Monday 23 March 2015

पळस … रंग माझा वेगळा



फेब्रुवारी महिना संपून मार्च सुरु होतो आणि घरोघरी परीक्षेचे वेध लागतात. भरदिवसा वातावरणात एक गूढ गंभीरता भासू लागते,  उष्णता जाणवू लागते. अगदी याच दिवसात पानगळ झाली असते शिशिर संपून नुकतीच वसंताची चाहूल लागलेली असते इतरत्र झाडांची पानं गडद रंगाची झाली असतात काही पिकलेली तर काही गळलेली दिसतात. ऋतू बदलणार असतो आणि निसर्गही नवा रंग नवे सौंदर्य ल्यायला आसुसलेला असतो. इकडे वातावरणाच्या या जरा कोरडेपणाने मन विषन्न होतं आणि गारवा शोधायला भटकू लागतं. मग अलगद पाय बाहेर वळतात. रोजच्या धकाधकीतून दूर रोजच्या परिसरातून वेगळा असा रस्ता शोधत आपली पावले मग शहरापासून दूर जाण्यास प्रवृत्त होतात.


शहर सोडले आणि आपली गाडी हायवेला लागली कि रणरणत्या उन्हातले मखमली सौंदर्य दृष्टीपथास पडतं. ऐन ज्वानीच्या भराला आलेली , तारुण्यानं मुसमुसलेली अंगभर केसरी-लाल रंग ल्यायलेली रस्त्याच्या दोन्ही कडेची वाऱ्यावर अलवार झुलणारी आणि त्यावर फुललेली ती अगणित केसरफुलं हिरवेपणात विलीन होणारी तरीही 'रंगात सार्या रंगुनी रंग माझा वेगळा' असे ठळकपणे सिद्ध करणारी 'पळसा'ची फुलं बहरून आलेली एक एक शृंगारलेणी लेवून सज्ज झालेली दिसतात. एरवी वर्षभर कधीही न दिसणारी अतिशय रेखीव आकर्षक अशी हि फुलं. अश्या सौंदर्याचा आताशा निव्वळ मागमूस लागलेला असतो. सुरुवातीला एक दोन झाडं दिसतात आणि आपण ते नजरेने टिपतो न टिपतो तोच गाडी पुढे निघून जाते. आपण थांबायला हवं होतं का? जरा वेळ त्या केसरी रंगात विलीन व्हायला हवं होतं … काहीतरी मिस झालंय असा विचार मनात येतो न येतो आपण जंगली भागात शिरलेलो असतो आणि काय आश्चर्य गाडीच्या समोरच्या काचेतून दूर दूर दिसणारा तो उतार चढावाचा काळभोर उन्हात चमचमणारा रस्ता दोन्ही बाजूने केसरी रंगात न्हाउन निघालेला दिसतो. झाड फुलांनी गच्च लगडलेलं आणि खाली जमिनीवर पाकळ्यांची पखरण …आपण पुन्हा सावरून बसतो. एक एक फुलांनी बहरलेले झाड मागे सोडत गाडी पुढे जात राहते आणि निसर्गाची, सौंदर्याची आवड असलेले आपण आसुसलेपणाने दोन्ही काचेतून वळून वळून बघत हे रंग हे सौंदर्य नजरेनेच पीत राहतो अंगांगात भिनवत जातो. हे सगळं आपल्यासाठी आहे असा भास होऊ लागतो आणि निसर्गाने मुक्तहस्ताने लुटलेल्या या सौंदर्याचा आस्वाद घेतांना 'बहारो फुल बरसाओ मेरा महेबूब आया है' गाण्याची आठवण होते… वैतागलेले मन पुन्हा फुलून येते. हे केसरिया कोमल, निष्कलंक, सात्विक रूप पाहून आत्मिक शांत समाधानी आनंदाचे तरंग वाहायला लागतात… सुख सुख म्हणतात ते हेच तर असते असे मनाला पटवून द्यायला दिवसाच्या उत्तरायण मध्ये आपण गाडी थांबवून बाहेर येतो नजरेने वेचलेले सौंदर्य, रंग गंध आता श्वासात भरून घ्यायचे असतात …. हि फुले बघतांना अनेक हळव्या आठवणी ताज्या होतात.…मन भूतकाळात उचंबळ खातं . डोळे अलगद पाणावतात. ओठांवर अजूनही स्मित वसलेलं असतं…

नजरभर सौंदर्य, ओंजळ भरून फुलं आणि मनभरून गारवा लुटून घेऊन पुढल्या निदान महिनाभराचा उत्साह साठवत गाडी परतीच्या रस्त्याला लागते.

आठवणीचा पळस मात्र मनात उमलून फुलून बहरत राहतो.
































No comments:

Post a Comment

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...