Tuesday 26 May 2020

टाळीला थाळीची आस - भाग 2

#लाॅकडाऊनच्या_कथा_व्यथा -



सगळ्या औपचारिकता पूर्ण झाल्या .. आणि राणी किंग ह्यांनी सध्या चालू असलेल्या लॉकडाऊन काळातल्या तृतीयपंथीयांच्या उपजीविकेच्या समस्यांवर बोट ठेवले. ह्यांच्या मागण्या आणि समस्या ह्याबद्दल उहापोह करण्याआधी जाणून घेऊया राणी किंग आहेत कोण ?

जात-पात-धर्म, स्त्री-पुरुष समानता अश्या अनेक हक्कांसाठी लढतांना किंवा त्यावर उर भरून बोलतांना आपण केवढे संवेदनशील होत असतो. मात्र ह्याच धर्तीवर जगणारे, मानवाच्या गर्भातूनच जन्म घेतलेले आपल्यासारखे जीव केवळ लैंगिक भिन्नतेमुळे उपेक्षित राहतात आणि नंतर संपूर्ण आयुष्यच केवळ हक्काचं जिणं जगण्यासाठी म्हणून झटत राहतात,  हे किती अन्यायकारक आहे हे जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे अश्यातलेच .. एखादा अक्खा समाज पोटाची खळगी भरण्यासाठी पिढी दर पिढी वर्षानुवर्षे केवळ रुढिवादातून चालत आलेल्या तुमच्या आमच्या अंधश्रद्धेच्या जोखडावर पाय रोवून टाळी वाजवत नाचत धडपडत हे दळभद्री आयुष्य जगत राहतो आणि सभ्यतेचा, समानतेचा, पुढारीपणाचा आणि समाजसेवेचा मुखवटा चढवून फिरणाऱ्यांना त्याचे वैषम्य वाटू नये किंवा त्याच्या बदलासाठी फारसे ठळक प्रयत्न होऊ नये हे फार दुःखद आहे.

ह्याच उपेक्षित तृतीय पंथीय समाजाच्या उत्थानासाठी किन्नर राणी ढवळे मागल्या अनेक वर्षांपासून लढतायेत. स्वतःच्या चांगुलपणावर आणि संस्कारावर ठाम विश्वास असणाऱ्या राणी म्हणतात 'ताली बाजाकर और एक रुपये का सीक्का देकर हम कबतक जिते रहेंगे, अपने लिये नहीं तो कमसे कम हमारी आनेवाले पिढी के लिये हमें मान सन्मान वाला जिंदगी छोडकर जाना चाहिये' तुकाराम महाराज म्हणतात ना 'जो बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले' कोणताही दुटप्पीपणा ढोंग न करता बोलनं आणि वागणं यात सुसंगती ठेवणार्या व्यक्ती बद्दल आदर बाळगावा म्हणूनच राणीचे काम बघितल्यानंतर आपसूक तिच्याबद्दल आदराची भावना निर्माण होते. तृतीय पंथीयांनी चांगले शिक्षण घ्यावे, शिकलेल्या सक्षम असलेल्या तृतीय पंथीयांना सरकारने रोजगार द्यावा, समाजात मान निर्माण होईल अशी त्यांनी वागणूक ठेवावी .. फक्त आपल्याच कम्युनिटीच्या नव्हे तर समाजातील प्रत्येक माणसांच्या गरजेला कामी यावे, अन्यायासाठी लढा द्यावा तेवढेच संकटात गरजेच्या वेळी एकमेकांसाठी धावून जावे ही राणीची मानसिकता आहे.

ती आजवर कोणत्याही संस्थेच्या भरवशावर न राहता स्वबळावर या कम्युनिटीसाठी त्यांच्या हक्कांसाठी लढा देत आली. त्यांच्या शिक्षणासाठी, रोजगार मिळवण्यासाठी, अनेक बाबतीत त्यांना समानतेचा अधिकार मिळण्यासाठी, त्यांना अपमानाचा सामना करावा लागू नये म्हणून शहरात स्वतंत्र शौचालय बांधून द्या यासाठी किंवा चुकीची कामे करावी लागू नये म्हणून व्यवसाय प्रशिक्षण किंवा निर्मिती करण्यासाठी शासनाने मदत द्यावी यासाठी राणी तिच्या साथीदारांसह पुढाऱ्यांपासून शासनदरबारापर्यंत पायपीट करत, निवेदन देत, आंदोलन करत फिरत असते.




राणीचे काम इतक्यावर संपत नाहीं. समाजातील कोणत्याही घटकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध ती ठामपणे उभी राहते तिच्या नेटवर्कच्या माध्यमातून मदत पोचवते. कुठल्याश्या विधवेला सासरहून मिळवून दिलेला हक्क, कोणत्या सुनेची सासरच्या जाचातून केलेली सुटका, एखाद्या म्हातारीला मुलगा-सुनेच्या अत्याचारापासून वाचवून प्रदान केलेली सुरक्षा, कुणाला मरणाच्या दारातून परत आणले किंवा कुना गरजवंताला पैशांची केलेली मदत अश्या एक ना अनेक कहाण्या तिच्या पदरात बांधलेल्या सापडत राहतात.

पुढल्या भागात पाहूया एका किन्नरच्या हत्येसाठी आपल्याच समाजातील त्या दृष्ट माणसांच्या विरोधात उभे राहण्याचे राणीचे धारिष्ट्य ..





©रश्मी पदवाड मदनकर




No comments:

Post a Comment

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...