Friday 23 June 2017

शब्दांचे पसारे !

एकांतातल्या शब्दांना कंठ असतो
त्या शब्दांना डोळे असतात ओघळणारे
त्या शब्दांना मन असते. भावनाही असतात 

पण मिळत नाहीत ते कान
त्यांना ध्येय असते पण गंतव्य नसते...
ज्यांना ऐकवायचे त्यांच्या पर्यंत जायचे रस्ते नसतात
दारं बंद करून टाकली असतात सगळीच
म्हणून तर ते एकांतात फुटतात
धुसफुसतात... मुसमुसतात, क्वचित किंचाळतातही

कंठातून बाहेर पडले कि त्यांचे प्राक्तन त्यांना कुठवर घेऊन जाईल सांगता येत नाही
असं म्हणतात, शब्दांना मरण नाही. ते हवेत विरत नाहीत, पाण्यात विरघळत नाहीत
अवकाशाच्या पोकळीत तरंगत राहतात ...
भटकत राहतात एकांतातल्या शब्दांच्या आरोळ्या
कुठवर ??
ऐकून घेणारे कान अन समजून घेणारे मन मिळत नाही तोवर

ज्या शब्दांना आस मिळते त्यांची वाफ होते ...
पाऊस होऊन बरसते, मातीत विरते
उरलेल्यांचे दगड होतात.. कुणी ग्रह म्हणतात .. कुणी तारे
न काढता न गिळता आलेले आवंढेच तर असतात सारे

जिकडे तिकडे शब्दांचेच पसारे  !!!

रश्मी पदवाड मदनकर
23.6.17






No comments:

Post a Comment

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...