Saturday 19 October 2019

डॉ श्रीधर शनवारे :- एक व्रतस्थ कवी !



एक उत्तुंग व्यक्तिमत्व आणि व्यक्तीमत्वात भिनलेला एक उत्कृष्ट कवी. त्यांच्या लिखाणातली वैचारिक वीण नेहेमीच मराठी साहित्याला नवे परिमाण मिळवून देण्यास महत्वपूर्ण ठरले आहे. यांच्या वाड्मयीन प्रवासातले ठळक टप्पे बारकाईने न्याहाळले तर त्यांच्या लिखाणाला प्रतिभेचे अनेकविध पंख फुटलेले दिसतात. वैदर्भीय रसिकांना अभिमान बाळगण्यास महत्वपूर्ण कारण ठरलेल्या या कविमनाच्या साहित्यिकाच्या वाण्ग्मयीन प्रवासाचा आढावा घेण्याचा हा छोटासा प्रयत्न.

या संवेदनशील साहित्यिकाचा जन्म ५ आक्टोबर १९३५ रोजी अमरावती जिल्ह्यातल्या' साहूर' येथे झाला. मात्र शिक्षण अन नौकरीच्या निमित्त्याने नंतर च्या काळात ते नागपुरात स्थायिक झाले. ते एम.ए., पीएच.डी.होते. नागपूरच्या धनवटे नॅशनल महाविद्यालयात प्रा. श्रीधर शनवारे यांनी ३५ वर्षे मराठीचे अध्यापन केले आणि मराठी विभागप्रमुख पदावरून निवृत्त झाले. गेल्या चार दशकांपासून त्यांचे साहित्य सृजन अव्याहत चालू होते.

‘‘उन्हंउतरणी सुरू होईल आता,
पण वाती भिजलेल्या नसतील,
धुपारतीची वेळ होईल लवकर अन्
माझ्याजवळ फुले जमलेली नसतील,’’

असं म्हणत सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीला ‘उन्हंउतरणी’ या संग्रहातून त्यांनी कवितेच्या क्षेत्रात पदार्पण केलं.… …

साठोत्तरी मराठी काव्यविश्‍वातील डॉ. श्रीधर शनवारे हे ज्येष्ठ कवी होते. लेखकाच्या जाणीवेत आणि नेणीवेत एखाद्या विषयासंबंधी अधिकाधिक चिंतनाने कसकसे परिवर्तन होत गेले याचे प्रतिबिंब त्याच्या साहित्यात दिसते. त्यांची वाण्ग्मयीन अभिरुची अनेक विषयात व्यापून राहिलेली आहे कविता, बाल-किशोर कविता, नाटक, प्रवासवर्णन, समीक्षा, मराठी व्याकरण, प्रबंध अशा अनेकविध अंगांनी त्यांचे साहित्यसृजन निरंतर प्रवाहित राहिले . पण विविध क्षेत्रातले लेखन त्यांनी केले असले तरी त्यांचा व्यासंग हा कवितेच्या गावचाच. समकालीन अनेक प्रतिभावंत कवी नावारूपाला येत असतांना डॉ. श्रीधर शनवारे यांनी स्वतःचे वेगळेपण जपत त्यांच्या काव्य चाहत्यांच्या आणि समीक्षकांच्याही नजरेत चिंतनशील कवी असा लौकिक प्राप्त केला. सूक्ष्म निरीक्षणशक्ती व चिंतनाची पक्की मांड त्यांची शक्तिस्थानं होती. त्यांच्या अनेक कवितांमधून त्यांची प्रतिभा बोलती झाली आणि आजही त्यांच्या अनेकविध पुस्तकांमधून त्यांची वाण्ग्मयीन गुणवत्ता सिद्ध झालेली आहे. 1960 नंतर मराठी कवितांना आयाम देणाऱ्या कवींमध्ये श्रीधर शनवारे यांचा समावेश आहे. विदर्भातील आध्यात्मिक, वैचारिक कवींच्या परंपरेतील ते कवी होते. त्यांच्या काव्यसंग्रहामध्ये 'उन्हउतरणी', 'आतून बंद बेट', 'तळे संध्याकाळचे', ' ‘तीन ओळींची कविता’, 'थांग अथांग तळे' आणि ‘सर्वा’ असे काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. या व्यतिरिक्त ‘राक्षसांचे वाडे’ हा बाल-किशोर कवितांचा संग्रह, श्री शरत्‌चंद्र चट्टोपाध्याय यांच्या ‘रामेर सुमोती’ या कथेचा अनुवाद, ‘अतूट’ या शीर्षकाने नाट्याविष्कार, हिन्दीतील प्रख्यात साहित्यिक ‘प्रेमचंद’ यांचा निवडक कथांचा अनुवाद, मराठीतील समर्थ ‘कथाकार वामन चोरघडे’ हा समीक्षाग्रंथ, ‘अभिनव मराठी व्याकरण’ हा व्याकरणावरील ग्रंथ, ‘कोलंबसाची इंडिया’ आणि ‘पायावर चक्र’ ही अप्रतिम प्रवासवर्णने अशा विविध रूपांनी त्यांच्या प्रतिभा वृक्षाला बहर आलेला आहे. साहित्य क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानामुळे विदर्भाच्या आणि पर्यायाने महाराष्ट्राच्या साहित्य संस्कृतीचे कलादालन समृद्ध होण्यास मदत झाली. विशेषत: मराठी कवितेतील त्यांच्या मौलिक योगदानाबद्दल नागपूर येथील कृषी विकास प्रतिष्ठानाच्या वतीने त्यांना ‘विदर्भ गौरव’ हा अत्यंत सन्मानाचा आणि प्रतिष्ठेचा पुरस्कार प्राप्त झाला. त्यांच्या ’सरवा' या कवितासंग्रहाला महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचा पुरस्कार, ’कोलंबसाची इंडिया’ या प्रवासवर्णनपर पुस्तकाला नागपूरच्या विदर्भ साहित्य संघाचा ‘गाडगेबाबा स्मृती पुरस्कार’ याव्यतिरिक्त प्रदीर्घ साहित्य सेवेबद्दल ’सूर्योदय काव्य पुरस्कार’ आणि विविध साहित्य प्रकाराला अनेकविध सन्मान आणि पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

डॉ श्रीधर शनवारे हे एक विकासशील कवी होते त्यांच्या लिखाणात 'अनुभवाची अंतर्मुखता' आहे त्यांच्या साहित्यातून प्रतिमासृष्टी, अभिव्यक्तीतील मनमोकळेपणा आणि आत्मविश्वास या साऱ्यातून एक प्रथामिक जोम व्यक्त होतांना दिसतो. निसर्ग आणि मानवी जीवनमूल्यांविषयी निस्सीम निष्ठा असणा-या या कवीच्या कवितेत अपूर्णतेनं खंतावणारं मन दिसत राहायचं. श्रीधर शनवारे यांनी पूर्वसूरींचे अनुकरण न करता, समकालीनांमध्ये न रमता, कोणत्याही वाद-संप्रदायात न अडकता शांतपणे काव्यलेखन करून कवितेची एक देखणी पाऊलवाट निर्माण केली. म्हणूनच त्यांच्या साहित्यावर अभ्यास करून अनेक विद्यार्थ्यांनी 'प्रबंध' आणि 'शोधनिबंध' सादर केले आहेत . त्यांनी शेकडो व्याख्याने दिली आहेत. अनेक पुस्तकांना त्यांनी प्रस्तावना लिहिल्या आहेत आणि अनेक ग्रंथांची प्रकाशने त्यांच्या हस्ते झाली आहेत. त्यांच्यावर जवळपास शंभर एक समीक्षा लेख प्रसिद्ध झाले आहेत.

त्यांचा स्वभाव काहीसा आत्ममग्न होता, ते अत्यंत शांत आणि संयमी होते. एक चारित्र्यसंपन्न, सदाचारी, सतत कार्यमग्न असलेले त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या हयातीत त्यांनी साहित्य सृजन केलेच पण अनेक समृद्ध विद्यार्थी घडवले. त्यांच्या हयातीत मिळणारा कोणताही पुरस्कार योग्य ठिकाणी दान करण्याचा संकल्प त्यांनी केला होता यातून त्यांच्या निरपेक्ष, हळव्या स्वभावाचा अंदाज बांधला जाऊ शकतो.

वांग्मय प्रेमी अन काव्यरसिकांसाठी ढीगभर मेजवानी ठेऊन, शब्दांची आगळी धून पाठी सोडून डॉ श्रीधर शनवारे २८ ऑक्टोबर २०१३ रोजी साहित्यविश्वात एक पोकळी निर्माण करून निघून गेलेत. साठोत्तरी मराठी काव्य विश्वातला तळपता सूर्य अस्ताला गेला. एका कवीची शेवटची ओळ संपली. त्यांच्याच शब्दात उर्धृत करायचे म्हंटले तर

"अंतिम ओळ
तुटण्याशी जोडलेली;
खोडता खोडता उरलेली
उरता उरता
सरलेली"

उन्ह-उतरणी संपली आणि अज्ञाताचा शोध घेताघेता एक आतून बंद बेट काळाच्या अथांग सागरात मावळून गेले. आज ते आपल्यात नसले तरी त्यांच्या शब्दातून अन कवितेतून अजरामर आहेत


- रश्मी पदवाड मदनकर

No comments:

Post a Comment

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...