटो पाठवणे, व्हिडीओ कॉलिंग या माध्यमातून नको त्या चुका करून बसल्या, आणि मग सुरु झाला जीवनमरणाचा खेळ. हे व्हिडीओ-फोटो कुटुंबाला पाठवावे किंवा सार्वजनिक करावे असे वाटत नसेल तर 'त्या' बायकांना प्रेमाच्या जाळ्यात फसवून ब्लॅकमेल करणाऱ्या टोळीच्या इशाऱ्यांवर काम करणे गरजेचे होऊन बसले. त्या टोळीच्या मागणीनुसार लाखो रुपये दिल्यानंतरही मागणी संपेचना. त्या थकल्या-रडल्या नंतर शेवटची मागणी म्हणून ४ सिमकार्ड आणि प्रत्येकी २-२ बँक खाते काढून त्याचे एटीएम कार्ड आणि इतर माहिती त्यांना बंगलोर शहरी पाठवण्यास सांगण्यात  आले..एवढं पाठवून आपण सुटलो असे या स्त्रियांना वाटत असतानाच, वर्षभरानंतर एकदिवस पोलीस घरावर येऊन धडकले आणि महिलांना बेड्या ठोकून घेऊन गेले.. ज्या बदनामीला घाबरून एक चूक लपवायला पुढे अनेक चुका या महिलांनी केल्या होत्या त्याच ह्यांना भोवलया होत्या. ह्यांनी पाठवलेल्या सिमच्या आधारे पुढे अनेक महिलांची फसवणूक केली गेली होती आणि त्या फसवणुकीतून मागवलेला पैसा, अगदी करोडो रुपयांचा खंडणीचा व्यवहार ह्यांनी पाठवलेल्या बँक खात्यावरून करण्यात आला होता. खऱ्या गुन्हेगारांचे नाव-गाव-पत्ता काहीही, कशाच्याही माध्यमातून पुढे न येऊ दिल्याने त्यांचा पत्ता लागणे कठीण होतं.. पण या करोडो रुपयांच्या फार मोठ्या फसवणुकीच्या प्रकरणात या महिला मात्र प्रमाणासह फसल्या, ही केस कोर्टात अजूनही चालू आहे.


२०१९ साली  सोशलमिडियाच्या माध्यमातून ३०० महिलांची त्यांच्या माहिती आणि फोटोंचा उपयोग करून, ते पॉर्नसाईटवर टाकून त्यांची फसवणूक आणि नंतर ब्लॅकमेल करण्याचे प्रकरण पुढे आले होते. याप्रकरणी  हैदराबादच्या सायबर विभागाने २५ वर्षीय ठग विनोदला बेड्या ठोकल्या होत्या. विनोद मुळचा विशाखापट्टनमचा रहिवासी होता. त्याने सोशल मीडियाचा गैरवापर करत ३०० महिलांची लैंगिक आणि आर्थिक फसवणूक केली आणि त्यांचे फोटो पॉर्न साईटवर अपलोड करून त्यांना ब्लॅकमेल केले होते आणि त्यांच्याकडून पैसे उकळले होते. एका तरुण मुलाच्या सायबर फसवणुकीला इतक्या महिलांनी बळी पडण्याचे हे प्रकरणही तेव्हा खूप गाजले होते.

आजही सोशल मीडिया वापरणाऱ्या महिलांकडून दबक्या आवाजात तक्रारींचे सूर उमटत राहतात. फसवणूक करणाऱ्यांमध्ये साहित्यिक, कवी, प्राध्यापक, कलावंत असणाऱ्या नामवंत पुरुषांची नावे देखील समोर येत असतात. काही दिवस गाजावाजा होतो. त्यात स्त्रियांनाच दोषी ठरवण्याची परंपरा कायम चालत आल्याने महिला संकोचतात, गप्प बसतात किंवा सोशल माध्यमातून कंटाळून पळ काढतात. त्या पुरुषांना मात्र फारसा फरक पडत नाही, अंगावर आलीच तर महिलांना दोष देऊन त्यांच्या चारित्र्यावर बोट ठेवून, चर्चेला पेव फोडून ते मोकळे होतात आणि पुन्हा पुन्हा गुन्हा करत राहतात. तिच्या भावुक असण्याचा फायदा उचलत एकेक पुरुष एकावेळी अनेकींचे आयुष्य उध्वस्त करत सुटतो आणि त्याबद्दल त्यांना जराही खंत वाटत नाही.  

सोशल मिडीयाचा वापर काही लोकांसाठी व्यसन होऊन बसले आहे. ह्याचाच गैरफायदा काही समाजकंटक स्वतःच्या हितासाठी करून घेताहेत आणि ह्याचे प्रमाण आता चिंता वाटावी इतके वाढले आहे. थोडा काळ मन रमवण्यासाठी, विरंगुळा म्हणून होणारा सोशलमिडीयाचा वापर आता विविध पद्धतीने फसवणुकीसाठी  केला जातो आहे आणि ह्याला अनेक बाईमाणसे बळी पडताहेत. गेल्याच महिन्यात माझी समुपदेशक मैत्रीण शुभांगी देवस्थळे हिच्याशी या विषयावर बोलणे झाले आणि सायबर गुन्ह्यांना बळी पडणाऱ्यांमध्ये महिलांचे प्रमाण प्रचंड वाढत असल्याचे तिने सांगितले. आर्थिक, शारीरिक, भावनिक पद्धतीने लुबाडणूक होणाऱ्या महिला घरच्यांना न सांगता गुपचूप समुपदेशनासाठी येतात तेव्हा त्यांची परिस्थिती अतिशय दयनीय झालेली असते, असं तिचं म्हणणं होतं. गेल्या महिन्यात सायबर क्राईमवर लेख लिहिण्यासाठी संदर्भ हवे होते म्हणून आणि खरे अनुभव लिहावे या हेतूने अनेकांशी चर्चा केली. या चर्चेतून सायबर गुन्ह्यांचे अनेक जिवंत किस्से समोर आलेच परंतु सोशल माध्यमातून होणाऱ्या बायकांचे भावनिक, लैंगिक आणि आर्थिक शोषण हा अत्यंत गंभीर गुन्हा लक्षात आला त्याबद्दल माहिती मिळवताना मी मात्र हादरून गेले.

व्यक्त होण्यासाठी, कलागुणांच्या प्रदर्शनासाठी, आवडीच्या गोष्टी शेअर करण्यासाठी, वैचारिक भूमिका बोलून दाखवण्यासाठी स्वतःचा हक्काचा एखादा प्लॅटफॉर्म असणं खरतर किती चांगली गोष्ट आहे. एकीकडे सोशल मीडियाचे स्वातंत्र्य अनुभवत असताना दुसरीकडे मात्र महिलांना याचाच उपद्रव होत असल्याने या 'व्हर्च्युअल' जगातही सावधगिरीने वागावे लागत आहे. सोशल मीडियाशी संबंधित घडणाऱ्या गुन्ह्यांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास सायबर गुन्हेगारांकडून त्यांनाच सर्वाधिक लक्ष्य केल्याचे दिसून येत आहे. 13 मे 2021, दिवस गुरुवार. या दिवशी 'लिबरल डॉजी' नावाच्या चॅनलने यूट्यूबवर लाईव्ह स्ट्रीम केले, ज्यामध्ये मुस्लिम मुलींवर त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून व्हिडिओ काढून अत्यंत अश्लील आणि अशोभनीय टिप्पण्या केल्या गेल्या. जेव्हा ट्विटरवर मुस्लिम मुलींनी या व्हिडिओ स्ट्रीमिंगच्या विरोधात लिहायला सुरुवात केली आणि तक्रार करण्याची विनंती केली तेव्हा लाईव्ह व्हिडिओची सेटिंग बदलून खाजगी करण्यात आले. गेल्याच महिन्यात मुस्लिम महिलांचे फोटो एडिट करून, आक्षेपार्ह माहितीसह ते इंटरनेटवर व्हायरल करण्याचा आणि "बुल्ली बाई'' आणि ‘सुली डील’ नावाच्या अॅपवर त्यांचा लिलाव करण्याचा अत्यंत खेदजनक, निषेधार्ह आणि त्याचबरोबर चिंताजनक प्रकार उघडकीस आला होता. या द्वेषाला फक्त मुस्लिम महिलाच बळी पडत नाहीत तर हिंदू महिलांच्या चेहऱ्याचे फोटो उघड्या शरीरावर मॉर्फ केले जातात, ते कुठल्यातरी पॉर्न साईटवर किंवा डेटिंग साईटवर सार्वजनिक केले जातात आणि नंतर त्यांचाच उपयोग करून सोशल मीडियावरून छळ केला जातो. अनेकदा वैयक्तिक सूद उगवण्याच्या दृष्टीने महिलांच्या सोशलमिडीयावरच्या माहितीच्या आणि फोटोच्या आधारे फेक अकाउंट सुरु केले जाते, त्यावर बदनामीकारक मजकूर-लिंक-फोटो शेअर केले जातात, महिलांचे फोननंबर सार्वजनिक केले जातात, त्यांचा लिलाव केला जातो, बलात्काराच्या धमक्या दिल्या जातात. उच्चशिक्षित महिलांचा अपमान केला जातो, दलित महिलांची विटंबना केली जाते, राजकीय महिलांनाही टार्गेट केलं जातं, झुंड एकत्र येतो त्यांना ट्रॉल केलं जातं, पिच्छ पुरवला जातो.. कधीकधीतर माणुसकीच्या सगळ्या मर्यादा लंघून महिलांशी या सोशल प्लँटफॉर्मवर वागले-बोलले जाते.

ओळख निर्माण करण्याचा मोह, जास्तीत जास्त मित्र जमवण्याचा मोह, एकटेपणा घालवण्यासाठी संवाद वाढवण्यासाठी सगळे संपर्क शेअर करणे, त्यातून संवाद आणि विश्वास हेतुपुरस्सर वाढवला जातो.. आकर्षण-प्रभाव निर्माण केला जातो.. तो निर्माण झाला आहे ह्याची चुणूक लागताच वैयक्तिक फोटो आणि माहिती मागवली जाते. त्याचाच कधीतरी गैरवापर होतो आणि त्यातून होणाऱ्या त्रासाला तोंड द्यावे लागते. आपल्याच चुकीमुळे पुरवलेली माहिती किंवा आपली माहिती चोरून, अकाउंट हॅक करून मिळवून जाळं विणलं जातं. कुटुंबाला-समाजाला घाबरून तक्रार करण्यास महिला आणि मुली धजावत नाहीत, हे गुन्हेगारांनी बरोबर हेरलं असतं, त्यांची हिम्मत वाढत जाते आणि एकामागोमाग एक अनेक महिलांना फसवण्याचा त्यांचा धंदा निर्धोक चालू राहतो.

मग काय करावे ?
बोलते व्हावे, कोणीतरी अगदी ओळखीतला किंवा अनोळखीही मुद्दाम जवळीक साधतो आहे, नको तितके कौतुक करतो, प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतो आहे हे लक्षात येताच हुरळून न जाता कोणतेही पाऊल उचलण्याआधी इतर महिलांचा त्या इसमाच्या बाबतीतला काय अनुभव आहे तो जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. किंवा अश्या येणाऱ्या अनुभवांविषयी विश्वासातल्या माणसांशी चर्चा करावी. घरी नसेल बोलता येत तर मैत्रिणींशी बोलावे. घरात कोणी लक्ष देणारं नाही, बोलणारं नाही, एकटेपणा जाणवतो, नवरा व्यसनी आहे, संकट येताहेत किंवा इतर कोणत्याही दुःखाचं प्रदर्शन कोणाहीजवळ करू नये. कुठलीच गुपितं अनोळखी किंवा फक्त फेसबुक मित्र आहे म्हणून उघड करू नये. याच गुपितांच्या भरवशांवर तुम्हाला सांत्वना देत तुमच्या मनाचा ताबा मिळवला जातो आणि एकदा मनावर ताबा आला कि मग महिलांचे शारीरिक, आर्थिक, मानसिक, भावनिक आणि लैंगिक शोषण करणे सोप्पे होऊन बसते. बरेचदा थोड्याश्या सुखाच्या अपेक्षेने सुखातला जीव दुःखात-धोक्यात घालण्यात काहीही अर्थ नसतो. कोणीतरी फेसबुक सेलिब्रिटी, एखादा कलाकार, व्यवसायी खूप मोठा माणूस असून त्याचे असंख्य चाहते असून तो आपल्याशी आपुलकीने बोलतो ह्यातच महिला हुरळून जातात आणि नको त्या चुका करून बसतात. तो करत असलेले कौतुक, प्रेमाचे दावे, शपथा वचनं, प्रेमबीम तो फक्त आपल्याशीच करतो आहे असे समज करून बसतात. त्याने पूर्वीही अनेक महिलांना गंडवले असते आणि आताही एकाचवेळी तो तुमच्यासह अनेकींचा गैरफायदा घेत असतो. दोन काळ प्रेमाच्या अपेक्षेने महिला स्वतःचे फोटो पाठवणे, नको त्या भाषेत चॅटिंग, व्हिडीओ पाठवणे अश्या चुका करून बसतात ज्या भरवशावर पुढे ब्लॅकमेल होतात आणि सगळीकडूनच लुबाडले जातात.  आपण फार मोठी चूक करून बसलो आहे आणि हे कोणाजवळ सांगितले तर आपली अब्रू जाईल या भीतीने त्या कोणाजवळच हे बोलत नाहीत.. इथेच सर्वात मोठी चूक करतात. त्या अपराध्यांना अधिक बळ मिळते. असे काही अनुभव येत असतील तर फसण्याआधी कुणाशीतरी हे अनुभव शेअर करावे, फसवणूक झाली असेल तरी संकोच न करता मैत्रिणींशी बोलावे. एकमेकींशी बोलण्यामुळे त्या अधिक फसायच्या बचावतीलच पण इतर महिलांनाही त्यातून धडा मिळेल..त्या जागरूक होतील, अनेकींचे आयुष्य खराब होण्यापासून आपल्याला थांबवता येईल. प्रत्येक महिलेने या व्यासपीठावर सावध राहावे, सुरक्षित राहावे व इतर महिलांनाही सावध करावे.


नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने (एनसीआरबी) दिलेल्या माहितीनुसार, 2018 ते 202१ दरम्यान भारतात महिलांवरील सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ झाली असून, सोशल मैद्याच्या माध्यमातून लैंगिकदृष्ट्या फसवणूक झाल्या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या प्रकरणांमध्ये 110% वाढ झाली आहे. लैंगिकदृष्ट्या दबाव टाकणे तशी सामग्री प्रकाशित करणे किंवा प्रसारित करणे यासाठी दोषी ठरण्याचे प्रमाण पूर्वी 47.1% होते, तर सायबर पाठलाग आणि गुंडगिरीच्या प्रकरणांमध्ये ते 27.6% इतके कमी होते. या अहवालानुसार, २०२० मध्ये यापद्धतीच्या गुन्ह्यांसाठी ६०० पुरुष आणि १९ महिलांना अटक करण्यात आली होती. तसेच केलेल्या आणि नोंदणीकृत सायबर गुन्ह्यांमागील हेतूचा तपशील देण्यात आला आहे, ज्यात "लैंगिक शोषण" हा आर्थिक फसवणुकीनंतरचा सर्वात मोठा दुसऱ्या क्रमांकाचा हेतू असल्याचे सांगितले गेले आहे.

- रश्मी पदवाड मदनकर





Sunday, 16 January 2022

 अनुष्काने विराटला उद्देशून लिहिलेल्या पत्राचा हा अनुवाद.

दोन हजार चौदा सालचा तो दिवस मला नीट आठवतो. त्यादिवशी तू मला सांगितलंस की एम. एस. निवृत्त होतोय आणि त्याच्या जागी तुला कप्तान केलं गेलंय.
मला आठवतं. त्या दिवशी काही वेळानंतर एम एस, तू आणि मी मिळून खूप गप्पा मारल्या. एम. एस विनोदाने म्हणाला की याची दाढी आता कशी पटापट पांढरी होऊ लागते बघच तू. आपण सगळेच यावर खळाळून हसलो होतो. त्या दिवसापासून आजवर मी नुसती तुझी दाढीच पांढरी होताना नाही पाहिली. मी तुझी वाढ होताना पाहिली. आश्चर्य वाटावे अशी वाढ. भोवतालच्या अवकाशातच नव्हे तर तुझ्या आतूनही तुला वाढताना मी पाहिलं. खरंय. भारताच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाचा कप्तान या नात्याने तुझा झालेला विकास पाहून आणि तुझ्या नेतृत्वाखाली तुझ्या संघाने गाजवलेले कर्तृत्व पाहून मला खूप अभिमान वाटतोय पण स्वतःवर काम करून स्वतःचा जो आंतरिक विकास तू घडवून आणला आहेस त्याचा मला कितीतरी जास्त अभिमान वाटतोय.
2014 साली आपण खूपच तरुण आणि भाबडे होतो. वाटायचं, हेतू चांगला असला, सकारात्मक हिंमत दाखवली आणि इरादा पक्का असला की झालं. माणूस सहजच पुढे जाईल. या गोष्टी आपली प्रगती घडवून आणतात हे खरंच आहे. पण वाटेत अडथळेही येतात. आव्हानांना तोंड द्यावे लागतेच. तुला तोंड द्यावी लागलेली यातली बरीच आव्हाने मैदानावरचीच होती असे नव्हे. पण यालाच तर जीवन ऐसे नाव. नाही का? तुम्ही कल्पनाही केलेली नसते अशा ठिकाणी जीवन तुमची कसोटी घेते. तिथेच तर तुमचा कस लागणे खरोखर गरजेचे असते. आणि माझ्या लाडक्या, तुझ्या सद्हेतूंच्या आड तू काही म्हणजे काही येऊ दिले नाहीस. म्हणूनच मला तुझा फार फार अभिमान वाटतो. इतरांना स्वतःचे उदाहरण घालून देत तू संघाचे नेतृत्व केलेस. मैदानात बाजी मारण्यासाठी कसलीच कसूर न करता तू तुझी सर्व शक्ती पणाला लावलीस. इतक्या प्राणपणाने झटूनही की काही वेळा हार पत्करावी लागल्यानंतर तुझे डोळे डबडबलेले पाहिलेत मी तुझ्या शेजारी बसून. आपल्या प्रयत्नात काही कमतरता तर राहिली नाही ना असा प्रश्न अशा वेळी तुला छळत असायचा. असा आहेस तू आणि सर्वांकडून अशाच वृत्तीची आणि कष्टाची तू अपेक्षा धरायचास. तुला चाकोरी मान्य नसे. तुझं वर्तन रोखठोक असायचं. ढोंगबाजीशी तुझं हाडवैर आहे आणि म्हणूनच तर माझ्या आणि तुझ्या सगळ्या चाहत्यांच्या नजरेत तुझं स्थान असं उंचावलेलं आहे. कारण या साऱ्यामागचा तुझा उद्देश नेहमी स्वच्छ असे, निर्भेळ असे. प्रत्येकाच्याच लक्षात ही गोष्ट कदाचित येणार नाही. मी म्हणाले तसं, वरवर दिसतोस त्याच्या आतल्या तुला पहायचा प्रयत्न ज्यांनी ज्यांनी केला ते खरे भाग्यवान. तू काही सर्वगुणसंपन्न पुरुषोत्तम नाहीस. दोष आहेत ना तुझ्यात. पण मग ते लपवायचा प्रयत्न तरी तू कधी केलास? तुझा प्रयत्न असायचा तो प्रत्येक वेळी हातून योग्य तेच घडावे याचा. योग्य त्याच्याच मागे उभे रहावे याचा. जे सर्वात कठीण तेच करत राहण्याचा. या क्षणी आणि दर क्षणी. कुठल्याच गोष्टीला तू कधी आसक्तीने चिकटून बसला नाहीस. या पदालाही नाही. मी जाणते ना. कारण अशा आसक्तीने माणसाला, त्याच्या कर्तृत्वाला सीमा पडतात. आणि तू माझ्या लाडक्या, निव्वळ असीम आहेस.
गेल्या सात वर्षातील या अनुभवांचा लाभ तुझ्या पितृत्वातून आपल्या सोनुलीलाही होईल.
छान केलंस रे!
अनुवाद: अनंत घोटगाळकर

************************************************

Original Letter



Thursday, 6 January 2022

हा लेख 2008 मध्ये मायबोली वरती प्रकाशित झालेला आहे !💐

लेखकाचे नाव :- चिनूक्स असे दर्शीवलेले आहे .. 

*********************


१९९० सालची गोष्ट. मे महिन्यात, भर दुपारी एक बाई आमच्या घरी आल्या. ठिगळं लावलेलं लुगडं, रुपयाएवढं कुंकू आणि पायात चपला नाहीत. माझ्या बाबांशी काहितरी काम होतं त्यांचं. या बाईंचं मोठ्या आवाजातलं बोलणं मला आत व्यवस्थित ऐकू येत होतं. त्यांचे कुठे कुठे ३-४ अनाथाश्रम होते, आणि तिथे राहणार्‍या मुलांसाठी त्यांना पैशांची आवश्यकता होती. बाबांचा कामानिमित्ताने अनेक धार्मिक संस्थानांशी संबंध होता, आणि या बाईंना तिथून आर्थिक मदत मिळवून देण्याचा प्रयत्न बाबा करणार होते. मग जरा वेळाने बाबांनी मला बोलावलं. म्हणाले, 'या सिंधूताई. यांना घेऊन डॉ. XXXX यांच्या घरी जा.'

बाहेर प्रचंड ऊन होतं. बाबांनी रिक्षेसाठी पैसे दिले आणि डोक्यावर रुमाल, खिशात कांदा असा जामानिमा करून मी निघालो. सिंधूताईंनी डोक्यावरून पदर घेतला फक्त. पायात चप्पल नव्हतीच. मे महिन्याच्या त्या भयंकर उन्हातही सिंधूताईंच्या पायांना चटके कसे बसत नाहीत, याचाच विचार मी बराच वेळ करत होतो. डॉक्टरकाकांचं घर तसं फार लांब नव्हतं, पण उन्हाच्या झळांमुळे रस्त्यावर एकही रिक्षा नव्हती. म्हणून पायीच जाणं आलं. चालता चालता मग त्यांनी नाव काय, कुठल्या वर्गात वगैरे चौकशी केली. त्यांचं बोलणं वेगळंच होतं. खूप प्रेमळ. आवाजही वेगळाच. खडा, खणखणीत, पण मऊ. उत्तर देताना त्यांना 'सिंधूताई' म्हटलं, तर मला म्हणाल्या, 'बाळ, मला माई म्हण.'


माईंना घेऊन डॉक्टरकाकांकडे पोहोचलो, तर घरात बरीच गर्दी होती. या डॉक्टरकाकांनी तेव्हा नुकतंच दक्षिणेतल्या एका बुवांचं शिष्यत्व पत्करलं होतं. अकोल्यातली प्रॅक्टीस सोडून, ते आंध्र प्रदेशातील त्या बुवांच्या आश्रमात जाऊन राहणार होते. हवेतनं अंगठ्या, घड्याळं काढणार्‍या त्या बुवांना गरिबांसाठी एक मोठा दवाखाना सुरू करायचा होता, आणि त्यासाठी म्हणून डॉक्टरकाकांनी आपला बंगला, त्याभोवतीची ८-१० एकर जमीन, ३-४ गाड्या असं सगळं त्या बुवांना देऊन टाकायचं ठरवलं होतं. आम्ही गेलो तेव्हा त्या बुवांच्या शिष्यांचा कसलासा सत्संग सुरू होता. डॉक्टरकाकांनी मला आत बोलावलं, पण माईंना बाहेरच थांबवलं. आत भरपूर कुलर्स लावलेले होते, आणि एक खूप स्थूल आजोबा 'मानवसेवा हीच माधवसेवा' असं काहीबाही बोलत होते. बाहेर माई काकांना त्यांच्या आश्रमांबद्दल सांगत होत्या. खर्च वाढले आहेत, मुलांना शिकवायचं आहे, सरकार पैसे देत नाही, वगैरे. माईंचं जोरात बोलणं इथेही आत ऐकू येत होतं. सत्संग सुरू असताना शांततेचा भंग झाल्याने ते आजोबाही बोलायचे थांबले.

काकांनी माईंना खिशातून पाच रुपये काढून दिले, आणि आत येऊन मला म्हणाले, 'एवढ्या उन्हात कशाला आलास? आता तू थांब इथेच. ड्रायव्हर घरी सोडेल तुला. त्या बाईंना मी जायला सांगितलं आहे. आणि तुझ्या बाबाला सांग की या बाई भिकारी आहेत. त्यांचा अनाथाश्रम वगैरे काही नसेल. उगीच फसवण्याचे धंदे.'


माई अजूनही बाहेरच उन्हात उभ्या होत्या. माईंना घेऊन घरी परत गेलो नाही, तर बाबा रागवतील, असं सांगून मी तिथून सटकलो. घरी परत येताना वाटेत माईंना काही घरं उघडी दिसली, आणि माई सरळ तिकडे वळल्या. माईंनी परत त्यां घरी आश्रम, मुलं असं सगळं सांगितलं, आणि 'माझ्या मुलांसाठी मला भीक घाल ग माये', असं म्हणून माईंनी पदर पसरला. मी थिजलोच. माईंनी अशी भीक मागितल्यानं मला प्रचंड शरमल्यासारखं झालं. पण माईंना भीक मागताना काही वाटत नसावं. उलट कोणीतरी दोन पाच रुपये पदरात टकल्याने त्या खुशीत होत्या. भीक मागणं, ही जगातली सगळ्यात अवघड गोष्ट, हे त्या दिवशी मला पुरेपूर कळलं.


माईंची पुढे बरीच वर्षं भेट झाली नाही. पण त्यांच्याबद्दल अनेकदा पेपरमध्ये यायचं. त्यात त्यांच्या भीक मागण्याचे, हालअपेष्टांचे उल्लेख असायचे. कधी लता मंगेशकर, मनमोहन सिंह, बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना त्यांचे फोटो असायचे. पण तरीही 'सिंधूताई सपकाळ', म्हणजे माईंचं नाव ऐकलं की डोळ्यासमोर यायच्या त्या हातात पाच रुपयाची नोट गच्च धरून उन्हात अनवाणी उभ्या असलेल्या, आणि माझा हात धरून भीक मागणार्‍या माई


माई मुळच्या विदर्भातल्या. वर्धा जिल्ह्यातील जंगल भागातील नवरगाव ही त्यांची जन्मभूमी. त्यांचे वडील अभिमान साठे गुरं वळायचं काम करायचे. गाव अतिशय मागासलेलं. शहरी सुविधांचा स्पर्श नाही, कुणाला शिक्षणाचा गंध नाही, अशीच सगळी परिस्थिती. चिंधी (सिंधू) ही सर्वांत मोठी मुलगी. पाठी एक भाऊ, एक बहीण. त्या पाच वर्षांच्या असताना त्यांचे वडील त्यांना घेऊन पिंपरीमधी गावात आले. मुलीनं शिकावं अशी वडलांची इच्छा. पण आईचा मात्र सक्त विरोध. मग ते माईंना गुरं राखायला म्हणून रोज सकाळी बाहेर पाठवायचे आणि त्या शाळेत जाऊन बसायच्या. माई मुळच्याच बुद्धिमान, पण जेमेतेम मराठी चौथीपर्यंत शिकता आलं. अल्पवयातच लग्न झालं आणि चिंधी साठेची चिंधाबाई श्रीहरी सपकाळ झाली. लग्नात माईंचं वय होतं अकरा वर्षं आणि नवर्‍याचं वय तीस वर्षं. घरी प्रचंड सासूरवास. ढोरासारखी मेहनत करावी लागे. घरात सगळे पुस्तकद्वेष्टे. जंगलात लाकूडफाटा, शेण गोळा करताना सापडलेले कागदाचे तुकडे माई घरी आणायच्या आणि उंदराच्या बीळांत लपवून ठेवायच्या. क्वचित घरी एकट्या असल्या तर त्या अक्षरांवरून आधाशासारख्या नजर फिरवायच्या.


अठराव्या वर्षापर्यंत माईंची तीन बाळंतपणं झाली. त्या चौथ्या वेळी गर्भवती असताना त्यांनी त्यांच्या आयुष्यातला पहिला संघर्ष केला. त्या सांगतात,"तेव्हा गुरं वळणं हाच व्यवसाय असायचा. गुरंही शेकड्यांनी असायची. त्यांचं शेण काढता काढता कंबरडं मोडायचं. शेण काढून बाया अर्धमेल्या व्हायच्या. पण त्याबद्दल कोणतीही मजुरी मिळायची नाही. रस्त्यावर मुरूम फोडणार्‍यांना मजुरी पण शेण काढणार्‍यांना नाही. या शेणाचा लिलाव फॉरेस्टवाले करायचे. इथं मी बंड पुकारलं. लढा सुरू केला. त्यामुळे या लिलावात ज्यांना हप्ता मिळायचा त्यांच्या हप्त्यावर गदा आली."


माई हा लढा जिंकल्या पण त्यांना या लढ्याची जबर किंमत चुकवावी लागली. बाईंच्या या धैर्याने गावातील जमीनदार, दमडाजी असतकर दुखावला गेला. जंगलखात्याकडून येणारी मिळकत बंद झाली होती, आणि अडाणी गावकर्‍यांना नवीन नेतृत्व मिळालं होतं. गावकरी डोईजड होण्याची शक्यता होती. माईंच्या पोटातील मूल आपलं असल्याचा प्रचार मग दमडाजीनं सुरू केला. नवर्‍याच्या मनात माईंच्या चारित्र्याबद्दल संशय निर्माण झाला, आणि पूर्ण दिवस भरलेल्या माईंना त्यानं बेदम मारून घराबाहेर काढलं. गुरांच्या लाथा बसून मरतील म्हणून तशा अर्धमेल्या अवस्थेत त्यांना गोठ्यात आणून टाकलं. त्या अवस्थेत त्यांची कन्या जन्माला आली.

नवर्‍यानं हाकलल्यानंतर गावकर्‍यांनीही हाकललं. माराने अर्धमेल्या झालेल्या माई माहेरी आल्या, पण सख्ख्या आईनंही पाठ फिरवली.


दोन घासांसाठी भीक मागण्याची वेळ माईंवर आली. परभणी-नांदेड-मनमाड रेल्वेस्टेशनवर त्या भीक मागत हिंडायच्या. चतकोर भाकर, उष्टावलेलं एखादं फळ हाती लागेल, म्हणून रात्रभर रेल्वेरुळांच्या कडेनं फिरायच्या. एकदा जळगाव जिल्ह्यातील पिंपराळे स्टेशनवर त्यांनी आत्महत्येचा प्रयत्नही केला. पण 'लहान मुलीचा जीव घेतला तर पाप लागेल' म्हणून मागे फिरल्या. मग पुन्हा भीक मागत पोट भरणं सुरू झालं. त्या गायच्या,


ये ऊन किती कडक तापते

बाई अंगाची फुटते लाही

दोन दिसाचा शिळा तुकडा वाढा

चालेल आम्हा वाढा

दार नका लावू

पुन्हा येणार नाही..


माई दिवसभर भीक मागायच्या आणि रात्री स्टेशनवरच झोपायच्या. पण तिथेही त्यांनी कधी एकटं खाल्लं नाही. स्टेशनवरच्या सगळ्या भिकार्‍यांना बोलावून त्या मिळालेल्या अन्नाचा काला करायच्या आणि मग सर्व भिकारी एकत्र बसून जेवायचे. त्यांनीच माईंना संरक्षण दिले. माईंभोवती ते रिंगण घालून झोपायचे. २१ वर्षांच्या होत्या माई तेव्हा. पण एक दिवस हे संरक्षणही संपले. दोन दिवस काहीच भीक मिळाली नाही. त्यांच्याबरोबर जेवणारे भिकारी त्यांच्यापासून दूर झाल्याचं त्यांना जाणवलं आणि लक्षात आलं की तिथे कायम राहता येणार नाही. वाट फुटेल तिथे माई चालत राहिल्या. आश्रय कुठेच मिळाला नाही. उघड्यावर तर रात्री झोपणं शक्य नव्हतं, म्हणून माईंनी स्मशान गाठलं.

त्या स्मशानातच राहू लागल्या. पण पोटातल्या भुकेचं काय? एक मृतदेह आला. अंत्यसंस्कार झाले. मडकं फुटलं. पण मडक्यात थोडं पाणी तसंच होतं. अंत्यविधी करून लोक निघाले. एखादा पैसा हातावर पडेल म्हणून माई त्यांच्या मागे मागे आशेने चालू लागल्या. एकाला त्यांची दया आली. त्याने त्यांना थोडं पीठ आणि सव्वा रुपया दिला. भिन्न काळोख दाटला होता. चिता अजून धगधगत होती आणि माईंच्या पोटात भूक इतकी पेटली होती की 'दगड चावता आला असता तर दगडही चावून खाल्ला असता.' माईंनी मडक्यातल्या पाण्यात पीठ कालवले, आणि चितेवरच्या निखार्‍यावर भाजले. कडक भाकरी तशीच खाल्ली.


माई काही दिवसांनी तिथूनही बाहेर पडल्या, आणि भीक मागत, काम शोधत चिखलदर्‍याला पोहोचल्या. तिथे रस्ताबांधणीला सुरुवात झाली होती. स्थानिक आदिवासी आणि मध्य प्रदेशातील मजूर तिथे काम करत होते. कंत्राटदाराने माईंना कामावर ठेवण्यास नकार दिला. सकाळ-संध्याकाळ कुटकी (भात), डाळ आणि आठवड्यातून एकदा ताक, या बोलीवर माईंनी तिथल्या मजुरांची मुलं सांभाळण्यास सुरुवात केली. चिखलदर्‍याचं काम संपल्यावर हे मजूर पुण्याला आले, आणि माई त्यांच्याबरोबर निघाल्या.


एकदा असंच पुण्यात कुठेसं रस्त्यावर माईंना एक मुलगा रडत बसलेला दिसला. आपलं नाव 'दिपक गायकवाड' एवढंच त्या मुलाला सांगता येत होतं. आसपासच्या लोकांनाही काहीच माहिती नव्हती. त्या मुलाला घेऊन माई पोलीस स्टेशनात गेल्या तर पोलीसांनी माईंना हाकलून लावलं. माईंनी आठवडा पोलीस स्टेशनबाहेर बसून काढला पण पोलीसांनी तक्रारही नोंदवून घेतली नाही. माईंनीच मग त्या मुलाचा सांभाळ करायचं ठरवलं. पुढे महिनाभरात अशीच २-३ मुलं त्यंना रस्त्यावर भीक मागताना भेटली, आणि माईंनी त्यांनाही आपल्या पदराखाली घेतलं. निराश्रिताचं जगणं किती भयंकर असतं ते त्यांनी अनुभवलं होतं. ते या मुलांच्या वाट्याला येऊ नये, हे त्यांची इच्छा होती. या मुलांमुळे आपल्याही जगण्याला काही अर्थ मिळेल, असं त्यांना वाटलं. पण या मुलांचा सांभाळ करायला पैसा कुठून आणायचा? स्वतःचंच पोट तिथे भरलं जात नव्हतं, आणि आता जोडीला ४ मुलं होती. आणि त्या मुलांनी भीक मागणं माईंना मंजूर नव्हतं.


त्यावेळी भारत-रशिया मैत्री करारावर पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात सह्या होणार होत्या. या ऐतिहासिक करारासाठी मोठा समारंभ योजला होता. कडेकोट बंदोबस्त होता. माईंच्या लक्षात आलं की आपण इथे व्यासपीठावर जाऊन दोन शब्द जर बोलू शकलो तर इथे जमलेल्या हजारो प्रेक्षकांच्या मनांत आपण जागा करू शकू आणि मग आपल्या संकटातून मार्ग निघू शकेल. त्यंनी हळूच सभागृहात प्रवेश केला. झाडूवाली असेल म्हणून कोणीच त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. व्यासपीठावर एक काश्मिरी माणूस आपल्या व्यथा सांगत होता. तो भाषण संपवून खाली उतरताच माईंनी थेट व्यासपीठावरच उडी घेतली. दुसरा वक्ता अजून उठायचा होता. त्याआधी माईंनी सरळ माईक धरला आणि भाषण सुरू केलं. त्यांचा खणखणीत आवाज आणि कविता ऐकून सगळे स्तब्ध झाले. टाळ्यांचा कडकडाट झाला, आणि माईंना जे हवं होतं ते मिळालं. आता त्यांना मदत नक्कीच मिळणार होती.


कार्यक्रम संपला आणि श्री. सुनील दत्त समोर आले. त्यांनी माईंशी हस्तांदोलनच केले. माई थक्क झाल्या. सर्वजण माईंचं कौतुक करत होते, पण त्यांचं तिकडे लक्ष नव्हतं. त्यांना भूक लागली होती. शेवटी त्यांनी हळूच विचारलं, 'खाना है क्या?' कार्यक्रमानंतर आमंत्रितांसाठी बडा खाना मांडलेलाच होता. माई गेल्या आणि त्यांनी पूर्ण ताट भरून अन्न घेतलं. तिथेच जमिनीवर बसून जेवू लागल्या. एवढं ताटभर अन्न त्यांनी आयुष्यात पहिल्यांदाच बघितलं होतं.


त्या जेवत असतानाच दगडूशेठ हलवाई मंदिर समितीचे तात्यासाहेब गोडसे तिथे आले आणि त्यांची विचारपूस केली. तात्यासाहेबांनी माईंच्या मुलीला, ममताला, सांभाळण्याची तयारी दाखवली, आणि ममता पुण्याच्या सेवासदनमध्ये दाखल झाली. त्याच कार्यक्रमात आकाशवाणीचे यशवंत खरातही होते. माईंचा खडा आवाज त्यांनी ऐकला होताच. त्यांनी माईंना आकाशवाणीवर कार्यक्रम करायला माईंना आमंत्रण दिलं. त्या मुलांना बरोबर घेऊन मुंबईला निघाल्या. पण स्वतःच्या मुलीला माईंनी दुसर्‍यांना सांभाळायला का दिलं?


माई सांगतात, "रस्त्यावर बेवारस सोडलेली मुलं माझ्याकडे सांभाळायला होती. मी जे काही सोसलं होतं त्यानंतर माझा हा मार्ग मी निश्चित केला होता. माझ्या मुलीला मी त्यांच्याबरोबर सहज सांभाळू शकले असते. पण एखाद्या दिवशी मुलांना उपाशी राहण्याची वेळ आली असती तर? मी काय केलं असतं? ज्या मुलांना मी सांभाळणार होते, ती मुलं तशीच पाणी पिऊन झोपली असती. पण माझी मुलगी त्यांच्याबरोबर असती तर माझी माया जागृत झाली असती. तिला मी अंधारात नेऊन गुपचूप दोन घास खाऊ घातले नसते का? मला अन्याय करायचा नव्हता. म्हणूनच मी मुलीला दगडूशेठ गणपतीच्या पायाशी घातले आणि पुढे निघाले. माझ्यातली आई चुकली असती तर मग माझ्याच्याने इतर मुलांचा सांभाळ झाला नसता."


आकाशवाणीवर गाऊन माईंना ३५० रु. महिना मिळू लागले. दूरदर्शनवरही त्यांच्या गाण्याचे २ कार्यक्रम झाले, आणि जमा झालेले पैसे घेऊन माई चिखलदर्‍याला परतल्या. एक झोपडी बांधून त्यांनी आपला आश्रम थाटला. हळूहळू मुलांची संख्या वाढू लागली. रस्त्यावर सापडलेली, कचराकुंडीत फेकलेली, अनाथ झालेली मुलं माईंनी आपली मानून चिखलदर्‍याला आणली.


त्याचवेळी महाराष्ट्र-मध्य प्रदेशाच्या सीमेवरील मेळघाटच्या जंगलात व्याघ्र प्रकल्पासाठी स्थाननिश्चिती होत होती. या प्रकल्पासाठी जंगलातील ८४ गावांतील आदिवासी निर्वासित होणार होते, आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी शासनाकडे कोणतीही योजना नव्हती. माईंनी या आदिवासींची बाजू शासनासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. कोणीच लक्ष देत नाही, हे पाहून जिल्हाधिकार्‍यांच्या कार्यालयावर २-३ मोर्चेही नेले. तेव्हाचे वनमंत्री छेडीलाल गुप्ता यांच्या कानावर हा प्रकार गेला, आणि त्यांनी आदिवासींचे पुनर्वसन झाल्याशिवाय व्याघ्र प्रकल्प सुरू होणार नाही, असं आश्वासन माईंना दिलं. अजून एक लढाई माई जिंकल्या, पण अशा अनेक लढाया त्यांना रोजच लढाव्या लागत होत्या.


चिखलदर्‍याचा परिसर ख्रिश्चन मिशनर्‍यांनी व्यापला आहे. माईंचं अनाथालय त्यांना त्या परिसरात नको होतं. त्यांनी माईंवर अनेकदा दबाव आणला. 'तुझी मुलं आम्हाला दे, आम्ही तुला पैसे देतो', म्हणून अनेकदा त्यांच्याकडून निरोप आला. मेळघाटच्या जंगलात मजा करायला येणार्‍या राजकारण्यांसाठी बंगल्यावर मुली धाडाण्यास दडपण आणलं गेलं. मात्र ही मुलं हिसकावून घ्यायचा प्रयत्न झाला, तेव्हा माई अक्षरशः चवताळून उठल्या. अमरावतीपासून ते थेट दिल्लीपर्यंत माईंनी तक्रारी केल्या, पण उपयोग शून्य. पण एवढं होऊनही माई चिखलदर्‍यातून पळ काढत नाही, हे पाहून मिशनर्‍यांच्या गुंडांनी माईंवर हल्ला केला. एका महिन्यातच दोन हल्ले झाले. माई तरीही बधल्या नाहीत. मुंबईला निघाल्या असता त्यांच्यावर तिसरा हल्ला झाला, आणि त्यात त्या जबर जखमी झाल्या. त्यानंतर मात्र माईंनी त्या परिसरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.


माईंचा पहिला मुलगा दिपक त्यांना पुण्याला सापडला होता. माईंच्या एका मुलाखतीत दिपकचा उल्लेख वाचून सासवडहून कोणी त्याचे नातेवाईक त्याचा शोध घेत चिखलदर्‍यास आले. दिपकच्या आजोबांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी थोडी जमीन आपल्या बेपत्ता, अनाथ नातवासाठी ठेवली होती. दिपकने आता आपल्या गावी परत जावं, अशी त्या नातेवाईकांची आणि माईंची इच्छा होती. पण दिपकने नकार दिला. माईंनीच त्याला वाढवलं होतं, आणि त्यांना सोडून कुठेही जाण्याची त्याची तयारी नव्हती. मात्र मिशनर्‍यांनी केलेल्या हल्ल्यानंतर दिपक, माई आणि अनाथाश्रमातील मुलांसकट चिखलदर्‍यातून बाहेर पडला. आणि कुंभारवळण या सासवडजवळ असलेल्या गावात, आजोबांनी नावे करून दिलेल्या जमिनीवर 'ममता बाल सदन' उभं राहिलं.


आज महाराष्ट्रात माईंचे चार अनाथाश्रम आहेत. १०४२ मुलं तिथे राहतात. काही वर्षांपूर्वी माई चिखलदर्‍यास परतल्या, आणि तिथे मुलींचं वसतीगृह सुरू केलं. आज १०० मुली तिथे राहून शिक्षण घेतात. माईंना आज सुमारे १५०० मुलं आहेत. दोन दिवसाच्या मुलापासून ७२ वर्षांच्या वृद्धांपर्यंत सगळीच त्यांची मुलं. विधवा, परित्यक्ता, मनोरुग्ण या त्यांच्या लेकी. माईंच्या मुलींचं आडनाव साठे, तर मुलांचं आडनाव सपकाळ असतं. माईंना ४०० सुना आणि २०० जावई आहेत. बरीचशी मुलं शिकून स्वतःच्या पायावर उभी आहेत. 'माझी मुलं डॉक्टर, वकील, शिक्षक आहेत', हे सांगताना त्यांचा चेहरा फुलून येतो. मागे एकदा माईंकडे गेलो होतो, तर 'माझी मुलगी M.Phil झाली' असं म्हणून माईंनी पेढे दिले. माईंच्या मुलांची, नातवंडांची लग्नं, बारशी तर नेहमीचीच असतात. शिकून, नोकरीला लागून मुलं दूर गेली, तरी माईंच्या ओढीनं ती परत येतात. माईंशिवाय आयुष्य जगणं, त्यांच्यासाठी संभवत नाही.

याशिवाय वर्धा जिल्ह्यात एक वृद्धाश्रम, गोरक्षण केंद्र आणि परित्यक्तांसाठी चिखलदर्‍याला वसतीगृह माईंनी सुरू केलं आहे. त्या सांगतात,

"सर्वांनी, जन्मदात्या आईनंही पाठ फिरवली तेव्हा गोठ्यातल्या गाईनं मला संरक्षण दिलं. म्हणून मी गायीलाच माझी माय मानलं. तुझ्या ऋणातून उतराई होईन, असं मी तिला वचन दिलंय." वर्ध्याच्या गोरक्षण केंद्राच्या रूपानं माईंनी आपलं वचन पाळलं. आज रस्त्यावर सोडलेल्या भाकड गायींचा, कावळ्यांनी डोळे फोडून जखमी केलेल्या गायींचा सांभाळ या केंद्रात केला जातो. ३० वर्षं राज्यभर हिंडून, भीक मागून, भाषणं करून, कविता म्हणून माईंनी त्यांचा हा संसार उभा केला आहे.


गाण्यानं, कवितेनं माईंना जगवलं, आणि आजही कविताच त्यांचा आधार आहे. बहिणाबाई, सुरेश भटांच्या कवितांचं ऋण त्या मान्य करतात. 'या साहित्यिकांनी मला दु:खातून बाहेर काढलं आणि सांगितलं, व्रण जपत रहा, गात रहा, पुढे जात रहा. साहित्य माणसाच्या पायात बळ देतं, जखमा पुसतं, बेभान करतं, उन्मत्त करतं. कवितांमुळेच माझ्या वेदना मी विसरू शकले', असं माई नेहमी सांगतात. त्या स्वतः उत्तम कवयित्री आहेत. त्यांच्या कवितेतही ही वेदना असते. "वेदनेशिवाय कविता निर्माण होत नसते. वेदनेतून निर्माण झालेली कविता काळजाशी नातं जोडते", माई सांगतात


माईंनी आता साठी ओलांडली आहे. दिपक आणि ममता ही त्यांची मुलं त्यांचं बरचसं काम आता सांभाळतात. ममताने MSW केलं आहे. 'सख्खी आई जिवंत असताना अनाथाश्रमात नेऊन टाकलं, आणि इतरांच्या मुलांना सांभाळलं', म्हणून आपली मुलगी आपल्याला बोल लावेल, याची माईंना सतत भीती वाटत असे. पण ममताला आपल्या आईने केलेल्या त्यागाचं मोल ठाऊक आहे. माईंनी उभ्या केलेल्या पसार्‍याचा तिला प्रचंड अभिमान आहे.


ममताप्रमाणेच आपल्या इतर मुलींनी शिकावं म्हणून माई झटत असतात. 'स्त्री कधीही हरणार नाही. कारण तिला वेदना म्हणजे काय, ते ठाऊक असतं. विदर्भात इतक्या शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. पण एकातरी शेतकर्‍याच्या बायकोनं आत्महत्या केल्याचं कधी ऐकलं आहे? ती कधीही या जगातून पळ काढणार नाही. कारण स्त्रीची वेदना तिला जगायला शिकवते. स्त्रीचं आयुष्य कसं? मंदिरात ठेवाल तर नंदादीप, मुठीत धराल तर आग. पण तरीही स्त्रीच कायम वेठीस धरली जाते. रमाबाई, पुतळाबाईंपासून ते रूपकंवरपर्यंत असंख्य स्त्रिया सती गेल्या. समाजात आजवर एक तरी 'सत्या' झाला आहे का?' विलक्षण नाट्यमय आयुष्य जगलेल्या माई 'वेदनांची कीव करून त्यांचा पराजय कसा करायचा', हे असं सहजपणे सांगून जातात. 'चिखल आणि पाण्याचं जे नातं, ते दु:खाचं माझ्याशी आहे. या चिखलातच, म्हणजे ओल्या मातीतच बीज अंकुरतं. पण असा ओलावा मला कधीच मिळाला नाही. मी खडकावरच रुजले. पण म्हणून माझी मुळं पक्की, चिवट आहेत. मी कधीच मोडून पडणार नाही.'


माईंनी केलेल्या संघर्षाची पावती म्हणून त्यांना आजवर १७२ पुरस्कार मिळाले आहेत. पण ज्यांच्यामुळे आणि ज्यांच्यासाठी बेघर व्हावं लागलं, त्या पिंपरीमधीच्या गावकर्‍यांनी माईंचं कौतुक केलं, आणि त्यांना आश्चर्यच वाटलं. माईंनी छेडलेल्या आंदोलनामुळेच आज गावकर्‍यांना शेणासाठी महिना हजार रुपये तरी मिळतात. आपल्या गावातील एक स्त्रीने देशात नाव काढलंय, याचा त्या गावकर्‍यांना अभिमान आहे. 'जो गाव माझ्यावर थुंकला, तोच गाव माझ्या नावाने आज जयजयकार करतो. माझं नाव झाल्यावर माझे पतीही माझ्याकडे आले. त्यांना सांभाळणारं कोणीच नव्हतं. मी त्यांना सांगितलं की मी तुमची आई होऊ शकेन, पत्नी मात्र कधीही नाही. पटत असेल तर रहा. माझ्या आश्रमातली मुलं त्यांचा नीट सांभाळ करतात'.


'हे निखारे मी स्वतःहून पदरात बांधून घेतले आहेत. जिवंत असेपर्यंत मी त्यांची राख होऊ देणार नाही,' असं म्हणत न थकता माई काम करत असतात. कसल्यातरी विवंचना सतत असतातच. जिंतूरचे एक डॉक्टर गेल्या महिन्यात माईंकडे एका १० वर्षाच्या मुलाला घेऊन आले. या मुलाच्या हृदयात दोष आहे. डॉक्टरांना तो रस्त्यावर भीक मागताना सापडला. त्यांनी त्याला माईंकडे आणून सोडलं. परवा माईंकडे गेलो तेव्हा या लहानग्याला भेटलो. निलेश त्याचं नाव. अतिशय तल्लख. अफाट स्मरणशक्तीचा धनी. आणि तितकाच समजूतदार. योग्य उपचार झाले नाहीत, तर तो फार जगेल असं डॉक्टरांना वाटत नाही. उपचारांसाठी लाख-दोन लाख रुपये कुठून आणायचे, याच चिंतेत आता माई आहेत.


'मला १७२ पुरस्कार मिळाले. पण ते पुरस्कार खाऊन पोट भरत नाही'. म्हणून माई आजही लोकांसमोर पदर पसरतात. चारपैकी एकाच अनाथाश्रमाला सरकारी अनुदान मिळतं. सात-आठशे मुलांच्या खर्चाची तजवीज करताना माईंची दमछाक होते. 'गाना नही तो खाना नही, भाषण नही तो राशन नही', असं म्हणत, आपल्या मुलांना दोन वेळ जेवायला मिळावं म्हणून त्या महाराष्ट्रभर हिंडत असतात.

माईंनी अनाथ मुलं वाढवली, त्यांच्या अनाथपणाची जाणीव न होऊ देता त्यांना वाढवलं, मोठं केलं, शिक्षण दिलं, जगण्याची प्रेरणा दिली. पण सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे माईंनी त्या मुलांना या समाजात मानाचं स्थान मिळवून दिलं. 'निराश्रित', 'बेवारस' असा शिक्का त्यांच्यावर बसू दिला नाही. या मुलांनाही त्याची जाण आहे. आपल्याला जे प्रेम मिळालं, तेच इतरांनाही मिळावं, म्हणून त्यांची धडपड सुरू असते. 'देवा, आम्हांला हसायला शिकव. परंतु आम्ही कधी रडलो होतो, याचा विसर पडू देऊ नकोस', हे माईंनी त्यांना शिकवलं आहे.


माईंच्या पायात अजून चप्पल नाही. कोणी पाच रुपये दिले की आजही त्यांना तितकाच आनंद होतो. माईंची वणवण आजही सुरू आहे. पदर पसरून त्या गात असतात,


निखार्‍यावरी दुर्दैवाच्या, पडली चिमणी पिलं,

कवटाळूनी हृदयासी त्यांना मी आईचं प्रेम दिलं,

सदा भुकेचा कहर माजला, अन्न मिळाले कधी,

चार घास मागाया आले, तुमच्या दारामधी





Tuesday, 7 December 2021

काळ्या मातीतल्या स्त्रिया !



'सारी उम्र हम मर मर के जी लिये… एक पल तो अब हमें जिने दो, जिने दो' असं म्हणणाऱ्या विद्यार्थ्यांना 'When your passion becomes your profession, you will be able to lead up to excellence in life - Follow your Passion' हे सांगून प्रोत्साहन देणारा 'थ्री इडियट' चा रँछो (रणछोडदास) आठवतो का ? एखाद्या ध्येयाने पछाडलेली माणसं इतिहास बदलू शकेल असं कर्तृत्व करून दाखवतात आणि एखाद्या छंदाने वेडी झालेली माणसं प्रत्यक्ष इतिहास घडवून दाखवतात हे नुकतच पार पडलेल्या पद्म पुरस्कार प्राप्त सन्मानार्थींची यादी पहिली की लक्षात येते... त्यातही ती स्त्री असेल तर ? ही एक विशेषच बाब ठरते.


आपल्याला ज्या-ज्या गोष्टी आवडतात, आपण ज्यात रमतो.. पॅशन वगैरे म्हणतात तसे काहीसे विना रोकटोक करायला मिळणे ह्याला नशीब लागतं.. अनेकदा तर जे करायला आवडतं ते करायला काही माणसं आयुष्याच्या अनेक अग्निपरीक्षा देतात, अनेक दिव्यातून प्रवास करतात, कष्ट उपसतात, अवहेलना सहन करतात, तरी अखंड मार्गक्रमण करीत राहतात आणि म्हणून त्या त्या गोष्टीत कौशल्य प्राप्त करतात. एक दिवस उगवतो कोणीतरी ह्याची दखल घेतो आणि त्यांच्या चिकाटीने केलेल्या कामाला मग प्रतिष्ठाही प्राप्त होते. असं होत असेल तर किती आनंद आहे.. नाही ? पण आजच्या धावपळीच्या जीवनात आपल्या 'पॅशन' जोपासायला, त्यातून आनंद घ्यायचा निवांतपणा आहे कोणाला ? आधी पोटापाण्याचा प्रश्न सोडवायचा असतो जो कधीच सुटत नाही आणि आयुष्यभर मनातल्या इच्छा मनातच विरून जातात.आयुष्यात काही गोष्टी फार उशिरा कळतात, अगदी आपल्या स्वतःच्या बाबतीतल्याही. कधीकधी त्या कळतातही पण पोटापाण्यासाठीच्या गरजेपोटी पैशांच्या मागे धावायच्या स्पर्धेत आपण इतके अडकतो कि, पोटाच्या भूकेपेक्षाही मनाची भूक खूप खोल आणि मोठी असते ह्याचा थांबून कधी विचारच करत नाही. पोटाची खळगी भरेल एवढं दोन वेळचं जेवण मिळालं कि झालं...ते भागतं कसंही,कुठेही, पण मनाची खळगी मात्र इतकी सहज भरत नाही. वास्तविक जगण्यासाठी अंतर्मनाचं समाधान,आत्म्याची तृप्ती जास्त महत्वाची हे कित्येकांना शेवटपर्यंत कळतंच नाही. आपल्याला आवडतात त्या गोष्टी पूर्ण वेळ करायला मिळणे, त्या अनुषंगाने समाजहित घडवता येणे, त्याबदल्यात उदरनिर्वाहापुरता मोबदला आणि खंडीभरून समाधान मिळणार असेल तर क्या बात है .. हे कुणाला नको असेल?


याच महिन्यात देशातील प्रतिष्ठेचे पद्म पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते राजधानी दिल्लीत वितरण करण्यात आले. यंदा सात मान्यवरांचा 'पद्म विभूषण', १० मान्यवरांचा 'पद्मभूषण' आणि १०२ जणांचा 'पद्मश्री' पुरस्काराने गौरव करण्यात आला. १६ जणांना मरणोत्तर 'पद्म पुरस्कार' प्रदान करण्यात आला. यंदाचे पद्म पुरस्कार हे नामवंतांचे पुरस्कार नसून ते सामान्य जनतेचे पुरस्कार आहेत अशी चर्चा आहे, ही चर्चा घडण्यामागे मुख्यत्वाने काही मानकरी कारणीभूत ठरले आहेत. यात बहुचर्चित ठरलेल्या अशाच काही ध्येयवेड्या-छंदवेड्या महिलांबद्दल आवर्जून सांगावं वाटतंय.


विपुलतेतही काहीतरी चांगले करण्याची इच्छाशक्तीच नसणारी 'मी' पुरते गुरफटून जगणारी माणसे आपण पहिली आहेत. प्रचंड अभावात जगूनही जवळ आहे ते समाजहितासाठी लुटून देण्याची ही वृत्ती म्हणूनच वाखाणण्यासारखी आहे. शिक्षणाच्या फारश्या संधी उपलब्ध नसताना स्वतःच्या हट्टावर जमेल तेवढे शिक्षण घेतलेल्या, ते अपुरे आहे म्हणून निराश न होता उपलब्ध साधनांतून आवडत्या क्षेत्राचे पूर्ण ज्ञान मिळवून ते समाजासाठी उपयोगात आणणे हे दिसते तेवढे सोपे असणे शक्य नाही, त्यासाठी प्रचंड मनोबल वापरून संघर्ष या महिलांनी केला आहे. आदिवासी मागासलेल्या जमातीत जन्म घेऊन उदर्निर्वाहापुरते जंगल हुंदळत मळलेली वाटच चोखाळत जगने त्यांच्यासाठी अधिक सोयीचे ठरले असते कदाचित. भोवतालची माणसे अशिक्षित, बाहेरच्या जगाचा फारसा स्पर्श नसणारी मागासलेली असताना आपल्या कार्याचे महत्व त्यांना समजावत किंवा त्यांच्या विरोधाला न जुमानता, लढा देत अनेक दशके तत्वांवर कायम राहत अविरत मार्गक्रमण करत राहणे.. या प्रवासात येणाऱ्या अनेक आर्थिक, सामाजिक, शारीरिक, मानसिक संकटांना-अडचणींना तोंड देत, मागे सारत न डगमगता कार्य करत राहणाऱ्या या महिलांच्या धैर्याचे आणि चिकाटीचे म्हणूनच कौतुक करावे तेवढे कमीच आहे.


या महिलांना पाहून पहिल्या भेटीत त्या वेड्या, अवलिया वाटण्याचीच शक्यता जास्त. या सगळ्या निसर्ग प्रेमात आकंठ बुडालेल्या आणि त्या अनुषंगाने आपापल्या छंदांना वाहून घेतलेलया, स्वतःच्या नियमांवर पॅशनेटली जगणाऱ्या स्त्रिया. यांची नैसर्गिक जडणघडणदेखिल निसर्गाला वाहिलेली. निसर्गातूनच घेऊन निसर्गालाच समर्पित करणाऱ्या पण ते करण्याआधी अनेकांचे भले करणाऱ्या या महिला नेमक्या आहेत तरी कोण?



१. वनमुतशी लक्ष्मी

तिला लोकं ''वनमुतशी'' म्हणजे 'जंगलातली मोठी आई' म्हणून ओळखतात, तिला दुसऱ्या बाजूने अनेकजण 'जहर निवारक' असेही संबोधतात. तिचे खरे नाव मात्र लक्ष्मी कुट्टी आहे. लक्ष्मी ७५ वर्ष वयाच्या आहेत. त्या तिरुअनंतपुरममधील कल्लर जंगलात असलेल्या आदिवासी गावात ताडाच्या पानांनी झाकलेल्या एका छोट्या झोपडीत राहतात. लक्ष्मी एक आदिवासी महिला आहे जी डिटॉक्सिफायर (विष उतारवणाऱ्या वैद्य) असण्यासोबतच केरळ फोकलोर अकादमीमध्ये शिक्षिका आणि कवयित्रीदेखिल आहेत. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना ५०० हून अधिक जडीबुटीच्या औषधांचे सूत्र माहिती आहे. कुठेही लिखित स्वरूपात नसलेल्या या औषधींच्या माध्यमाने अनेक वर्षांपासून फक्त आठवणींच्या आधारे त्या विष भिनलेल्या मरणासन्न रुग्णांवरदेखिल उपचार करतात आणि त्यांचे उपचार रामबाण ठरतात. त्यांच्या छोट्या झोपडीभोवती त्यांनी विविध वनौषधी लावल्या आहेत. जंगलातील औषधांनी विष काढण्यासाठी लांबून शेकडो लोक लक्ष्मी कुट्टी यांच्याकडे पोचतात. परंतु त्यांची उपचारपद्धती केवळ औषधांपुरती मर्यादित नाही, तर त्या रुग्णांशी अत्यंत मायेने आणि नम्रतेने तासनतास बोलतात आणि शरीरासोबतच मनावरही सकारात्मक उपचार करतात.


1950 च्या दशकात तिच्या परिसरातून शाळेत जाणारी ती एकमेव आदिवासी मुलगी होती. गावातील आणखी दोन मुलांबरोबर १० किलोमीटरपर्यंत चालत जावे लागे. गावातून घरून विरोध असतानाही जिद्दीने आणि चिकाटीने त्यांनी आठवी इयत्तापर्यंतचे शिक्षण घेतले. पुढे शिक्षण बंद झाले कारण त्यापुढे शिक्षणासाठी शहरात जावे लागणार होते. वनस्पती औषधींचे सर्व ज्ञान मात्र त्यांना गावात दाई म्हणून काम करणाऱ्या आईकडून मिळाले. लक्ष्मी कुट्टी आणि तिची आई या दोघींनीही हे ज्ञान कधीही लिखित स्वरूपात मांडले नसल्याने केरळ वन विभागाने त्यांच्या ज्ञानावर आधारित एक पुस्तक तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचे योगदान या भूमिकेपुरते मर्यादित नाही. दक्षिण भारतातील अनेक संस्थांमध्ये त्यांनी निसर्गोपचाराबद्दल भाषणे दिली आहेत. देशविदेशाचा प्रवासदेखिल केला आहे; मात्र त्यांचे मन त्यांच्या जंगलातल्या छोट्याशा झोपडीतच रमते. लक्ष्मी कुट्टी यांचे स्वप्न आहे की एके दिवशी त्यांची ही झोपडी एक छोटेसे रुग्णालय व्हावे, जिथे लोक दीर्घकालीन उपचारांसाठी येऊ शकतील.


पण निसर्गोपचाराच्या पलिकडे, लक्ष्मी कुट्टी त्यांच्या व्यंगात्मक कविता आणि लेखनासाठीदेखिल ओळखल्या जातात. त्यांनी आदिवासी संस्कृती आणि जंगलाचे वर्णन अशा विविध विषयांवर अनेक लेख लिहिले आहेत जे डीसी बुक्सने प्रकाशित केले आहेत. त्यांच्या कविता समरसून वाचता येतात. त्याचा शब्दसंग्रह सोपा आहे, जो कोणीही गाऊ शकतो.


२. बीजमाता राहीबाई

दुसऱ्या पद्म पुरस्कारार्थी महिला आहेत देशी वाणांचे संवर्धन करणाऱ्या बीजमाता राहीबाई पोपेरे. राहीबाईंना पद्म पुरस्कार मिळाला तेव्हा राष्ट्रपती कोविंद त्यांना म्हणाले होते ''तुम्हाला काळ्या मातीच्या सेवेसाठी हा पुरस्कार मिळाला आहे. तुमच्या कार्याला सलाम''. नारीशक्ती पुरस्काराच्या वेळेस पंतप्रधान मोदींनीदेखिल तोंडभरून कौतुक केले. ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकरांनी एका कार्यक्रमात त्यांचा 'सीड मदर' म्हणजेच 'बीजमाता' असा उल्लेख केला आणि त्या 'बीजमाता' म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. आपण शहरात राहणाऱ्या माणसांना बँक म्हटले कि आठवते ती पैशांची बँक. पण पैशांपेक्षाही महत्त्वांचे काहीतरी असते आणि ते जतन केले पाहिजे असे शहरातील माणसांच्या ध्यानीही येणार नाही. हे महत्त्वाचे जे काही आहे ते जतन व संवर्धन करण्याचं काम राहीबाई ह्यांनी केलं. त्यांच्याच मातीच्या घरावर काही पत्रं टाकून त्यांनी आपली बॅंक उभी केली आहे. राहीबाईंच्या बँकेत आदिवासी परंपरेने जपलेल्या ५५ पिकांचे ११४ गावरान वाण आहेत. आपण ज्या पिकांबद्दल कधी ऐकलंही नाही त्या पिकाचं वाण त्यांनी पारंपरिक पद्धतीनं जतन करून ठेवलं आहे. देशी वाणांचं जतन आणि संवर्धन करणाऱ्या राहीबाई पोपेरे यांना 'बीबीसीच्या १०० वुमन' यादीतसुद्धा स्थान मिळाले आहे. पारंपरिक पिकांचे शेकडो देशी वाण जतन करण्यासाठी राहीबाई यांनी मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे शाश्वत शेतीला मोठं वरदान तर मिळतेच आहे पण त्यांच्यासारख्या माणसांमुळे भविष्याबद्दलही दिलासा वाटू लागला आहे. एवढेच नाहीतर त्यांनी तीन हजार स्त्रिया व शेतकरी यांचा बचतगट बनवलाय. त्यांच्या मार्फत या भाज्या अस्सल गावठी व संपूर्ण सेंद्रीय पद्धतीने पिकवल्या जातात व त्यांचे बियाणे मडक्यात जतन केले जाते. हे पारंपारिक चविष्ट व नैसर्गिक बियाणे मूळ नैसर्गिक स्वरूपात जगात कोणत्याही कंपनीकडे नाही.


३. वनदेवी तुलसी गौडा

त्या जंगल संगिनी आहेत. त्यांना जंगलाची भाषा समजते.. त्या जंगलाशी अखंड संवाद साधू शकतात. त्या पद्म पुरस्कार स्वीकारायला तशाच जुनाट पारंपरिक पोशाखात, अनवाणी पायाने दाखल झाल्या आणि चक्क पंतप्रधानांनी त्यांना प्रणाम केला. हा व्हिडीओ झपाट्याने सोशल मीडियावर वायरल झाला आणि 'कोण त्या?' असा प्रश्न सर्वत्र दुमदुमू लागला. कोण होत्या त्या? त्या होत्या कर्नाटकातल्या होनाली या गावात राहणाऱ्या पर्यावरणतज्ज्ञ 'वनदेवी' नावाने परिचित असलेल्या प्रसिद्ध तुलसी गौडा. 'इन्सायक्लोपीडिया ऑफ फॉरेस्ट' म्हणजेच ''वनांचा विश्वकोश'' अशी त्यांची ओळख. कर्नाटकातल्या हलक्की या आदिवासी जमातीशी त्यांचा जन्माचा संबंध. या समाजाला वनस्पती आणि त्यांच्या विविध गुणांबद्दल कमालीचे ज्ञान असतं, असे म्हणतात. त्यात एरवी अशिक्षित असणाऱ्या तुलसी ह्यांनी विशेष ज्ञान प्राप्त करून त्याचा उपयोग सामाजिक हिताच्या दृष्टीने त्या गेली अनेक वर्ष करीत आहेत.



तुलसी गौडा आज ७२ वर्षांच्या आहेत, त्या दोन वर्षांच्या असताना त्यांचे वडील वारले. घरात प्रचंड गरिबी. संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाहच जंगलाच्या भरवशावर. थोडेफार पैसे कमवायला आई नोकरीवर जात असे, ती नोकरीपण नर्सरीची होती. सतत निसर्गाच्या सान्निध्यात आणि वनस्पतीच्या संगोपनात राहिल्याने वयाच्या १२ व्या वर्षापासूनच त्यांनी या कार्याला सुरुवात केली होती. गेली सहा दशके त्या पर्यावरणासाठी अविरत झटतात आहेत. आजवर त्यांनी ३० हजारांहून अधिक पर्यावरणपूरक आणि समाजोपयोगी, औषध गुणांनी युक्त झाडे लावलीत. त्यांचे संगोपनही केले. झाडांच्या प्रत्येक भागाचा सखोल परिचय, गुणवत्तेची माहिती त्यांना आहे. या झाडांच्या रोपट्यांपासून ते बियांपर्यंत संगोपन, लागवड आणि जतन करण्याचे कार्य त्या करतात. एवढेच नाही तर तुलसी गौडा त्यांच्या आदिवासी गावातील महिलांच्या अन्यायासाठी देखील त्यांच्या पाठिशी उभ्या राहतात, लढा देतात.



हे अख्खं व्यापलेलं क्षीतिज, निसर्ग, त्यातील जीवजंतू यांच्या प्रेमात पडून त्यांचा ध्यास घेत त्यांच्या शोधात बाहेर पडलेल्या, निसर्गात राहणाऱ्या अनेक भटक्यांबद्दल मला फार आदर वाटतो. यांच्या पायाला भिंगरी असल्याने ह्यांनी आयुष्यभर मुशाफिरी करून गोळा केलेलं दुनियाभराचं ज्ञान आणि दर्शन आपण बसल्या जागी घेऊ शकतो. आजही असेच अनेक भटके आपला सुखा-समाधानातला जीव धोक्यात टाकत कुठल्या तरी विषयाचा ध्यास घेत जगभर फिरत आहेत आणि लाखमोलाचं दान आपल्या झोळीत घालत आहेत.. म्हणून तर पुढल्या पिढीच्या वाट्याला शुद्धतेचं वाण पडण्याची शाश्वती वाटते.. नाही ?

अशा जगावेगळ्या मातीतल्या माणसांचा शोध घेऊन त्यांना देशातील सर्वोत्तम पुरस्काराचे मानकरी बनवणे हा देशाचाच तर सन्मान आहे...!



- रश्मी पदवाड-मदनकर  

(27/11/2021 महाराष्ट्र टाईम्सला (आॅल एडीशन) प्रकाशित लेख..)



 हल्ली मी लिहित नाही तुझ्यावर काही 

उल्लेख तुझा ... हवाय कशाला ?? 


पूर्वी असायचा कवितेतल्या प्रत्येक ओळीत 

शब्दाशब्दा मागे छुप्या भावनेच्या खोलात

अलगद हसून केलेला तुझा उल्लेख… 


पण तेव्हा त्या ओळीत असूनही कुठे असायचास तू ?  

अन आज कुठेच नसतोस … तरीही असतोच ना ?

  

उर्दू गझलेच्या काही शब्दांचे अर्थ संदर्भकोशातून शोधावे,  

नाहीच मिळाले तर जुळवून घ्यावा अर्थ लागतो तसा .. 

तसेच काहीसे … 


तसेच काहीसे … 


तुझ्या असण्याचे अन नसण्याचे संदर्भ 

शोधूनही लागत नाही हल्ली… 


संवेदना जाणवत राहतात …. फक्त 


अन त्या संवेदनांचा न लागलेला अर्थ 

शोधत राहते मग मी … प्रत्येक ओळीत 

आणि म्हणूनच … 


जाणून असणाऱ्या या संवेदनांचा 

उल्लेख करायचे सोडून दिलेय मी 


कळतंय का ? 

हल्ली लिहित नाही मी तुझ्यावर काही …


रश्मी पदवाड मदनकर

Thursday, 30 September 2021

विस्मृतीचा शाप ...

 विस्मृतीचा शाप ... 


अंधारलेल्या एखाद्या बोगद्यात शिरावे 

आणि एक एक पाऊल पुढे चालताना 

घूप्प अंधार गवसत रहावा ... 

आकाश, जमीन, प्रकाश 

आणि सजीवांचे भास-आभास 

सगळंच दूर-दूर पुसट होत, 

ठिपका होत नाहीसे होईपर्यंत येऊन पोचावे .. 


नाव, गाव ओळख मिटू लागावी, 

भूत, वर्तमान भविष्याचा संदर्भच कळू नये 

माणसांच्या भेटण्याच्या, त्यांच्या निघून जाण्याच्या,  

घट्ट झालेल्या नात्यांच्या, निसटलेल्या हातांच्या कथा, 

कणकण आनंद, क्षणक्षण दुःखाच्या व्यथा.. आणि

या सर्वात धडपडत तगून-जगून दाखवण्याच्या निष्ठुर प्रथा ..बाष्प होऊन उडून जाव्यात  ..


 रंग, गंध, दृष्टी, स्पर्शाच्या पलिकडे कुठेतरी

वैचारिक, बौद्धिक- मानसिक आंदोलनं

गहिवरलेली स्पंदनं ... विरावीत 

इच्छा-आकांक्षा,अपेक्षांची वाफ व्हावी.  


अनोळखी होत जावे सारे,

आपण चालत रहावे...


अंधाराच्या पटलावर पुढे चमकताना दिसेल काहीतरी

धाव घेऊ नये मृगजळ असेल ते ..


काळाकभिन्न परिसर, फसव्या दिशा 

अनिश्चित अंतरे, अनाकलनीय स्थिती 

अनासक्त प्रवास ... आणि 

अनवट भिवतीच्या अंधार वाटा .. 


कुठे घेऊन जातील... ?


बोगदा अनादी नसतो तसा अनंतही नसतो..

अफाट नसतो आणि अथांगही नसतो .. 

आपण चालत राहावे ... 

प्रकाशाचे किरण चमकून शेवटचे टोक गाठेपर्यंत

आकाश, जमीन, वारा, गवताची हिरवी गार कुरणं 

आणि सजीवांचे भास-आभास परत मिळवेपर्यंत 


पुन्हा गाणी स्फुरेपर्यंत, पुन्हा सूर फुटेपर्यंत 

चालत राहावे .. अनिमिष .. 


बोगद्यातून बाहेर पडलो की मात्र ..  


मन निष्ठूर अन बुद्धी निबर होण्याआत 

भावनांचा चोळामोळा अन संवेदनांचा पाचोळा होण्याआत..


मागून घ्यावा बोगद्यातील भोगकाळाला 'विस्मृतीचा शाप' ... 


© रश्मी पदवाड मदनकर




Tuesday, 28 September 2021

२ विरोधाभासी अनुभव -


आमच्या ऑफिसजवळ म्हणजे दीक्षाभूमीच्या समोरच्या रस्त्याचे काम गेले अनेक महिने चालू आहे. ऑफिसच्या अगदी शेजारी फुटपाथवर याच रस्त्यासाठी लागणाऱ्या मटेरिअलची थप्पी ठेवलेली असायची. त्याचाच वापर करून छोटीशी अगदी एकमाणूस नीट उभेही राहू शकणार नाही इतक्या उंचीलांबीरूंदीची झोपडी बांधून एक महिला तिथे राहत असल्याचे लक्षात आले.. पुढे आणखी काही दिवसात दीक्षाभूमीच्या पुढल्या भागाला थोडं समोर गेल्यावर तशीच रस्त्याला लागणाऱ्या ब्लॉकचा उपयोग करून दुसरी झोपडी बनलेली दिसली. आधी असा समज झाला की यात राहणारे ती बाई आणि हा इसम रस्त्यासाठी काम करणारे कामगार असतील.. कामगार असले तरी इतक्याश्या जागेत हे राहत कसे असतील ही जिज्ञासा होतीच म्हणून रोज दुपारच्या जेवणानंतर आम्ही २-३ सहकारी मैत्रिणींनी तिथून फेरी मारायचा शिरस्ता सुरु केला. शिवाय रोजचाच जाण्यायेण्याचा रस्ता असल्याने नकळत आत डोकावले जाऊ लागले.
त्यात असे लक्षात आले की बाई जरा विक्षिप्त आहेत. तिला काहीतरी मानसिक समस्या असावी ती सतत कुणालातरी शिव्या घालत असते.. कुठेतरी पाहत कुणाकुणाची उणीदुणी काढत असते, अगदी सरकारला, प्रशासनाला, कामगारांनाही शिव्या घालते. आंबेडकर कॉलेजचे विद्यार्थी तर बिचकूनच असतात. ती कुणाशीही सरळ तोंडाने बोलत नाही. ती कधी त्या छोट्याश्या झोपडीत कधी बाहेर बसलेली दिसते. मारायला धावेल की काय अशी सारखी भीती वाटत राहते. पण हिची वाखाणण्यासारखी बाब अशी की ही अत्यंत नीटनेटकी राहते. व्यवस्थित स्वच्छ साडी नेसलेली, कपाळाला टिकली, हातात काचेच्या बांगड्या अगदी पायात सॉक्स आणि त्यावर चकाकत्या जाड्या तोरड्या. तिचं अंगण स्वच्छ, आत सगळं नीटनेटकं. ही स्वतःचा स्वयंपाक स्वतः बनवून खाते.. झोपडीबाहेर दोरीवर धुतलेले कपडे सुकत असतात. आत एखादी चूल असावी, इंधनाची लाकडं तिने झोपडी बाजूला जमा करून ठेवली आहेत. एकदा मी बोलायला गेले.. माझी सहकारी ती मारेल म्हणून घाबरत मला ओढत होती, तरी मी तिच्याजवळ जाऊन बोलून आले. 'आम्ही तुम्हाला काही मदत केली तर चालेल का विचारले?' मात्र सगळ्या जगावर सूड उगवायला आल्यासारखे सर्व जगाला शिव्या घालत तिने ते सपशेल नाकारले. (तिच्या अश्या वागण्याचीही काहीतरी ठोस कारणे असावीत..ती माहिती व्हायला हवीत हा विचार आता स्वस्थ बसू देणार नाहीये.)



हा अनुभव गाठीशी असल्याने पुढे असणाऱ्या झोपडीतल्या या इसमाशी बोलायची बरेच दिवस हिम्मत झाली नाही. पण जेव्हा बोलले तेव्हाचा अनुभव पूर्णतः उलट होता. एकमेकांची अजिबात ओळख नसलेली दोन टोकाची ही दोन माणसे अगदी एकमेकाविरोधी वाटलीत. ती टापटीप - हा गचाळ, ती वाचाळ-हा शांत संयमी हसरा, तिचं घर नीटनेटकं याचं पसाऱ्याचं.. ती साऱ्या जगाला दूषणं लावणारी-हा साऱ्या जगावर भाळलेला. मी विचारलेल्या सगळ्या प्रश्नांना त्याने हसत छान उत्तर दिलीत. इथे का, कसे, एकटे ? त्यावर तो जे बोलला ते अंतर्मुख करणार होतं. तो यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड जवळच्या एका छोट्या गावातून पैदल चालत इथवर आलाय. मी विचारलं घरदार नातीगोती सोडून नेमकं कशासाठी? एका वाक्यात उत्तर आलं 'गौतम बुद्ध ज्या कारणासाठी निघाले होते तेवढ्याचसाठी' .. मी स्तब्ध.



तुम्हाला काही मदत केली तर चालेल का ? त्यावर मोठ्या मनानं त्यानं होकार दिला.. त्यातली पूर्ण जेवणाचा डबा देऊन आज मी माझी पहिली इच्छा पूर्ण केली. उद्या थोडे तांदूळ आणि डाळ घेऊन जाणार आहे.
इथून बाजूलाच म्हणजे अगदी दीक्षा भूमीच्या पुढ्यात एक जख्ख म्हातारे आजोबा थेट उस्मानाबादहून एकटे आले होते, ते एकटेच रस्त्याच्या कडेला बसलेले दिसले. त्यांना एक जेवणाचा डबा दिला तेव्हा त्यांना पाणी हवं होतं. मी पाणी घेऊन गेले नव्हते या व्यक्तीला मी त्यांना पाणी हवे असल्याचे सांगितले, त्याने लगेच त्याच्याजवळचे पाणी एका स्वच्छ बाटलीत भरून त्यांना देण्यासाठी दिले. ज्याला स्वतःलाच मदतीची गरज आहे तो लगेच मोठ्या मनाने इतरांनाही मदत करतो हा अनुभव खूप मनाला भिडला.


अशी माणसे भेटत राहतात असे अनुभव येत राहतात म्हणून आपण बदलत जातो पूर्वीपेक्षा अधिकाधिक प्रगल्भ, अधिक समृद्ध होत राहतो..


- रश्मी पदवाड मदनकर

Saturday, 18 September 2021

म्हणी

सत्यभामा सौंदरमल यांचा संग्रही ठेवावा असा लेख -


 #सिंदळकी_करणार्या_महिलांना_म्हणीतुन_नावं_कशी_ठेवली_जातात

महिलांना नावं ठेवताना ज्या (अर्थात लोक काय म्हणतील) म्हणी वापरल्या जातात त्या कदाचित साहित्यिक भाषेत आढळणं तसं दुर्मिळ.या म्हणी मी माझ्या वस्तीत घरात ऐकत लहानाची मोठी झाले.माझ्या आजीच्या तोंडुन आमच्या शेजारी रहाणार्या बाया यांच्या तोंडुन या म्हणी सतत कानावर पडत असत यालाच #ठिवणीतल्या किंवा दलित साहित्यातील शिव्या असं ही म्हणता येईल.कोणत्या स्त्रियांवर कोणत्या म्हणी लागु होतात याबाबतची ही कंसात माहीती देण्याचा हा प्रयत्न.एखादी महीला दुसर्या पुरुषाच्या(नवरा असताना) प्रेमात पार वेडी झालेली असेल तर आणि ती या प्रेमासाठी काही ही करायला तयार असते तेव्हा तिला काय म्हणतात,
#फिरली_नार_कोषा_मार_फिरली_नार_भ्रतार_मार म्हणजेच नवरा किंवा भाऊ यांचा खून करणे (प्रियकराच्या मदतीने) ती तिच्या प्रेमाच्या आड जे येतात त्यांना ती आपले दुश्मन समजत असते आणि यात अशा महिलांना विरोध करणारे पुरूष म्हणजे एक तर भाऊ असतो किंवा नवरा असतो यालाच नाकात वारं भरलेली बाई असं ही म्हणतात. #नि_नांदीला_बारा_बुधी_अन_फुटलयं_कपाळ_बांधली_चिंधी म्हणजे जी बाई नांदत नाही तिची बूद्धी जास्त चालते ती सारखी फिरत असते ती मागचा म्होरचा कसलाच विचार न करणारी आपल्या न नांदण्यामूळे स्वतः वर लेकरांवर नवर्यावर काय परिणाम होतील,याचा जराही सारासार विचार न करणारी स्त्री या अर्थाने ही म्हण वापरली जाते.#हुरळली_मेंढी_लागली_लांडग्याच्या_मागं ही म्हण साधारणतः एखादी स्त्री एखाद्या अशा पुरुषाच्या प्रेमात पडत असते जो #बाबु_जेवला_पतर_पालथं_अन_झोकुन_देलय_गावाच्या_खाल्तं अशा व्रतीचा असतो जो एका स्त्री वर कधीच टिकुन रहात नाही अनेक स्त्रियांना फसवण्यात तो तरबेज असतो तरीही त्याच्या प्रेमात ही पार वेडी असते तिला तिचं उध्वस्त आयुष्य होणार याची कल्पना असताना देखील. #शिकविन_ते_दुखविन_अन_झोप_ण_तो_मायबाप म्हणजे म्हंजी एखादी बाई मुलगी वाईट वकटं वागायला लागली की,तिला घरातुन काही लोक असं करू नकू तसं करू नकु म्हणत #इज्जतजाईल लोकं काय म्हणतेल बाप भाऊ जीव देतेन,बहिणीचं लग्न होणार नाही,आपल्यात असं नसतं तसं वागणार्या बाया चांगल्या नसतात असं पद्धतशीरपणे संस्कार(बंधने)शिकवले जातात.तर काही लोक तिला तिच्या प्रेमासाठी मदत करतात मग यात प्रियकराची भेट घालून देणं,भेटण्यासाठी जागा उपलब्ध करून देणं प्रियकराला भेटताना तिला सर्व मदत करणं यामुळे अशा परिस्थितीत त्या स्त्रीला संस्कार शिकवणारे आवडत नसतात आणि मदत करणारे आवडत असतात.#मी_गेले_खाल्ल्या_घोणं_अन_चाव्हडीत_होते_पन्नास_जणं(खाली मुंडी अन पाताळ धुंडी) एखादी बाई,मुलगी तिच्यावर कितीही बंधणं घातली संस्कार शिकवले बाईचं आयुष्य चूल अन मुल एवढच आयुष्य असं कितीही शिकवलं तरी ती आजुबाजुला काय चाललयं हे जाणुन घेते माहीती घेत असते या अर्थाने (आजच्या परिस्थितीत) #काशा_उपटून_बावच्या_पेरणारी म्हणजे एखादी स्त्री जी मुळातच अगुचर स्वभावाची(स्वतःच्या हक्क मिळवण्यासाठी तत्पर असणारी) तिच्यावर घरात अन्याय होत असेल तर ती घरातल्या त्या सर्वाना पुरून उरत असते. #मी_नाही_त्यातली_अन_कडी_लावा_आतली ही म्हण या अर्थाने त्या बाईसाठी म्हटली जाते जी बाई दिसताना कशी साधी भोळी वचवच नाही पचपच नाही शांत स्वभाव वगैरे असं असतं पण अचानक कळतं की,तिला एखाद्या पुरुषासोबत ऊसाच्या फडात,तुरीच्या कापसाच्या पाट्यालागवत आणताना, डागवनात सरपण आणायला गेल्यावर परक्या पुरुषाबरोबर #एकावर_एक धरलं जातं.तेव्हा असं बोललं जातं #बडबडीचा_बोभाटा_अन_झिपरीमारी_झपाटा ही म्हण या अर्थाने बोलली जाते जेव्हा एखादी बाई भंडग असते मोकळं खरं बोलणारी असते ती चुकीला चुक खर्याला खरं खोट्याला खोटं ओळखुन ते स्पस्टपणे बोलुन दाखवण्याची तिच्यात धमक असते.पण तिच्या नावाचा वाईट स्त्री म्हणूनच गावभर बोभाटा होत असतो पण जिच्यावर विश्वास असतो किंवा हिला कोण इचारील ?असं जिच्याबद्दल वाटत असतं ती मात्र कार्यक्रम उरकुन येत असते.
#खाय_माझी_भाकर_अन_भोक_माझं_उखर ही म्हण एखादी बाई जी विधवा परित्यक्ता असते तरुणपणात एकटीला आयुष्य जगायचं असतं अशा वेळी ती तिला जो पुरूष हवा असतो ती त्याला कसलाही पैसा धन न मागता जवळची सर्व संपत्ती लावत असते या अर्थाने ही म्हण बोलली जाते.
ही म्हण या अर्थाने त्या बाईसाठी बोलली जाते जी एकत्र अनेक पुरूषांसोबत प्रेमसंबध,एक दोन लग्न करते किंवा वेश्याव्यवसाय करते आणि हे सगळं करूनही तिची परिस्थिती अतिशय हालबेहाल पुर्वीसारखीच रहाते
#घालून_घोरायचं_अन_उठुन_बोम्ब_मारायचं ही म्हण या अर्थाने वापरली जाते जेव्हा बाई गडी सहमतीने संबंध ठेवतात पण जेव्हा त्यांना कुणीतरी पकडलं की मग बाईला लोक नावं ठेवतील म्हणुन यातुन सहिसलामत बाहेर पडण्यासाठी बाई मग त्या गड्यावर आळ घेते की ह्याने मला धरलं किंवा जबरदस्ती केली वगैरे #आली_अंगावर_तर_घेतली_शिंगावर. ही म्हण या अर्थाने वापरली जाते जेव्हा एखादी स्त्री स्वतःहुन एखाद्या पुरुषासोबत झोपण्यासाठी पुढाकार घेत असते आणि जेव्हा ह्या गोष्टीचा बोभाटा गावात होतो तेव्हा बाईला दोष देत गड्याला चहात पडलेल्या माशी सारखं अलगद बाहेर काढलं जातं तेव्हा,त्यो गडी हाय त्याच काय,बाईचं बळच मागं लागल्यास गडी थोडाच नाही म्हणेल!या अर्थाने ती म्हण वापरली जाते सिंदळकी लादली तर लादत असती नाही तर मग #वाळुत_मुतलं_फेस_ना_पाणी अशी गत होत असते असं म्हणतेत की,चोरी अन सिंदळकी झाकता झाकत नसते नाहीत तर मग #आंधळं_उरावर_घ्या_अन_भवताली_बघत #गरगर_फिरे_अन_आपुन_आपला_कंड_आपोआप_जिरे अशी गत होते अन मग #इच्च्याचं_बिर्हाड_पाठीवर म्हणल्यासारखं बाईला लेकरांबाळासहित घराबाहीर हाकलून दिलं जातं.
अशा बर्याच म्हणी आमच्या वरती मध्ये बोलताना वापरलेल्या जायच्या ज्या मी काही विसरले पण मी बोलताना काही म्हणीचा वापर करते.अर्थात या म्हणी वापर महिलांचं दमन करण्यात मोठी भुमिका निभवतात या म्हणी आधारेच महिलांना बंधनात ठेवलं जातं कारण या म्हणीतुन बायांनी सिंदळकी केली तर लोक काय म्हणतील याचा अर्थबोध होतो. बाकी महिलांच्या भावना दुखावण्याचा अजिबात हेतू नाही आजही खेडेगावात महिलांच्या कानावर या म्हणी शब्दाच्या कमी शिव्यांच्या स्वरुपात जास्त पडतात....
सत्यभामा सौंदरमल
निर्धार सामाजिक सेवाभावी संस्था
बीड
दिनांक 16/9/2020
Like
Comment
Share

Featured post

  काही गोष्टींचे, काही नात्यांचे, काही क्षणांचे, काही घटनांचे Endnote, Closure (पूर्णविराम) Epilogue मिळत नाहीत… ते फक्त थांबतात, गोठतात अचा...