Monday 26 July 2021

स्त्री-स्वातंत्र्याचा लढा कि तिढा ..

बाई, बुब्स आणि ब्रा' या आशयाची खळबळ माजवून देणारी, चर्चेला ऊत आणणारी आणि नेटकरांसाठी चर्वित चर्वणाला खाद्य पुरवणारी अभिनेत्री हेमांगी कवी हिची एक फेसबुक पोस्ट अत्यंत वायरल झाली आणि पुन्हा एकदा हा सार्वकालीन वाद पटलावर येऊन उभा राहिला. तिच्या एका व्हिडीओवरून सुरु झालेला हा वाद आता स्त्रीस्वातंत्र्याच्या विषयापर्यंत येऊन चिघळला आहे. स्त्रीवाद हा विषय तसा आजचा नाही. स्त्रीस्वातंत्र्य आणि समानतेसाठी पुरुषप्रधान समाजाशी दोन हात करण्याची स्त्री चळवळ अनेक दशकांपासून चालूच आहे. ''स्त्रीवादी चळवळीचा हेतू स्त्रियांना राजकीय, आर्थिक व सामाजिक हक्क आणि समान संधी याची जाणीव करून देणं, तिला आत्मनिर्भर बनवणं इतकाच नाहीये, तर हे साधताना आर्थिक स्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य आणि निर्णयस्वातंत्र्य म्हणजे नेमके काय याचे स्पष्टीकरण करणे आहे,'' असे एकदा अरुणा ढेरे म्हणाल्या असल्याचे आठवते. चित्रपट, साहित्य, कलाक्षेत्रातील अनेक नामवंतांचे याबाबतचे मत-मतभेद अनेकदा चर्चेचा विषय होत राहिलेला आहे. आजही स्त्रीवादाचा प्रश्न निर्माण झाला की त्याची परिभाषा अनेक स्तरातून होत असते. सोशल मीडिया हा आजच्या खऱ्या जगाचा आरसा आहे असे म्हंटल्यास ते वावगे ठरणार नाही.. यावर वाहणारे चर्चेचे, ट्रेंड्सचे आणि ट्रॉलिंगचे वारे आजच्या पिढीच्या वैचारिक वळणांचे तंतोतंत प्रतिबिंब दाखवत असते. गेल्या दोन-तीन वर्षात 'हैशटैग मी टू' ने सोशल मीडियाचा फार मोठा भाग आणि काळ व्यापला होता. हॉलिवूड चित्रपट निर्माता हार्वे विंस्टीनवर अनेक महिलांनी लैंगिक अत्याचाराचे आरोप लावले होते आणि तिथून सुरु झालेल्या आरोप प्रत्यारोपाचे रूपांतर आंदोलनाच्या स्वरूपात जगभर पसरत गेले, वर्ष-दोन वर्ष सरता सरता हे आंदोलन फक्त चित्रपट सेलिब्रिटीजपुरते मर्यादित न राहता, लेखक, पत्रकार, सैन्यातले अधिकारी, राजकारणापासून ते न्यायमूर्तीपर्यंत चिघळत गेले. अंतर्राष्ट्रीय खेळाचे रिपोर्टींग करणाऱ्या महिलांचे व्हिडीओ वायरल झाले, अनेक एमएमएस, ऑडिओ नोट, मॅसेजेस चव्हाट्यावर आणले गेले. पण हे किती महत्वाचे होते हे हळूहळू लक्षात येऊ लागले आणि ही साधी दिसणारी मोहीम जगव्यापी आंदोलनात परावर्तित झाली. हा ट्रेंडही सोशल मीडियाच्या माध्यमातूनच सुरु झाला होता. अभिनेत्री हेमांगी कवी हिने अंतर्वस्त्रावरून ट्रोल करणाऱ्यांसाठी पोस्ट टाकली आणि त्यावरून ती अधिकच ट्रोल होऊ लागली. ''बाईने तिचे बुब्स (स्तन), त्याला असलेली पुरुषांसारखीच स्तनाग्रे (nipples, tits) आणि त्यांना धरून ठेवायला, झाकायला किंवा मला आवडत नाही पण लोक काय म्हणतील म्हणून लाजेखातर का होईना ब्रा वापरायची की नाही हा सर्वस्वी त्या बाईचा choice असू शकतो, मग ती घरी असो किंवा social media वर किंवा कुठेही'' हे हेमांगी कवीच्या पोस्टमधील वाक्य वाचून मला सोनम कपूरची प्रकर्षाने आठवण आली. सोनम कपूरने लग्नानंतर सासरचेही नाव तिच्या नावासह जोडले होते तेव्हा स्त्रीवादी ट्रॉलर्सनी तिच्या नावाने शंख फुंकायला सुरुवात केली होती. ती सासरचे नाव जोडते आहे म्हणजे तिने आता पारतंत्र्य स्वीकारले आहे आणि तिच्या शिक्षणाचा उपयोग राहिलेला नाही अश्या अर्थाने तिच्यावर ताशेरे ओढले गेले होते, त्याचे प्रत्यत्तर म्हणून एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत तिने 'फेमिनिज्म म्हणजे ब्रा जाळून मिश्या वाढवणे नव्हे' असे वक्तव्य करून आणखीनच गदारोळ उडवून दिला होता. सोनमने 'स्त्रीवाद' म्हणजे फेमिनिज्मचा खरा अर्थ काय हे प्रत्येकीने समजून घेणे आवश्यक आहे स्त्रीवादाचे ढोंग करणे म्हणजे स्त्रीवाद नाही असे परखडपणे सांगितले होते. स्त्रीवादी असण्याचा खरा अर्थ आहे प्रत्येक गोष्टीत समानता. स्त्री म्हणून जगणे-वागणे सोडून देऊन पुरुषांसारख्या मिश्या वाढवून जगणे हा काही स्त्रीवादाचा अर्थ नाही. अनेक अभिनेत्रींना स्त्रीवादाचा खरा अर्थच समजलेला नाही. आता बदलत्या काळानुसार सर्वांनीच स्त्रीवादाचा अर्थ समजून घेतला पाहिजे. अश्या खड्या शब्दात तिने ट्रोलर्सचा समाचार घेतला होता. पण आजच्यासारखाच तेव्हाही 'फेमिनिज्म म्हणजे ब्रा जाळून मिश्या वाढवणे नव्हे' तिच्या या वाक्याचा बुरा-भला प्रभाव व्हायचा तो झालाच आणि सोशल मीडिया ढवळून निघाले होते. स्त्रीवादाचा जो काही नवा अर्थ सोनमच्या वक्तव्यातून उद्धृक्त झाला होता त्याचेही महत्व समजून घेणे महत्वाचे आहे, हेमांगी कवी यांच्या वक्तव्यावरून होणाऱ्या चर्चेचा त्यानिमित्ताने आढावा घेणे देखील महत्वाचे ठरते.


समाजात स्त्री-पुरूष असा भेदभाव आहे. यात बदल होईल अशी आशा आहे. अनेकांचा या दृष्टीने प्रयत्न देखील सुरु आहे. मात्र हेमांगी कवीने ज्या पद्धतीने विषय चव्हाट्यावर मांडला आहे ते मांडण्याची गरज होती का ? असाही एक सूर यानिमित्ताने आळवला जातो आहे. स्त्री म्हणून आपल्याला खरंच स्त्री स्वातंत्र्याचा अर्थ कळाला असता तर लोकं काय म्हणतात ह्याला इतकं महत्व देत बसण्याची गरज उरली नसती. आपल्याला जे योग्य आहे असे वाटते आणि तसे वागावे वाटते ते कुठलीही बाष्कळ बडबड न करता कुणाच्याही आरोप-प्रत्यारोपांना महत्व न देता, उत्तरं न देता करत-वागत राहणं जास्त रास्त ठरत असतं. याबाबत मला ऑगस्ट २०१५ साली घडलेला एक किस्सा मुद्दामहून सांगावासा वाटतो. किरण गांधी नावाच्या २६ वर्षीय क्रीडापटूने तिची मासिक पाळी सुरु असतांना पॅड न घेता मॅरेथॉनची स्पर्धा पूर्ण केली होती. स्पर्धा पूर्ण होऊन ती गंतव्यस्थळी पोचली तेव्हा तिचा गुलाबी ट्रॅकपॅन्ट रक्ताने पूर्णपणे माखलेला होता. हे फोटो जगभर वायरल झाले तेव्हा किरण ह्यांनाही अनेक माध्यमातून ट्रोलर्सचा सामना करावा लागला होता. या सगळ्या प्रश्नांना प्रत्युत्तर देतांना ती म्हणाली कि '' वर्षभर स्पर्धेसाठी प्रचंड कष्ट आणि अभ्यास केल्यावर फक्त मासिक पाळी आलीय म्हणून स्पर्धेतूनच बाहेर पडणे किंवा काढून टाकले जाणे संयुक्तिक नाही, उलट ते अन्यायकारक आहे. एवढेच नाही तर वर्षभराच्या इतक्या मेहनतीनंतर फक्त पॅड घेतल्यामुळे स्पर्धेत धावतांना निर्माण होणाऱ्या अडथळ्यामुळे मागे पडणं मी का मंजूर करावं ? पॅड न घेतल्याने माझ्या कष्टाला मला न्याय देता येणार असेल तर मी साहजिक तसे वागायला हवे. फारफारतर काय होईल कपड्यावर ओघळणारे डागच दिसतील आणि हे नैसर्गिक आहे याची जाणीव बघणाऱ्यांनी ठेवायला हवी '' किरण गांधींच्या या वक्तव्यावरही उलट-सुलट चर्चा झडल्या मात्र नको त्या ठिकाणी नको त्या क्रिया न करता, नको तशी वायफळ बडबडही न करता, तेव्हाच्या गरजेच्या वेळी तिला जे वाटतंय ते तिने निःसंकोच करून दाखवले होते..आणि स्पर्धा जिंकून त्याचे महत्वही उदाहरणासह सिद्ध केले होते. स्त्रीस्वातंत्र्याचा खरा अर्थ बोलण्यापेक्षा वागण्यात आहे हे अश्याच पद्धतीने सिद्ध केले गेले पाहिजे अशी हि घटना होती. .


एकीकडे स्वतःचे स्त्रीत्व नैसर्गिकपणे मान्य करून ते सांभाळत आपले हक्क ओळखून, त्यासाठी लढा देऊन ते मिळवून शैक्षणिक-वैचारिक-बौद्धिक-आर्थिक उन्नती करून घेत अधिकाराने सन्मानाचे-आदराचे आयुष्य जगणाऱ्या स्त्रिया आहेत. तर दुसरीकडे स्त्री स्वातंत्र्याच्या नावाखाली आणखी एक वेगळा गट तयार होत चालला आहे जो स्त्रीत्वाची संपूर्ण कातडीच ओरबाडून काढून नवा उन्मादी मुखवटा चढवण्याला किंवा पुरुषांसारखे वागण्याला स्त्री-स्वातंत्र्य समजून बसल्या आहेत. पुरुषांसारखे कपडे घालणे, सिगारेटी फुंकणे, मोटार-बाईक उडवणे किंवा दारू पिऊन धिंगाणे घालणे हे सर्रास दिसू लागले आहे. या बाबत मधल्या काळात विद्या बालनने देखील ''स्त्री-पुरुष समानतेसाठी लढा देणे म्हणजे स्त्रीने पुरुषी होणे नव्हे; तर जन्मतः मिळालेले स्त्रीतत्त्व सांभाळत माणूस म्हणून जगण्याचे समान अधिकार मिळवणे आहे'' अशी मोहीम चालवली होती.


नुकतच युरोकप-२०२० ची स्पर्धा पार पडली. या स्पर्धेनंतर इटली जिंकल्याच्या आनंदात एका इटालियन महिलेने टॉपलेस होत नाच करतानाच एक व्हिडिओ वायरल झाला होता.. आनंदाच्या भरात उर्स्फुर्तपणे घडलेली ही एक प्रतिक्रिया असू शकते, अनेकदा अश्या प्रतिक्रियांविषयी आक्षेप घेतला जात नाही कारण त्या अनैसर्गिक नसतात. मात्र पूनम पांडे सारख्या काही अभिनेत्रीचे जाणीवपूर्वक असं घडवून आणणं किंवा त्यासाठी गाजावाजा करणं मात्र अनैसर्गिक आणि तत्वाला धरून नसल्याने त्यावर साहजिक गदारोळ उडतो.


१९६८ साली ७ सप्टेंबर रोजी अमेरिकेतील एका सौन्दर्यस्पर्धेत स्त्री-समानतेच्या हक्कासाठी २०० स्त्रीवादी महिलांनी अंतर्वस्त्र जाळून निषेध व्यक्त केला होता, अमेरिकेतील 'ब्रा बर्निंग' या प्रातिनिधिक घटनेला ५३ वर्षे पूर्ण झाली आहेत. या निषेध आंदोलनाचा उद्देश ''स्त्रियांच्या शरीरापेक्षा तिच्या बुद्धीवर लक्ष केंद्रित व्हावे आणि तिच्याकडे मानवतावादी दृष्टीने पाहिले जावे'' असा होता. आज ५३ वर्षांनंतरही हेमांगी आणि सोनामसारख्या स्त्रियांना वेगवेगळ्या कारणांसाठी 'जगू द्या' अशी आरोळी ठोकत स्वातंत्र्याची मागणी करावी लागते याचे आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही.


काळ सरता सरता आज इथवर पोचेपर्यंत अश्या चळवळीचे स्वरूप बदलत गेले असले तरी समस्या सुटली नाही, मुद्दा कायम आहे बदललेल्या काळाचे स्वरूप समजून घ्यायला अलीकडच्या काळात होऊन गेलेल्या स्त्री आंदोलनांची काही उदाहरणं पाहणं महत्वाचं ठरेल.


> २०१० ऑगस्टमधे लॉस अ‍ॅन्जलेसच्या सुप्रसिध्द व्हेनिस बिचवर एक मोठा चळवळीचा ग्रुप, विशेष म्हणजे स्त्री -पुरुष दोन्ही समान संख्येनी एकत्र जमला होता. स्त्रियांच्या हक्कांसाठी लढा देणारे हे संघटन होते. 'गो टॉपलेस इक्वालिटी राइट्स' हा या आंदोलनाचा विषय होता.
त्यांच्या म्हणण्यानुसार 'अ‍ॅज लाँग अ‍ॅज मेन आर अलाउड टु गो टॉपलेस इन पब्लिक विमेन शुड हॅव द सेम कॉन्स्टिट्युशनल राइट ऑर एल्स मेन शुड हॅव टु वेअर समथिंग टु कव्हर देअर चेस्ट्स.' त्यांच्या वेबसाइट वर लिहिलल्याप्रमाणे, अमेरिकेसारख्या समान हक्काचा दावा करणार्‍या देशात स्त्रियांना या गोष्टीसाठी दंड होणे, हाकलून लावणे, अपशब्द ऐकावे लागणे अश्या अपमानास्पद गोष्टींना सामोरे जावे लागते त्याच गोष्टीसाठी पुरुषांना मात्र पूर्ण मान्यता आहे ही गोष्ट त्यांना इक्वल राइट्सवर आणलेली गदा वाटते.


> बळजबरी किंवा परंपरेच्या नावाखाली बुरखा घालायला लावणे यावर अनेकदा आंदोलनं झाली मात्र या विरुद्धही काही पाश्चात्त्य देशात 'बुरखा न घालु देणे' ही मुस्लिम स्त्रियांच्या हक्कावर आणलेली गदा असे वाटणार्‍या बऱ्याच मुस्लिम महिला आहेत, 'इफ आय कान्ट वेअर बुरखा, इट्स नॉट माय रिव्हॉल्युशन' या विचारांच ते समर्थन करतात. त्या स्वतः बुरखा घालतातच असेही नाही, काही हिजाबही घालतात. पण पाश्चात्य लोकांनी बुरख्यावर बन्दी घालणे हे त्यांना कट्टरपंथीय मुस्लिम देशांच्या बुरखा कंपलसरी करणे, किंवा इतर कडक कायद्या इतकेच अन्याय झाल्यासारखे वाटते हे विशेष.


हा सुरुवातीपासूनचा सगळा काळ स्त्रीअधिकाराच्या आंदोलनाच्या संघर्षाचाच काळ नव्हता तर प्रस्थापितांच्या आखून दिलेल्या लक्ष्मण रेषेला मोडणारी स्त्री म्हणून त्या मोबदल्यात पुरुषसत्ताक समाजाकडून अवहेलना सहन करण्याचाही काळ होता. ही जखडलेली बंधने झुगारतांना तिने उचललेला पवित्रा हा त्या स्त्रियांना पुरुषविरोधी स्त्री किंवा समाज चौकट लांघणारी बाई असं संबोधन करू लागली तिच्याबाबत नकारात्मक भाव पोसू लागला. इतकेच कशाला, तिच्या केसांच्या-कपड्यांच्या लांबीवरून, लिपस्टिकच्या रंगावरून किंवा चपलांच्या हिलवरून, एवढेच नाहीतर आता चक्क अंतर्वस्त्रांवरून तिच्या चारित्र्याचे मोजमाप करण्याची मानसिकता आजही दिवसेंदिवस वाढतच आहे. म्हणूनच सुरुवातीपासून समानतेचा लढा देतांना स्त्री-पुरुष समान कसे ह्याचे पुरावे देण्यासाठी अनेक सोंगे तिला घ्यावी लागली. पुरुषांच्या सवयी स्वीकारण्यापासून त्याच्यासारखा पेहेराव करण्यापर्यंत.. त्याच्यासारखी नोकरी-व्यवसाय करण्यापासून ते त्याच्यासारखी व्यसनं कारण्यापर्यंतही तिने मजल मारली. मात्र हे करतांना स्त्रीची नकारात्मक छबी प्रस्थापित होऊ लागली. या सर्वांपलीकडे पाहणारी आजची स्त्री पुन्हा बदलतांना दिसते आहे. मी पुरुषासारखीच आहे म्हणून मला समान अधिकार द्या असे म्हणून लढा देणारी स्त्री आज मी स्त्री आहे मला त्याचा अभिमान आहे एवढेच नाही तर स्त्री म्हणून पूर्ण स्वतंत्र आणि मनासारखे जगायचा अधिकारही आहे हे निक्षून सांगते आहे. आज तिचा लढा प्रथा-परंपरा किंवा पुरुषविरोधी नाही, तर त्या पलीकडचा कायदेशीर हक्कांचा आहे तसा तो तिच्या जन्मजात मिळालेल्या नागरिकत्वाचा, मानवी हक्कांचा आणि अस्तित्वाचा आहे आणि त्याची आत्मप्रतिष्ठा, बाईपणाचं स्वत्व जपण्याचा देखील आहे.

- रश्मी पदवाड मदनकर

(लेख ७ जुलै २०२१ च्या महाराष्ट्र टाइम्स दैनिकातील मैफल पुरवणीत सर्व आवृत्तींमध्ये प्रकाशित झाला आहे)








No comments:

Post a Comment

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...