Friday 8 May 2020

झूम जब तक धड़कनों में जान है ...



याद रख जीवन के पल हैं चार... सीख ले हर पल में जीना यार.. मरने से पहले जीना सीख ले !!


कोणीतरी येऊन आपल्या कानाखाली बंदूक लावावी आणि सांगावे मरण जवळ येतंय, दिवस निघत जातायत, 'स्व'च्या पलीकडले जगणे काय असते शिक. आणि जगून घे मनासारखं एकदातरी. असच काहीतरी होतंय ना ... कोरोना नावाच्या बंदुकीच्या टोकावर आहोत आपण सगळे, कुणाची गोळी पहिले चालणार हाच काय तो प्रश्न.. या काळात अनेकांचे अवसान गळून पडले असतील. मुखवटे उतरले असतील. झगमगाटीपेक्षा, दिखाव्यापेक्षा जगण्यामरण्याचा प्रश्न महत्वाचा वाटायला लागावा असा काळ उगवून पुढ्यात येऊन ठाकला आहे. आता जमापुंजी साठवत बसण्यापेक्षा गरजवंतांसाठी पुढे येणारे हात दिसतायेत. एरवी स्पर्धेच्या चढाओढीत पायात पाय अडकवणारे पोटावर पाय देऊन पुढे जाणारेही एकमेकांना हात देऊन स्थिर करण्याचा प्रयत्न करताहेत.

माणूस मरणाच्या रेषेवर उभा असतांना आणि मदतीचा पुढे आलेला हात धरतांना हा हात कुठल्या प्रांतातला, कोणत्या जातीचा-धर्माचा, नात्यातला की अनोळखी, पापी की पुण्यवान या सर्वांचा कितीसा विचार करत असेल…?? संकटाच्या काळी मदतीला आलेला कुठलाही हात हा 'देवस्वरूप' वाटत असेल तर मग सगळं सुरळीत चालू असतांनाच हे सगळे असले चोसले आपण का पाळत बसतो. एकदा 'द बर्निंग ट्रेन' हा सिनेमा पाहतांना मला हा प्रश्न पडला होता तेव्हा वय थोडं लहानच होतं पण आज कोरोनाच्या धर्तीवर पुन्हा हा प्रश्न ऐरणीवर आला आहे आणि सिनेमा पुन्हा पुन्हा आठवू लागला आहे.


साहिर लुधियानवीने लिहिलेली रफी अन आशादी ने गायलेली या सिनेमातली कव्वालीच आयुष्याचे केवढे सार सांगून जाते..


पल दो पल का साथ हमारा
पल दो पल के याराने हैं
इस मंज़िल पर मिलने वाले
उस मंज़िल पर खो जाने हैं


आयुष्याची शाश्वती आहे तोवरच जगून घ्यायला हवे, उद्याचा काय भरवसा आज ज्यांचे हात हातात आहेत उद्या नसतील कदाचित, आज जे डोळ्यांना दिसतायेत उद्या दिसणार नाहीत. आपण तरी उरणार आहोत का ? जिथे कशाचीच शाश्वती नाही तिथे कसला संकोच आणि कसली शंका .. सगळं पुसून कोऱ्या पाटीप्रमाणे स्वच्छ करावं आणि उरलेल्या दिवसांचा मनाप्रमाणे उत्सव करावा.


कव्वालीत म्हटलंय ना ..
हर ख़ुशी कुछ देर की मेहमान है
पूरा कर ले दिल में जो अरमान है
ज़िन्दगी इक तेज़-रौ तूफ़ान है
इसका जो पीछा करे नादान है
झूम जब तक धड़कनों में जान है




१९८० साली रवी चोपडा यांच्या निर्देशनात ५ वर्षाच्या दीर्घ कालावधीत तयार झालेला 'द बर्निंग ट्रेन' सिनेमा आला होता. विनोद खन्ना, धर्मेंद्र, हेमा मालिनी, जितेन्द्र आणि नीतू कपूर सारख्या दिग्गज कलाकारांनी काम करूनही त्याकाळात फ्लॉप झालेला परंतु कालांतराने क्लासिक सिनेमाचा दर्जा प्राप्त झालेला हा अफलातून चित्रपट. विविध स्थानकांवरून वेगवेगळ्या गंतव्याला निघालेली जात, धर्म, परंपरा, पेश्यानं आणि स्वभावानंही विवीधता असणारी अनेकजण अगदी अबालवृद्ध एका ट्रेनने प्रवास करत असतात.. प्रवासभर कायकाय घडत राहतं. आपापसात प्यार-मोहब्बत पासून ते मारधाडपर्यंत.. नव्या होणारया मैत्रीपासून ते पुर्विचे असणारे वैर आणि त्याचा सुड वगैरे घेण्यासाठी कुठल्याही थराला जाण्यापर्यंत...अगदी करमणुकीत नाच गाणीही चालू असतात. सगळे आपापल्या तालात जगण्यात तल्लीन वगैरे. पण हे सर्व सगळं आलबेल असतं तोवर... अचानक परिस्थिती पालटते चालत्या ट्रेनला आग लागते आणि सारं चित्रच पालटतं. धगधगत्या ट्रेनमधले ब्रेक फेल होतात. मरण डोळ्यापुढे दिसू लागतं.. जगण्याचे आता काहीच क्षण उरल्याची जाणीव प्रखर होते. सगळे मुखवटे सगळे बेगडी अवसान गाळून पडू लागतात. होते नव्हते क्लेश विसरून प्रेमाची माणसं जवळ येतात.. सहप्रवासी माझं-तुझं विसरून एकमेकांना मदत करू लागतात. वैरी हातात हात घेऊन संकटातून मार्ग काढायला रणांगणात उतरतात, महिला खांद्याला खांदा लावून मदतीला सरसावतात, ज्यांना ज्यांना हे शक्य होत नाही ती देवाला प्रार्थना करून हातभार लावतात.


तेरी मर्ज़ी से ऐ मालिक हम
इस दुनिया में आए हैं
तेरी रहमत से हम सबने
ये जिस्म और जान पाए हैं
तू अपनी नज़र हम पर रखना
किस हाल में हैं ये ख़बर रखना
तेरी है ज़मीं, तेरा आसमां
तू बड़ा मेहरबां, तू बक्शिश कर ..


जगण्या-मरण्याच्या प्रचंड कोलाहलातून, मोठ्या संघर्षातून महत्प्रयासाने विजय मिळविला जातो आणि काही प्रवासी गमावून उर्वरित मात्र सुखरूप गंतव्याला पोचतात. हा मरणाकडे घेऊन जाणारा प्रवास खूप काही शिकवून गेलेला असतो. ट्रेनमध्ये चढतांना असलेला प्रवासी त्याच ट्रेनमधून उतरतांना पूर्वीचा तो राहिलेलाच नसतो ... नखशिखांत बदललेला असतो.


काहीतरी शिकायला समजून घ्यायला बरेचदा स्वतःचे अनुभवच का घ्यावे. पुढ्ल्याला लागलेली ठेच पाहून खरतर मागल्याने शहाणे व्हायला हवे पण असे होत नाही. त्याला ठेच कशी लागली म्हणून पाहायला धजावतो आणि स्वतःचा पाय ठेचकाळून घेतो. आज या घडीला तरी हे व्हायला नको कारण शिकत बसायला आयुष्य पडलंय हे म्हणण्याइतकासुद्धा वेळ खरंच आपल्याकडे शिल्लक आहे का कुणास ठाऊक. म्हणून वाटतं जो पर्यंत आपल्या घरात, परिवारात, आपल्या आजू-बाजूला सर्व सुरळीत आणि सुखरूप असतं तोपर्यंतच माणसाचे जात-धर्म, आपला-तुपला, सख्खा-परका, हा गरीब तो श्रीमंत असे जास्तीचे चोसले असतात, पण खरी वेळ अंगावर आली की यातले काहीही कामात येत नाही कामात येते ती फक्त माणसातली माणुसकी... आपल्यातली माणुसकीच तेवढी शिल्लक राखायला हवी .. जपायला हवी.


 रश्मी पदवाड मदनकर






No comments:

Post a Comment

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...