Friday, 17 November 2017

कथांची व्यथा..


तू आखुन दिलेली लक्ष्मणरेषा लांघता येत नाही
 आणि अर्ध्या अधुऱ्या कथांची व्यथा मांडताही येत नाही

मनात खूप दाटल्याहेत तुला सांगावयाच्या गोष्टी
कोंबल्या गेल्या आहेत..काचताहेत
न बोलताच गिळून टाकलेले किती हुंदके .. कित्तेक शब्द
पचतही नाही आणि ओकवतही नाही.
अडकले आहेत मनात-बुद्धीत, घश्यातही
आत आत चर्वण करीत राहिले ... तरी
त्यांना कंठ फुटत नाही
अर्ध्या अधुऱ्या कथांची व्यथा आता मांडताही येत नाही

आपणच जन्म घातलेले त्या कथेतले काही पात्र
त्या पात्रांना स्वप्नांचे क्षितिज दाखवून आपणच वाढीस लावले होते
त्यांना पंख फुटाण्याआत तू भिरकावून लावलेस अन निघून गेलास
ते भटकताहेत अनवाणी - तडफडताहेत
तुझ्या येण्याच्या वाटेवर जीव अडकलाय त्यांचा
त्यांना मुक्ती हवीय रे ...
कसं सांगू त्यांचे हाल आताशा बघवत नाही
अर्ध्या अधुऱ्या कथांची व्यथा आता मांडताही येत नाही


आता मलाही वाटू लागलंय
तू यावंसंच एकदा ... फक्त एकदा
ये अन स्पर्शाने पुनर्जीवित कर त्यां स्वप्नांना
स्वप्नातील विरक्त पात्रांना
अन तृप्ततेचा श्वास देऊन पुन्हा समाधानाने मरणाला मार्ग मोकळा करून दे
ये अन मोक्ष मिळवून दे त्यांना
मरगळ आलेल्या शब्दांना तुझ्या स्पर्शाने जिवंत कर
एकटंच भटकणाऱ्या त्या तप्त उसस्यांचा दाह शांत कर
वाट पाहून दमलेल्या डोळ्यांना ओठांची उब दे  आणि
शांतवून त्या दीर्घ रात्रींना अखंड निज दे ..

तू आखुन दिलेली लक्ष्मणरेषा लांघयचीय रे एकदा
अर्ध्या अधुऱ्या कथांची व्यथा संपवायचीय कायमची

सांग... येशील ?







No comments:

Post a Comment

Featured post

रागातून जागृतीकडे : आधुनिक स्त्रीचा आत्मभानाचा प्रवास !

परंपरेनं स्त्रियांकडे नेहमीच नियमपालक, चारित्र्यसंपन्न आणि सामाजिक चौकटीत वावरणाऱ्या व्यक्ती म्हणून पाहिलं गेलं आहे. स्त्रियांबाबत त्यांच्य...