Thursday 6 December 2018

कातरवेळ !

हि कविता म्हणजे एका निराशेने ग्रासलेल्या सखीने दुसऱ्या तश्याच हळव्या सखीला उद्देशून केलेला संवाद आहे. अनुभव समांतर असला की ते दुःख आपलं वाटतं. खरंतर समदुःख हे परानुभूती सहजतेनं देत असेल .. म्हणून नभ भरून आलं कि, पाऊस बरसून गेल्यावर, रात्र दाटून आली कि बरेचदा सारखे फीलिंग असतात, म्हणूनतर कविता आवडतात त्या बरचजणांना सारखंच रडवतात कुणीतरी तयार केलेली गाणी ऐकताना , चित्रपट पाहताना डोळ्यातून पाणी वाहू लागतं, मनाच्या घालमेली तश्याच अनुभवताना, जवळून बघत जगताना खूप कठीण आणि त्रासदायक होत जातं, असं मन घेऊन जन्माला येणं प्राक्तनच म्हणायचं..  पण आता आपल्यात बदल होत नाहीच हे समजावून घेउन स्वतःलाच सांभाळून घ्यावं लागतं कारण आपल्या मनाची त्या त्या घटनेला त्या त्या परिस्थितीला होणारी अवस्था समजून घेणारा सहयोगी प्रत्येकवेळी तश्याच मनाचा असतो असे नव्हे, तश्या मनाचा असला तरी त्याचे तुमचे प्राक्तन सारखे असतेच असे नाही आणि म्हणून तो त्या त्या प्रत्येकवेळी सोबत असतोच असे नव्हे..एकसारख्या मनाची माणसं एका विशिष्ट घटनेत विशिष्ट वेळी एकाठीकाणी सेम अनुभवातून जात असणे किंवा निदान मनाने तीथे अवैलेबल असणे हे योगायोगानेच घडत असावं आणि हे जेव्हा घडतं तो काळ डीवाईन होतो त्या विशिष्टांसाठी अजरामर ठरतो. कदाचित नियती त्यांना अश्या अजरामर ऐतिहासिक क्षणांसाठी क्षणैक भेटवत असेल पण असाही अनुभव दुर्मिळच... म्हणून अश्याच कुठल्याश्या हळव्या मनाच्या, समजून घेणाऱ्या सखीला हि आर्त मानभावनी आहे.

सावळओल्या आभाळाची सावळीच सावली गं ।
गहिवरलेेल्या शब्दांमधल्या अंतरातच मावली गं ।

हे आभाळ कसं दाटून सावळं झालंय बघ, सावळ्याची सावळीच सावली पसरलीय  ..सगळीच पानंफुलं सृष्टी सावळ्याच रंगात झाकोळली जाते आहे .. या वातावरणानं मन गहिवरून येतंय... कुणाला काय सांगू ? शब्दांमधल्या कंपनातून अंतरात दडून बसलेले सारे गुपित उकलतील म्हणून भीती वाटतेय .. आभाळ आणि मन गहिवरून ओसंडेस्तोवर संध्याकाळ अवतरते आहे...आणि सखी , मी लिहू लागलेय या आभाळाचं दुःख !

खिन्नसावळ्या स्निग्ध किनारी केसर आले रंगून गं ।
कातरवेळी सोन झळाळी उतरेल चोर पावली गं  ।

सखी , तशीतर ही संध्याकाळ , अशावेळी डोळ्यातून आसवे वाहून किनाराही आपोआप ओला होतो .. ढग भरुन आलेत मनातल्या पावसाची रिपरिप सुरु झालीय, इकडे निळाई उतरून आता केशरीया सूर्यकिरणं सप्तरंगात न्हावून धरतीवर उतरलीत ..आणि त्या सोनेरी किरणांची एक नाजूकशी तेजस झळाळी निसर्गाच्या गात्रागात्रात शिरूनही कातरवेळेची खिन्नता पाठ सोडत नाही..मळभ दाटतंय, काळ सरकतोय अंधाराचे सावट चोर पावलाने सर्वत्र पसरेल आता.

चंद्रसख्याच्या भोवताली मग चांदण्यांचे आलिंगन गं ।
सांज वेडीला रातराणीची भूलच अलगद भावली गं  ।

सखी , सांज मावळून रात्र होत जाते, या सांजवेडीला रातराणीची भूल अलगद वेढत / चढत जातेय  .. अगं , माझ्या सख्याची आठवण या चंद्रसख्याला पाहून होतेय ..आणि चांदण्या चंद्राला अलिंगन देताहेत तशा माझ्या अनिवार आठवणी त्याच्याभोवती रुंजी घालताहेत.

घनमोराचा फुलत पिसारा अंगणभर मन थयथय गं  ।
थरथर वेड्या श्वासामधूनी सरसर वीज धावली गं ।

घन म्हणजे ढग ते मयूरपंख लेवून अंगणात अक्षरशः थयथय नाचताहेत आणी माझे श्वास अनावर झालेत . इतका आवेग वाढला की त्याच्या ओढीनं अंगातून श्वासातून अक्षरशः वीज धावल्याचा भास होतो आहे.
 
सावळओल्या आभाळाची सावळीच सावली गं ।
गहिवरलेेल्या शब्दांमधल्या अंतरातच मावली गं ।

खिन्नसावळ्या स्निग्ध किनारी केसर आले रंगून गं ।
कातरवेळी सोन झळाळी उतरेल चोर पावली गं  ।

चंद्रसख्याच्या भोवताली मग चांदण्यांचे आलिंगन गं ।
सांज वेडीला रातराणीची भूलच अलगद भावली गं  ।

घनमोराचा फुलत पिसारा अंगणभर मन थयथय गं  ।
थरथर वेड्या श्वासामधूनी सरसर वीज धावली गं ।





No comments:

Post a Comment

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...