Wednesday, 24 December 2025

एका ‘T’ची कहाणी - कायांतर

 #मुखपृष्ठ

#कायांतर ही केवळ एक कादंबरी नाही; ती आहे एका ‘T’ची कहाणी...LGBTQAI++ समुदायातील ‘T’, म्हणजेच ट्रान्सजेंडरची.
पण ही फक्त एका व्यक्तीची कथा नाही. ही कहाणी आहे एका आयुष्याची....होरपळत, तावून-सुलाखून, वेदनांतून घडत अखेर स्वतःचं अस्तित्व उजळवून टाकणाऱ्या
एका ताऱ्यासारख्या जीवनप्रवासाची. आणि तितक्याच ठळकपणे, आपण जगत असलेल्या या काळाची… या एराची.
हा असा काळ आहे जिथे काही माणसांची असंवेदनशीलता इतर काही माणसांच्या आयुष्याची वाताहत करतात. ज्या समुदायाचा भारतीय इतिहास सांगतो की ते कधी राजाश्रय प्राप्त होते, आदराने आणि प्रतिष्ठेने.. नवरत्नातील रत्न म्हणून राजमहाली वावरत होते. तोच समुदाय आज उपेक्षित का झाला असेल बरं ? कुठे, कधी आणि कसे आपण समाज म्हणून चुकलो की ज्यांना कधी सन्मान मिळत होता, त्यांना आज दारोदार टाळ्या वाजवत फिरण्याची अक्षरशः भीक मागण्याची वेळ आली?
आपल्या नाकारण्याची किंमत या समुदायाला कोणकोणत्या यातनांतून मोजावी लागते, हे जर आपण संवेदनशील नजरेने समजून घेतले, तर खूप काही बदलू शकते... आणि हा बदल दोन्ही बाजूंना समाधान देणारा ठरेल याची खात्रीही वाटते.
#कायांतर या कादंबरीच्या माध्यमातून हे समजून घेणं अधिक सोपं होईल असं प्रामाणिकपणे वाटतं.
माझ्या मनाला खोलवर स्पर्श करून गेलेल्या एका ट्रान्सजेंडर महिलेच्या आयुष्याचा हा लेखाजोखा आहे..पण जसाच्या तसा नाही; तर तिच्यासह या समुदायातील इतर अनेक घटकांचे, त्यांच्या वेगळ्या जगण्याचे, अनुभवांचे, संघर्षांचे आणि जगण्यातल्या सूक्ष्म कंगोऱ्यांचे संवेदनशील चित्रण यात गुंफले आहे.
वास्तववादी आशय असलेली ही चरित्रात्मक कादंबरी
वाचकांच्या मनात स्थान मिळवेल, त्यांना विचार करायला भाग पाडेल आणि कदाचित थोडं अधिक माणूसही बनवेल अशी मनापासून आशा आहे.



''कायांतर'' कादंबरीच्या निमित्ताने...

 समाजात #तृतीयपंथी व्यक्तींविषयी काळानुसार असंख्य #कथा निर्माण होत गेल्या... काही अफवा, काही अर्धसत्य तर काही पूर्वग्रहांनी ग्रसित. या कथांनी त्यांच्या भोवती एक धूसर, अंधुक वलय निर्माण केलं. परंतु त्या धुक्याच्या पलीकडे, जरा जवळून पाहिलं की कळतं; हा समुदाय अतिशय भावनाशील-संवेदनशील आणि माणुसकीच्या नात्यांना मायेने जपणारा आहे. #नव्या_येऊ_घातलेल्या_पुस्तकाच्या_निमित्ताने

भूक भागवण्याचा आणि जिवंत राहण्याच्या संघर्षात अनेक तृतीयपंथीना कोणकोणत्या दिव्यातून जावे लागते, आयुष्यभर नरकात भोगाव्या इतक्या दुःखयातना भोगाव्या लागतात. हे सगळं फक्त एवढ्यासाठी कारण समाज त्यांना स्वीकारत नाही.. हे किती दुर्दैवी आहे. आज या बाबत दोन्ही बाजूने जागृती होत असली, बदल घडत असला तरी पूर्ण परिवर्तन घडायला अनेक युगे जावी लागणार आहेत. माझं येऊ घातलेलं हे नवं पुस्तक #कायांतर लिहीत असताना, अनेक तृतीयपंथींच्या भेटी घेतल्या आणि मनाला स्पर्शून जाणारे, हृदय पिळवटून टाकतील असे अनुभव ऐकायला मिळाले. ते ऐकताना आपण कुठल्यातरी वेगळ्याच जगाच्या कहाण्या ऐकत आहोत असे वाटू लागते; कारण आपल्या जगात, आपल्या भोवताल सगळं आलबेल असतं; किमान या स्तरावरचा संघर्ष तरी नसतो. इतकं सगळं भोगुनही, आयुष्याला झुंज देणाऱ्या या व्यक्तींच्या डोळ्यांत एक वेगळंच तेज दिसतं, तावून सुलाखून, संघर्षांनी घणाघात घालून पैलू पडलेलं. स्वतःच्या अंगांगावर घाव झेलून सोलून निघालेलं पण तरीही इतरांच्या वेदना ओळखणारं. स्वतःच्या जखमा दडवूनही इतरांच्या दुःखाना आधार देण्याची त्यांची तयारी असते, कसलाही संकोच न बाळगता ते सदैव तत्पर असतात. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून त्यांना वारंवार दूर ठेवण्यात आलं, तरीही संकटाच्या क्षणी त्याच माणसांच्या मदतीसाठी ते पुढे येताना दिसतात; कुठे वाद निर्माण झाला तर तेच शांततेचा दिवा पेटवतात; कुणी अडचणीत सापडलं तर हात धरून सांभाळून उभं करतात. त्यांचं वागणं ही केवळ मदत करण्याची कृती नसते; ती त्यांच्या मनातील खोलवर वाहणाऱ्या मानवतेची प्रकट रूपं असतात. जगाने त्यांच्याभोवती गैरसमजांच्या चौकटी उभ्या उभ्या केल्या, पण त्यांनी माणुसकीतील ऊब कधीच गमावली नाही. उलट, परिस्थिती तापली की तेच शांततेचा शिडकावा करून लोकांना एकत्र आणणारे ठरतात.
यांच्याबाबत अनेक सत्य आहेत. त्यातले काही अनुभव ''कायांतर'' कादंबरीच्या निमित्ताने तुमच्याशी शेअर करावे वाटतात, (या कथा पुस्तकात नाहीत.. पुस्तकात एक वेगळीच अधिक गहिरी सत्यकथा आहे. आता पोस्ट करत असलेल्या कथा केवळ या समुदायांना मानवंदना देण्यासाठी)
२०१५ च्या चेन्नई पुरात संपूर्ण शहर पाण्यात बुडालं होतं. हजारो लोक घरी अडकले होते. वीज खंडित झाल्याने सर्वत्र अंधार, भीती आणि अनिश्चितता वाढत होती. अशा कठीण वेळी मदतीसाठी कोण येईल याचीच शंका आणि धास्ती अनेकांच्या मनात होती.
पण समाजाकडून अनेकदा उपेक्षित ठरवलेला तृतीयपंथी समुदाय मात्र सर्वांत आधी मदतीला पुढे आला होता. प्रत्यक्ष पुराच्या पाण्यात उतरून कित्येकांचे जीव त्यांनी वाचवले होते. स्वतःंच्या छोट्या-छोट्या घरात जागा कमी असताना देखील, अनेक ट्रान्सजेंडर महिलांनी पुरग्रस्तांना आसरा दिला. पाणी, अन्न, कपडे जे काही त्यांच्या हाताशी होतं ते त्यांनी इतरांना वाटून दिलं होतं. काहीजण पावसात भिजत, गुडघाभर पाण्यातून चालत अडकलेल्या कुटुंबांपर्यंत पोहोचले. कुणाच्या हातात औषधं होती, कुणी अन्न घेऊन पोचलं होतं, तर LGBTQ+ समूहांनी एकत्र येऊन, मिळेल तसं साहित्य जमवून पुरग्रस्तांपर्यंत पोचवलं.
या समुदायाला स्वतःलाच राहत छावण्यांमध्ये अनेकदा जागा मिळत नव्हती. तरीही त्यांनी स्वतःच्या अडचणींपेक्षा इतरांच्या संकटाला प्राधान्य दिलं. त्या दिवसांत तृतीयपंथी समुदायाने खऱ्या अर्थाने मानवतेचं काम केलं. भीती आणि गोंधळाच्या काळात त्यांनी दाखवून दिलं, माणसाची ओळख, रूप किंवा नावाने नाही, तर त्याच्या माणूसपणाच्या कर्माने आणि कृतीने केली जाते. त्यांची मदत, त्यांची संवेदनशीलता आणि संकटातही धैर्याने उभं राहण्याची ताकद हे सगळं समाजाने मान्य करायलाच हवं. कारण खऱ्या मानवतेचा अर्थ मोठ्या शब्दांत नसतो, तो अशा लोकांच्या छोट्या पण मनाला भिडणाऱ्या कृतींमध्ये असतो.



तृतीयपंथी समाजाकडे वर्षानुवर्षे एकाच नजरेतून पाहण्याची आपली सवय झाली आहे. पण कधीतरी तो चष्मा बदलून पाहण्याची गरज आहे. कारण या समुदायाकडे शिकण्यासारखं, समजून घेण्यासारखं आणि मनापासून स्वीकारण्यासारखं खूप काही आहे. आपण समाज म्हणून त्यांना नाकारण्यासाठी हजार कारणं सहज शोधतो; त्यांच्या चुका मोठ्या करून पाहतो, पण त्यांच्या चांगुलपणाकडे पाहण्याइतपत थांबत नाही. उलट, त्यांच्या मनातील माणुसकी, त्यांची निस्वार्थ मदत, त्यांचं निरपेक्ष प्रेम याकडे लक्ष दिलं तर त्यांना स्वीकारण्याचीही अनेक कारणं आपल्याला सापडतील. हा दिवस आपण केव्हा मान्य करू, तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने माणूस म्हणून मोठे ठरू.


रश्मी पदवाड मदनकर

Tuesday, 23 December 2025

मानवतेचा खरा अर्थ दाखवणारा तृतीयपंथी समुदाय


२०१४ चा काळ होता… २३ ऑक्टोबर 2014. ती दिवाळीची रात्र होती. दिल्लीच्या त्रिलोकपुरी परिसरात त्या दिवशी हवा काहीतरी वेगळीच जाणवत होती. सकाळपासूनच गल्लीबोळांत कुजबुज वाढत होती, लहानमोठे वाद ऐकू येऊ लागले. रस्त्यांवर तणावपूर्ण चेहरे फिरत होते. जणू काही अदृश्य ठिणगी हवेत पेट घेण्याचीच वाट पाहत होती. संध्याकाळी सूर्य मावळायला लागला आणि शहरावर अंधार पसरू लागला तशी परिस्थिती अचानक हाताबाहेर गेली. दिल्ली अचानक थरथरली… कुठेतरी दगडफेक झाली, एखाद्या गल्लीत भांडण पेटलं, दुसऱ्या टोकाला जमाव एकत्र येऊ लागला आणि क्षणभरात संपूर्ण परिसरात सांप्रदायिक दंगल उसळली.



लोक धावाधाव करू लागले; दुकाने, कार्यालयांचे दरवाजे झटापट करत बंद करू लागली. कुठे हाका, कुठे किंकाळ्या, काही घरांच्या खिडक्यांमधून रडणाऱ्या स्त्रियांचे आवाज ऐकू येत होते. कुणाच्या मोबाईलवर अफवा, कुठे भीतीची लाट… हवा धुराने आणि भयाने भरून गेली होती. पोलीस पुरेसे नव्हते, नेते दिसत नव्हते आणि संपूर्ण परिसर तोडाफोडीच्या, जळायच्या मार्गावर उभा होता. जमाव गटागटाने एकमेकांना मारण्याच्या कापून टाकण्याच्या उद्देशाने धावून येत होते. बायका, लहान मुले धास्तावल्या होत्या. या सगळ्या तणावात किती आणि कोणकोण घायाळ होतील कित्येकांचे जीव जातील याची भीती मनामनात साठून राहिली होती.



आणि तेव्हा पुढे आले… समाजाने उपेक्षित, वाळीत टाकलेली, टाकाऊ मानलेली ती माणसे...१५ तृतीयपंथी !
ब्लॉक ३५ च्या कोपऱ्यावरून दगड आणि शस्त्र घेऊन पुढे येणारा एक जमाव दिसताच, लोक घाबरून पळू लागली. आसपासच्या परिसरात माणसे घराची दारं बंद करू लागले. बाहेर उघड्यावर असणाऱ्या माणसांचे आता काही खरे नाही असे वाटत असतानाही, त्या वेळी १५ तृतीयपंथी बहिणी मात्र पळून गेल्या नाहीत.
नाही.
त्या उलट त्या रौद्र जमावासमोर जाऊन ठामपणे उभ्या राहिल्या. त्यांनी हात वर करत शांततेची विनंती केली, रागाने पेटलेल्या जमावाशी संवाद साधला. त्यांच्या शब्दांना मान मिळतो की नाही हा प्रश्न नव्हता, त्या क्षणी काहीही करून त्यांना फक्त रक्तपात थांबवायचा होता, माणसे वाचवायची होती. परिसर शांत करायचा होता, लोकांना सुरक्षित ठेवायचं होतं.
त्यांची नेता किन्नर लैला शाह (35) मोठ्या आवाजात म्हणाली: “भांडणानं कुणाचं घर वाचणार नाही… परत फिरा! शांतता ठेवा!” त्यांचा आवाज प्रामाणिक होता, धाडसी होता. त्या आवाजात काळजीपूर्ण दरारा होता. डोळ्यात धगधगती आग होती, निश्चय होता; कदाचित म्हणूनच जमावाची पाऊलं तिथेच थांबली.
त्या भयंकर रात्रीत त्यांनी एक आशेचा दिवा सुलगावला होता.. त्या रात्री त्यांनी काही घरांत घुसून दडून बसलेल्या भीतीने धास्तावलेल्या महिलांना सुरक्षित बाहेर काढलं. रडणाऱ्या मुलांना सांभाळलं. दोन्ही समुदायातील लोकांशी संवाद साधून गैरसमज कमी केले. गल्लीबोळात उभं राहून तणाव कमी होईपर्यंत जागरण केलं. आजही दिल्लीचे लोक म्हणतात की त्या १५ बहिणी त्या दिवशी नसत्या तर तो परिसर अनेक दिवस जळत राहिला असता.

ही केवळ एक धाडसाची गोष्ट नाही ही मानवतेची कहाणी आहे.. ज्यांना समाज धुडकावून लावतो, लोकांच्या लेखी ज्यांची किंमत शून्य आहे, ज्यांचा उल्लेख देखील कित्येकांना आजही अपमानास्पद वाटतो. त्याच लोकांनी त्या दिवशी दिल्ली वाचवण्यासाठी सर्वांत मोठी भूमिका निभावली होती. ज्यांच्या शेजारी उभे राहणेही लोक टाळतात, ज्यांना तुच्छतेची वागणूक देतात त्याच तृतीयपंथींनी स्वतःच्या सुरक्षेचा विचार न करता, हजारो लोकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी घेतली.
त्यांनी सिद्ध केलं "माणुसकीच्या मार्गाने चालण्यासाठी माणसांनी निर्माण केलेल्या चौकटीत जन्म नसला तरी; मानवता लिंगावर अवलंबून नसते... तर माणुसकी निभवायला जे हृदय लागते ते हृदय त्यांच्याकडे आहे... अतूट, निर्भय, नि:स्वार्थ.''
पण कितीही चांगलं वागण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्या वाट्याला काय येतं ? अशावेळी फ़िराक़ गोरखपुरी यांचे शब्द आठवतात....
“हर ज़ोर-ए-ज़माने का सहा हमने बड़ी मुश्किल से,
हम लोग मगर आदमी कहलाए बड़ी मुश्किल से…”
या ओळी ज्या वेदना दिसतात, त्या आजही आपल्या समाजातील तृतीयपंथी समुदायाच्या संघर्षांना तंतोतंत लागू पडतात. समाजाकडून सतत वंचना, गैरसमज आणि उपेक्षा कित्येकदा तर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष केला जाणारा अन्याय सहन करूनही, फक्त “माणूस” म्हणून ओळख मिळवण्यासाठी त्यांची अविरत झुंज चालू असते. पण या सर्व अडचणी संघर्ष झेलत जगतानाही तेच अनेकदा माणुसकीचे सर्वात मोठे उदाहरण बनून समोर येतात, त्याच समाजासाठी धावून येतात. त्यांच्या प्रयत्नांची दखल म्हणून त्यांना पुरस्कारांची अपेक्षा नसते.. फक्त दोन प्रेमाचे, आदराचे शब्दही त्यांना पुरे असतात. पण आपलीच झोळी अनेकदा इतकी फाटकी असते की इतके साधे शब्दही आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी धजावत नाही..
माझ्या नव्या येऊ घातलेल्या पुस्तकाच्या निमित्ताने, त्यांच्या या अविरत संघर्षाला आणि मानवी मूल्यांना शब्दरूपातील विनम्र मानवंदना अर्पण करण्याचा हा छोटासा प्रयत्न…


रश्मी पदवाड मदनकर

Wednesday, 3 December 2025

From wheels to wings ...

 From wheels to wings .... A symbol of freedom beyond limitations; the iconic wheelchair grave in Salt Lake, America.

काहीतरी वाचत शोधत राहिलं की काहीतरी सापडत राहतं... कधी मनाला भावणारं, तर कधी बुद्धीला खाद्य देणारं. असच काहीतरी सापडलं आणि शेअर करावं वाटलं. प्रेमाला कुठलीच मर्यादा नसते म्हणतात, आणि ते प्रेम अपत्याबद्दल असेल तर ते मर्यादेच्याही पलीकडे कितीतरी व्यापक होऊन बसतं. परवा एका वेगळ्या कारणासाठी काही संदर्भ शोधत होते... तेव्हा एक व्हिडिओ पाहण्यात आला; त्यात अतिशय सुंदर स्मारक शिळा नजरेस पडली. खूप आकर्षित केले त्या मूर्तीने. संपूर्ण स्मशानभूमीत ते एकमेव थडगे किंवा स्मारक (Grave) होते.. जे लक्ष आकर्षित करत होते. आपल्या प्रिय मुलाच्या मृत्यूनंतर त्या वडिलांनी ज्या भावनेने ते बनवले होते तेही विशेष आहे. ते थडगे आहे मॅथ्यू स्टॅनफर्ड रोबिसन याचे. ते पाहून माहिती काढल्यावाचून राहवले नाही.



मॅथ्यू स्टॅनफर्ड रोबिसनचा जन्म २३ सप्टेंबर १९८८ मध्ये झाला होता, जन्मतःच गंभीर आणि कधीही बरे न होणारे अपंगत्व घेऊन तो जन्माला आला.. तो जन्मापासूनच अंध आणि पंगु होता. जन्मानंतर तो काही तासच जिवंत राहील, असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला होता; परंतु तो जवळपास ११ वर्षे धैर्याने आयुष्य जगला. या काळात त्याच्या आईवडिलांनी त्याच्यासोबत जगलेल्या एकेक क्षणाचे महत्त्व समजून ते क्षण जतन केले आणि त्याच्या मृत्यूनंतर देखील त्यांनी त्याच्या स्मृतींना अमरत्व देण्यासाठी असे रूप दिले कि ते आजही प्रत्येक पाहणाऱ्याला भावुक करून जातं.

मॅथ्यू १० वर्ष जगला पण पूर्णकाळ व्हीलचेअरवर बसून.. त्याची अनेक स्वप्ने होती जी त्याला कधीच पूर्ण करता आली नाहीत. कारण तो बंधनात होता... बंधन शरीराचं, वेदनेचं, अपंगत्वाचं. त्याचे आई-वडील त्याला फार जपत असले तरी त्याचा मृत्यू मात्र अटळ होता; आणि खरतर हा मृत्यूचं त्याची सुटका करू शकणार होता. या अपंग शरीरापासून, ते देत असलेल्या दुःखापासून आणि त्या व्हीलचेअरपासून मृत्यूचं त्याला स्वतंत्र करू शकणार होता. अखेर तो दिवस उगवला. १९९९ मध्ये मॅथ्यूच्या निधनानंतर, त्यांचे वडील अर्नेस्ट रोबिसन आणि चुलत बहीण सूझन कॉर्निश यांनी मॅथ्यूच्या स्मरणार्थ अत्यंत हृदयस्पर्शी असे एक शिल्प तयार केले. या शिल्पामध्ये मॅथ्यू आपल्या व्हीलचेअरवरून उडत स्वर्गाकडे झेपावत असल्याचे दिसते. सॉल्ट लेक सिटी स्मशानभूमी येथे उभारलेले हे स्मारक दिव्यांगच काय प्रत्येक पाहणाऱ्या व्यक्तींकरिता आकर्षणाचा, प्रेरणेचा स्रोत आहे. मॅथ्यूच्या पालकांनी १९९३ मध्ये 'ऍबिलिटी फाउंडेशन' ची देखील स्थापना केली. या संस्थेमार्फत गरजू लोकांना सहाय्यक उपकरणे उपलब्ध करून दिली जातात. त्यांच्या संकेतस्थळावर मॅथ्यूच्या स्मारकाची प्रतिकृती व इतर स्मरणिकाही विक्रीस उपलब्ध आहेत.


गम्मत

 NBT च्या राष्ट्रीय पुस्तक प्रदर्शनात झालेल्या मुलाखतीत विशाखाने एक प्रश्न विचारला... 

“तुम्हाला लिखाणासाठी प्रेरित करणारा एखादा गमतीशीर किस्सा सांगा ना. काहीतरी मजेशीर घडले असेल, ज्यातून काहीतरी लेखणीत उतरले असेल?”

असा प्रश्न आला की खरतर मीच गोंधळते. कारण मी लिहिते ते बहुतांश गंभीर, वास्तविकतेत घडलेल्या घटनांमधून, आणि त्या अनुभवांतून मनात निर्माण झालेल्या उद्विग्नतेतून व कोलाहलातून जन्माला आलेलं असतं. माझ्या लिखाणाचा संबंध हा प्रत्यक्ष जमिनीवर उतरून केलेल्या कामाशी, अभ्यासाशी आणि संवादांशी आहे. त्यामुळे त्या लिखाणामागे गमतीदार किस्सा असण्याची शक्यता फारच कमी. उलटपक्षी गंभीर घटना अधिक असतात. 

गम्मत असेल तर ती लिहिण्यानंतर किंवा लिखाणाच्या प्रक्रियेदरम्यान घडणाऱ्या प्रसंगांत असते. संवेदनशील विषयांवर लिहिल्यावर लोकांच्या प्रतिक्रिया पाहण्यात जी गम्मत असते, किंवा गंभीर मुद्द्यांबाबत लोकांच्या उथळ समजुतींशी सामना झाला की जी विडंबनात्मक मजा जाणवते तीच खरी मजेशीर असते. एकाच व्यक्तीत दिसणारे दोन विरुद्ध चेहरे, दोन विरोधी विचार… हे पाहताना मात्र मला खरी गंमत वाटते.

अशा अनेक “गंभीर गमतीजमती” सतत माझ्यासोबत घडत असतात, आणि त्यांची उदाहरणे सांगताना नेहमीच हशा पिकतो. एरवी सतत मिश्किली, विनोद, मस्ती करणाऱ्या माझ्याकडे लिहिण्यासाठी प्रेरणादायी असा अगदीच गमतीदार एकही किस्सा नाही, याचे आश्चर्य मात्र श्रोत्यांसह मला स्वतःलाही वाटत राहते. हीही एक गंमतच तर आहे 😀😀

वाईब्ज -


एक मराठी चित्रपट येऊन गेलाय ''अगंबाई, अरेच्चा'' या चित्रपटातल्या नायकाला स्त्रियांच्या मनातल्या गोष्टी ऐकायला येत असे. बरेचदा हे असे काहीतरी विचित्र माझ्याबाबत घडतं असं मला नेहमी फार स्ट्रॉन्गली वाटतं. म्हणजे माझ्या अवतीभोवती असणाऱ्या माणसांचे वाईब्ज माझ्यापर्यंत फार थेट आणि  प्रखरपणे पोचतात आणि ते फार स्पष्ट मला जाणवतात. म्हणजे पुढला व्यक्ती तुमच्याबद्दल काय विचार करतो, वरवर काहीही दाखवत असला तरी मनात काय भावना काय विचार बाळगतो.. समोर हसून बोलणारा आपल्या मागे गेल्यावर काय बरळतो ते आपोआप माझ्यापर्यंत पोचतं. याचे अनेक उदाहरण आहेत.. आश्चर्यात पाडणारे, अचंभित करून सोडणारे अनुभव आले आहेत. म्हणतात ना ''Actions can be seen, but vibes are felt; and what is felt stays longer than what is seen.'' म्हणजे एखाद्या नात्यात-मैत्रीत फार चांगलं चाललेलं असतं.. एखाद्या काळात त्या नात्यात काहीतरी जाणवायला लागतं. इथे आपल्याबाबतीत काहीतरी चांगलं नाहीये, काहीतरी चुकीचं घडत असल्याचा आभास होतो. पुढला मात्र सगळं आलबेल असल्याचा दिखावा करण्यात अधिक चांगला वागू लागतो.. काळ पुढे सरकतो तसतशा गोष्टी स्पष्ट होऊ लागतात आणि एकदिवस समोरच्या माणसाचा मुखवटा उतरतो. त्याने आपल्याबाबत काहीतरी फार वाईट करण्याचा प्रयत्न केलेला असतो, त्यासाठी भरपूर वेळ घेतलेला असतो आणि हा तोच काळ असतो ज्यावेळी आपल्याला ते वाईब्ज जाणवले होते. संकेत मिळाले होते. बरेचदा तर मी समोरच्याला हे सांगितलेही आहे की मला तुमच्याकडून चांगले वाईब्ज येत नाहीयेत. पुढला ते गमतीत घेतो; पण मी बरोबरच होते हे काळ सिद्ध करतो. बरेचदा अनेक लोकांपासून दूर होण्याचे हे एक कारण ठरते. म्हणतात ना, ज्या गोष्टी तुम्हाला दिसत नाहीत त्या गोष्टी तुमचा देव (निसर्ग, ब्रह्मांड, सुपर पावर काहीही म्हणा) पाहत असतो आणि म्हणून तो तुम्हाला तुमच्यासाठी योग्य नसणाऱ्या काही माणसांपासून दूर करतो. हे असेच अगदी या उलटही. जी माणसे खरोखर आपल्या बाबतीत प्रामाणिक भावना बाळगून असतात. त्यांच्या वागण्यात आणि बोलण्यात कुठलाही भेद नसतो. जे आतबाहेरून एकसमान असतात आणि खरोखर आपल्यावर मनापासून प्रेम करत असतात त्यांचे हेतू खूप शुद्ध असतात; अश्यांचे ते शुद्ध, प्रामाणिक, प्रेमाचे वाईब्ज आपल्यापर्यंत थेट येतात आणि आतवर पोचत असतात आणि म्हणून त्या माणसांबद्दल अधिक आदर, प्रेम आणि ओढ वाढत जात असते. त्यांची मैत्री त्यांचा सहवास हवाहवा वाटत असतो. अशी मैत्री कधीच कुठल्याच कारणाने दुरावू शकत नाही.. दुरावण्याचे एकच कारण असू शकते ते म्हणजे अंर्तमनातले खरेखुरे भाव बदलेल तेव्हा, त्यात नकारात्मक भाव निर्माण होतील तेव्हा ते पुढ्ल्यापर्यंतही आपोआप पोचतील हे निश्चित. Sometimes a silent vibe reveals more truth than a thousand spoken words or actions.

शेवटी सगळं वाइब्जवरच येऊन ठरतं.
तुम्ही कितीही चांगलं बोललात, हसलात, वागलात – पण जर मनात राग, मत्सर, स्वार्थ किंवा कपट असेल, तर ते लपवताच येत नाही. शब्दांनी पडदा टाकता येतो, पण ऊर्जा आणि भावनांचं सत्य नेहमी प्रकट होतंच.म्हणून कदाचित, नाती जपताना शब्दांपेक्षा भावना शुद्ध ठेवणं महत्त्वाचं असतं. कारण माणसांच्या आठवणीत तुमचं रूप, तुमचे कपडे, तुमची आर्थिक स्थिती नाही तर तुमच्या वाइब्ज राहतात...तुम्ही त्यांना कशी जाणीव करून दिली ते. Vibes are the soul’s language; they whisper what actions cannot explain. जिथे चांगले वाइब्ज मिळतात, तिथे मन शांत होतं जिथे नकारात्मक वाइब्ज असतात, तिथे मन नकळत दूर जायला लागतं. खरं तर, हे वाइब्ज म्हणजे विश्वाचा तुमच्याशी बोलण्याचा एक मार्गच आहे. फक्त आपण त्याला ऐकायचं आणि मानायचं, कोणाला जवळ करायचं आणि कोणाला हळूच सोडून द्यायचं हे वाइब्ज हा निसर्गाचा संकेतच देत असतो..जे काळानुरूप अकळतात.. आणि जे झाले ते योग्यच होते हा विश्वास पटायला लागतो.  







Monday, 18 August 2025

 एक वर्तुळ पूर्ण झालं ! #छोटी_छोटी_बाते

आयुष्य स्वतःजवळ काहीच ठेवत नाही.. तुम्ही जे जे बरं-वाईट वाटून दिलेलं असतं ते ते कधीतरी तुमच्याकडे परत येतं, याउलट असेही की जे जे मिळवलेलं असतं...स्वतःच्या कष्टाने, कर्माने किंवा ओरबाडून देखील; ते कधीतरी कुठेतरी कोणत्यातरी रूपात तुम्हाला परत करावं लागतं. त्याच व्यक्तीला करावं लागेल असंही नाही; पण ते परतावं लागतं हे निश्चित. कर्माचा सिद्धांत म्हणा किंवा जगण्याचे नियम. आयुष्य जसजसं पुढं जात राहतं आणि जाणीवा प्रखर होतात तसतसे हे अनुभव अधिकच ठळकपणे प्रखर स्वरूपात जाणवायला लागतात.
हल्ली मला एक गोड आठवण सतत येत असते, माझा मुलगा ओम आठ महिन्यांचा असताना आम्ही नागपूरहून मुंबईला शिफ्ट झालो आणि तो दोन अडीच वर्षांचा असताना मी मुंबईत जॉब जॉईन केला होता. माझ्या सिनिअर असणाऱ्या मॅडमचा या अडीच वर्षांच्या ओमवर फार जीव जडला होता. त्याचे त्या लाड पुरवायच्या, फोनवर त्याच्याशी बोलत बसायच्या. त्या कुठेही बाहेर गेल्या की त्याच्यासाठी काहीतरी घेऊन यायच्या. कधी गिफ्ट्स कधी खाऊ. हा सिलसिला काही वर्षे निरंतर चालू होता. त्यावेळी त्यांचा मुलगा टीनेज होता. आता माझा मुलगा टिनेज आहे. माझ्याकडे एक मदतनीस आहे जिचा मुलगा ५ वर्षांचा आहे, नाव आहे जय. सध्या आम्हा दोघांचं छान सूत जुळलं आहे. त्याला त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या सगळ्या गोष्टी मला सांगायच्या असतात. अभ्यासातलं यश शेअर करायचं असतं ... आणि त्याबदल्यात हक्कानं काय हवं ते मागून घ्यायचं असतं. माझ्या सांगण्यावर तो मोबाईल सोडून पुस्तकं वाचत बसतो, तेवढ्यासाठी मी त्याच्यासाठी छानछान चित्र असणारी पुस्तकं शोधात असते. तो चित्रही काढतो. फार लांब गप्पा चालतात आमच्या. सध्या त्याला लग्न करायचं आहे म्हणतो; त्यासाठी मुलगी पाहायला सांगितले आहे. फार गम्मत येते या विषयावर.. लग्न का तर लग्नात छान छान कपडे घालायला मिळतात आणि खूप सारे पदार्थ खाता येतात म्हणून. पण लग्न केले की नोकरी करून मुलीला, घराला सांभाळावे लागते असे त्याला सांगितल्यावर ''मैं जल्दी जल्दी पढाई खतम करके, जल्दी ही नोकरी कर लुंगा, लेकिन आप लडकी धुंडो'' असे तो सांगतो. त्याला समजावतानाच खळखळून हसूनही घेतो. सुट्टीच्या दिवशी तो त्याच्या आईसोबत घरी आलेला असला की आमच्या गप्पा अशा रंगात येतात. ''इस बार मैं क्लास का मॉनिटर बनूंगा फिर आप मुझे लकडी कि बॅट लेकर देना... मेरे पास बॉल है'' असे हक्काने सांगणे असते. त्याला पक्का प्रॉमिस म्हंटले की तो खरोखर मॉनिटर बनून दाखवतो आणि आम्ही त्याच्यासाठी छान बॅट जी आधीच आणून ठेवलेली असते ती मस्ती करत देतो... कधी चांगले मार्क आणले म्हणून गिफ्ट, कधी चीज सँडविच आवडतं म्हणून ते बनवून दिले की मग त्या चिमण्याच्या चेहेऱ्यावर दिसणारा आनंद अवर्णनीय-अविस्मरणीय असतो. या आठवणी आहेत.. जय उद्या मोठा होईल या गमती संपतील कदाचित, उद्या तो असा नियमित येईल न येईल; पण या आठवणी कायम स्मरणात राहणार आहेत.. त्याच्याही आणि आमच्याही. त्याला मोठे होताना पाहण्यात आनंद आहे. अगदी अगदी तसाच जसा कधीतरी मुंबईतल्या मॅडमला माझ्या लेकासाठी असे क्षण जगताना होत असे. आनंदाचे असे हे देणेघेणे वेगवेगळ्या माध्यमातून अखंड चालू राहावे. आनंद घेता घेता आनंद देणाऱ्याचे हात होत राहावे...



Thursday, 22 May 2025

रागातून जागृतीकडे : आधुनिक स्त्रीचा आत्मभानाचा प्रवास !



परंपरेनं स्त्रियांकडे नेहमीच नियमपालक, चारित्र्यसंपन्न आणि सामाजिक चौकटीत वावरणाऱ्या व्यक्ती म्हणून पाहिलं गेलं आहे. स्त्रियांबाबत त्यांच्यातील सहनशीलता, त्याग आणि समर्पण या गुणांचंच पूजन करण्यात आलं. मात्र, गेल्या काही दशकांत हे चित्र बदलताना दिसत आहे. गुन्हेगारी क्षेत्रात स्त्रियांचा सहभाग वाढतो आहे, आणि ही बाब केवळ जागतिक पातळीवरच नव्हे, तर भारतातही प्रकर्षाने जाणवते आहे. अलीकडच्या काळात महिलांद्वारे केलेल्या गुन्ह्यांच्या बातम्या सतत चर्चेचा विषय ठरत आहेत. वृत्तपत्रांपासून ते टीव्ही आणि सोशल मीडियापर्यंत अशा घटना सतत झळकत राहतात; जणू त्या नव्या सामाजिक वास्तवाचे प्रतिबिंब आहेत.

गेल्या वर्षातही अनेक धक्कादायक घटनांनी समाजाला हादरवून टाकलं आहे. काही स्त्रियांनी आई असून आपल्या मुलांचाच जीव घेतला; तर काहींनी जोडीदाराला किंवा कुटुंबीयांना क्रूरतेनं ठार केलं. जेथे प्रेम, सान्निध्य आणि विश्वास असायला हवा, तिथेच छळ, हिंसा आणि मृत्यू घडताना आपण पाहिले. हे पाहून अंतर्मन अस्वस्थ होतं. या घटनांचा मागोवा घेताना, एक महत्त्वाचा प्रश्न समोर येतो... अशा गुन्हेगारी प्रवृत्ती निर्माण होण्यामागचं, वाढीला लागण्याचं कारण काय आहे? हा फक्त कायद्याचा विषय नाही, तर तो सामाजिक, मानसिक आणि भावनिक घटकांशी संबंधित आहे. कदाचित वर्षानुवर्षे दडपलेला राग, अन्याय, भावनिक ताणतणाव, किंवा सामाजिक अपेक्षांचं दडपण या सगळ्यांचा स्फोट अशा स्वरूपात होत असेल का ? या प्रश्नांवर केवळ चर्चाच नव्हे, तर सखोल विचार, समाजशास्त्रीय विश्लेषण आणि मानसशास्त्रीय समज आवश्यक आहे. कारण ही फक्त गुन्हेगारी नव्हे; तर ही बदलत्या समाजाच्या वेदनेचा प्रारंभ तर नसेल अशी चिंता वाटू लागली आहे.


विकसनशील सामाजिक भूमिका, वाढते स्थलांतर, व्यवसायांमधील परिवर्तन, महिला मुक्तीची चळवळ, आर्थिक स्वातंत्र्य आणि राजकीय स्वायत्तता; या सगळ्यांमुळे आजच्या काळातील स्त्रियांना विविध क्षेत्रांत सहभागी होण्याच्या नव्या संधी प्राप्त झाल्या आहेत. संधी मिळाल्या की आत्मविश्वास वाढतो, आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण झालेली व्यक्ती नव्या दिशांकडे आकर्षित होते. मात्र या आकर्षणाला एक वेगळीही दिशा मिळत आहे; काही स्त्रिया गुन्हेगारीच्या वाटेवर वळताना दिसत आहेत. एकेकाळी केवळ पुरुषप्रधान समजल्या जाणाऱ्या गुन्हेगारी जगतात आता महिलांची संख्याही वाढताना दिसतेय. ही वाढ इतकी स्पष्ट आहे की, तिच्याकडे डोळसपणे पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. महिलांकडून होत असलेले गुन्हे आता फक्त किरकोळ स्वरूपाचे उरलेले नाहीत. त्या अनेक गंभीर, हिंसक आणि अप्रचलित गुन्ह्यांमध्येही सक्रिय सहभागी होऊ लागल्या आहेत. त्यामुळे गुन्ह्यांचा स्वरूप अधिक व्यापक आणि धोकादायक होत चालले आहे.

मग प्रश्न उभा राहतो की, महिलांमध्ये अचानक गुन्हे करण्याची उर्मी का वाढते आहे? हा संताप कुठून निर्माण होतो आहे? हे फक्त सामाजिक बदलांचे परिणाम आहेत की वर्षानुवर्षे साचलेल्या असंतोषाचा उद्रेक? की स्वातंत्र्याचा अर्थ चुकीचे समजण्याची लक्षणं? या प्रश्नांवर विचार होणे आणि त्याचे सखोल विश्लेषण होणे आज अत्यावश्यक झाले आहे.

महिलांचा राग आणि संताप हे काही अलीकडील घटक नाहीत. इतिहास, पुराणकथा आणि लोककथांमध्ये या भावना वारंवार उमटताना आपल्याला दिसतात. परंतु, अलीकडच्या काळात या भावना अधिक स्पष्ट, ठाम आणि प्रखर स्वरूपात व्यक्त होताना दिसतात. समाजमाध्यमे आणि विविध सार्वजनिक मंचांवर, विशेषतः अवहेलनेच्या आणि अश्लीलतेच्या छटांनी युक्त भाषेत, हा राग अधिक ठळकपणे समोर येतो. अनेकदा हा संताप अपरिपक्व, भावनाशून्य आणि बेपर्वा वाटतो. परंतु, हे दुर्लक्ष करता येणार नाही की अनेक पिढ्यांपासून स्त्रियांमध्ये साठून राहिलेला, दाबलेला राग आता उफाळून येत आहे.

पूर्वी महिलांचा राग मुख्यतः साहित्य, सिनेमा किंवा नाट्यरूपांमधूनच व्यक्त होत असे. वास्तविक जीवनात त्याला फारसे स्थान नव्हते. त्याची दखल घेतली जात नव्हती, स्वीकार केला जात नव्हता. त्यामुळे हा दाबलेला संताप आता समाजमाध्यमांच्या मंचांवर अधिक तीव्र आणि आक्रमक रूपात व्यक्त होत आहे. त्यास तिथे एक प्रकारची अनुमती, संमती आणि सहानुभूती मिळत असल्याने, तो अधिकाधिक वाढत असल्याचे जाणवते. मनोविज्ञानतज्ज्ञांचे मत आहे की, स्त्रिया अनेक पिढ्यांपासून अंतर्मनात रागाचे ओझे बाळगत जगत आहेत. दैनंदिन जीवनातील अन्याय, भेदभाव आणि अपमान यांच्या विरोधातील त्यांचा संताप आज चित्रपट, समाजमाध्यमांवरील रील्स, संगीत, साहित्य आणि लोकप्रिय संस्कृतीच्या विविध माध्यमांतून ठळकपणे प्रकट होत आहे. तथापि, प्रत्यक्ष जीवनात या रागाला समाजाकडून आवश्यक ती मान्यता, समजून घेणे आणि गांभीर्याने विचार करणे याचा अभाव जाणवतो. या भावनांवर सखोल मंथन होऊन, त्या समजून घेत योग्य उपाययोजना केल्या जात नाहीत हीच यातली खरी शोकांतिका आहे.

या पार्श्वभूमीवर काही मूलभूत प्रश्न समोर येतात —
समाज या भावना समजून घेईल का?
या रागाला योग्य दिशा देण्याची संधी स्त्रियांना मिळेल का?
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा आवाज केवळ अभिव्यक्त होण्यापुरताच मर्यादित राहील, की परिवर्तन घडवण्यासाठी आधार बनेल?


आपल्या समाजाची एक मोठी समस्या अशी आहे की, मोकळेपणाने बोलणारी, खळखळून हसणारी, आनंदी राहणारी स्त्री समाजाला खटकते. स्त्रियांनी अल्पभाषी राहावे, नम्र, संयमी वर्तन करावे हे ‘बाळकडू’ तिला लहानपणापासूनच दिले जाते. उघडपणे हसणारी, स्पष्ट बोलणारी स्त्री सहजपणे चरित्रहीन ठरवली जाते. मुलगी जन्मल्यापासून तिच्या आजूबाजूला असलेल्या स्त्रिया तिने दबलेल्या, पिचलेल्या, कुचंबणा झालेल्या अवस्थेत जगताना तिला दिसतात. अशा वातावरणात तिच्या मनात निर्माण होणाऱ्या भावनांचा निचरा होण्यासाठी कोणीही नसते; न व्यक्त होण्यासाठी माणसं, न समजून घेणारा समाज. आणि हे चक्र पिढ्यानपिढ्या सुरूच राहिलं आहे. राग हा भाव नेहमी एखाद्या गोष्टीच्या रक्षणाशी जोडलेला असतो. पण समाजाने हा रक्षणाचा अधिकार, हा संताप व्यक्त करण्याचा हक्क आजपर्यंत फक्त पुरुषांसाठी राखून ठेवला होता. स्त्रियांनी राग व्यक्त केला, तर तो "अस्वीकार्य" मानला गेला. मात्र अलीकडच्या काळात हे चित्र हळूहळू बदलू लागले आहे. स्त्रियांच्या हातात आता सोशल मिडिया, साहित्य, कला यासारखी प्रभावी माध्यमं आली आहेत. या माध्यमांतून त्यांच्या मनात वर्षानुवर्षे साचून राहिलेल्या भावना व्यक्त होऊ लागल्या आहेत ... कधी सौम्य, तर कधी प्रखर उद्रेकाच्या रूपाने. हा बदल केवळ अभिव्यक्तीपुरता मर्यादित न राहता, समाजाला स्त्रियांच्या अनुभवांकडे नव्या दृष्टीने पाहायला लावेल, अशी अपेक्षा आहे.

स्त्रियांचा राग हा एक अत्यंत वैयक्तिक अनुभव असला तरी, सध्याच्या काळात तो सामूहिक अनुभव देखील बनत चालला आहे. सामाजिक प्लॅटफॉर्मवरून म्हणा किंवा अभिव्यक्त होण्याच्या उर्मीतून आता स्त्रिया स्वतः एकमेकींशी ते शेअर करताना दिसतात. पूर्वी ज्या रागासाठी लाज वाटायची, त्याच रागासाठी आता एकजूट होऊन समर्थन तयार होत आहे. महिलांमध्ये एक नव्या प्रकारची जागरूकता आणि एकात्मता दिसून येत आहे, जिचामुळे त्यांच्या रागाची, त्यांच्या भावना व्यक्त करण्याची व स्वीकार करण्याची त्यांना आपसूकच परवानगी मिळत आहे.

ब्रिटिश गायिका आणि गीतकार पालोमा फेथ यांचं गाणं "लेबर" सध्या अत्यंत लोकप्रिय झालं आहे. या गाण्यात स्त्रियांच्या संतापाची तीव्र आणि थेट अभिव्यक्ती आहे. सुमारे ३५,००० रील्समध्ये या गाण्याचा साउंडट्रॅक वापरण्यात आला आहे. हे गाणं, हे रील्स, आणि अशा कथा हे दाखवतात की आता महिलांचा राग दाबून ठेवला जात नाही; तो जगासमोर स्पष्टपणे, निर्भीडपणे व्यक्त केला जातो आहे.

खरं तर, रागाचा उद्रेक तोच क्षण असतो, जेव्हा स्त्री सहनशीलतेच्या सीमारेषेवर येऊन पोहोचते... जेव्हा तिच्या भावना, अस्तित्व आणि ओळख सातत्याने दुर्लक्षित केल्या जातात. पूर्वी केवळ सहन करणाऱ्या स्त्रिया आता बोलू लागल्या आहेत, व्यक्त होऊ लागल्या आहेत आणि समाजबदल घडवण्यासाठी पुढे येत आहेत. हा राग आता केवळ भावनिक उद्रेक न राहता, कृतीशीलता, आत्मभान आणि सामर्थ्य यांचं योग्य रूप धारण करू लागला आहे. तो दडपशाहीच्या कोंडमाऱ्यातून बाहेर पडून समाजपरिवर्तनाची नांदी ठरू लागला आहे. महत्त्वाचं म्हणजे, हा राग जोपर्यंत सकारात्मकता आणि बांधिलकीच्या दिशेने मार्गक्रमण करतो, तोपर्यंत समाजात खोलवर आणि स्थायिक परिवर्तन घडवण्याची परिणामकारक क्षमता त्याच्यात असते. कारण असा राग विध्वंसक नसून, सृजनशील असतो... स्वतःसाठी नव्हे, तर व्यापक सामाजिक हितासाठी प्रेरित असतो. परंतु हाच संताप जर अराजक व विध्वंसाच्या मार्गाला लागला, तर तो त्या व्यक्तीसाठी, कुटुंबासाठी आणि पर्यायाने समाजासाठीही घातक ठरतो.

गेल्या काही दशकांतील चित्रपटांचा मागोवा घेतला, तर लक्षात येतं की स्त्रियांच्या अंतर्मुख संतापाला पडद्यावर आवाज मिळू लागला आहे. हा राग आक्रमक नसला, तरी तो गंभीर आणि गहिरा आहे, खोल आहे. दैनंदिन लहानसहान अपमान, अन्याय, दुर्लक्ष आणि दमित भूमिका यांचा हळूहळू साचणारा असंतोष आहे. मल्याळम चित्रपट 'द ग्रेट इंडियन किचन' आणि त्याचाच हिंदी रीमेक 'मिसेस' (2025), 'थप्पड' (2020), पगलट (2021) या चित्रपटांनी हाच शांत, पण सतत उफाळणारा स्त्रियांचा संताप दाखवला आहे. त्यातील नायिकांच्या संतप्त नजरा, मौन विद्रोह, आणि शेवटी एका कृतीतून होणारा नात्यांचा किंवा चौकटींचा भंग; हे सर्व आजच्या समाजातील स्त्रियांच्या अंतर्गत लढ्याचं प्रतिनिधित्व करतं. तरीही, खरतर या आधुनिक चित्रपटांमधील राग तुलनेने सौम्य वाटतो, विशेषतः पूर्वीच्या काही चित्रपटांतील रौद्र रूपाच्या तुलनेत. उदाहरणार्थ, स्मिता पाटीलच्या मिर्च मसाला (1987) चित्रपटातील अंतिम दृश्य ! एक अश्रुत पण आगीने पेटलेला संताप जेव्हा उफाळून येतो तेव्हा तो सूड नसतो तो स्वसंरक्षणासाठी उचललेले अंतिम पाऊल असते. मिरची फॅक्टरीत येणारा क्रूर अत्याचारी सुभेदार जेव्हा सहनशीलतेची पराकाष्टा झालेल्या सोनाबाईला पकडण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा फॅक्टरीतील सर्व महिला एकत्र येतात आणि ताज्या लाल मिरच्यांच्या मसाल्याने त्याच्यावर हल्ला करतात. या हल्ल्यात सुभेदार घायाळ होतो. ते दृश्य म्हणजे स्त्रियांच्या संयमाच्या सीमेला पार केल्यानंतर झालेला उद्रेक ... एक प्रतीकात्मक विस्फोट ! 'मदर इंडिया' (1957) मध्ये तर नायिका स्वतःच्या मुलाला गोळी घालते. कर्तव्य आणि नैतिकतेच्या संघर्षात तिला स्वीकारावा लागलेला हा क्रूर निर्णय असतो.

मर्दानी, मॉम, कहाणी, गुलाब गँग आणि बँडिट क्वीन हे चित्रपट आधुनिक स्त्रीच्या रागाला केवळ भावनात्मक प्रतिक्रिया म्हणून न दाखवता, त्यामागील परिपक्वता, अन्यायाविरोधातील झुंज, सूडाची भावना आणि अन्यायी समाजरचनेविरोधात घेतलेली ठाम भूमिका दाखवतात. हे चित्रपट स्त्रीचा राग म्हणजे दुबळेपणाची नाही तर दृढ प्रतिकाराची, आत्मभानाची आणि न्यायाच्या शोधातील प्रवृत्तीची अभिव्यक्ती आहे हे अधोरेखित करतात. मात्र, असा प्रतिकार नेहमीच हिंसक असायला हवा, असे नाही. राग व्यक्त करण्याची किंवा सूड उगवण्याची दिशा सकारात्मक आणि सृजनात्मकदेखील असू शकते, याची अनेक उदाहरणे आपल्या आजूबाजूला आहेत. अनेक अशा स्त्रिया आहेत, ज्या संकटांनी उद्ध्वस्त झाल्यानंतरही पाषाणाच्या छाताडावर एखादे हिरवे कोंब फुटावे तशा जगल्या तगल्या आणि पाय रोवून उभ्या राहिल्या, नव्या उमेदीनं आयुष्य घडवलं आणि समाजासाठी प्रेरणास्थान ठरल्या. काहींनी बेघर अवस्थेतून स्वतःचं विश्व उभं केलं, तर काहींनी शिक्षण, व्यवसाय, समाजसेवा यामध्ये आपलं स्थान निर्माण केलं. त्यांच्या जिद्दीने, आत्मविश्वासाने आणि न झुकणाऱ्या वृत्तीने त्या अनेकांसाठी आदर्श ठरल्या आहेत.

''स्त्रीने ठरवले तर ती काहीही करू शकते'' असे एक वाक्य सर्वश्रुत आहे पण हे ''काहीही'' म्हणजे शब्दशः काहीही नव्हे. ते म्हणजे सृजन, सर्जन, उत्पत्ती आणि कल्पकतेच्या अंगाने काहीही करणे असते. स्त्रीराग केवळ विद्रूपतेचा, दुःखाचा अथवा तक्रारीचा उद्रेक असू नये; तो परिवर्तनाची बीजं घेऊन येणारा, एक सृजनशील उर्जेचा प्रवाह असायला हवा. कारण हीच स्त्रीची मूळ प्रवृत्ती, महत्वाचा स्वभावधर्म आहे. राग येणे साहजिक असले तरी; जेव्हा या रागाला योग्य दिशा, समजूतदार व्यासपीठ आणि स्वीकार करणारा प्रगल्भ समाज लाभतो, तेव्हा तो संहारक न राहता समाज परिवर्तनाचा प्रेरणास्त्रोत बानू शकतो. म्हणूनच एक समाज म्हणून आजच्या काळात सर्वांत मोठी गरज आहे, ती स्त्रीच्या रागाकडे संवेदनशीलतेने, समजूतदारपणे आणि सहानुभूतीने पाहण्याची. अशा रागाला योग्य मार्गदर्शन आणि सकारात्मक ऊर्जा दिली, तर तो फक्त विरोध न राहता परिवर्तनाचे साधन बनू शकतो असा विश्वास वाटतो.







रश्मी पदवाड मदनकर
rashmi.aum15@gmail.com

Saturday, 17 May 2025

हायब्रिस्टोफिलिया समुदाय: गुन्हेगारांप्रती आकर्षण आणि नैतिक गुंतागुंत -


याकुब मेनन 1993 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी असूनही, काही व्यक्तींनी आणि संघटनांनी त्याच्या शिक्षेविरोधात सहानुभूतीने युक्तिवाद केला. त्याच्या शिक्षेपूर्वी अनेक नागरिकांनी त्याला बुद्धिमान, प्रतिष्ठित चार्टर्ड अकाउंटंट म्हणून गौरवले. त्याच्याबद्दलची सहवेदना, सहानुभूती, आणि गुन्ह्याच्या पलीकडे पाहण्याचा प्रयत्न या गोष्टी स्टॉकहोम सिंड्रोम आणि हायब्रिस्टोफिलिया या दोन मानसशास्त्रीय संकल्पनांच्या सामाजिक छटा दाखवतात.

चार्ल्स शोभराज, ज्याला "द सर्पेंट" आणि "बिकिनी किलर" म्हणून ओळखले जाते, हा एक कुख्यात फ्रेंच-भारतीय व्हिएतनामी सिरियल किलर आहे. त्याने 1970 च्या दशकात आशियातील विविध देशांमध्ये अनेक पर्यटकांची हत्या केली, शोभराजच्या गुन्हेगारी कारकीर्दीचे मानसशास्त्रीय विश्लेषण केल्यास, तो एक सायकोपॅथिक व्यक्तिमत्व होता, ज्याला इतरांच्या वेदनेत आनंद मिळत असे. त्याची आकर्षकता आणि चातुर्यामुळे तो लोकांना फसवण्यात यशस्वी होत असे. त्याच्या गुन्ह्यांमुळे त्याला 'द सर्पेंट' हे टोपणनाव मिळाले, कारण तो आपल्या शिकारांभोवती जाळे विणत असे. चार्ल्स शोभराज हे हायब्रिस्टोफिलिया या मानसशास्त्रीय संकल्पनेचं एक ठोस आणि उल्लेखनीय उदाहरण मानलं जाऊ शकतं विशेषतः त्याच्या गुन्हेगारी इतिहासाच्या पार्श्वभूमीवरही अनेक स्त्रिया त्याच्याकडे आकर्षित झाल्या, प्रेमाच्या भावना व्यक्त केल्या आणि काहींनी तर त्याच्याशी विवाह करण्याचा निर्णय घेतला. 2008 मध्ये, शोभराजने नेपाळमधील नीहिता बिस्वास हिच्याशी विवाह केला. ती त्याच्यापेक्षा 44 वर्षांनी लहान होती, आणि शोभराज तुरुंगात असतानाच दोघे भेटले. त्याचे सगळे गुन्हे माहिती असताना नीहिताने त्याच्यावर प्रेम असल्याचं खुलेपणाने जाहीर केलं आणि त्याची निर्दोषता सिद्ध करण्यासाठीही प्रयत्न केले.

रिचर्ड रामिरेझ हा अमेरिकेतील अत्यंत क्रूर आणि भयावह सिरीयल किलर होता, ज्याला "नाईट स्टॉकर" म्हणून ओळखले जाते. 1984 ते 1985 दरम्यान कॅलिफोर्नियामध्ये त्याने बलात्कार, हत्या, चोरी आणि अत्याचार यांसारखे अनेक गुन्हे केले. त्याच्या विकृत आणि सैतानी प्रवृत्तीमुळे संपूर्ण अमेरिका हादरली होती. तरीसुद्धा, रामिरेझ तुरुंगात गेल्यानंतर हजारो महिलांनी त्याच्यावर प्रेम व्यक्त केलं, त्याला प्रेमपत्रं पाठवली, आणि त्याच्या सैतानी व्यक्तिमत्त्वाला "आकर्षक" म्हटलं. 1996 मध्ये, डोरीन लिओय नावाच्या एका पत्रकार महिलेने त्याच्याशी तुरुंगात विवाह केला. ही घटना हायब्रिस्टोफिलिया या मानसशास्त्रीय विकृतीचं अत्यंत स्पष्ट उदाहरण आहे ... जिथे स्त्रिया गंभीर गुन्हेगारांच्या क्रौर्याऐवजी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाकडे आकर्षित होतात.

भारतातील पंजाब आणि हरियाणा राज्यांतील शेतकरी आणि अर्धिया (कमिशन एजंट) यांच्यातील संबंध स्टॉकहोम सिंड्रोमच्या उदाहरणासारखे आहेत. अर्धिया शेतकऱ्यांना पिकांची खरेदी आणि अनौपचारिक कर्ज देतात, ज्यामुळे शेतकरी त्यांच्यावर अवलंबून राहतात. शेतकऱ्यांना थेट बाजारपेठेत विक्री करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना विरोध केला जातो, कारण अर्धिया यांच्या माध्यमातून त्यांना तात्पुरती सुरक्षितता आणि आधार मिळतो. या संबंधांमध्ये शेतकऱ्यांचे मोठे प्रमाणात शोषण होऊनही अर्धिया यांच्याबद्दल प्रेमाचे नाते आणि विश्वास दिसून येतो, जे स्टॉकहोम सिंड्रोमचे मोठे लक्षण आहे.

सोशल मीडियावरील हायब्रिस्टोफिलिया समुदाय:
आजच्या युगात सोशल मीडियाचा मानवी वर्तनावर खोलवर परिणाम होत आहे. ही केवळ माहितीच्या देवाण-घेवाणीची जागा राहिलेली नसून, व्यक्ती आपल्या ओळखी, मतमतांतरे आणि भावना खुलेपणाने मांडताना दिसतात. या डिजिटल विश्वात एक आगळावेगळा आणि वादग्रस्त समुदाय पुढे येताना दिसतो आहे, तो म्हणजे "हायब्रिस्टोफिलिया समुदाय". या समुदायातील व्यक्ती गंभीर गुन्हेगारांप्रती प्रेम, आकर्षण वा सहानुभूती व्यक्त करतात. ही भावना केवळ वैयक्तिक मानसिक विचलन नसून, सोशल मीडियाच्या प्रभावाखाली सामूहिक ओळखीचं आणि उपसंस्कृतीचं रूप घेत आहे.

हायब्रिस्टोफिलिया म्हणजे काय?
हायब्रिस्टोफिलिया ही एक विशिष्ट मानसशास्त्रीय अवस्था आहे, जिथे एखाद्या व्यक्तीला बलात्कार, खून, दहशतवादी कृत्ये, नक्सलवाद किंवा अन्य गंभीर गुन्हे करणाऱ्या व्यक्तींबद्दल सहानुभूती किंवा भावनिक काहीवेळा लैंगिक आकर्षण देखील निर्माण होते. हे आकर्षण अनेकदा इतके तीव्र असते की काही महिला (बहुतेक वेळा) तुरुंगात असलेल्या गुन्हेगारांशीदेखील विवाह करण्याचा निर्णय घेतात. उदाहरणार्थ, चार्ल्स शोभराज, अबू सालेम, टेड बंडी, रिचर्ड रामिरेझ आणि जेफ्री डाहमर हे अत्यंत गंभीर गुन्हेगार असूनही, त्यांच्या भोवती एक मोठा प्रेम, आकर्षण आणि भक्तिभाव व्यक्त करणारा चाहतावर्ग निर्माण झाला होता. या गोष्टी मर्यादित वैयक्तिक होत्या तोवर ठीक होतं; पण सोशल मीडियावर अशा गुन्हेगारांची स्तुती करणाऱ्या पोस्ट्स, त्यांना निरपराध दाखवण्याची लगबग, त्यासाठी होणारी अस्वस्थता तडफड आणि त्या तडफडीचे विक्षिप्त पद्धतीने केलेले सादरीकरण हायब्रिस्टोफिलियाच्या समाजमाध्यमांवरील रुग्णांच्या दृश्य रूपाची साक्ष देतात.

सोशल मिडिया ही केवळ संवादाची जागा नाही, ती आता एक ओळख साकारण्याची जागा आहे असे समजले जाते. TikTok, Instagram, Tumblr, Reddit यांसारख्या प्लॅटफॉर्म्सवर लोक अनेकदा गुन्हेगारांविषयी आकर्षण व्यक्त करताना स्वतःची एक खास 'डार्क फॅन' ओळख निर्माण करतात. हे आकर्षण अनेक वेळा गुन्हेगाराच्या "वैयक्तिक बाजू" ला वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. उदाहरणार्थ, "तो गुन्हेगार आहे, पण त्याच्या डोळ्यात प्रेम आहे", "त्याची बालपणाची वेदना कुणी समजून घेतली नाही म्हणून बिचारा असा झाला", वगैरे.
अशा लोकांच्या नैतिकतेचा गोंधळ उडालेला असतो. या अशा मानसिक डिस्टर्ब् समुदायांमध्ये एक प्रकारची 'नैतिक तडजोड' (moral negotiation) दिसून येते. हे लोक वारंवार सांगतात की ते गुन्ह्यांना पाठिंबा देत नाहीत, पण गुन्हेगार म्हणून व्यक्तीमध्ये त्यांना काही "खास" दिसतं किंवा हा मानवी दयामायेचा मुद्दा आहे पण हीच मानवीयता किंवा दयामाया त्यांना त्या अन्यायाला बळी पडलेल्यांबद्दल किंवा अत्याचारग्रस्त माणसांबद्दल वाटत नसते. तेव्हा यांचा मानवतेचा बुरखा उघडा पडतो. काही वेळा हे आकर्षण केवळ व्यक्तिमत्त्व, रूप, किंवा प्रसिद्धीशी संबंधित देखील असते. असे असते तेव्हा ते अधिक मानसिक आजाराशी संबंधित असते.
हायब्रिस्टोफिलिया समुदाय अनेक वेळा सोशल मिडियावर गुन्हेगारांचे फोटो, त्यांच्या कुटुंबाचे फोटो, कोर्ट फूटेज, किंवा जुन्या मुलाखती वापरून त्यांचं 'एस्थेटिक रूपांतर' करतात. गडद संगीत, ब्लर फिल्टर्स, रोमँटिक कोट्स यांद्वारे गुन्हेगाराची प्रतिमा एखाद्या प्रेमळ, दयाळू, कुटुंबवत्सल व्यक्तींसारखी सादर केली जाते. यामुळे गुन्हेगारांची भीतीदायक प्रतिमा लुप्त होते आणि त्या जागी एक "आकर्षक विरोधाभास" उभा राहतो.

या समुदायांबाबत समाजात दोन प्रकारच्या प्रतिक्रिया दिसतात काहींना हे मनोरंजक वाटते, तर काहींना हे 'अतिशय चिंताजनक' वाटते. गुन्हेगारांविषयी सहानुभूती निर्माण होणं हे ''गुन्हेगारीचे सामान्यीकरण'' होणे असू शकते, जे समाजासाठी घातक आहे. विशेषतः जेव्हा पीडितांच्या वेदना दुर्लक्षित केल्या जातात आणि त्या ऐवजी गुन्हेगारांचे महिमामंडन केले जाते तेव्हा ते अधिकच गंभीर स्वरूपाचे असते.

हायब्रिस्टोफिलिया समुदाय हे सोशल मिडियाच्या काळात निर्माण झालेलं एक गुंतागुंतीचं, नैतिकदृष्ट्या गंडलेलं, आणि मानसशास्त्रीयदृष्ट्या साशंक असलेलं क्षेत्र आहे. या समुदायातील लोक फक्त गुन्हेगारांवर प्रेम करत नाहीत, ते सोशल मिडियाद्वारे त्या गुन्हेगाराशी स्वतःची ओळख वाढवणे, त्याच्या विचारसरणीशी सुसंगत वागणे आणि भरकटलेल्या भावनिक गरजा एनकेन पद्धतीने पूर्ण करून घेण्यासाठी असे वागत असतात. ही गोष्ट फक्त मानसशास्त्राच्या दृष्टीने नव्हे, तर समाजशास्त्र, डिजिटल माध्यमांचे विश्लेषण, आणि नैतिकता या सर्व अंगांनी अभ्यासण्यासारखी आहे. जरासे स्वतःच्या आत वाकून पाहण्याची तेवढी गरज आहे.

✍🏻 रश्मी पदवाड मदनकर

(१७ मे २०२५ रोजी तरुण भारत आकांक्षा पुरवणीत कव्हर स्टोरी प्रकाशित)





Friday, 9 May 2025

Operation Sindoor!

तुम्हाला माहिती आहे का ? २०१७ पर्यंत भारतात महिलांना थेट युद्धावर जाण्याचा अधिकार नव्हता. युद्धसंबंधी निर्णय घेण्याची संधीही त्यांना दिली जात नव्हती. या विषमतेविरुद्ध त्यांचा संघर्ष अनेक वर्षांपासून सुरू होता. तेव्हा महिलांना लष्करात केवळ सहाय्यक भूमिका, जसे की सैनिकांच्या शस्त्रास्त्रांची तयारी, वैद्यकीय सेवा या क्षेत्रांपुरतीच मर्यादित संधी दिली जात असे. लष्करासारख्या पारंपरिकपणे पुरुषप्रधान समजल्या जाणाऱ्या क्षेत्रात महिलांना दीर्घकाळ पूर्णतः वगळण्यात आले होते. मात्र, आता त्या युद्धाच्या मोहिमांमध्ये नेतृत्व करताना दिसत आहेत, हे भारतासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि ऐतिहासिक पाऊल आहे. २०१७ मध्ये भावना कांत ही भारतीय हवाई दलातील पहिली महिला ऑपरेशनल फायटर पायलट ठरली. ती युद्धाच्या मोहिमांवर लढाऊ विमान चालवणारी पहिली महिला वैमानिक बनली. त्याच वर्षी सब लेफ्टनंट शिवांगी हिने भारतीय नौदलात सर्विलन्स विमान उडवणारी पहिली महिला पायलट होण्याचा मान मिळवला. २०२० पर्यंत महिलांना लष्करात कायमस्वरूपी नियुक्ती (Permanent Commission) देण्यात येत नव्हती. मात्र २०२० मध्ये भारतीय लष्कर आणि त्यानंतर नौदलामध्येही महिला अधिकाऱ्यांना हे अधिकार मंजूर करण्यात आले. हा निर्णय महिलांच्या दीर्घकालीन संघर्षाचा विजय ठरला. गेल्या दशकभरात महिलांनी लष्करी क्षेत्रात केवळ आपली उपस्थिती सिद्ध केली नाही, तर कर्तृत्व, नेतृत्व आणि सामर्थ्यही प्रभावीपणे सादर केले आहे. आज हा बदल सुरू झाला आहे, आणि 'समान संधी' ही आता केवळ संकल्पना न राहता प्रत्यक्ष वास्तवात उतरू लागली आहे. ही बदलाची सुरुवात आहे आणि ही आशा आता वास्तव होताना दिसत आहे. 

 ‘ऑपरेशन सिंदूर’ हे केवळ एक लष्करी कारवाईचं नाव नाही, तर ते भारताच्या महिला सैनिकांच्या शौर्याचं, जिद्दीचं आणि आत्मसन्मानाचं प्रतीक आहे. या नावात एक गहन अर्थ दडलेला आहे... ‘सिंदूर’ या शब्दात नुसताच सौंदर्याचा नव्हे, तर त्याग, निष्ठा आणि सन्मानाचा अर्थही अंतर्भूत आहे. आणि या संकल्पनेला साजेसं नेतृत्व केलं दोन महिलांनी... विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी यांनी. पहलगाममध्ये ज्यांच्या डोळ्यांसमोर त्यांच्या सहचाऱ्यांना निर्दयपणे मारलं गेलं, ज्यांना ‘महिला आहेत’ म्हणून दुर्लक्षित म्हणून जिवंत ठेवलं गेलं, त्याच महिलांनी हा प्रतिशोध उचलला. "स्त्रियांना केवळ पुढाऱ्यांपर्यंत संदेश पोचवण्याचं काम आहे, त्यांच्यात दुसरी क्षमताच नाही" या अत्यंत हीन समजुतीला त्यांनी खणखणीत उत्तर दिलं. हा फक्त बदला नव्हता, तर एक इशारा आहे की भारताच्या महिला आता मागे राहिलेल्या नाहीत. महिलेच्या वेदनेचा महिलांनीच घेतलेला बदला, महिलांनीच दिलेला संदेश, आणि महिलांनीच मांडलेली कारवाईची रूपरेषा हे सगळं फक्त प्रेरणादायी नाही, तर ऐतिहासिक आहे. २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाममध्ये झालेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्याला उत्तर देण्यासाठी भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर अचूक आणि प्रभावी हवाई व क्षेपणास्त्र हल्ले केले. या यशस्वी कारवाईत भारतीय लष्कराच्या शौर्याचं जितकं योगदान होतं, तितकंच महत्त्वाचं होतं महिलांच्या नेतृत्वाचं. या प्रेस ब्रीफिंगमध्ये महिलांनी जे आत्मविश्वासाने सांगितलं, त्याने केवळ भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारतीय लष्कराची प्रतिष्ठा उंचावली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणजे सन्मान, शक्ती आणि समतेचा संगम. हे केवळ एक मिशन नव्हतं हे भारताच्या महिला सैनिकांचं धगधगतं उत्तर आहे. कोण आहेत या दोघी ? विंग कमांडर व्योमिका सिंग विंग कमांडर व्योमिका सिंग भारतीय हवाई दलाच्या फ्लाइंग शाखेतील एक वरिष्ठ अधिकारी आहेत. ऑपरेशन सिंदूरच्या प्रेस ब्रीफिंगमध्ये त्यांनी पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्यांच्या तपशीलांची माहिती दिली. या ऑपरेशनमध्ये त्यांनी भारतीय हवाई दलाच्या Rafale आणि Su-30MKI लढाऊ विमानांचा वापर केला. त्यांच्या नेतृत्वाखाली, भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील नौ ठिकाणी सुस्पष्ट आणि प्रभावी हल्ले केले, ज्यात अंदाजे ७० दहशतवादी ठार झाले आहेत. कर्नल सोफिया कुरेशी कर्नल सोफिया कुरेशी भारतीय लष्कराच्या सिग्नल कोर्प्समध्ये अधिकारी आहेत. ऑपरेशन सिंदूरच्या प्रेस ब्रीफिंगमध्ये त्यांनी भारतीय लष्कराच्या भूमिकेची स्पष्टता दिली. त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या शांती मिशनमध्येही सहभाग घेतला आहे, ज्यामुळे त्यांच्या आंतरराष्ट्रीय लष्करी अनुभवाला महत्त्व प्राप्त झाले आहे. 

 रश्मी पदवाड मदनकर

Featured post

एका ‘T’ची कहाणी - कायांतर

  #मुखपृष्ठ #कायांतर ही केवळ एक कादंबरी नाही; ती आहे एका ‘T’ची कहाणी...LGBTQAI++ समुदायातील ‘T’, म्हणजेच ट्रान्सजेंडरची. पण ही फक्त एका व्...