Thursday, 30 September 2021

विस्मृतीचा शाप ...

 विस्मृतीचा शाप ... 


अंधारलेल्या एखाद्या बोगद्यात शिरावे 

आणि एक एक पाऊल पुढे चालताना 

घूप्प अंधार गवसत रहावा ... 

आकाश, जमीन, प्रकाश 

आणि सजीवांचे भास-आभास 

सगळंच दूर-दूर पुसट होत, 

ठिपका होत नाहीसे होईपर्यंत येऊन पोचावे .. 


नाव, गाव ओळख मिटू लागावी, 

भूत, वर्तमान भविष्याचा संदर्भच कळू नये 

माणसांच्या भेटण्याच्या, त्यांच्या निघून जाण्याच्या,  

घट्ट झालेल्या नात्यांच्या, निसटलेल्या हातांच्या कथा, 

कणकण आनंद, क्षणक्षण दुःखाच्या व्यथा.. आणि

या सर्वात धडपडत तगून-जगून दाखवण्याच्या निष्ठुर प्रथा ..बाष्प होऊन उडून जाव्यात  ..


 रंग, गंध, दृष्टी, स्पर्शाच्या पलिकडे कुठेतरी

वैचारिक, बौद्धिक- मानसिक आंदोलनं

गहिवरलेली स्पंदनं ... विरावीत 

इच्छा-आकांक्षा,अपेक्षांची वाफ व्हावी.  


अनोळखी होत जावे सारे,

आपण चालत रहावे...


अंधाराच्या पटलावर पुढे चमकताना दिसेल काहीतरी

धाव घेऊ नये मृगजळ असेल ते ..


काळाकभिन्न परिसर, फसव्या दिशा 

अनिश्चित अंतरे, अनाकलनीय स्थिती 

अनासक्त प्रवास ... आणि 

अनवट भिवतीच्या अंधार वाटा .. 


कुठे घेऊन जातील... ?


बोगदा अनादी नसतो तसा अनंतही नसतो..

अफाट नसतो आणि अथांगही नसतो .. 

आपण चालत राहावे ... 

प्रकाशाचे किरण चमकून शेवटचे टोक गाठेपर्यंत

आकाश, जमीन, वारा, गवताची हिरवी गार कुरणं 

आणि सजीवांचे भास-आभास परत मिळवेपर्यंत 


पुन्हा गाणी स्फुरेपर्यंत, पुन्हा सूर फुटेपर्यंत 

चालत राहावे .. अनिमिष .. 


बोगद्यातून बाहेर पडलो की मात्र ..  


मन निष्ठूर अन बुद्धी निबर होण्याआत 

भावनांचा चोळामोळा अन संवेदनांचा पाचोळा होण्याआत..


मागून घ्यावा बोगद्यातील भोगकाळाला 'विस्मृतीचा शाप' ... 


© रश्मी पदवाड मदनकर




No comments:

Post a Comment

Featured post

रागातून जागृतीकडे : आधुनिक स्त्रीचा आत्मभानाचा प्रवास !

परंपरेनं स्त्रियांकडे नेहमीच नियमपालक, चारित्र्यसंपन्न आणि सामाजिक चौकटीत वावरणाऱ्या व्यक्ती म्हणून पाहिलं गेलं आहे. स्त्रियांबाबत त्यांच्य...