Saturday 12 August 2017

(कुठेतरी वाचलेलं - आवडलेलं)

कथा हा एक प्रवास असतो. सुरूवातीपासून शेवटपर्यंतचा. मधल्या काळात जे घडते ते कथानक असते. प्रत्येक लेखकाची लेखनशैली वेगळी असते, असावी. कथेची मांडणी कशी करावी, कशी असावी? या बद्धल रूढ नियम नाहित. कथा सहजगत्या उलगडत गेली तर ती वाचकांपर्यंत लवकर पोहचते. काही कथा वेगळ्या धाटणीच्या असतात, त्या पहिल्या वाचनात लवकर कळत नाहीत. त्यामधील ओळीमागचं, न लिहलेलंही समजून घ्यावं लागतं, काही जागा वाचकांसाठी सोडायच्या असतात. वाचकांना त्यांच्या आकलनाप्रमाणे त्यात रंग भरता येतात. एकच कथा अनेक वाचकांना वेगवेगळी अनुभूती देत असते. आकाशातल्या ढगांचे आकार प्रत्येकाला वेगळे दिसतात, तसंच हे.

कथा लेखन हे उस्फुर्त अंत:प्रवाही असावे. शब्दांचा कच्चा माल घेवून कथेची इमारत जरूर उभी राहू  शकते पण ती साहित्यकृती होवू शकत नाही. इकडची वीट तिकडे, तिकडचा दगड इकडे करून कथेचा तोल सावरला जाईलही पण ते शब्दांचे बांधकामच !

एका तंद्रीत कविता सुचते. एका तल्लीनतेत चित्रकार रेषांचे फटकारे मारत चित्राला जिवंत करत असतो. समाधी अवस्थेत जावून मुर्तीकार छिन्नी हाथोड्याने मुर्ती घडवत असतो. लेखनाचेही तसेच आहे. ठरवून लेखन होत नाही, ते आपोआप व्हावे लागते. लेखन हे अपत्य जन्मासारखे असते, लेखक त्याला फक्त जन्म देवू शकतो, ते कसले जन्माला येईल हे लेखकाच्याही हातात नसते.

लेखकाने लिहित जावे, वाचकांनी वाचत जावे, समिक्षकांनी त्याचे रसग्रहण करावे. वाचकांना काय आवडेल, काय आवडणार नाही ? याचा विचार लेखकाने लिहताना करू नये, लिहून मोकळे व्हावे. लिहण्याची वेळ साधावी. पुढचे वाचकांवर सोपवावे. वाचकानूनय सर्वात धोकेदायक ! मागणी तसा पुरवठा करत बसलो तर आपण यशस्वी उद्योजक नक्की होवू पण साहित्यिक होवू शकणार नाही. भले भले लेखक लोकप्रिय झालेले आहेत, त्यांची वाचक संख्या अफाट आहे तरी त्यांना साहित्यिक म्हणून ओळख नाही !

आपल्याला लेखक व्हायचेय की साहित्यिक याचा विचार करणे गरजेचे आहे !

लेखक :  संजन मोरे

No comments:

Post a Comment

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...