Thursday, 22 May 2025

रागातून जागृतीकडे : आधुनिक स्त्रीचा आत्मभानाचा प्रवास !



परंपरेनं स्त्रियांकडे नेहमीच नियमपालक, चारित्र्यसंपन्न आणि सामाजिक चौकटीत वावरणाऱ्या व्यक्ती म्हणून पाहिलं गेलं आहे. स्त्रियांबाबत त्यांच्यातील सहनशीलता, त्याग आणि समर्पण या गुणांचंच पूजन करण्यात आलं. मात्र, गेल्या काही दशकांत हे चित्र बदलताना दिसत आहे. गुन्हेगारी क्षेत्रात स्त्रियांचा सहभाग वाढतो आहे, आणि ही बाब केवळ जागतिक पातळीवरच नव्हे, तर भारतातही प्रकर्षाने जाणवते आहे. अलीकडच्या काळात महिलांद्वारे केलेल्या गुन्ह्यांच्या बातम्या सतत चर्चेचा विषय ठरत आहेत. वृत्तपत्रांपासून ते टीव्ही आणि सोशल मीडियापर्यंत अशा घटना सतत झळकत राहतात; जणू त्या नव्या सामाजिक वास्तवाचे प्रतिबिंब आहेत.

गेल्या वर्षातही अनेक धक्कादायक घटनांनी समाजाला हादरवून टाकलं आहे. काही स्त्रियांनी आई असून आपल्या मुलांचाच जीव घेतला; तर काहींनी जोडीदाराला किंवा कुटुंबीयांना क्रूरतेनं ठार केलं. जेथे प्रेम, सान्निध्य आणि विश्वास असायला हवा, तिथेच छळ, हिंसा आणि मृत्यू घडताना आपण पाहिले. हे पाहून अंतर्मन अस्वस्थ होतं. या घटनांचा मागोवा घेताना, एक महत्त्वाचा प्रश्न समोर येतो... अशा गुन्हेगारी प्रवृत्ती निर्माण होण्यामागचं, वाढीला लागण्याचं कारण काय आहे? हा फक्त कायद्याचा विषय नाही, तर तो सामाजिक, मानसिक आणि भावनिक घटकांशी संबंधित आहे. कदाचित वर्षानुवर्षे दडपलेला राग, अन्याय, भावनिक ताणतणाव, किंवा सामाजिक अपेक्षांचं दडपण या सगळ्यांचा स्फोट अशा स्वरूपात होत असेल का ? या प्रश्नांवर केवळ चर्चाच नव्हे, तर सखोल विचार, समाजशास्त्रीय विश्लेषण आणि मानसशास्त्रीय समज आवश्यक आहे. कारण ही फक्त गुन्हेगारी नव्हे; तर ही बदलत्या समाजाच्या वेदनेचा प्रारंभ तर नसेल अशी चिंता वाटू लागली आहे.


विकसनशील सामाजिक भूमिका, वाढते स्थलांतर, व्यवसायांमधील परिवर्तन, महिला मुक्तीची चळवळ, आर्थिक स्वातंत्र्य आणि राजकीय स्वायत्तता; या सगळ्यांमुळे आजच्या काळातील स्त्रियांना विविध क्षेत्रांत सहभागी होण्याच्या नव्या संधी प्राप्त झाल्या आहेत. संधी मिळाल्या की आत्मविश्वास वाढतो, आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण झालेली व्यक्ती नव्या दिशांकडे आकर्षित होते. मात्र या आकर्षणाला एक वेगळीही दिशा मिळत आहे; काही स्त्रिया गुन्हेगारीच्या वाटेवर वळताना दिसत आहेत. एकेकाळी केवळ पुरुषप्रधान समजल्या जाणाऱ्या गुन्हेगारी जगतात आता महिलांची संख्याही वाढताना दिसतेय. ही वाढ इतकी स्पष्ट आहे की, तिच्याकडे डोळसपणे पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. महिलांकडून होत असलेले गुन्हे आता फक्त किरकोळ स्वरूपाचे उरलेले नाहीत. त्या अनेक गंभीर, हिंसक आणि अप्रचलित गुन्ह्यांमध्येही सक्रिय सहभागी होऊ लागल्या आहेत. त्यामुळे गुन्ह्यांचा स्वरूप अधिक व्यापक आणि धोकादायक होत चालले आहे.

मग प्रश्न उभा राहतो की, महिलांमध्ये अचानक गुन्हे करण्याची उर्मी का वाढते आहे? हा संताप कुठून निर्माण होतो आहे? हे फक्त सामाजिक बदलांचे परिणाम आहेत की वर्षानुवर्षे साचलेल्या असंतोषाचा उद्रेक? की स्वातंत्र्याचा अर्थ चुकीचे समजण्याची लक्षणं? या प्रश्नांवर विचार होणे आणि त्याचे सखोल विश्लेषण होणे आज अत्यावश्यक झाले आहे.

महिलांचा राग आणि संताप हे काही अलीकडील घटक नाहीत. इतिहास, पुराणकथा आणि लोककथांमध्ये या भावना वारंवार उमटताना आपल्याला दिसतात. परंतु, अलीकडच्या काळात या भावना अधिक स्पष्ट, ठाम आणि प्रखर स्वरूपात व्यक्त होताना दिसतात. समाजमाध्यमे आणि विविध सार्वजनिक मंचांवर, विशेषतः अवहेलनेच्या आणि अश्लीलतेच्या छटांनी युक्त भाषेत, हा राग अधिक ठळकपणे समोर येतो. अनेकदा हा संताप अपरिपक्व, भावनाशून्य आणि बेपर्वा वाटतो. परंतु, हे दुर्लक्ष करता येणार नाही की अनेक पिढ्यांपासून स्त्रियांमध्ये साठून राहिलेला, दाबलेला राग आता उफाळून येत आहे.

पूर्वी महिलांचा राग मुख्यतः साहित्य, सिनेमा किंवा नाट्यरूपांमधूनच व्यक्त होत असे. वास्तविक जीवनात त्याला फारसे स्थान नव्हते. त्याची दखल घेतली जात नव्हती, स्वीकार केला जात नव्हता. त्यामुळे हा दाबलेला संताप आता समाजमाध्यमांच्या मंचांवर अधिक तीव्र आणि आक्रमक रूपात व्यक्त होत आहे. त्यास तिथे एक प्रकारची अनुमती, संमती आणि सहानुभूती मिळत असल्याने, तो अधिकाधिक वाढत असल्याचे जाणवते. मनोविज्ञानतज्ज्ञांचे मत आहे की, स्त्रिया अनेक पिढ्यांपासून अंतर्मनात रागाचे ओझे बाळगत जगत आहेत. दैनंदिन जीवनातील अन्याय, भेदभाव आणि अपमान यांच्या विरोधातील त्यांचा संताप आज चित्रपट, समाजमाध्यमांवरील रील्स, संगीत, साहित्य आणि लोकप्रिय संस्कृतीच्या विविध माध्यमांतून ठळकपणे प्रकट होत आहे. तथापि, प्रत्यक्ष जीवनात या रागाला समाजाकडून आवश्यक ती मान्यता, समजून घेणे आणि गांभीर्याने विचार करणे याचा अभाव जाणवतो. या भावनांवर सखोल मंथन होऊन, त्या समजून घेत योग्य उपाययोजना केल्या जात नाहीत हीच यातली खरी शोकांतिका आहे.

या पार्श्वभूमीवर काही मूलभूत प्रश्न समोर येतात —
समाज या भावना समजून घेईल का?
या रागाला योग्य दिशा देण्याची संधी स्त्रियांना मिळेल का?
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा आवाज केवळ अभिव्यक्त होण्यापुरताच मर्यादित राहील, की परिवर्तन घडवण्यासाठी आधार बनेल?


आपल्या समाजाची एक मोठी समस्या अशी आहे की, मोकळेपणाने बोलणारी, खळखळून हसणारी, आनंदी राहणारी स्त्री समाजाला खटकते. स्त्रियांनी अल्पभाषी राहावे, नम्र, संयमी वर्तन करावे हे ‘बाळकडू’ तिला लहानपणापासूनच दिले जाते. उघडपणे हसणारी, स्पष्ट बोलणारी स्त्री सहजपणे चरित्रहीन ठरवली जाते. मुलगी जन्मल्यापासून तिच्या आजूबाजूला असलेल्या स्त्रिया तिने दबलेल्या, पिचलेल्या, कुचंबणा झालेल्या अवस्थेत जगताना तिला दिसतात. अशा वातावरणात तिच्या मनात निर्माण होणाऱ्या भावनांचा निचरा होण्यासाठी कोणीही नसते; न व्यक्त होण्यासाठी माणसं, न समजून घेणारा समाज. आणि हे चक्र पिढ्यानपिढ्या सुरूच राहिलं आहे. राग हा भाव नेहमी एखाद्या गोष्टीच्या रक्षणाशी जोडलेला असतो. पण समाजाने हा रक्षणाचा अधिकार, हा संताप व्यक्त करण्याचा हक्क आजपर्यंत फक्त पुरुषांसाठी राखून ठेवला होता. स्त्रियांनी राग व्यक्त केला, तर तो "अस्वीकार्य" मानला गेला. मात्र अलीकडच्या काळात हे चित्र हळूहळू बदलू लागले आहे. स्त्रियांच्या हातात आता सोशल मिडिया, साहित्य, कला यासारखी प्रभावी माध्यमं आली आहेत. या माध्यमांतून त्यांच्या मनात वर्षानुवर्षे साचून राहिलेल्या भावना व्यक्त होऊ लागल्या आहेत ... कधी सौम्य, तर कधी प्रखर उद्रेकाच्या रूपाने. हा बदल केवळ अभिव्यक्तीपुरता मर्यादित न राहता, समाजाला स्त्रियांच्या अनुभवांकडे नव्या दृष्टीने पाहायला लावेल, अशी अपेक्षा आहे.

स्त्रियांचा राग हा एक अत्यंत वैयक्तिक अनुभव असला तरी, सध्याच्या काळात तो सामूहिक अनुभव देखील बनत चालला आहे. सामाजिक प्लॅटफॉर्मवरून म्हणा किंवा अभिव्यक्त होण्याच्या उर्मीतून आता स्त्रिया स्वतः एकमेकींशी ते शेअर करताना दिसतात. पूर्वी ज्या रागासाठी लाज वाटायची, त्याच रागासाठी आता एकजूट होऊन समर्थन तयार होत आहे. महिलांमध्ये एक नव्या प्रकारची जागरूकता आणि एकात्मता दिसून येत आहे, जिचामुळे त्यांच्या रागाची, त्यांच्या भावना व्यक्त करण्याची व स्वीकार करण्याची त्यांना आपसूकच परवानगी मिळत आहे.

ब्रिटिश गायिका आणि गीतकार पालोमा फेथ यांचं गाणं "लेबर" सध्या अत्यंत लोकप्रिय झालं आहे. या गाण्यात स्त्रियांच्या संतापाची तीव्र आणि थेट अभिव्यक्ती आहे. सुमारे ३५,००० रील्समध्ये या गाण्याचा साउंडट्रॅक वापरण्यात आला आहे. हे गाणं, हे रील्स, आणि अशा कथा हे दाखवतात की आता महिलांचा राग दाबून ठेवला जात नाही; तो जगासमोर स्पष्टपणे, निर्भीडपणे व्यक्त केला जातो आहे.

खरं तर, रागाचा उद्रेक तोच क्षण असतो, जेव्हा स्त्री सहनशीलतेच्या सीमारेषेवर येऊन पोहोचते... जेव्हा तिच्या भावना, अस्तित्व आणि ओळख सातत्याने दुर्लक्षित केल्या जातात. पूर्वी केवळ सहन करणाऱ्या स्त्रिया आता बोलू लागल्या आहेत, व्यक्त होऊ लागल्या आहेत आणि समाजबदल घडवण्यासाठी पुढे येत आहेत. हा राग आता केवळ भावनिक उद्रेक न राहता, कृतीशीलता, आत्मभान आणि सामर्थ्य यांचं योग्य रूप धारण करू लागला आहे. तो दडपशाहीच्या कोंडमाऱ्यातून बाहेर पडून समाजपरिवर्तनाची नांदी ठरू लागला आहे. महत्त्वाचं म्हणजे, हा राग जोपर्यंत सकारात्मकता आणि बांधिलकीच्या दिशेने मार्गक्रमण करतो, तोपर्यंत समाजात खोलवर आणि स्थायिक परिवर्तन घडवण्याची परिणामकारक क्षमता त्याच्यात असते. कारण असा राग विध्वंसक नसून, सृजनशील असतो... स्वतःसाठी नव्हे, तर व्यापक सामाजिक हितासाठी प्रेरित असतो. परंतु हाच संताप जर अराजक व विध्वंसाच्या मार्गाला लागला, तर तो त्या व्यक्तीसाठी, कुटुंबासाठी आणि पर्यायाने समाजासाठीही घातक ठरतो.

गेल्या काही दशकांतील चित्रपटांचा मागोवा घेतला, तर लक्षात येतं की स्त्रियांच्या अंतर्मुख संतापाला पडद्यावर आवाज मिळू लागला आहे. हा राग आक्रमक नसला, तरी तो गंभीर आणि गहिरा आहे, खोल आहे. दैनंदिन लहानसहान अपमान, अन्याय, दुर्लक्ष आणि दमित भूमिका यांचा हळूहळू साचणारा असंतोष आहे. मल्याळम चित्रपट 'द ग्रेट इंडियन किचन' आणि त्याचाच हिंदी रीमेक 'मिसेस' (2025), 'थप्पड' (2020), पगलट (2021) या चित्रपटांनी हाच शांत, पण सतत उफाळणारा स्त्रियांचा संताप दाखवला आहे. त्यातील नायिकांच्या संतप्त नजरा, मौन विद्रोह, आणि शेवटी एका कृतीतून होणारा नात्यांचा किंवा चौकटींचा भंग; हे सर्व आजच्या समाजातील स्त्रियांच्या अंतर्गत लढ्याचं प्रतिनिधित्व करतं. तरीही, खरतर या आधुनिक चित्रपटांमधील राग तुलनेने सौम्य वाटतो, विशेषतः पूर्वीच्या काही चित्रपटांतील रौद्र रूपाच्या तुलनेत. उदाहरणार्थ, स्मिता पाटीलच्या मिर्च मसाला (1987) चित्रपटातील अंतिम दृश्य ! एक अश्रुत पण आगीने पेटलेला संताप जेव्हा उफाळून येतो तेव्हा तो सूड नसतो तो स्वसंरक्षणासाठी उचललेले अंतिम पाऊल असते. मिरची फॅक्टरीत येणारा क्रूर अत्याचारी सुभेदार जेव्हा सहनशीलतेची पराकाष्टा झालेल्या सोनाबाईला पकडण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा फॅक्टरीतील सर्व महिला एकत्र येतात आणि ताज्या लाल मिरच्यांच्या मसाल्याने त्याच्यावर हल्ला करतात. या हल्ल्यात सुभेदार घायाळ होतो. ते दृश्य म्हणजे स्त्रियांच्या संयमाच्या सीमेला पार केल्यानंतर झालेला उद्रेक ... एक प्रतीकात्मक विस्फोट ! 'मदर इंडिया' (1957) मध्ये तर नायिका स्वतःच्या मुलाला गोळी घालते. कर्तव्य आणि नैतिकतेच्या संघर्षात तिला स्वीकारावा लागलेला हा क्रूर निर्णय असतो.

मर्दानी, मॉम, कहाणी, गुलाब गँग आणि बँडिट क्वीन हे चित्रपट आधुनिक स्त्रीच्या रागाला केवळ भावनात्मक प्रतिक्रिया म्हणून न दाखवता, त्यामागील परिपक्वता, अन्यायाविरोधातील झुंज, सूडाची भावना आणि अन्यायी समाजरचनेविरोधात घेतलेली ठाम भूमिका दाखवतात. हे चित्रपट स्त्रीचा राग म्हणजे दुबळेपणाची नाही तर दृढ प्रतिकाराची, आत्मभानाची आणि न्यायाच्या शोधातील प्रवृत्तीची अभिव्यक्ती आहे हे अधोरेखित करतात. मात्र, असा प्रतिकार नेहमीच हिंसक असायला हवा, असे नाही. राग व्यक्त करण्याची किंवा सूड उगवण्याची दिशा सकारात्मक आणि सृजनात्मकदेखील असू शकते, याची अनेक उदाहरणे आपल्या आजूबाजूला आहेत. अनेक अशा स्त्रिया आहेत, ज्या संकटांनी उद्ध्वस्त झाल्यानंतरही पाषाणाच्या छाताडावर एखादे हिरवे कोंब फुटावे तशा जगल्या तगल्या आणि पाय रोवून उभ्या राहिल्या, नव्या उमेदीनं आयुष्य घडवलं आणि समाजासाठी प्रेरणास्थान ठरल्या. काहींनी बेघर अवस्थेतून स्वतःचं विश्व उभं केलं, तर काहींनी शिक्षण, व्यवसाय, समाजसेवा यामध्ये आपलं स्थान निर्माण केलं. त्यांच्या जिद्दीने, आत्मविश्वासाने आणि न झुकणाऱ्या वृत्तीने त्या अनेकांसाठी आदर्श ठरल्या आहेत.

''स्त्रीने ठरवले तर ती काहीही करू शकते'' असे एक वाक्य सर्वश्रुत आहे पण हे ''काहीही'' म्हणजे शब्दशः काहीही नव्हे. ते म्हणजे सृजन, सर्जन, उत्पत्ती आणि कल्पकतेच्या अंगाने काहीही करणे असते. स्त्रीराग केवळ विद्रूपतेचा, दुःखाचा अथवा तक्रारीचा उद्रेक असू नये; तो परिवर्तनाची बीजं घेऊन येणारा, एक सृजनशील उर्जेचा प्रवाह असायला हवा. कारण हीच स्त्रीची मूळ प्रवृत्ती, महत्वाचा स्वभावधर्म आहे. राग येणे साहजिक असले तरी; जेव्हा या रागाला योग्य दिशा, समजूतदार व्यासपीठ आणि स्वीकार करणारा प्रगल्भ समाज लाभतो, तेव्हा तो संहारक न राहता समाज परिवर्तनाचा प्रेरणास्त्रोत बानू शकतो. म्हणूनच एक समाज म्हणून आजच्या काळात सर्वांत मोठी गरज आहे, ती स्त्रीच्या रागाकडे संवेदनशीलतेने, समजूतदारपणे आणि सहानुभूतीने पाहण्याची. अशा रागाला योग्य मार्गदर्शन आणि सकारात्मक ऊर्जा दिली, तर तो फक्त विरोध न राहता परिवर्तनाचे साधन बनू शकतो असा विश्वास वाटतो.







रश्मी पदवाड मदनकर
rashmi.aum15@gmail.com

Saturday, 17 May 2025

हायब्रिस्टोफिलिया समुदाय: गुन्हेगारांप्रती आकर्षण आणि नैतिक गुंतागुंत -


याकुब मेनन 1993 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी असूनही, काही व्यक्तींनी आणि संघटनांनी त्याच्या शिक्षेविरोधात सहानुभूतीने युक्तिवाद केला. त्याच्या शिक्षेपूर्वी अनेक नागरिकांनी त्याला बुद्धिमान, प्रतिष्ठित चार्टर्ड अकाउंटंट म्हणून गौरवले. त्याच्याबद्दलची सहवेदना, सहानुभूती, आणि गुन्ह्याच्या पलीकडे पाहण्याचा प्रयत्न या गोष्टी स्टॉकहोम सिंड्रोम आणि हायब्रिस्टोफिलिया या दोन मानसशास्त्रीय संकल्पनांच्या सामाजिक छटा दाखवतात.

चार्ल्स शोभराज, ज्याला "द सर्पेंट" आणि "बिकिनी किलर" म्हणून ओळखले जाते, हा एक कुख्यात फ्रेंच-भारतीय व्हिएतनामी सिरियल किलर आहे. त्याने 1970 च्या दशकात आशियातील विविध देशांमध्ये अनेक पर्यटकांची हत्या केली, शोभराजच्या गुन्हेगारी कारकीर्दीचे मानसशास्त्रीय विश्लेषण केल्यास, तो एक सायकोपॅथिक व्यक्तिमत्व होता, ज्याला इतरांच्या वेदनेत आनंद मिळत असे. त्याची आकर्षकता आणि चातुर्यामुळे तो लोकांना फसवण्यात यशस्वी होत असे. त्याच्या गुन्ह्यांमुळे त्याला 'द सर्पेंट' हे टोपणनाव मिळाले, कारण तो आपल्या शिकारांभोवती जाळे विणत असे. चार्ल्स शोभराज हे हायब्रिस्टोफिलिया या मानसशास्त्रीय संकल्पनेचं एक ठोस आणि उल्लेखनीय उदाहरण मानलं जाऊ शकतं विशेषतः त्याच्या गुन्हेगारी इतिहासाच्या पार्श्वभूमीवरही अनेक स्त्रिया त्याच्याकडे आकर्षित झाल्या, प्रेमाच्या भावना व्यक्त केल्या आणि काहींनी तर त्याच्याशी विवाह करण्याचा निर्णय घेतला. 2008 मध्ये, शोभराजने नेपाळमधील नीहिता बिस्वास हिच्याशी विवाह केला. ती त्याच्यापेक्षा 44 वर्षांनी लहान होती, आणि शोभराज तुरुंगात असतानाच दोघे भेटले. त्याचे सगळे गुन्हे माहिती असताना नीहिताने त्याच्यावर प्रेम असल्याचं खुलेपणाने जाहीर केलं आणि त्याची निर्दोषता सिद्ध करण्यासाठीही प्रयत्न केले.

रिचर्ड रामिरेझ हा अमेरिकेतील अत्यंत क्रूर आणि भयावह सिरीयल किलर होता, ज्याला "नाईट स्टॉकर" म्हणून ओळखले जाते. 1984 ते 1985 दरम्यान कॅलिफोर्नियामध्ये त्याने बलात्कार, हत्या, चोरी आणि अत्याचार यांसारखे अनेक गुन्हे केले. त्याच्या विकृत आणि सैतानी प्रवृत्तीमुळे संपूर्ण अमेरिका हादरली होती. तरीसुद्धा, रामिरेझ तुरुंगात गेल्यानंतर हजारो महिलांनी त्याच्यावर प्रेम व्यक्त केलं, त्याला प्रेमपत्रं पाठवली, आणि त्याच्या सैतानी व्यक्तिमत्त्वाला "आकर्षक" म्हटलं. 1996 मध्ये, डोरीन लिओय नावाच्या एका पत्रकार महिलेने त्याच्याशी तुरुंगात विवाह केला. ही घटना हायब्रिस्टोफिलिया या मानसशास्त्रीय विकृतीचं अत्यंत स्पष्ट उदाहरण आहे ... जिथे स्त्रिया गंभीर गुन्हेगारांच्या क्रौर्याऐवजी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाकडे आकर्षित होतात.

भारतातील पंजाब आणि हरियाणा राज्यांतील शेतकरी आणि अर्धिया (कमिशन एजंट) यांच्यातील संबंध स्टॉकहोम सिंड्रोमच्या उदाहरणासारखे आहेत. अर्धिया शेतकऱ्यांना पिकांची खरेदी आणि अनौपचारिक कर्ज देतात, ज्यामुळे शेतकरी त्यांच्यावर अवलंबून राहतात. शेतकऱ्यांना थेट बाजारपेठेत विक्री करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना विरोध केला जातो, कारण अर्धिया यांच्या माध्यमातून त्यांना तात्पुरती सुरक्षितता आणि आधार मिळतो. या संबंधांमध्ये शेतकऱ्यांचे मोठे प्रमाणात शोषण होऊनही अर्धिया यांच्याबद्दल प्रेमाचे नाते आणि विश्वास दिसून येतो, जे स्टॉकहोम सिंड्रोमचे मोठे लक्षण आहे.

सोशल मीडियावरील हायब्रिस्टोफिलिया समुदाय:
आजच्या युगात सोशल मीडियाचा मानवी वर्तनावर खोलवर परिणाम होत आहे. ही केवळ माहितीच्या देवाण-घेवाणीची जागा राहिलेली नसून, व्यक्ती आपल्या ओळखी, मतमतांतरे आणि भावना खुलेपणाने मांडताना दिसतात. या डिजिटल विश्वात एक आगळावेगळा आणि वादग्रस्त समुदाय पुढे येताना दिसतो आहे, तो म्हणजे "हायब्रिस्टोफिलिया समुदाय". या समुदायातील व्यक्ती गंभीर गुन्हेगारांप्रती प्रेम, आकर्षण वा सहानुभूती व्यक्त करतात. ही भावना केवळ वैयक्तिक मानसिक विचलन नसून, सोशल मीडियाच्या प्रभावाखाली सामूहिक ओळखीचं आणि उपसंस्कृतीचं रूप घेत आहे.

हायब्रिस्टोफिलिया म्हणजे काय?
हायब्रिस्टोफिलिया ही एक विशिष्ट मानसशास्त्रीय अवस्था आहे, जिथे एखाद्या व्यक्तीला बलात्कार, खून, दहशतवादी कृत्ये, नक्सलवाद किंवा अन्य गंभीर गुन्हे करणाऱ्या व्यक्तींबद्दल सहानुभूती किंवा भावनिक काहीवेळा लैंगिक आकर्षण देखील निर्माण होते. हे आकर्षण अनेकदा इतके तीव्र असते की काही महिला (बहुतेक वेळा) तुरुंगात असलेल्या गुन्हेगारांशीदेखील विवाह करण्याचा निर्णय घेतात. उदाहरणार्थ, चार्ल्स शोभराज, अबू सालेम, टेड बंडी, रिचर्ड रामिरेझ आणि जेफ्री डाहमर हे अत्यंत गंभीर गुन्हेगार असूनही, त्यांच्या भोवती एक मोठा प्रेम, आकर्षण आणि भक्तिभाव व्यक्त करणारा चाहतावर्ग निर्माण झाला होता. या गोष्टी मर्यादित वैयक्तिक होत्या तोवर ठीक होतं; पण सोशल मीडियावर अशा गुन्हेगारांची स्तुती करणाऱ्या पोस्ट्स, त्यांना निरपराध दाखवण्याची लगबग, त्यासाठी होणारी अस्वस्थता तडफड आणि त्या तडफडीचे विक्षिप्त पद्धतीने केलेले सादरीकरण हायब्रिस्टोफिलियाच्या समाजमाध्यमांवरील रुग्णांच्या दृश्य रूपाची साक्ष देतात.

सोशल मिडिया ही केवळ संवादाची जागा नाही, ती आता एक ओळख साकारण्याची जागा आहे असे समजले जाते. TikTok, Instagram, Tumblr, Reddit यांसारख्या प्लॅटफॉर्म्सवर लोक अनेकदा गुन्हेगारांविषयी आकर्षण व्यक्त करताना स्वतःची एक खास 'डार्क फॅन' ओळख निर्माण करतात. हे आकर्षण अनेक वेळा गुन्हेगाराच्या "वैयक्तिक बाजू" ला वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. उदाहरणार्थ, "तो गुन्हेगार आहे, पण त्याच्या डोळ्यात प्रेम आहे", "त्याची बालपणाची वेदना कुणी समजून घेतली नाही म्हणून बिचारा असा झाला", वगैरे.
अशा लोकांच्या नैतिकतेचा गोंधळ उडालेला असतो. या अशा मानसिक डिस्टर्ब् समुदायांमध्ये एक प्रकारची 'नैतिक तडजोड' (moral negotiation) दिसून येते. हे लोक वारंवार सांगतात की ते गुन्ह्यांना पाठिंबा देत नाहीत, पण गुन्हेगार म्हणून व्यक्तीमध्ये त्यांना काही "खास" दिसतं किंवा हा मानवी दयामायेचा मुद्दा आहे पण हीच मानवीयता किंवा दयामाया त्यांना त्या अन्यायाला बळी पडलेल्यांबद्दल किंवा अत्याचारग्रस्त माणसांबद्दल वाटत नसते. तेव्हा यांचा मानवतेचा बुरखा उघडा पडतो. काही वेळा हे आकर्षण केवळ व्यक्तिमत्त्व, रूप, किंवा प्रसिद्धीशी संबंधित देखील असते. असे असते तेव्हा ते अधिक मानसिक आजाराशी संबंधित असते.
हायब्रिस्टोफिलिया समुदाय अनेक वेळा सोशल मिडियावर गुन्हेगारांचे फोटो, त्यांच्या कुटुंबाचे फोटो, कोर्ट फूटेज, किंवा जुन्या मुलाखती वापरून त्यांचं 'एस्थेटिक रूपांतर' करतात. गडद संगीत, ब्लर फिल्टर्स, रोमँटिक कोट्स यांद्वारे गुन्हेगाराची प्रतिमा एखाद्या प्रेमळ, दयाळू, कुटुंबवत्सल व्यक्तींसारखी सादर केली जाते. यामुळे गुन्हेगारांची भीतीदायक प्रतिमा लुप्त होते आणि त्या जागी एक "आकर्षक विरोधाभास" उभा राहतो.

या समुदायांबाबत समाजात दोन प्रकारच्या प्रतिक्रिया दिसतात काहींना हे मनोरंजक वाटते, तर काहींना हे 'अतिशय चिंताजनक' वाटते. गुन्हेगारांविषयी सहानुभूती निर्माण होणं हे ''गुन्हेगारीचे सामान्यीकरण'' होणे असू शकते, जे समाजासाठी घातक आहे. विशेषतः जेव्हा पीडितांच्या वेदना दुर्लक्षित केल्या जातात आणि त्या ऐवजी गुन्हेगारांचे महिमामंडन केले जाते तेव्हा ते अधिकच गंभीर स्वरूपाचे असते.

हायब्रिस्टोफिलिया समुदाय हे सोशल मिडियाच्या काळात निर्माण झालेलं एक गुंतागुंतीचं, नैतिकदृष्ट्या गंडलेलं, आणि मानसशास्त्रीयदृष्ट्या साशंक असलेलं क्षेत्र आहे. या समुदायातील लोक फक्त गुन्हेगारांवर प्रेम करत नाहीत, ते सोशल मिडियाद्वारे त्या गुन्हेगाराशी स्वतःची ओळख वाढवणे, त्याच्या विचारसरणीशी सुसंगत वागणे आणि भरकटलेल्या भावनिक गरजा एनकेन पद्धतीने पूर्ण करून घेण्यासाठी असे वागत असतात. ही गोष्ट फक्त मानसशास्त्राच्या दृष्टीने नव्हे, तर समाजशास्त्र, डिजिटल माध्यमांचे विश्लेषण, आणि नैतिकता या सर्व अंगांनी अभ्यासण्यासारखी आहे. जरासे स्वतःच्या आत वाकून पाहण्याची तेवढी गरज आहे.

✍🏻 रश्मी पदवाड मदनकर

(१७ मे २०२५ रोजी तरुण भारत आकांक्षा पुरवणीत कव्हर स्टोरी प्रकाशित)





Friday, 9 May 2025

Operation Sindoor!

तुम्हाला माहिती आहे का ? २०१७ पर्यंत भारतात महिलांना थेट युद्धावर जाण्याचा अधिकार नव्हता. युद्धसंबंधी निर्णय घेण्याची संधीही त्यांना दिली जात नव्हती. या विषमतेविरुद्ध त्यांचा संघर्ष अनेक वर्षांपासून सुरू होता. तेव्हा महिलांना लष्करात केवळ सहाय्यक भूमिका, जसे की सैनिकांच्या शस्त्रास्त्रांची तयारी, वैद्यकीय सेवा या क्षेत्रांपुरतीच मर्यादित संधी दिली जात असे. लष्करासारख्या पारंपरिकपणे पुरुषप्रधान समजल्या जाणाऱ्या क्षेत्रात महिलांना दीर्घकाळ पूर्णतः वगळण्यात आले होते. मात्र, आता त्या युद्धाच्या मोहिमांमध्ये नेतृत्व करताना दिसत आहेत, हे भारतासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि ऐतिहासिक पाऊल आहे. २०१७ मध्ये भावना कांत ही भारतीय हवाई दलातील पहिली महिला ऑपरेशनल फायटर पायलट ठरली. ती युद्धाच्या मोहिमांवर लढाऊ विमान चालवणारी पहिली महिला वैमानिक बनली. त्याच वर्षी सब लेफ्टनंट शिवांगी हिने भारतीय नौदलात सर्विलन्स विमान उडवणारी पहिली महिला पायलट होण्याचा मान मिळवला. २०२० पर्यंत महिलांना लष्करात कायमस्वरूपी नियुक्ती (Permanent Commission) देण्यात येत नव्हती. मात्र २०२० मध्ये भारतीय लष्कर आणि त्यानंतर नौदलामध्येही महिला अधिकाऱ्यांना हे अधिकार मंजूर करण्यात आले. हा निर्णय महिलांच्या दीर्घकालीन संघर्षाचा विजय ठरला. गेल्या दशकभरात महिलांनी लष्करी क्षेत्रात केवळ आपली उपस्थिती सिद्ध केली नाही, तर कर्तृत्व, नेतृत्व आणि सामर्थ्यही प्रभावीपणे सादर केले आहे. आज हा बदल सुरू झाला आहे, आणि 'समान संधी' ही आता केवळ संकल्पना न राहता प्रत्यक्ष वास्तवात उतरू लागली आहे. ही बदलाची सुरुवात आहे आणि ही आशा आता वास्तव होताना दिसत आहे. 

 ‘ऑपरेशन सिंदूर’ हे केवळ एक लष्करी कारवाईचं नाव नाही, तर ते भारताच्या महिला सैनिकांच्या शौर्याचं, जिद्दीचं आणि आत्मसन्मानाचं प्रतीक आहे. या नावात एक गहन अर्थ दडलेला आहे... ‘सिंदूर’ या शब्दात नुसताच सौंदर्याचा नव्हे, तर त्याग, निष्ठा आणि सन्मानाचा अर्थही अंतर्भूत आहे. आणि या संकल्पनेला साजेसं नेतृत्व केलं दोन महिलांनी... विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी यांनी. पहलगाममध्ये ज्यांच्या डोळ्यांसमोर त्यांच्या सहचाऱ्यांना निर्दयपणे मारलं गेलं, ज्यांना ‘महिला आहेत’ म्हणून दुर्लक्षित म्हणून जिवंत ठेवलं गेलं, त्याच महिलांनी हा प्रतिशोध उचलला. "स्त्रियांना केवळ पुढाऱ्यांपर्यंत संदेश पोचवण्याचं काम आहे, त्यांच्यात दुसरी क्षमताच नाही" या अत्यंत हीन समजुतीला त्यांनी खणखणीत उत्तर दिलं. हा फक्त बदला नव्हता, तर एक इशारा आहे की भारताच्या महिला आता मागे राहिलेल्या नाहीत. महिलेच्या वेदनेचा महिलांनीच घेतलेला बदला, महिलांनीच दिलेला संदेश, आणि महिलांनीच मांडलेली कारवाईची रूपरेषा हे सगळं फक्त प्रेरणादायी नाही, तर ऐतिहासिक आहे. २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाममध्ये झालेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्याला उत्तर देण्यासाठी भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर अचूक आणि प्रभावी हवाई व क्षेपणास्त्र हल्ले केले. या यशस्वी कारवाईत भारतीय लष्कराच्या शौर्याचं जितकं योगदान होतं, तितकंच महत्त्वाचं होतं महिलांच्या नेतृत्वाचं. या प्रेस ब्रीफिंगमध्ये महिलांनी जे आत्मविश्वासाने सांगितलं, त्याने केवळ भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारतीय लष्कराची प्रतिष्ठा उंचावली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणजे सन्मान, शक्ती आणि समतेचा संगम. हे केवळ एक मिशन नव्हतं हे भारताच्या महिला सैनिकांचं धगधगतं उत्तर आहे. कोण आहेत या दोघी ? विंग कमांडर व्योमिका सिंग विंग कमांडर व्योमिका सिंग भारतीय हवाई दलाच्या फ्लाइंग शाखेतील एक वरिष्ठ अधिकारी आहेत. ऑपरेशन सिंदूरच्या प्रेस ब्रीफिंगमध्ये त्यांनी पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्यांच्या तपशीलांची माहिती दिली. या ऑपरेशनमध्ये त्यांनी भारतीय हवाई दलाच्या Rafale आणि Su-30MKI लढाऊ विमानांचा वापर केला. त्यांच्या नेतृत्वाखाली, भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील नौ ठिकाणी सुस्पष्ट आणि प्रभावी हल्ले केले, ज्यात अंदाजे ७० दहशतवादी ठार झाले आहेत. कर्नल सोफिया कुरेशी कर्नल सोफिया कुरेशी भारतीय लष्कराच्या सिग्नल कोर्प्समध्ये अधिकारी आहेत. ऑपरेशन सिंदूरच्या प्रेस ब्रीफिंगमध्ये त्यांनी भारतीय लष्कराच्या भूमिकेची स्पष्टता दिली. त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या शांती मिशनमध्येही सहभाग घेतला आहे, ज्यामुळे त्यांच्या आंतरराष्ट्रीय लष्करी अनुभवाला महत्त्व प्राप्त झाले आहे. 

 रश्मी पदवाड मदनकर

Monday, 3 February 2025

काही माणसांना कामे न करण्यासाठी जसे हजार बहाणे ज्ञात असतात आणि ते त्याचा खुबीने उपयोग करून घेतात; तसेच अनेकांना परिस्थिती प्रतिकूल असतानाही कामे शोधून काढून ती करण्यासाठी हजारो कारणे हजारो पर्याय माहिती असतात. असे असणारे आणि कुठल्याही कामाची लाज न बाळगता कष्ट करत, त्यातून ज्ञानवर्धन करत अनुभवसंपन्न होत पुढे जाणारी माणसे भेटली की फार बरं वाटतं. काम न करणाऱ्यासाठी कामचं सापडत नाहीत आणि काम करणाऱ्यासाठी कामाची वानवा नसते. आमच्या ऑफिसला एक सिनिअर आहेत, त्यांच्या उच्चभ्रू एरियात पहाटे पहाटे एक मुलगा येतो कामाला, त्याच्याकडे त्या एकाच मोहोल्ल्यातली ७-८ घरे आहेत. त्याचं काम त्यांच्या घरातील कुत्र्यांना सकाळी फिरवून आणण्याचं आहे. एका कुत्र्याला फिरवून आणायला १५ मिनिटे लागतात, या हिशोबाने २ तासात तो एका मोहोल्ल्यातले काम संपवतो. पगार आहे प्रत्येकी २००० रुपये महिना. रोजच्या दोन तासांच्या कामात तो १५००० रुपये महिना कमावतो. त्यानंतरच्या वेळेत तो कदाचित दुसऱ्या मोहोल्ल्यात हेच काम करत असावा किंवा दुसरी कामे. असाच आमच्या इमारतीत एक मुलगा येतो. त्याची ना कुठली कंपनी आहे ना कुठला ब्रँड. वन मॅन कंपनी. तो कार धुवायचे काम करतो. प्रत्येकाकडे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा. त्यात डीप क्लिनिंग, वॉटरल्स वॉश असे अनेक प्रकार आहेत.. त्याच्याकडे सध्या २०-२२ घरे आहेत म्हणे जिथे त्याला नियमित जावे लागते. एका घरचे २-३ हजार रुपये महिना मिळत असावेत असा अंदाज धरला तरी ४० हजाराच्या घरात त्याची मिळकत असावी.

मुंबईला आमच्या सोसायटीत एक वयस्कर काका यायचे. फार दुरून लोकलने यायचे त्यांच्या हातात दोन मोठ्या पिशव्या असायच्या. एका दिवशी एका एरियात असे ते आठवडाभर सात वेगवेगळ्या एरियात फिरायचे. त्यांच्या पिशवीत सकाळचा लागणार नास्ता असायचा. म्हणजे सहा इडल्या आणि छाटणीचे पॅकेट, तसेच ढोकळ्याचे, ठेपल्याचे, उपमा, अप्पे, सँडविच. शिवाय अंडी, दही, फरसाण, चकल्या, शेव वगैरे असायचे. सकाळच्या नोकरीच्या घाईत असणारे अनेक जण पटापट पॅकेट उचलायचे. सकाळी ७ ला आलेले काका सकाळी १० वाजता दोन्ही पिशव्या घडी घालून गावाकडे परतायचे.

महिलांना औद्योगिक प्रशिक्षण देऊन त्यांचे आर्थिक सबलीकरण करण्याच्या हेतून नोकरीनिमित्त काम केल्यावर त्या त्या संस्थांशी अजूनही जुळून काम करते आहे. अनेकदा महिला काहीतरी हाताला काम हवे म्हणून विचारायला येतात. पायलीचे अनेक काम खरतर आजही उपलब्ध असतात त्यासाठीचे प्रशिक्षण देखील मोफत असते; त्यात उदबत्ती बनवणे, कागदाचे लिफाफे बनवून दुकानांना देणे, गृह उद्योग सारख्या गोष्टी असतात. मात्र प्रत्यक्ष काम करायची वेळ येते तेव्हा महिलांना अशी छोटीमोठी कामे करायला लाज वाटते. मला आठवतं आम्ही मुंबईला राहायचो तेव्हा भिजवलेली आणि मोड आलेली कडधान्ये बाजारात विकायला असायची. त्या विकणाऱ्या बायका अशी दहा भांडी मांडून दहा प्रकारची कडधान्ये विकायची. नोकरीपेक्षा बायकांना अशी आयती भिजवलेली मोड आलेली कडधान्ये, निवडलेल्या भाज्या, तोडलेल्या शेंगा मिळणार असतील तर त्या अनेकदा जास्तीचे पैसे द्यायलाही मागेपुढे पाहत नाही. अनेकींना हे करायचे सुचवले तेव्हा ''ही अशी कामे आम्ही करणार?'' असा अविर्भाव होता. कामाची पैशांची प्रचंड गरज आहे. मात्र काम करणार ते टेबलावर बसूनच उच्च पदाचेच असे अनेकींना वाटत असते, भलेही त्यासाठीची पात्रता त्यासाठी लागणारे स्किल आपण कधीच आत्मसात करण्याचा प्रयत्न केला नसेल.

मागे आणखी एक किस्सा ऐकला होता, हायवेवर असणाऱ्या ढाब्यांना लागणारे सोललेले लसूण, आल्याचे लच्छे एकेक किलोचे पॅकेट तयार करून ग्रामीण भागातील काही महिला त्यांना पुरवत असे. किती सोपे आहे.. रोज एका हॉटेलला एक किलो. पाच-सहा हॉटेलला तेवढेच. केवळ लसूण सोलून द्यायचा हा व्यवहार आहे आणि त्याबदल्यात जी काही मेहनत लागेल त्याचे पैसे मिळेल.. कुणाला बरं जमणार नाही हा व्यवसाय.

आमच्याकडे रोज एक भाजी विकणारा २२-२३ वर्षांचा चुणचुणीत उत्साही मुलगा येतो.. तो संध्याकाळी ठेलाभर सिजनल भाजी किंवा फळे (कोणतेही एकच) विकायला वेगवेगळ्या मोहोल्ल्यात फिरतो. त्याच्या कामाची यूएसपी म्हणजे तो त्याचे ग्राहक असणाऱ्या महिलांशी तो अत्यंत आदराने, प्रेमाने आपुलकीने वागतो. सगळ्या त्यांच्या ताई, वाहिनी, आत्या, मावशी झाल्या आहेत. कुठली वेगळी भाजी बाजारात आली कि ''ले जातो ना दीदी, तुमको पसंद है करके मै लाया खास, पैसे भी मत दो. तुम खाओगे तो मेरा पेट भरेंगा'' म्हणतो. कधी दोन काकड्या उचलून एखादीच्या पिशवीत घालतो. ''तुम्हारे लिये नही, ये मेरे भांजे के लिये दे रहा, उसको खिलाओ, धष्टपुष्ट बनाव'' म्हणतो. बायका चक्क दिवसभर त्याची वाट पाहतात पण दुसरीकडून भाजी घेत नाहीत. दिवसभरात त्याचा ठेला रिकामा होतो.

नोकरी पाण्याविषयी बेरोजगार असल्याचे लोकं जेव्हा बोलतात आणि तुम्ही त्यांना काही पर्याय सुचवता तेव्हा ते न करण्याचे त्यांच्याकडे अनेक कारणं असतात. लोकांना निकामी बसणं आवडतं पण मिळालेले काम कधी अंतर दूर पडतं म्हणून, कधी बॅकऑफीसचेच काम हवे म्हणून, कधी एरिया चांगला नाहीये म्हणून, कधी वेळा सोयीच्या नाही म्हणून, कधी हाताशी गाडी नाही म्हणून गमावणे ते पसंत करतात पण कुठलीही लाज न बाळगता जरा जास्तीचे कष्ट घेऊन जे मिळेल त्या कामातून ज्ञान आणि अनुभव वाढवून घेऊन पुढे हवे ते मिळवण्यासाठी प्रयत्न करणारी माणसे खरंच विरळा असतात.

Rashmi Padwad Madankar



Saturday, 1 February 2025

माझी शाळा

 शाळा म्हणजे केवढा जिव्हाळ्याचा विषय असतो. ज्या शाळेच्या अंगाखांद्यावर खेळत-शिकत, पडत-झडत उभे राहून; आहे त्या उंचीवर पोचलो असतो त्या शाळेचे ऋण व्यक्त करण्याची संधी मिळत असेल तर त्यासारखा आनंद कुठला असेल. माझी शाळा म्हणजे नागपूरची प्रथितयश शाळा ''केशवनगर हायस्कुल''. शाळेच्या या वर्षीच्या स्नेहसंमेलनाची उदघाटक म्हणून जाण्याची संधी आमचे आवडते गणिताचे शिक्षक आणि आताचे मुख्याध्यापक श्री मिलिंद भाकरे सर यांच्यामुळे मिळाली. ते सगळ्या माजी विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवून असतात, त्यांच्याशी कनेक्टेड असतात. सरांनी या आधीही कार्यक्रमांना अतिथी म्हणून बोलावले पण माझ्याच काहीतरी अडचणींमुळे जाता आले नाही. यावेळी मात्र ही संधी मला गमवायची नव्हती. कित्येक वर्षांनी पुन्हा एकदा शाळेत पाय ठेवला आणि शाळेतले अनेक वर्ष, तेव्हाचे क्षण भरभर डोळ्यासमोरून सरकत गेले. तशा दोन प्रकारच्या शाळा असतात, एक शिकवणारी दुसरी घडवणारी. खरतर अनेक शाळांमध्ये फक्त पुस्तकी ज्ञान दिलं जातं तर एखाद्याच शाळेत ज्ञानासोबत संस्कारही दिले जातात, आपली संस्कृती, नीतिमत्ता शिकवली जाते, मातीचं ऋण, समाजाचं देणं, देशप्रेम या सगळ्या गोष्टी अंगात रुजवल्या जातात. कला, खेळ, संस्काराच्या माध्यमातून चारित्र्य घडवलं जातं. अशाच दुर्मिळ झालेल्या शाळांमध्ये अजूनही आपल्या मूळ तत्वांवर कायम राहून मुलांना घडवत असलेली शाळा म्हणजे माझी केशवनगर शाळा.

मी शाळेत आली तेव्हा रेशीमबागेच्या संघाच्या इमारतीत ही शाळा भरत होती. लांबलचक कित्येक खोल्यांची भव्य इमारत, मोठाले दोन मैदान आणि स्मृती भवनाचे शांत सुंदर पवित्र वातावरण आम्हाला या काळात लाभले. पुढे मी सातव्या वर्गात असताना नंदनवन येथील स्वतःच्या इमारतीत शाळा शिफ्ट झाली. इथेही चार मजली मोठी इमारत होती. पुढे आमच्यासमोरच त्याच प्रांगणात दुसऱ्या इमारतीचे बांधकाम देखील सुरु झाले. आता केशवनगर शाळेची इमारत त्याच प्रांगणात चारही बाजूने चौकोनी बांधली गेली आहे. म्हणजे ज्या शाळेने आम्हाला मोठे होताना घडताना पाहिले; त्याच शाळेला आमच्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी देखील मोठी होताना घडताना याची देही याची डोळा पाहिले, अनुभवले आहे.
स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने यावेळी जवळजवळ २७-२८ वर्षानंतर शाळेला जवळून आतबाहेर न्याहाळता आले. बराच बदल झाला आहे पण तो वरवरचा आहे. मुळात शाळा तशीच आहे जशी ती मनात घर करून बसली आहे. या शाळेने खूप काही दिले. मुख्य म्हणजे आयुष्याचा पाया मजबूत करून दिला ज्यावर आम्ही आज पाय रोवून, तग धरून घट्ट उभे आहोत. सकाळी सात वाजता त्यावेळचे आमचे मुख्याध्यापक पाचपोर सरांनी शिकवलेल्या प्रार्थना-ध्यान साधनेने होणारी दिवसाची सुरुवात व्हायची. त्या साधनेचे महत्त्व आज या टप्प्यावर येऊन कळले आहे. वर्गशिक्षिका वझलवार मॅडमने केवळ जीवशास्त्र शिकवले नव्हते, आयुष्याला वळण देण्याचे कठोर कार्य त्यांनी अत्यंत मृदूपणे केले होते. शारीरिक शिक्षणाच्या केचे सरांनी शिस्त अंगात भिनवली. त्यांचा दरारा असा होता की त्यांच्या मेन गेटवर झालेल्या केवळ प्रवेशाने देखील अक्खी इमारत चिडीचूप होऊन जायची. सरांच्या मार्गदर्शनात कित्येक खेळात प्राविण्य मिळवले, कित्येक राज्यस्तरीय, राष्ट्रस्तरीय कार्यक्रमात सहभागी होता आले.. त्यांच्यामुळे आत्मविश्वास दुणावला. मुजुमदार बाईंनी शिकवलेलं संस्कृत असेल किंवा भाकरे सरांनी शिकवलेलं गणित.. आजही बुद्धीची ताकद नाही ते विसरण्याची, इतके ते पक्के मांड मांडून बुद्धीत घट्ट बसले आहे. धर्माधिकारी मॅडमने विज्ञानाबरोबर कलेत गती मिळवून दिली. दंताळे (कुलकर्णी) मॅडम, मलिये मॅडम तारे मॅडम या सगळ्यांनीच आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन दिला. यावेळी कार्यक्रमात आजच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना आमच्या त्या त्या वेळच्या अनेक गमतीजमती सांगण्याची संधी मिळाली. त्यांना मी अनेक किस्से सांगू शकले, त्यातून आम्हा सगळ्यांच्या घडण्याचा प्रवास मला सांगता आला. आणि हे क्षण, हे प्रसंग, हे शिक्षण, ज्ञान, कला आणि शिस्त या शाळेने आम्हाला दिली, आमचा पाया मजबूत केला, म्हणूनच जमिनीवर घट्ट उभे राहूनही आम्हाला आकाशात भरारी घेण्याचे बळ मिळाले असल्याची कबुली मला देता आली, या कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेचे, एकूणएक शिक्षकाचे, इतर कर्मचाऱ्यांचे आणि माझ्यासोबत शिकणाऱ्या त्यावेळच्या माझ्या सहविद्यार्थ्यांचे, ज्यांनी ज्यांनी या घडण्यात योगदान दिले त्या सगळ्यांचे ऋण व्यक्त करता आले.
हा अतिशय आनंदाचा दिवस होता. मी माझ्या वर्गखोलीत माझ्या बाकावर जाऊन बसले होते. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. गणित लॅब, विज्ञान लॅब, ग्रंथालय पाहिले. जुन्या-नव्या शिक्षकांच्या सगळ्यांच्या भेटी-गाठी झाल्या. नव्या कार्यकारिणीची ओळख झाली. मिलिंद भाकरे सरांनी नव्या उपक्रमांची माहिती दिली. विद्यार्थ्यांचे नृत्य, नाट्य कलांचा आस्वाद घेता आला; आणि विद्यार्थी ते मार्गदर्शक पाहुनी म्हणून जाण्याच्या या योगामुळे अनेक वर्षांपासून वाट पाहणारे एक वर्तुळ पूर्ण झाले.

वेड्या माणसांच्या गोष्टी -

 वेड्या माणसांच्या गोष्टी - #भेटलेलीमाणसे



हा आहे विशाल टेकाडे ! त्याच्या नावात जो विशाल शब्द आहे तो त्याने सार्थक करून दाखवला आहे. विशाल चार वर्षांपूर्वी आयुष्य शोधायला म्हणजे "सर्च ऑफ लाईफ'' मिशनसाठी सायकल प्रवासावर निघाला होता. कुठे जायचे कसे जायचे काहीही डोक्यात नव्हते.. घरातून बाहेर पडल्यावर टप्प्याटप्प्यावर मार्ग सापडत गेला.. मदत मिळत गेली, माणसे भेटत गेली आणि त्याचा एकट्याचा कारवा अखंड पुढे पुढे सरकत राहिला. अंगावर एक ड्रेस आणि एक पिशवीत, एक जुना मोबाईल आणि चार्जर घेऊन तो निघाला होता. निघताना खिशात दहा हजार रुपये होते पण प्रवासात सुरुवातीलाच आयुष्याचा पहिला धडा मिळाला. एका स्वयंसेवी संस्थेच्या संचालकाने, समाजसेवकाने सांगितले. ''आयुष्य असे शोधून सापडत नसते रे. लग्झरी सोबत घेऊन फिरलास तर कधीच आयुष्य सापडणार नाही, जोपर्यंत रस्त्यावरच्या कुत्र्यासारखी वाताहत होत नाही तोपर्यंत आयुष्य कळत नसते'' हे वाक्य मनाला लागले आणि त्या क्षणात निर्णय घेऊन सोबत आणलेली सगळी रक्कम त्याने संस्थेला दान केली. यापुढचा सगळा प्रवास शून्य पैसे घेऊन करायचा. रस्त्यात लागणारी मदत देखील पैशांच्या स्वरूपात घ्यायची नाही हे ठरवून तो पुढल्या प्रवासाला निघाला. भारतातले एकूण १८ राज्य आणि ३ देश आणि अवघे ४ वर्ष त्याने सायकलवर पालथे घातले. मार्गात कुणी राहायला जागा दिली तर राहायचे, पोटापुरते अन्न दिले तर खायचे...आणि मिळाले नाही तर ? या आहे आणि नाहीच्या मधलाच हा प्रवास होता. या प्रवासात त्याने कुठला अनुभव घेतला नसेल ?? कोव्हीड काळात कित्येक गावातून हाकलून लावले असताना वेशीवरच्या मंदिरात रात्र काढण्यापासून ते गावाबाहेर मंदिर नाही म्हणून स्मशानात भर पावसात पूर आलेला असताना निथळत राहून आजच डुबून मृत्यू येईल की काय याची वाट पाहण्यात काढलेली रात्र. अनेकांच्या घरी एका रात्रीचा आसरा घेण्यासाठी विनवणी करण्यापासून ते अनेकांच्या मनात कायम घर करण्यापर्यंतचा प्रवास. ४ दिवस पोटात अन्न गेलेले नसताना, भुकेने पोट तोडत असताना, आता जिवंत राहणे शक्य नाही असे वाटत असताना भिक्षा मागण्याखेरीज उपाय नसताना नाईलाजाने पसरलेला हात ते कुठेतरी कुणाच्यातरी घरी प्रेमाने आग्रहाने पोट तुडुंब भरेपर्यंत अन्न आणि प्रेम मिळवण्याचा प्रवास. प्रवास वरवर स्वतःपासून सुरु होऊन स्वतःच्याच खोलवर आत आत घेऊन जाणारा, प्रगल्भ करून सोडणार प्रवास.

कौटुंबिक वादातून निराशेने ग्रासलेल्या विशालने मनात अतीव दुःख घेऊन घर सोडले होते. विशालला नेपाळला गेल्यावर एका जोडप्याने दत्तक घेतले. तिथे त्याने नेपाळ प्रवासातले एक वर्ष त्यांच्या सोबत घालवला. बांगलादेशात ऐन दंगे सुरु असताना प्रवास केला. ओडिसा आसाम नागालँड सारख्या ठिकाणचे अनुभव ते छत्तीसगढ मधल्या गावांमध्ये प्रत्यक्ष नक्सल गावांत राहण्याचा अनुभव. एकेक माणसांच्या हजारो कथा त्याच्या गाठोड्यात जमा झाल्या आहेत. आयुष्यभर जगल्यावरही घेता येणार नाही असे सगळे अनुभव चार वर्षाच्या सलग सायकल प्रवासातून घेऊन परत आलेला विशाल. या जगात ''प्रेम'' ही एकमेव शाश्वत गोष्ट आहे हे सांगणारा विशाल. जाताना असलेला आणि आता परतलेला विशाल अंतर्बाह्य बदलला आहे. आता तो लवकरच पुन्हा प्रवासावर निघणार आहे. आजवरच्या प्रवासातून फक्त घेत आलो आता ते परत करण्यासाठी प्रवास करायचा आहे असे तो म्हणतो. आम्ही एकाच प्रदेशातले एकाच शहरातले असताना पूर्वी त्याची माझी भेट नव्हती, ओळख नव्हती. ३ वर्षांआधी तो दूरवर प्रवासात असताना त्याला तिथे कुणीतरी माझी ओळख सांगितली. आम्ही फोनवर बोललो आणि मला त्याचे अनुभव ऐकत राहण्याचे वेडच लागले. तो जिथे कुठे जायचा तिथले किस्से फोनवरून सांगत राहायचा. पुढे दोन वर्षांपूर्वी ''अनलॉक'' दिवाळी अंकात त्याची विशेष स्टोरी आम्ही प्रकाशित केली होती. तेव्हापासून विशाल कधी परत येतो आणि भेटतो, कधी त्याला मुलाला, कुटुंबाला जवळच्या मित्रपरिवाराला भेटवते असे झाले होते. अखेर तो दिवस उगवला. २५ डिसेंबर ख्रिसमसच्या संध्याकाळी हा असा एक सांताक्लॉज भेटला आणि त्याचे अनुभव ऐकण्याची, गप्पांची अशी मैफल सजली की ५ तास कसे निघून गेले लक्षात सुद्धा आले नाही. त्याने घेतलेले अनुभव आणि त्यातून त्याला मिळालेलं ज्ञान अनुभूती खरोखर समृद्ध करणारे आहेत हे मात्र निश्चित.

Wednesday, 25 December 2024

रेहने को सदा दुनिया में आता नहीं कोई...
आप जैसे गये, वैसे भी जाता नहीं कोई..!!
खरतर एरवी डिसेंबर महिना म्हणजे कसला गोडीगुलाबीचा वाटतो. वातावरणात पसरलेले धुके, हवेत पसरलेला गारवा आणि मनात भरून उरलेला आजवरच्या डिसेंबर आठवणींचा मंद मंद गंध. ''जाडो कि नरम धूप और आंगण में लेटकर....'' वगैरे आठवाचे दिवस. यंदाचे वर्ष मात्र अशा स्वप्नील वातावरणाचे नाही. यंदा ऐन थंडीत थरथरत्या हाताने अग्नी द्यावी लागलेल्या सासऱ्यांच्या स्मृतींचे तर ऐन डिसेंबरमध्ये अचानक झटकन निघून गेलेल्या दोन जिवापासच्या मैत्रिणीना आक्रंदत हाक मारत जाणाऱ्या क्षणाक्षणाच्या हिशोबाचे.
गेल्या महिन्याच्या शेवटाला दीर्घ आजारपणाने सासरे सोडून गेले. मागे सोडून गेले भरलेपुरले कुटुंब आणि अनेक छोट्याछोट्या गोष्टी. त्यांची पुस्तके, वेगवेगळ्या रंगाच्या पेनांचे सेट, दैनिक हिशोब लिहिण्याची सवय असल्याने हिशोबाच्या भरलेल्या अगणित डायऱ्या.. त्यांचा पंचा, काही रुमाल, त्यांचे हौसेने शिवलेले सूट आणि पैसे ठेवायची पर्सपेक्षा जराशी मोठी अशी बॅग. सासुआई गेल्या होत्या तेव्हा त्यांच्या आठवणीसाठी आम्ही सगळ्या घरातल्या स्त्रियांनी त्यांची एकेक साडी ठेवून घेतली होती. बाबूजींच्या आठवणीतले काय ठेवावे बरे... मला पुस्तके पुरे आहेत पण इतरांच्या हिस्श्याला तेही नाही. कारण पुस्तके काही फार कुणाला नको असतात. त्यांच्या दैनंदिन खर्चाच्या हिशोबाने भरलेल्या डायऱ्या देखील खरतर आयुष्याचे गणित शिकवणाऱ्या. भूतकाळातून आजच्या या क्षणापर्यंत पोचण्याच्या त्या पाऊलखुणाच तर आहेत. मार्गातले सगळे खाचखळगे, अडथळे, खड्डे, पोकळी या सगळ्यांचा जणू ब्लू प्रिंटच. नीट वाचले तर एकेका पानावर तो महिना कुठल्या आणि किती अडचणींचा होता किंवा आनंदाचा; त्या त्या वेळेच्या भावना त्या त्या पानांवर शिंपडलेल्या दिसतील आणि इतिहास बोलका होईल. शिवाय आता उरलेत त्यांची तत्त्व, त्यांचे सत्व आणि आम्हा सगळ्यांना देऊन गेलेले भरभरून आशीर्वाद. निघून गेलेली माणसेही खूप काही ठेवून गेलेली असतात. घेतले तर ओंजळ भरून जाईल, तरीही त्यांच्या विना सगळंच अपुरं राहील अशी स्थिती.. आपण मात्र घेतानाही कमी पडतो.

Rashmi Paraskar
रश्मी गेली. गेली म्हणजे काय ? म्हणजे तिच्या घरी गेलो की ती दिसणार नाही. खरंच दिसणार नाही ? तिचं वावरणारं शरीर कदाचित दिसणार नाही पण तिच्या घरातल्या कोपऱ्याकोपऱ्यात तिनं जीव ओतून ठेवलाय त्यात तर ती दिसत राहणार आहे. एकेक वस्तू हौशीनं घेतलेली, खूप निगुतीनं सजवलेली. कणाकणात तिचा श्वास जाणवेल इतकी ती भिनली आहे त्या घरात. रश्मीच्या घराबाहेर गुलाबी-जांभळ्या कांचनच्या फुलांचं झाड आहे. सुरुवातीला म्हणजे आठ-नऊ वर्षांआधी तिच्या घराचा पत्ता पटकन सापडायचा नाही. मग रश्मीच्या घराची खून म्हणजे ते लगडलेलं कांचनच्या फुलांचं झाड. मुख्य रस्त्यापासून तिच्या घराच्या गल्लीत नुसतं वाकून पाहिलं तरी ती सगळी फुलं आनंदाने डोलताना दिसायची. रश्मीचं घर आणि कांचनची फुलं हे समीकरण इतकं दाट डोक्यात बसलं की नंतर जिथेजिथे कांचनची ती गुलाबी-जांभळी फुलं दिसतील तिथे रश्मीच आठवत राहणार. म्हणूनच मी तिला 'कांचनच्या फुला' म्हणत असे. तिची माझी ओळख नऊ वर्षांआधी सकाळ कार्यालयातली. तेव्हा मी ''मी'' नावाच्या पुरवणीची सहाय्यक संपादक म्हणून काम पाहत होते. त्यात तिचे लेख यायचे. आधी ते घेण्यासाठी, नंतर विषयांवर चर्चा म्हणून बोलणं व्हायचं. मी ''तनिष्का'' साठी महिलांच्या सक्षमीकरणाच्या क्षेत्रात काम करते आहे माहिती झाल्यावर महिलांच्या नेटवर्कच्या मदतीच्या निमित्ताने नंतर छान मैत्री झाली. खूप कामे एकत्र केली. सगळ्या जगात ''मी टू'' गाजत असताना आम्ही नागपुरात एक आगळावेगळा कार्यक्रम आयोजित केला. आकाशवाणी, रेडिओ, बातम्यांसाठी काम केले. उमरेडच्या बलात्कार प्रकरणात आमच्या उमरेडच्या महिलांच्या नेटवर्कची चांगली मदत झाली. आम्ही एकत्र फुटाळा तलावावर आंदोलन-निदर्शने केली. विद्यार्थ्यांसाठी काम केले. दोनेक महिन्याआधी रेल्वे ऑफिसला जाऊन चंद्रपूरला जाणाऱ्या रोज अपडाऊन करणाऱ्या महिलांना ट्रेनच्या वेळेत झालेल्या बदलांचा त्रास होता. त्या वेळा बदलण्यात यश मिळाले. या सगळ्या स्मृतीत रश्मी जिवंत आहे. तिने केलेल्या मी करत असलेल्या अनेक लिखाणाच्या बाबत आम्ही फार गहिरी चर्चा करत असू. त्यावेळी तिच्या विचारांनी माझ्यात आणलेल्या बदलांत ती जिवंत आहे. माझ्या तब्येतीच्या काळजीपोटी ज्या कळवळीने ती मला रागवत असे...मी स्वतःची काळजी घ्यावी म्हणून ज्या पोटतिडकीने मला समजावत असे तिची ती आत्मीयता मरून जाऊ शकत नाही. माझ्याशी मैत्री झाल्यावर कामाच्या निमित्ताने नंतर ज्या ज्या माणसांशी मी तिची ओळख करून दिली त्या सगळ्यांशीही तिने फार जिव्हाळ्याचे संबंध जपले. ती प्रत्येक मैत्रीण तिच्या जाण्यानं गहिवरते आहे.
Supriya Ayyar
सुप्रिया ताईंचे काय बोलावे. त्यांचे ममत्व जवळून लाभले हे सुदैव. त्यांचे घर माझ्या ऑफिसच्या जवळ त्यामुळे अनेकदा कुठकुठल्या निमित्ताने त्यांच्या घरी जाणे होतंच राहायचे. त्यांना माझ्या लिखाणाचे किती कौतुक होते काय सांगू. पुस्तक वाचून झाले तेव्हा हळव्या मनाने गालावरून हात फिरवत एक गुणी लेखिका सापडली म्हणत जवळ घेतले होते. माझ्या पुस्तक प्रकाशनाला अध्यक्ष होत्या.. तेव्हाही खूप खूप भरभरून बोलल्या होत्या. माझ्या मागे कुणाकुणाला कौतुक सांगायच्या ते पोचायचे माझ्यापर्यंत तेव्हा फार आदर वाटायचा त्यांचा. स्वतःलाच मिरवत बसण्याचा जमाना असताना कोण कुणाचे मागे इतके कौतुक करत बसते बरं? अभिव्यक्तीच्या निमित्ताने अनेक कार्यक्रमात सोबत होतो तेव्हा त्यांच्यातली विनयशीलता रुजुता अनुभवली. वर्धेच्या साहित्य संमेलनात जाताना आणि एकदा अभिव्यक्तीच्या एका कार्यक्रमासाठी असे दोनवेळा एकत्र प्रवास केला. तेव्हा त्यांना आम्हा तरुणाईसोबत तरुण होताना पाहिले. अगदी मस्ती करत आम्हा सर्वांना खळखळून हसवले त्यांनी. गेल्या वर्षी माझ्या दिवाळी अंकाच्या संपादक व्हाल का विचारले तेव्हा नम्रपणे म्हणाल्या सगळी मेहनत तू करणार मग मला का इतका मान देते. पण माझा आग्रह बालहट्ट समजून मोडला नाही त्यांनी, हसत स्वीकारला. सगळ्या प्रोसेसमध्ये पूर्ण ऊर्जेने सोबत राहिल्या. एकेक लेख, सगळ्या कथा कविता जातीने वाचल्या. तासनतास चर्चा करायचो आम्ही. त्या मृदू भाषेत बदल सुचवायच्या. अगदी अंकांना मिळालेल्या पुरस्कारांसाठी देखील सगळं क्रेडिट मलाच देऊन तोंडभरून कौतुक करत राहायच्या, खूप लाड केले त्यांनी माझे. मी त्यांना भेटायला जाणार म्हंटले की मी घाईत असते नेहमी, हे माहिती होते त्यांना मग आधीच माझ्यासाठी वाटीत खायला तयार करून ठेवायच्या.. मला फेणी आवडली म्हणून दुसऱ्यावेळी घरी न्यायला काढून ठेवली. म्हणजे मला पळवाटच ठेवायच्या नाहीत.. इतका जीव लावायच्या. माझ्या कामांबाबत सखोल विचारायच्या माझी धावपळ पाहून त्यांना त्यांचे नोकरी करतानाचे दिवस आठवायचे, त्या किस्से शेअर करायच्या, आम्ही रंगून जायचो...
किती बोलावं आणि कायकाय ?
ही जाणारी जिवापासची माणसे त्यांनी दिलेल्या अनुभवांतून आपल्याला आलेल्या अनुभूतीमधून मनात खोलवर शिल्लक राहणार आहेत. त्यामुळे हे सगळे आता नाहीत हे कुणी कितीही पटवून दिले तरी ते आहेत हे पटवून द्यायला, दाखवायला निदान माझ्याकडे तरी हजार जागा आहेत. माणूस म्हणजे केवळ शरीर असू शकत नाही... शरीरापलीकडे तो जसा वागतो, जे वाटतो, जिथे जिथे अस्तित्व सांडत राहतो, जीव ओतत राहतो, तितका तितका शिल्लक उरतो. मनामनात शिरून राहतो तेवढाच खरा माणूस असतो बाकी सगळं वरवर चिकटलेले पापुद्रे....
आणि हे जे काही उरलेले असते हे कधीच संपत नाही, संपूच शकत नाही.

Wednesday, 11 December 2024

मनातले काही


सासरे जाऊन अर्धा महिना उलटला. खरतर ते गेले हे स्वीकारायला आणि आता ते कधीच दिसणार नाहीत यावर विश्वास ठेवायला मन तयारच नाही. समस्त कुटुंबाचा आधारवड होते ते. आमच्या कुटुंबातील जुन्या खोडांपैकी हे शेवटचे खोड होते. सासऱ्यांचे सगळे भाऊ, सासूआईंचे सगळे भाऊ याआधीच गेलेत, माझे व माझ्या जाऊचे वडीलही आधीच गेलेत आणि माझ्या नंदांचे सासरेही गेलेत. या सगळ्या घरादारातल्या स्त्रिया मात्र अजून खमक्या आहेत; नातवंडांच्या पतवंडांचा वाढीव संसार सांभाळत जगत आहेत. चाळीशीपार मध्यवयात पोचलेल्या सगळ्यांचा हा अनुभव असेल की एकेक करत निघून जाते आहे; एक पिढी आता संपते आहे. दुसर्यांसाठी जगत स्वत:चे जीवन संपवणारी पिढी, मान मर्यादा वडीलकीची आब राखणारी, कमी पैशातही तडजोड करून, तरीही सगळ्यांना एकत्र बांधून ठेवणारी, सोबत घेऊन चालणारी पिढी आता संपते आहे. ते होते.. आहेत तोपर्यंत आपण अजूनही लहान असण्याचे आतून येणारे फीलिंग कायम आहे.. ही डोक्यावर हात ठेवून असणारी माणसे जसजशी जाऊ लागतात तसतशी ही फीलिंग मंदावत जाणार. जबाबदारीची जाणीव वाढत जाणार आणि हळूहळू आपल्याला त्यांची जागा घ्यावी लागणार आहे; हे विधिलिखित टळणारे नाही.. पण ही जाणीव खूप खोलवर उद्विग्न करणारी, विचार करायला भाग पाडते आहे.
एक अत्यंत हुशार, प्रगाढ वाचन करणारे, सर्व विषयांचा व्यासंग असणारे, कलेची-साहित्याची आवड असणारे, आयुष्यभर प्रचंड काम करून आभाळभर अनुभव गाठीशी जमा करून प्रगल्भ झालेले एक व्यक्तिमत्व आमच्या कुटुंबातून कमी झाले. नातवंडांना हे संचित देऊ शकणारे असे व्यक्तिमत्व जगभर शोधले तरी आता सापडणार नाही; ही अशी हानी काही केल्या भरून येत नसते. माणूस म्हातारे झाले म्हणून, खूप आजारी होते म्हणून ते वेदनेतून सुटले, सद्गतील लागले हे एक समाधान मानून घेतले तरी कुटुंबात एक जी दरी निर्माण होते ती दुसऱ्या कुणाहीमुळे भरणारी नसते. प्रत्येकाचे एकमेव स्थान आहे आपल्या आयुष्यात हे तो माणूस निघून गेल्यावर अधिक प्रकर्षाने जाणवू लागते.
माझ्याबाबत सांगायचे झाले तर; सासरे ज्यांना आम्ही सगळेच बाबूजी म्हणायचो, ते आणि सासूबाई आमच्याकडे मुंबईला राहायला यायचे तेव्हा घराला अधिकच घरपण यायचे. माझ्या मुलाच्या वाट्याला आजी-आजोबा यावे म्हणून मला नेहमीच त्यांची ओढ असायची. त्यांचे माझ्यावर विशेष प्रेम होते.जगातल्या कुठल्याही विषयावर आम्हाला एकमेकांशी चर्चा करायला आवडत असे. अगदी आजचा कांद्याचा बाजारभाव ते उद्याचा देशाचा राष्ट्रपती ते पुढले महायुद्ध अशा कुठल्याही गोष्टीवर आम्ही मोकळी चर्चा करू शकायचो. त्यांच्यानंतर त्यांच्या सर्व मुलांमध्ये मी एकमेव सरकारी क्षेत्रात काम करते याचा कोण अभिमान होता त्यांना... माझ्या लिखाणाचे कौतुक तर एवढे की मी स्वतः कधी केले नसेल पण ते वृत्तपत्रातली माझ्या लेखांची कात्रणे काढून साठवून ठेवत असत, मी लिहिलेली पुस्तके तर त्यांना त्यांच्या समवयस्क मित्रांमध्ये अभिमानाने मिरवण्याचे साधन वाटायचे. अगदी माझे व्हिजिटिंग कार्ड सुद्धा ते कित्येकांना कौतुकाने दाखवत राहायचे. बारा वर्षांआधी वडील गेल्यानंतरही वडील नाहीत असे कधी वाटलेच नाही. बाबूजींच्या जाण्याने मात्र ते प्रकर्षाने जाणवले..पण माझ्यापेक्षा नवऱ्याचे दुःख जास्त मोठे आहे कारण त्याची आई नव्हती आणि आता वडीलही नाहीत. आई-वडील दोन्ही नसणाऱ्यांच्या आयुष्यातून माहेरपणाची घरपणाची लक्झरी झटक्यात निघून जाते.. कितीही नातेवाईक असू द्या आणि कितीही वय असले तरी मग पोरकेपणा येतोच वाट्याला.
जगण्याच्या अनेक अनुभवातून हे सगळं स्वीकारण्याची मानसिकता तयार होत असली तरी, त्यात्या वेळी येणाऱ्या या भावना ज्याच्या त्यालाच कळत असतात. सांत्वना तेवढ्यापुरत्याच दिलासा देतात; म्हणून जुन्या माणसांना जपले पाहिजे... त्यांचा सहवास जेवढा होऊ शकेल तितका अनुभवून घेतला पाहिजे. कारण त्यांच्या जाण्यानंतर ते कितीही हवेहवेसे वाटले तरी ते फिरून परत येत नाहीत आणि त्यांच्या सोबतीचे क्षण पुन्हा मिळत नाहीत हेच शाश्वत सत्य आहे.

Tuesday, 19 March 2024

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...


काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली
ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली !

झाडाचे जाडे खोड खोलले, सोलले, रंगवले
घराच्या दृश्य भागात निगुतीने सजवले.

इतर फांद्यांचा कोंडा केला, चुलीत घातला  
चुलीवरच्या चविष्ट मटणावर मग यथेच्छ ताव मारला.

मी म्हणाले,
अहो दादा, तुम्ही झाडे तोडायला नको होती
पक्ष्यांची घरटी अशी मोडायला नको होती
बाग बघा कशी ओकीबोकी झाली
परिसरातली आपल्या हो रयाच गेली...रयाच गेली

दादा म्हणाले
ताई जरा इकडे या, मी काय म्हणतो कान देऊन ऐका..  

तुम्हाला नसेल माहित, मी पर्यावरणवादी आहे
तुम्हाला नसेल माहित मी पर्यावरणवादी आहे
आणि काय सांगू अहो, निसर्गाच्या बाबतीत जरा जास्तच दर्दी आहे...

तशी माझी नजर पारखी आहे बरे
निसर्गात दिसतात मला चमचमते हिरे
हिऱ्यांना पेहेलू   पाडल्याशिवाय चमक येते होय?
आणि हिऱ्यांशिवाय सौन्दर्याची मजा येते होय ??  

वृक्षारोपण तर मी दरवर्षीच करतो..  
आणि त्या वाढत्या वृक्षामध्येच सौन्दर्य घेरतो.

काय माहित वृक्षाला त्याची जागा कुठे असते
बघा आमच्या बंगल्यात कसा पठ्ठा शोभून दिसते

उभे राहून झाड थकले होते फार
म्हणून आम्हीच झालो त्याचा तारणहार

मी म्हणलं
बस झाले थांबा! तुमचे म्हणणे पटले
रजा द्या आता, तुमच्यासमोर हात टेकले
तुमच्यासमोर हात टेकले !  

 

 



Thursday, 15 February 2024

चिमुकल्या देशाची रोमहर्षक कहाणी -

 


खाली फोटोत दिसतोय तो एक अक्खा देश आहे. जगातला सगळ्यात छोटा देश. हा देश आहे जो उत्तर समुद्रात, इंग्लंडच्या किनाऱ्यापासून सुमारे 12 मैलांवर दूर स्थित आहे. या देशाची संख्या एकेकाळी ५० होती आता आहे फक्त २७ माणसे.

या छोट्याश्या देशाची कहाणी देखील तशीच अजिब आणि रोमहर्षक आहे. पॅडी रॉय बेट्स एक निवृत्त ब्रिटीश सैन्य अधिकारी यांनी 1967 मध्ये त्यांच्या कुटुंबासह एचएम फोर्ट रफ्सजवळील एक निरुपयोगी नौदलाचा किल्ला ताब्यात घेतला जो एकेकाळी लष्करी किल्ला म्हणून वापरला जात होता आणि त्याला स्वतंत्र राष्ट्र घोषित केले.

असा देश निर्माण करण्याची कल्पना एका वेडातून साकार झाली, पॅडी ह्यांनी त्यांच्या बायकोला वाढदिवसाची भेट द्यायला म्हणून हे पाऊल उचलले होते. पुढे त्यावर फार वाद निर्माण झाला आणि पुढे शिक्कामोर्तब झाले. 1966 साली ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला, बेट्सने एक पडीत टॉवर घेतली आणि ती प्लॅटफॉर्मवर नेली. मग, ग्रॅपलिंग हुक, दोरी आणि त्याच्या बुद्धीचा वापर करून, तो प्लॅटफॉर्मच्यावर चढला आणि त्यावर हक्क घोषित केला. तो म्हणाला होता कि त्याने आपल्या पत्नीसाठी हा किल्ला भेट म्हणून जिंकला आहे.

गिफ्ट म्हणजे त्यात बायकोला आवडण्यासारखे खरतर काहीही नव्हते.. मात्र पॅडीच्या डोक्यात भविष्यासाठी काही वेगळ्या योजना होत्या. 1940 च्या दशकाच्या सुरुवातीला खरतर दोन काँक्रीटच्या खांबांवर उभारलेला तुटका-फुटका फोर्ड म्हणजे हिज मॅजेस्टीज फोर्ड (HMF) एक रफ टॉवर होते जे टेम्सचे रक्षण करणारी चौकी म्हणून कार्यरत होती. ५ टॉवरपैकी हाही एक टॉवर होता. हे दोन पोकळ काँक्रिट टॉवर्सच्या वर समुद्रापासून सुमारे 60 फूट उंचीवर असलेल्या दोन टेनिस कोर्टच्या आकाराचे होते. त्यावेळी यावर शंभरहून अधिक ब्रिटिश सैनिक संपूर्ण शस्त्रांसह तैनात असत.




1950 च्या दशकाच्या उत्तरार्धात, जर्मनच्या पराभवानंतर ब्रिटिश आर्मीने हा किल्ला सोडला आणि त्यानंतर अनेक वर्ष त्यांना ह्याचा विसर पडला. हीच संधी साधून पदी रॉयने त्यावर स्वतःचा दावा ठोकला. मुळात रॉय बेट्स हा एक कर्मठ माणूस होता ज्याने प्रथम स्पॅनिश गृहयुद्धात आणि नंतर WWII दरम्यान उत्तर आफ्रिका, मध्य पूर्व आणि इटलीमध्ये 15 वर्षांचा असल्यापासून लष्कर सेवा केली होती. तो कुठल्याही संकटांना घाबरत नसे. उलट  रॉय बेट्सला नोकरशहांनी काय करावे हे जेव्हा सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला तेव्हा तो जिद्दीला पेटला आणि न घाबरता त्याने या किल्ल्यावर मालकीचा दावा ठोकला पुढेही सरकारच्या इशाऱ्यांकडे धमक्यांकडे दुर्लक्ष करत तो त्याच्या या छोट्याश्या देशासाठी काम करीत राहिला आणि परिणामी सीलँडची प्रतिष्ठा जगभरात वाढत गेली.

या सगळ्या प्रकरणाला सुरुवात झाली ती एका रेडिओ स्टेशनच्या अधिकारशाहीने आणि ती मोडून काढण्याच्या पॅडीच्या जिद्दीमुळे. त्या वेळी, ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (बीबीसी) हे एकमेव कायदेशीर रेडिओ स्टेशन होते आणि रॉयल चार्टरमुळे लोक काय ऐकू शकतात आणि काय ऐकू शकत नाहीत यावर त्यांचे पूर्ण नियंत्रण होते. त्यांना आव्हान देत बेट्सने या रिकाम्या पडलेल्या, पडीक किल्ल्यावर त्याचे पायरेट रेडिओ स्टेशन सुरू केले, लोकांना आवडेल ते संगीत ऐकता याय्ला पाहिजे एवढाच त्याचा हेतू होता. मात्र सरकारने त्याच्या कामात अडथळे आणून त्याचे रेडिओ स्टेशन इतरांपर्यंत पोचू नये अशी सोया केली. त्यानंतर बेट्स ती जागा सोडून निघून जाईल असे ब्रिटिशांना वाटले. मात्र झाले काहीतरी वेगळेच. पॅडीने त्या किल्ल्यावरच स्वतंत्र देशाचा दावा ठोकला.

असे म्हटले जाते की एका रात्री मित्रांसोबत आणि पत्नीसोबत गप्पा मारत असताना बेट्सने निश्चय केला आणि 2 सप्टेंबर 1967 रोजी किल्ल्याला “प्रिन्सिपॅलिटी ऑफ सीलँड” असे नाव दिले. तो त्याच्या पत्नीचा वाढदिवस होता. काही काळानंतर त्याचे कुटुंब त्याच्याबरोबर या जगातल्या सर्वात लहान देशात राहायला गेले
सफोकच्या किनाऱ्यापासून अवघ्या सात मैलांवर, सागरात असलेल्या या अपरिचित सार्वभौमत्वाच्या स्थापनेने यूके सरकारचे लक्ष वेधून घेतले. देशभर खळबळ माजली.  ब्रिटीश पुढारी अधिकारी या घटनेमुळे अस्वस्थ झाले. त्यांनी सीलँडचे वर्णन "आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार बेट म्हणून मान्यता नसलेल्या संरचनेवर बेकायदेशीर कब्जा" असे केले..आणि त्यांनी उर्वरित चार चौक्या उद्धवस्त केल्या जेणेकरून पुन्हा कोणी असा दावा ठोकू नये. दुसरीकडे, बेट्स सर्व संकटांना सामना करायला तयार आणि स्वतःच्या निर्णयावर ठाम होते की सीलँड हा त्याचा स्वतःचा देश आहे तो त्यांनी संघर्षाने जिंकला आहे आणि तो त्याचा योग्य नेता आहे.

1978 मध्ये, अलेक्झांडर गॉटफ्रीड अचेनबॅच नावाच्या एका पश्चिम जर्मन व्यावसायिकाने स्वत: ला सीलँडचे "पंतप्रधान" घोषित केले आणि सत्तापालट केला.
कौटुंबिक आणीबाणीचा सामना टाळण्यासाठी बेट्सने कुटुंबासह सीलँड सोडले होते आणि त्याच्या अनुपस्थितीत, अचेनबॅच आणि काही जर्मन आणि डच भाडोत्रींनी हा किल्ला म्हणजे नवा देश ताब्यात घेतला.

त्यांनी बेट्सचा मुलगा प्रिन्स मायकेलला ओलीस ठेवले आणि त्याला चार दिवस कोंडून ठेवले. बेट्सने त्वरीत राज्य परत घेण्यासाठी माणसांना एकत्र आणलं. एक संघ तयार केला. युद्धदरम्यान अचेनबॅचच्या गटातील बरेच लोक पळून गेले, परंतु बेट्सने अचेनबॅचला ओलीस ठेवण्याचा निर्णय घेतला. जेव्हा यूकेच्या राजदूताने बेट्सशी वाटाघाटी केली तेव्हा कुठे त्याने शेवटी अचेनबॅकची सुटका केली.

1980 च्या दशकात, ब्रिटीश सरकारने सीलँडच्या दाव्यांची कोणतीही वैधता काढून टाकण्यासाठी आपल्या प्रादेशिक अधिकारांचा विस्तार केला. तरीसुद्धा, बेट्सने सीलँड हा स्वतंत्र देश असल्याचे ठामपणे सांगत असून राहिला. सीलँडचे चलन, पासपोर्ट आणि स्टॅम्प जारी करणे ही प्रक्रिया त्याने अधिक प्रखर केली. स्वतःचा ध्वज देखील त्याने तयार केला. दुर्दैवाने, 1990 च्या दशकात, लोकांनी काही गुन्हेगारी क्रियाकलापांसाठी वापरल्यामुळे सीलँडला त्याचे पासपोर्ट मात्र रद्द करावे लागले.

2006 मध्ये प्लॅटफॉर्मवर विध्वंसक आग लागली आणि मुख्य पॉवर जनरेटरचा नाश झाला, अनेकदा अनेक संकटं आलीत. सीलँडवर यूके सरकारकडून भाडोत्री आक्रमण आणि सतत धमक्या आल्या, परंतु ते ठाम राहिले, ही लोकं डगमगली नाहीत. सीलँड आजही तेथे आहे आणि मायकेल बेट्स आणि त्यांचे कुटुंब सीलँडच्या कल्याणात गुंतलेले आहेत आणि ते स्वतंत्र देश म्हणून चालवतात. त्यांनी प्लॅटफॉर्मवर पूर्णवेळ सुरक्षा देखील स्थापित केली आहे.




या स्वतंत्र रियासतची वेबसाइट देखील आहे आणि खर्चाला मदत करण्यासाठी नाणी, पॅचेस आणि टी-शर्ट यांसारखी स्मृतिचिन्हे ते विकतात. आश्चर्यकारकपणे, समुद्राच्या मध्यभागी असलेल्या अशा लहान संरचनेने 50 वर्षांहून अधिक काळ त्याचे सार्वभौमत्व टिकवून ठेवले आहे हे आश्चर्य आहे.
दुसरे महायुद्ध सुरु झाले तेव्हा रक्षक किल्ला म्हणून सुरू झालेला एक पडीक टॉवर पुढे एक कौटुंबिक प्रकल्प आणि त्याही पुढे जाऊन एक स्वतंत्र राष्ट्र बनला. खडतर भूतकाळ असूनही, सीलँड कधीच डगमगला नाही. तो देश अजूनही सुरूच आहे आणि जगभरातील सर्वात लहान देश म्हणून अनौपचारिकरित्या का होईना तो ओळखला जातो; आणि आजही ह्या देशाचा रोमांचक इतिहास जगभरातल्या लोकांना आकर्षित करीत राहतो..

Thursday, 25 January 2024

जगातील सर्वात घाणेरडा माणूस-अमो हाजीचा आंघोळ केल्याने मृत्यू -

 #IntrestingStory #worldsdirtiestman #Iran

सध्या थंडीचे दिवस आहेत आणि फेसबुकवर अनेकदा अनेकजण आंघोळ न करण्यावरून जोक करताना दिसतात. म्हणजे या दिवसात रोज रोज आंघोळ केली नाही तरी फार फरक पडत नाही अशी जवळ जवळ मान्यता असल्यासारखे लोक बोलतात. कुणी गमतीने म्हणतात आज आंघोळीची गोळी घेतलीय. कुणी म्हणतात अंगावर चार थेम्ब शिंपडून घ्यावे. बर्‍याच लोकांनी त्यांच्या आयुष्यात अशी वेळ देखील अनुभवली असेल जेव्हा आंघोळ करणे हे सर्वोच्च प्राधान्य नव्हते. त्याहून महत्वाची कामे होती, आजारपण वगैरे.

आंघोळीशिवाय काही दिवस चालूही शकत असेल पण जेव्हा तुम्हाला एक आठवडा किंवा त्याहून अधिक काळ आंघोळीशिवाय होतो तेव्हा गोष्टी थोड्या चिंताजनक आणि दुर्गंधीयुक्त होऊ लागतात, आणि अश्यात एखाद्याने वर्षभर आंघोळ केली नाही तर काय होईल ? अनेक वर्ष ? किंवा अगदी 67 संपूर्ण वर्षे?

#अमोहाजी या नावाने ओळखल्या जाणार्‍या इराणी माणसाची ही जीवनपद्धती होती, ज्याला “जगातील सर्वात घाणेरडा माणूस” म्हणूनही ओळखले जाते.


अमो हाजी (20 ऑगस्ट, 1928 - 23 ऑक्टोबर, 2022) यांनी आपले संपूर्ण आयुष्य इराणमधील देझ गाह गावात व्यतीत केले. त्याचे खरे नाव माहित नाही, आणि त्याचे अमो हाजी हे प्रत्यक्षात एक टोपणनाव आहे ज्याचे भाषांतर "जुना टाइमर" असे आहे.




अर्ध्या शतकाहून अधिक काळ, अमौ हाजी एक संन्यासी म्हणून जगला, जो कधीही आंघोळ करत नव्हता, हाजी शहराच्या काठावर एका सिंडर ब्लॉकच्या झोपडीत राहत होता, तो रस्त्यावरच जेवायचा आणि पाईपमधून जनावरांचे शेण काढायचे काम करायचा. अमो हाजीच्या सुरुवातीच्या जीवनाबद्दल फारसे माहिती नाही, परंतु त्याने घोषित केले की त्याने हृदयविकाराचा त्रास सहन केल्यानंतर संन्यासी म्हणून आपले जीवन सुरू केले आहे. आंघोळ न करण्याचे त्याचे कारण म्हणजे साबण आणि पाण्याने शरीर धुतल्याने रोग होण्याची शक्यता आहे त्यामुळे लवकर मरण येते असे तो म्हणत. हा विश्वास इतका दृढ होता की त्याने 60 वर्षांहून अधिक काळ आंघोळ केली नाही, त्याची त्वचा धूळ, माती आणि अगदी पिकलेल्या जखमांनी भरलेली असायची. अमौ हाजी हा गावकऱ्यांसाठी अतिशय ओळखीचा माणूस होता. अनेक दशके अंग न धुतल्यामुळे त्याची त्वचा जवळजवळ एकसमान राखाडी-तपकिरी रंगाची झाली होती आणि त्याचे केस विचित्र दिसायचे. तो अंघोळ करत नसला तरी त्याचे हे जगावेगळे सौंदर्य टिकविण्यासाठी तो त्याचे डोके आणि दाढीचे केस आगीत जाळून टाकण्यासाठी ओळखला जात असे. त्याच्या आंघोळीची भीती ही एकमेव गोष्ट अमो हाजीला इतर समाजापासून वेगळे ठरवणारी नव्हती, तर त्याचा आहार आणि छंद देखील विचित्र-आणि घृणास्पद-लक्ष वेधण्यासाठी पुरेसे होते. आंघोळ करताना हाजीला पाण्याची भीती वाटायची, पण पाणी पिण्याच्या बाबतीत तसे नव्हते. हायड्रेटेड राहण्यासाठी तो अनेकदा न धुतलेल्या, घाणेरड्या टिन डब्यातून मिळेल तिथून दिवसातून ५ लिटर पाणी प्यायचा. कुणीही देऊ केलेले अन्न तो नाकारायचा आणि स्वतः शोधून ताजे कच्चे अन्न, कच्चे मांस, कधीकधी अगदी सडलेले मांस तो खात असे. त्याला स्मोकिंग आवडत असे त्याच्याजवळ असलेल्या एका पुरातन पाईपमध्ये तो प्राण्यांची वाळलेली विष्ठा टाकून स्मोक करायचा आणि एकावेळी अनेक सिगारेट ओढत असल्याचे त्याचे फोटो देखील उपलब्ध आहेत.






सगळ्यात अषाचार्याची गोष्ट म्हणजे हाजी अविश्वसनीयरित्या 94 वर्षांचे आयुष्य जगला आणि त्यांच्या मृत्यूनंतर अंतिम तपासणीत त्याला कुठलाही रोग नसल्याचे आणि त्यांची तब्येत चांगली असल्याचे घोषित करण्यात आले..आश्चर्याची गोष्ट म्हणजे, गलिच्छ वापर, घाण पाणी आणि कुजलेले मांस अमो हाजीला कधीच आजारी बनवत नव्हते . मरेपर्यंत तो निरोगी होता. त्याला खरोखर आजारी बनवले असेल ते म्हणजे त्याचे इतक्या काळातील पहिले स्नान. वयाच्या 94 व्या वर्षी, काही गावकऱ्यांनी दयाळू दृष्टीकोन दाखवला आणि अमो हाजीला 67 वर्षांमध्ये आग्रहाने त्याची पहिली आंघोळ घातली.आंघोळीनंतर तो आजारी पडला आणि काही महिन्यातच त्याचे निधन झाले.

त्याच्या मृत्यूपूर्वी, तेहरान युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायन्सेस स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ येथील पॅरासिटोलॉजीचे प्रोफेसर डॉ. घोलामरेझा मोलावी यांनी हाजी यांच्यावर चाचण्या केल्या होत्या, ज्यामुळे त्याची अशी जीवनशैली असूनही त्यांच्या दीर्घायुष्याची आणि चांगल्या आरोग्याची गुरुकिल्ली शोधण्यात आली होती. डॉक्टरांनी असा निष्कर्ष काढला की अमौ हाजी इतकी वर्षे अस्वच्छ परिस्थितीत राहिल्यामुळे खूप मजबूत रोगप्रतिकारक शक्ती विकसित करू शकला, या मजबूत रोगप्रतिकारक शक्तीने त्याला अत्यंत अविश्वसनीय परिस्थितीतही निरोगी राहण्यास मदत केली.




एकंदरीत, अमौ हाजी एक निरुपद्रवी माणूस होता ज्याला कधीही नियमात जगण्यात किंवा स्वच्छतेत रस नव्हता. 67 वर्षांतील त्याच्या पहिल्या आणि शेवटच्या आंघोळीमुळे त्याचा मृत्यू झाला की नाही याची खात्री नाही, परंतु हे लक्षात येतंय की तो खूप दीर्घ आणि स्वतःच्या नियमांवर एक आनंदी, मनोरंजक जीवन जगला.

Rashmi Padwad Madankar

Featured post

रागातून जागृतीकडे : आधुनिक स्त्रीचा आत्मभानाचा प्रवास !

परंपरेनं स्त्रियांकडे नेहमीच नियमपालक, चारित्र्यसंपन्न आणि सामाजिक चौकटीत वावरणाऱ्या व्यक्ती म्हणून पाहिलं गेलं आहे. स्त्रियांबाबत त्यांच्य...