वाटतंय ..

वाटतंय डोळ्यांना अन मनाला उन्हात नेऊन सोडून यावं
दाटलेली ओल आटली पाहिजे.. सुकली पाहिजे
उरलेली सगळी उब मग डोळ्यातच साठवून घेऊन यावी
ठेऊन द्यावी उशाशी ..
कधीतरी जागल्या रात्री तगमग वाढतेय असं वाटेल
भावनांचा उद्रेक होईल, मग
ती उशाखालची उब पेनात भरावी .. आणि
नक्षीदार वळणांनी ओतत राहावी कागदावर
शब्दसुमने गुंफत गुंफत आकार घेतील,
 नाद, गंध, रंग स्पष्ट होऊ लागतील
अर्थ उमटू लागतील ..ते भिनू द्यावेत आतात
उधळून टाकू नये.. राखून ठेवावे तिथेच
मनाच्या भावविभोर अवस्थेसाठी ..

कधीतरी ओल पुन्हा दाटून आलीच कि ..
डोळे पाझरायला लागले कि
अन उबेचे शब्दही भिजले कि,
डोळ्यांचा डोह करावा ..मनाचा सागर
आणि
डोळ्यांना अन मनाला उन्हात नेऊन सोडून यावं
पुन्हा ... पुन्हा





Comments

Popular posts from this blog

रागातून जागृतीकडे : आधुनिक स्त्रीचा आत्मभानाचा प्रवास !

राधा-अनय