Thursday 24 August 2017

पत्र - 2 - आतल्या मास्तरीण बाई

आज सहज मोकळीक मिळाली म्हणून माझ्या आवडत्या खिडकीत येऊन बसले..खुश होते पण एकांत हवा होता, तंद्री लागली. चिंतन करता करता अनेक प्रश्नांची सरबत्तीच सुरु झाली आणि माझ्याच प्रश्नांच्या गुंत्यात मी गुंतत गेले..थोडी असहज होऊ लागले. अस्वस्थता वाढली. असे व्हावे आणि आतल्या मास्तरीण बाई अवतरणार नाही असे होणे नव्हतेच..त्या आल्या अन न लिहिलेले एक पत्र माझ्या हातात ठेवले.
****************************************


ए वेडे,
एखादा काळ मधून मधून येत असतो आयुष्यात जेव्हा गोतावळा नकोसा होतो. स्व-सहवास आवडायला लागतो. काही गुंते, काही बोचके असतात साठलेले त्यांना जरा मोकळा श्वास घेऊ द्यावा असं जाणवायला लागतं. मग आपण सारं या ओढून घेतलेल्या एकांतात उकलून पुढ्यात मांडून बसतो. कधी कधी या गाठोड्यातून किती प्रश्न बाहेर पडतात ना? कधीचे, कुठले-कुठले पत्ता नसतो. गाठोड्यातून पुढ्यात आणि पुढून मनात आलेले हे प्रश्न कुणा कुणाला विचारावे असं वाटत राहतं. पण फक्त विचारावं वाटतं, म्हणजे मला असे प्रश्न पडतात, पडू शकतात ही अशी माहिती म्हणून पुढल्याला द्यावी वाटते. प्रश्नांना अपेक्षित अशी उत्तर नकोच असतात. हाच तो प्रश्नांचा साठलेला गुंता-बोचका असतो ज्याच्या जवळ असण्याचाच मनाला आधार वाटत राहतो.
काही प्रश्न अनुत्तरीतच राहावीत असे का वाटत असावे..माहिती? त्या प्रश्नांवर सतत विचार करत राहणे त्यांना घोकत राहणे किंवा माझ्याकडे ही न सोडवता न साठवता येणारे प्रश्न आहेत..सलणारे पण तरीही गोड वाटणारे ही बाबच सुखद वगैरे वाटत असते. मनालाही खेळ लागतो गं - विरंगुळा. चुरगाळून कोड्याचा कागद फेकायचा आणि पुन्हा पुन्हा उचलून वाचायचा, पुन्हा कोडं सुटत नाही म्हणून पुन्हा फेकायचा असा गमतीदार खेळ खेळल्यासारखे आपणंच आपल्या मनाशी खेळत असतो. खोल एखाद्या जखमेच्या वेदना बराच काळ सहन करत राहिलो की त्या दुखण्याचीही सवय होते. त्या वेदनेचे भांडवल आपसूक आपल्या हातून होत जाते. नकळत चढलेली खपली नखाने कोरून आपण काढत राहतो. जखम भळभळत राहते. जखम होण्यापेक्षाही ती जखम बसल्यावर मधून मधून उमलणाऱ्या जखमेची आठवण अधिक वेदनादायी होत जाते. होतं ना गं असं? बरेचदा. खरं सांगू साथ कोण कशी देतंय याहून अधिक कुणीतरी साथ देतंय हे महत्वाचं होऊन बसतं. ती सोबत सुखद का दुःखद हा भाग काळासोबत गौण होत जातो आपल्या लेखी. हेच कारण असेल बहुदा. असू दे ना असेल काहीही कारण. पण असं होतं मात्र नक्की. काही प्रश्नांची उत्तरं माहिती असतात पण ती आपण आपल्याच हाताने हळूच बाजूला कोपऱ्यात सरकवून देतो, सगळ्यांच्या नकळत अगदी आपल्याही, आणि त्या प्रश्नाला प्रश्नच राहू देण्यात परम सुख मानतो. कारण उत्तरानंतर प्रश्न प्रश्न उरणार नसतो, तो उत्तर बनून भुर्रकन उडणार असतो. ते नको असतं आपल्याला. काही प्रश्नांना तर काही उत्तरांना आपणच आपले गृहीत धरून बसलेले असतो. हे जे काही आहे ते आपले आपल्यालाही अनपेक्षितच असतं. जे काही अपेक्षे अनपेक्षेच्या पलीकडचं घडत असतं ते इतकं सुंदर असतं की अनुत्तरित प्रश्नांची डोक्यावर चढलेली झिंग उतरूच नये असं वाटत राहते.
असो …
तर कधी कधी प्रश्नांचीच परीक्षा घ्यावी वाटते ती अशी..त्यात गैर तरी काय ?
तुझ्याच
आतल्या मास्तरीणबाई




No comments:

Post a Comment

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...