Thursday 6 December 2018

वाटतंय ..

वाटतंय डोळ्यांना अन मनाला उन्हात नेऊन सोडून यावं
दाटलेली ओल आटली पाहिजे.. सुकली पाहिजे
उरलेली सगळी उब मग डोळ्यातच साठवून घेऊन यावी
ठेऊन द्यावी उशाशी ..
कधीतरी जागल्या रात्री तगमग वाढतेय असं वाटेल
भावनांचा उद्रेक होईल, मग
ती उशाखालची उब पेनात भरावी .. आणि
नक्षीदार वळणांनी ओतत राहावी कागदावर
शब्दसुमने गुंफत गुंफत आकार घेतील,
 नाद, गंध, रंग स्पष्ट होऊ लागतील
अर्थ उमटू लागतील ..ते भिनू द्यावेत आतात
उधळून टाकू नये.. राखून ठेवावे तिथेच
मनाच्या भावविभोर अवस्थेसाठी ..

कधीतरी ओल पुन्हा दाटून आलीच कि ..
डोळे पाझरायला लागले कि
अन उबेचे शब्दही भिजले कि,
डोळ्यांचा डोह करावा ..मनाचा सागर
आणि
डोळ्यांना अन मनाला उन्हात नेऊन सोडून यावं
पुन्हा ... पुन्हा





No comments:

Post a Comment

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...