Wednesday 12 December 2018

चर्चा सेलिब्रेटी मॅरेजेसची ...



जगातल्या सर्व बातम्या देण्यासारख्या घटना संपुष्टात येऊन केवळ डोळ्यांचे पारणे फेडणा-या दिमाखदार विवाह लग्नसोहळ्याच्या बातम्या येऊ लागल्या तर ?? जिकडे तिकडे हि एकमेव चर्चा सुरु असली तर ? सकाळपासून टीव्ही चॅनेल्सवरून छोट्या छोट्या गोष्टींचे लाइव्ह प्रक्षेपण.. गेल्या वर्षभर प्रसारमाध्यमात जेकाही सुरु आहे ते पाहून हे प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे. जणूकाही जगातील सर्व घटना संपल्या आहेत, राजकारण बंद पडलंय, समाजकारण संपुष्टात आलंय, अपघात, चोऱ्या चपाट्या, मृत्यू, गरिबी, भ्रष्टाचार हे सगळं सगळं व्हायचं थांबलंय आणि घडतंय फक्त नं फक्त सेलिब्रेटींचे विवाह असे वाटायला लागावं इथवर या लग्नाच्या बातम्या, फोटो, व्हिडीओ प्रसारमाध्यमांमधून फिरताहेत.. नुसतं फिरत नाहीयेत तर गल्ली-बोळात, कट्ट्यावर, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामवर ह्याचे चर्वित चर्वण वायरल होतंय. यंदाचं वर्ष म्हणजे जगप्रसिद्ध भारतीय इंडस्ट्रीयालिस्ट आणि बॉलिवूडमधील ख्यातनाम व्यक्तींच्या लग्नसराईचं वर्ष म्हणून गाजलं. रिलायन्स कंपनीचे सर्वेसर्वा मुकेश आणि नीता अंबानींच्या मुलाचे लग्न आटोपले आता सुरु आहे लगीनघाई मुलीच्या लग्नाची.. अंबानी कुटुंब घरातून निघून कुठे पोचतात, कोणकोणत्या देवळात दर्शनाला जातात, पत्रिका कशी छापली आहे, लग्नात कुठले सेलिब्रिटी कोणता डान्स करणार, पाहुणे कोण आले, कसे दिसले, कुठे बसले, कसे नाचले..  सोनमच्या लग्नात कोण काय नेसणार, अनुष्काचं लग्न कोणत्या देशात होणार, दीपिकाने काय काय आणि कुठून कुठून शॉपिंग केलीय ते प्रियांका कुठल्या कुठल्या पद्धतीने लग्न करतेय .. या सगळ्यांच्या लग्नात कोणी हजेरी लावली, कुणाला निमंत्रण होतं, कुणाला नव्हतं ते लग्न लागताना कोण कसं हसलं कोण कसं दिसलं इथपर्यंत. लग्न आटोपले ..त्या नंतरही  कोण कोण कुठे हनिमूनला गेले, जातांना हातात हात होते का गालात स्मित होतं कि नाही अश्या बिनबुडाच्या ब्रेकिंग बातमीनं प्रसारमाध्यम आणि सोशल मीडिया तुडुंब डुंबून गेला होता.

माध्यम समूहात कोणत्या बातम्या विशेषत्वाने गाजतात त्यावरून वर्षभऱयाचा आलेख तयार केला जात असतो.  म्हणजे गेल्या वर्षाची ओळख त्या बातम्यांवरून ठरते.  किती जणांना कुठले कुठले पुरस्कार मिळाले. देशाबद्दल विदेशात झालेल्या काही घडामोडी. आरक्षणाच्या बातम्या, निवडणुकीचा धुराळा अश्या बातम्यांनी वर्ष वर्ष गाजत असतात. यंदाचं वर्ष मात्र सुरुवातीपासूनच खऱ्या अर्थाने लग्नसराईचं वर्ष म्हणूनच गाजतंय. सोनम कपूर, अनुष्का शर्मा आता दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा या लोकप्रिय अभिनेत्रींनी त्यांच्या आयुष्यातील नव्या प्रवासाला सुरुवात केली. सोनमन आनंद आहुजाशी, अनुष्काने देशाच्या लाडक्या खेळाडू विराट कोहलीशी गाठ बांधली, दीपिका पदुकोण हिने अभिनेता रणवीर सिंग याच्याशी तर देसी गर्ल म्हणून ओळखली जाणारी प्रियांका चोप्राही  अमेरिकन गायक निक जोनास याच्यासोबत विवाहबंधनात अडकली. यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलेलं असतानाच आता आणखी एका अभिनेत्रीच्या लग्नाविषयीची माहिती समोर येण्यास सुरुवात झाली आहे. ऑस्कर पुरस्कारावर आपली छाप पाडणाऱ्या Slumdog Millionaire या चित्रपटातील 'लतिका' या भूमिकेमुळे प्रकाशझोतात आलेली फ्रिडा लवकरच लग्न करणार असल्याच्या बातम्या माध्यमसमूहात झळकायला सुरुवात झाली आहे. म्हणजे वर्ष जाताजाताही लग्नाचीच बातमी भाव खाऊन जाणार.

परीकथेत शोभावे अशा सोहळ्याने डोळ्याचे पारणे फेडले असले तरी त्यामुळे अर्थव्यवस्थेचे मात्र कंबरडे मोडण्याची शक्यता असते. कोट्यवधी खर्चाचे ओझे विनाकारण झेलावे लागणे, लोकांच्या महत्वाच्या वेळेचा अपव्यय, विनमहत्वाच्या घटनांना वेळ दिल्याने महत्वाच्या बाबींकडे दुर्लक्ष, हा यातला मुख्य लूपहोल आहे.
पर्यटन आणि रिटेल व्यवसाय विवाहामुळे भरात असले तरी सामान्य जनतेच्या खिशातून काढूनच हा सोहळा पार होत असतो.. यातील सगळ्यात मोठा खर्च सुरक्षा व्यवस्थेवर करण्यात आलेला असतो. एकंदरीत समाजात आपण नट-नट्याना अवास्तव महत्व देऊन नको इतके लाडावून ठेवले आहे. अनेक माध्यमांतून त्यांचा उदो उदो होत असतो. त्यांची प्रेम प्रकरणे, विवाह-सोहळे, घटस्फोट आणि विवाहबाह्य संबंध इ. गोष्टी ‘राष्ट्रीय घटना’ असल्यागत सतत चघळले जातात. ज्या नटांवर फौजदारी गुन्हे दाखल झालेले असतात त्यांच्या चित्रपटांचा गल्ला कितीशे कोटी करण्याचा जणू विडाच जनता उचलते. काही नटांच्या आयकर थकबाकीबाबत बातम्याही ‘टीआरपी’ साठी प्रसिद्ध होतात आणि चवीने पहिल्या जातात. एक दिवसाचीही समाजसेवा न करता ही नटमंडळी जेव्हा थेट लोकसभेच्या निवडणुकीस उभी राहतात तेव्हाही आपण विचार नं करता त्यांना निवडून का देतो? सगळेच असे असतात असेही नाही अगदी मोजके अभिनेते सामाजिक भान ठेऊन वागतात. त्यांच्यात चांगल्या नागरिकाची लक्षणे जरूर असतात. परंतु ते नको त्या मंडळींच्या झगमगाटात झाकोळले जातात खरे. आपले मनोरंजन करणारे कलाकार आवडण्यात काही गैर नाही पण आपल्या आयुष्यात त्यांना किती स्थान द्यावे हे ज्याचे त्याला समजायला हवे.

रश्मी पदवाड मदनकर
१०. १२. १८


(दैनिक सकाळ विदर्भ आवृत्तीच्या 'मी' पुरवणीत प्रकाशित)


No comments:

Post a Comment

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...