Monday 1 June 2020

टाळीला थाळीची आस - भाग ३

#लाॅकडाऊनच्या_कथा_व्यथा - प्रकरण 1

४ जून २०१९ ची घटना, या घटनेने संपूर्ण नागपूरचा किन्नर समाज हादरला होता. किन्नर समाजात नावारूपाला येणाऱ्या .. शहरात बऱ्यापैकी ओळख निर्माण झालेल्या आणि भविष्यात समाजाची पुढारी म्हणून आशा असणाऱ्या चमचम गजभियेचा भरदुपारी प्राणघातक हल्ला करून खून करण्यात आला होता. तृतीय पंथियांचा त्यावेळचा सेनापती म्हणजे गुरु मानला जाणारा उत्तम बाबा तपन याने आपल्या साथीदारांसह विरोधी गटातील आणि किन्नरांची अपेक्षित उदयोन्मुख सेनापती तृतीयपंथी चमचम गजभियेची कळमनातील कामना नगरात तिच्या घरात घुसून हत्या केली होती. खरतर तृतीयपंथीयांमध्ये वर्चस्वासाठीचा आपापसातला संघर्ष हा काही नवीन विषय नाही. सर्वाधिकार असणारी गादी मिळवून नेतृत्व करण्याची इच्छा इथे अनेक जण बाळगून असतात.. त्यातून चालणारी गटबाजी, कुरघोड्या, राजकारण हे नेहमीचेच. आपल्यावर कोणी हावी होऊ नये म्हणून जास्तीत जास्त किन्नर आपल्या गोटात राखून शक्तिप्रदर्शनाने नेतृत्व गाजवण्याचा प्रयत्न हे प्रस्थापित आणि इच्छुक पुढारी करीत राहतात. त्यातून परस्परांवर हल्ले, हाणामाऱ्या, एकमेकांना धमक्या देणे इत्यादी राजरोसपणे घडत राहतं. पोलिसांनाही सतत या प्रकरणांचा शहानिशा करावा लागतो. तत्कालीन सेनापती उत्तम बाबाच्या डोक्यातही वर्चस्वाची हवा होती .. इतर किन्नरांबरोबर दुष्टपणे वागण्याच्या, अत्याचाराच्या अनेक कथा पोलीस स्टेशनपर्यंत जाऊ लागल्या होत्या. त्यातून गट पडायला लागली होती, माणसे वाटली जात  होतीत, उत्तमबाबाची ताकद कमी होऊ लागली होतीच पण पैशांचे गल्ल्यात येण्याचे प्रमाणही आता कमी झाले होते.. उत्तमबाबा विरोधात उभे राहण्याचे धाडस करणाऱ्या चमचमच्या गोटात जाणाऱ्या किन्नरांची संख्या वाढत होती, आणि हुकूमशाही नाकारायला, कष्टाचे पैसे त्याच्या गल्ल्यात द्यायला चमचमने ठामपणे नाकारायला सुरुवात केली होती ...

तृतीयपंथीवर पहिल्यांदाच सार्वजनिक ...

कोण होती चमचम - 
पूर्वाश्रमीचा प्रवीण प्रकाश गजभिये उर्फ 'किन्नर चमचम गजभिये' ही अतिशय देखणी आकर्षक व्यक्तिमत्वाची होती. किन्नर करीत असलेल्या सगळ्या प्रकारच्या कामात तिला सर्वात जास्त मागणी असायची, लोकप्रियताही बऱ्यापैकी वाढत होती.. तिला मुहबोली किंमत देखील मिळायची .. मात्र प्रयत्नांनी कष्टांनी काम मिळवून त्यातून कमावलेला सगळा पैसा उत्तमबाबाच्या हवाली करावा लागायचा. हे हळूहळू चमचमच्या जीवावर यायला लागले आणि तिने त्याला टाळायला सुरुवात केली.. चमचमच्या वाढत्या लोकप्रियतेला भाळलेले आणि उत्तमबाबाला कंटाळलेले इतर अनेक तृतीयपंथी देखील मग मार्ग बदलू लागले... ह्याचा वचपा काढत एक दिवस उत्तमबाबाने त्याच्या इतर साथीदारांसह काटा काढून टाकण्याच्या दृष्टीनेच चमचमवर हल्ला चढवला..तिच्याच राहत्या घरी घुसून या टोळीने तिच्या डोक्यावर चेहेऱ्यावर धारदार शस्त्राने अनेक वार केलेत, तीला गंभीर जखमी केले. ती रक्ताच्या थारोळ्यात पडून राहिली, आणि त्यातूनच दोन दिवसाने कामठी मार्गावरील एका प्रायव्हेट हॉस्पिटलला तिचा मृत्यू झाला. 

nagpur-third-gender-uttambaba-kinner-chamcham-fight-for-head945
 
ही घटना तृतीय पंथीयांसाठी हादरवणारी होती, प्रचंड तणाव निर्माण झाला.. उत्तमबाबांच्या अत्याचाराची सीमा पार झाली होती त्याला शिक्षा होण्यासाठी आता तृतीयपंथींना पुढे येणे गरजेचे होऊन बसले होते. कारण तसेही ह्यांना हक्काचे जगणे असू देत नाहीतर न्याय मिळणे इतके सहज साध्य कुठे आहे, त्यासाठी पुन्हा संघर्ष आलाच. चमचमला न्याय मिळवून द्यायला पुन्हा राणी किंग पुढे आल्यात.. उत्तमबाबांच्या त्वरित अटकेसाठी पोलीस स्टेशनसमोर घोषणाबाजी असो किंवा नंतर त्याला कडक शिक्षा व्हावी म्हणून अनेक स्तरावरची आंदोलनं .. पुढे कोर्टातली धावपळ अशी चमचमच्या न्यायाची लढाई राणी लढत राहिली...आजही हे चालू आहे. या संघर्षातून आणि लढाईतून तृतीयपंथीयांनी संघटना असावी हा विचार उदयास आला आणि 'किन्नर विकास बहुद्देशीय सामाजिक संस्था' निर्माण करण्यात आली. या संस्थेच्या अध्यक्षपदाचा कारभार आज राणी किंग सांभाळत आहेत. या माध्यमातून  किन्नरांसाठी अनेक चांगली कामे करण्याचा मानस असल्याचे राणी किंग वारंवार बोलून दाखवतात ....
शेवटच्या भागात बघूया कोरोना वायरस लॉकडाऊन काळात तृतीय पंथीयांच्या जीविकेवर झालेला परिणाम आणि याही काळात राणी किंग निभावत असलेली माणुसकी ...

रश्मी पदवाड मदनकर 

No comments:

Post a Comment

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...