मुक्तांगण
मनातले खूप काही मनातच मांडतांना मनाचा तळ मात्र कधीच गाठता आला नाही म्हणूनच 'मना तुझे मनोगत मला कधी कळेल का?' हाच शोध मनात येणाऱ्या विचारांच्या माध्यमातून घेण्याचा हा साधासा प्रयत्न …
Thursday, 22 May 2025
रागातून जागृतीकडे : आधुनिक स्त्रीचा आत्मभानाचा प्रवास !
परंपरेनं स्त्रियांकडे नेहमीच नियमपालक, चारित्र्यसंपन्न आणि सामाजिक चौकटीत वावरणाऱ्या व्यक्ती म्हणून पाहिलं गेलं आहे. स्त्रियांबाबत त्यांच्यातील सहनशीलता, त्याग आणि समर्पण या गुणांचंच पूजन करण्यात आलं. मात्र, गेल्या काही दशकांत हे चित्र बदलताना दिसत आहे. गुन्हेगारी क्षेत्रात स्त्रियांचा सहभाग वाढतो आहे, आणि ही बाब केवळ जागतिक पातळीवरच नव्हे, तर भारतातही प्रकर्षाने जाणवते आहे. अलीकडच्या काळात महिलांद्वारे केलेल्या गुन्ह्यांच्या बातम्या सतत चर्चेचा विषय ठरत आहेत. वृत्तपत्रांपासून ते टीव्ही आणि सोशल मीडियापर्यंत अशा घटना सतत झळकत राहतात; जणू त्या नव्या सामाजिक वास्तवाचे प्रतिबिंब आहेत.
गेल्या वर्षातही अनेक धक्कादायक घटनांनी समाजाला हादरवून टाकलं आहे. काही स्त्रियांनी आई असून आपल्या मुलांचाच जीव घेतला; तर काहींनी जोडीदाराला किंवा कुटुंबीयांना क्रूरतेनं ठार केलं. जेथे प्रेम, सान्निध्य आणि विश्वास असायला हवा, तिथेच छळ, हिंसा आणि मृत्यू घडताना आपण पाहिले. हे पाहून अंतर्मन अस्वस्थ होतं. या घटनांचा मागोवा घेताना, एक महत्त्वाचा प्रश्न समोर येतो... अशा गुन्हेगारी प्रवृत्ती निर्माण होण्यामागचं, वाढीला लागण्याचं कारण काय आहे? हा फक्त कायद्याचा विषय नाही, तर तो सामाजिक, मानसिक आणि भावनिक घटकांशी संबंधित आहे. कदाचित वर्षानुवर्षे दडपलेला राग, अन्याय, भावनिक ताणतणाव, किंवा सामाजिक अपेक्षांचं दडपण या सगळ्यांचा स्फोट अशा स्वरूपात होत असेल का ? या प्रश्नांवर केवळ चर्चाच नव्हे, तर सखोल विचार, समाजशास्त्रीय विश्लेषण आणि मानसशास्त्रीय समज आवश्यक आहे. कारण ही फक्त गुन्हेगारी नव्हे; तर ही बदलत्या समाजाच्या वेदनेचा प्रारंभ तर नसेल अशी चिंता वाटू लागली आहे.
विकसनशील सामाजिक भूमिका, वाढते स्थलांतर, व्यवसायांमधील परिवर्तन, महिला मुक्तीची चळवळ, आर्थिक स्वातंत्र्य आणि राजकीय स्वायत्तता; या सगळ्यांमुळे आजच्या काळातील स्त्रियांना विविध क्षेत्रांत सहभागी होण्याच्या नव्या संधी प्राप्त झाल्या आहेत. संधी मिळाल्या की आत्मविश्वास वाढतो, आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण झालेली व्यक्ती नव्या दिशांकडे आकर्षित होते. मात्र या आकर्षणाला एक वेगळीही दिशा मिळत आहे; काही स्त्रिया गुन्हेगारीच्या वाटेवर वळताना दिसत आहेत. एकेकाळी केवळ पुरुषप्रधान समजल्या जाणाऱ्या गुन्हेगारी जगतात आता महिलांची संख्याही वाढताना दिसतेय. ही वाढ इतकी स्पष्ट आहे की, तिच्याकडे डोळसपणे पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. महिलांकडून होत असलेले गुन्हे आता फक्त किरकोळ स्वरूपाचे उरलेले नाहीत. त्या अनेक गंभीर, हिंसक आणि अप्रचलित गुन्ह्यांमध्येही सक्रिय सहभागी होऊ लागल्या आहेत. त्यामुळे गुन्ह्यांचा स्वरूप अधिक व्यापक आणि धोकादायक होत चालले आहे.
मग प्रश्न उभा राहतो की, महिलांमध्ये अचानक गुन्हे करण्याची उर्मी का वाढते आहे? हा संताप कुठून निर्माण होतो आहे? हे फक्त सामाजिक बदलांचे परिणाम आहेत की वर्षानुवर्षे साचलेल्या असंतोषाचा उद्रेक? की स्वातंत्र्याचा अर्थ चुकीचे समजण्याची लक्षणं? या प्रश्नांवर विचार होणे आणि त्याचे सखोल विश्लेषण होणे आज अत्यावश्यक झाले आहे.
महिलांचा राग आणि संताप हे काही अलीकडील घटक नाहीत. इतिहास, पुराणकथा आणि लोककथांमध्ये या भावना वारंवार उमटताना आपल्याला दिसतात. परंतु, अलीकडच्या काळात या भावना अधिक स्पष्ट, ठाम आणि प्रखर स्वरूपात व्यक्त होताना दिसतात. समाजमाध्यमे आणि विविध सार्वजनिक मंचांवर, विशेषतः अवहेलनेच्या आणि अश्लीलतेच्या छटांनी युक्त भाषेत, हा राग अधिक ठळकपणे समोर येतो. अनेकदा हा संताप अपरिपक्व, भावनाशून्य आणि बेपर्वा वाटतो. परंतु, हे दुर्लक्ष करता येणार नाही की अनेक पिढ्यांपासून स्त्रियांमध्ये साठून राहिलेला, दाबलेला राग आता उफाळून येत आहे.
पूर्वी महिलांचा राग मुख्यतः साहित्य, सिनेमा किंवा नाट्यरूपांमधूनच व्यक्त होत असे. वास्तविक जीवनात त्याला फारसे स्थान नव्हते. त्याची दखल घेतली जात नव्हती, स्वीकार केला जात नव्हता. त्यामुळे हा दाबलेला संताप आता समाजमाध्यमांच्या मंचांवर अधिक तीव्र आणि आक्रमक रूपात व्यक्त होत आहे. त्यास तिथे एक प्रकारची अनुमती, संमती आणि सहानुभूती मिळत असल्याने, तो अधिकाधिक वाढत असल्याचे जाणवते. मनोविज्ञानतज्ज्ञांचे मत आहे की, स्त्रिया अनेक पिढ्यांपासून अंतर्मनात रागाचे ओझे बाळगत जगत आहेत. दैनंदिन जीवनातील अन्याय, भेदभाव आणि अपमान यांच्या विरोधातील त्यांचा संताप आज चित्रपट, समाजमाध्यमांवरील रील्स, संगीत, साहित्य आणि लोकप्रिय संस्कृतीच्या विविध माध्यमांतून ठळकपणे प्रकट होत आहे. तथापि, प्रत्यक्ष जीवनात या रागाला समाजाकडून आवश्यक ती मान्यता, समजून घेणे आणि गांभीर्याने विचार करणे याचा अभाव जाणवतो. या भावनांवर सखोल मंथन होऊन, त्या समजून घेत योग्य उपाययोजना केल्या जात नाहीत हीच यातली खरी शोकांतिका आहे.
या पार्श्वभूमीवर काही मूलभूत प्रश्न समोर येतात —
समाज या भावना समजून घेईल का?
या रागाला योग्य दिशा देण्याची संधी स्त्रियांना मिळेल का?
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा आवाज केवळ अभिव्यक्त होण्यापुरताच मर्यादित राहील, की परिवर्तन घडवण्यासाठी आधार बनेल?
आपल्या समाजाची एक मोठी समस्या अशी आहे की, मोकळेपणाने बोलणारी, खळखळून हसणारी, आनंदी राहणारी स्त्री समाजाला खटकते. स्त्रियांनी अल्पभाषी राहावे, नम्र, संयमी वर्तन करावे हे ‘बाळकडू’ तिला लहानपणापासूनच दिले जाते. उघडपणे हसणारी, स्पष्ट बोलणारी स्त्री सहजपणे चरित्रहीन ठरवली जाते. मुलगी जन्मल्यापासून तिच्या आजूबाजूला असलेल्या स्त्रिया तिने दबलेल्या, पिचलेल्या, कुचंबणा झालेल्या अवस्थेत जगताना तिला दिसतात. अशा वातावरणात तिच्या मनात निर्माण होणाऱ्या भावनांचा निचरा होण्यासाठी कोणीही नसते; न व्यक्त होण्यासाठी माणसं, न समजून घेणारा समाज. आणि हे चक्र पिढ्यानपिढ्या सुरूच राहिलं आहे. राग हा भाव नेहमी एखाद्या गोष्टीच्या रक्षणाशी जोडलेला असतो. पण समाजाने हा रक्षणाचा अधिकार, हा संताप व्यक्त करण्याचा हक्क आजपर्यंत फक्त पुरुषांसाठी राखून ठेवला होता. स्त्रियांनी राग व्यक्त केला, तर तो "अस्वीकार्य" मानला गेला. मात्र अलीकडच्या काळात हे चित्र हळूहळू बदलू लागले आहे. स्त्रियांच्या हातात आता सोशल मिडिया, साहित्य, कला यासारखी प्रभावी माध्यमं आली आहेत. या माध्यमांतून त्यांच्या मनात वर्षानुवर्षे साचून राहिलेल्या भावना व्यक्त होऊ लागल्या आहेत ... कधी सौम्य, तर कधी प्रखर उद्रेकाच्या रूपाने. हा बदल केवळ अभिव्यक्तीपुरता मर्यादित न राहता, समाजाला स्त्रियांच्या अनुभवांकडे नव्या दृष्टीने पाहायला लावेल, अशी अपेक्षा आहे.
स्त्रियांचा राग हा एक अत्यंत वैयक्तिक अनुभव असला तरी, सध्याच्या काळात तो सामूहिक अनुभव देखील बनत चालला आहे. सामाजिक प्लॅटफॉर्मवरून म्हणा किंवा अभिव्यक्त होण्याच्या उर्मीतून आता स्त्रिया स्वतः एकमेकींशी ते शेअर करताना दिसतात. पूर्वी ज्या रागासाठी लाज वाटायची, त्याच रागासाठी आता एकजूट होऊन समर्थन तयार होत आहे. महिलांमध्ये एक नव्या प्रकारची जागरूकता आणि एकात्मता दिसून येत आहे, जिचामुळे त्यांच्या रागाची, त्यांच्या भावना व्यक्त करण्याची व स्वीकार करण्याची त्यांना आपसूकच परवानगी मिळत आहे.
ब्रिटिश गायिका आणि गीतकार पालोमा फेथ यांचं गाणं "लेबर" सध्या अत्यंत लोकप्रिय झालं आहे. या गाण्यात स्त्रियांच्या संतापाची तीव्र आणि थेट अभिव्यक्ती आहे. सुमारे ३५,००० रील्समध्ये या गाण्याचा साउंडट्रॅक वापरण्यात आला आहे. हे गाणं, हे रील्स, आणि अशा कथा हे दाखवतात की आता महिलांचा राग दाबून ठेवला जात नाही; तो जगासमोर स्पष्टपणे, निर्भीडपणे व्यक्त केला जातो आहे.
खरं तर, रागाचा उद्रेक तोच क्षण असतो, जेव्हा स्त्री सहनशीलतेच्या सीमारेषेवर येऊन पोहोचते... जेव्हा तिच्या भावना, अस्तित्व आणि ओळख सातत्याने दुर्लक्षित केल्या जातात. पूर्वी केवळ सहन करणाऱ्या स्त्रिया आता बोलू लागल्या आहेत, व्यक्त होऊ लागल्या आहेत आणि समाजबदल घडवण्यासाठी पुढे येत आहेत. हा राग आता केवळ भावनिक उद्रेक न राहता, कृतीशीलता, आत्मभान आणि सामर्थ्य यांचं योग्य रूप धारण करू लागला आहे. तो दडपशाहीच्या कोंडमाऱ्यातून बाहेर पडून समाजपरिवर्तनाची नांदी ठरू लागला आहे. महत्त्वाचं म्हणजे, हा राग जोपर्यंत सकारात्मकता आणि बांधिलकीच्या दिशेने मार्गक्रमण करतो, तोपर्यंत समाजात खोलवर आणि स्थायिक परिवर्तन घडवण्याची परिणामकारक क्षमता त्याच्यात असते. कारण असा राग विध्वंसक नसून, सृजनशील असतो... स्वतःसाठी नव्हे, तर व्यापक सामाजिक हितासाठी प्रेरित असतो. परंतु हाच संताप जर अराजक व विध्वंसाच्या मार्गाला लागला, तर तो त्या व्यक्तीसाठी, कुटुंबासाठी आणि पर्यायाने समाजासाठीही घातक ठरतो.
गेल्या काही दशकांतील चित्रपटांचा मागोवा घेतला, तर लक्षात येतं की स्त्रियांच्या अंतर्मुख संतापाला पडद्यावर आवाज मिळू लागला आहे. हा राग आक्रमक नसला, तरी तो गंभीर आणि गहिरा आहे, खोल आहे. दैनंदिन लहानसहान अपमान, अन्याय, दुर्लक्ष आणि दमित भूमिका यांचा हळूहळू साचणारा असंतोष आहे. मल्याळम चित्रपट 'द ग्रेट इंडियन किचन' आणि त्याचाच हिंदी रीमेक 'मिसेस' (2025), 'थप्पड' (2020), पगलट (2021) या चित्रपटांनी हाच शांत, पण सतत उफाळणारा स्त्रियांचा संताप दाखवला आहे. त्यातील नायिकांच्या संतप्त नजरा, मौन विद्रोह, आणि शेवटी एका कृतीतून होणारा नात्यांचा किंवा चौकटींचा भंग; हे सर्व आजच्या समाजातील स्त्रियांच्या अंतर्गत लढ्याचं प्रतिनिधित्व करतं. तरीही, खरतर या आधुनिक चित्रपटांमधील राग तुलनेने सौम्य वाटतो, विशेषतः पूर्वीच्या काही चित्रपटांतील रौद्र रूपाच्या तुलनेत. उदाहरणार्थ, स्मिता पाटीलच्या मिर्च मसाला (1987) चित्रपटातील अंतिम दृश्य ! एक अश्रुत पण आगीने पेटलेला संताप जेव्हा उफाळून येतो तेव्हा तो सूड नसतो तो स्वसंरक्षणासाठी उचललेले अंतिम पाऊल असते. मिरची फॅक्टरीत येणारा क्रूर अत्याचारी सुभेदार जेव्हा सहनशीलतेची पराकाष्टा झालेल्या सोनाबाईला पकडण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा फॅक्टरीतील सर्व महिला एकत्र येतात आणि ताज्या लाल मिरच्यांच्या मसाल्याने त्याच्यावर हल्ला करतात. या हल्ल्यात सुभेदार घायाळ होतो. ते दृश्य म्हणजे स्त्रियांच्या संयमाच्या सीमेला पार केल्यानंतर झालेला उद्रेक ... एक प्रतीकात्मक विस्फोट ! 'मदर इंडिया' (1957) मध्ये तर नायिका स्वतःच्या मुलाला गोळी घालते. कर्तव्य आणि नैतिकतेच्या संघर्षात तिला स्वीकारावा लागलेला हा क्रूर निर्णय असतो.
मर्दानी, मॉम, कहाणी, गुलाब गँग आणि बँडिट क्वीन हे चित्रपट आधुनिक स्त्रीच्या रागाला केवळ भावनात्मक प्रतिक्रिया म्हणून न दाखवता, त्यामागील परिपक्वता, अन्यायाविरोधातील झुंज, सूडाची भावना आणि अन्यायी समाजरचनेविरोधात घेतलेली ठाम भूमिका दाखवतात. हे चित्रपट स्त्रीचा राग म्हणजे दुबळेपणाची नाही तर दृढ प्रतिकाराची, आत्मभानाची आणि न्यायाच्या शोधातील प्रवृत्तीची अभिव्यक्ती आहे हे अधोरेखित करतात. मात्र, असा प्रतिकार नेहमीच हिंसक असायला हवा, असे नाही. राग व्यक्त करण्याची किंवा सूड उगवण्याची दिशा सकारात्मक आणि सृजनात्मकदेखील असू शकते, याची अनेक उदाहरणे आपल्या आजूबाजूला आहेत. अनेक अशा स्त्रिया आहेत, ज्या संकटांनी उद्ध्वस्त झाल्यानंतरही पाषाणाच्या छाताडावर एखादे हिरवे कोंब फुटावे तशा जगल्या तगल्या आणि पाय रोवून उभ्या राहिल्या, नव्या उमेदीनं आयुष्य घडवलं आणि समाजासाठी प्रेरणास्थान ठरल्या. काहींनी बेघर अवस्थेतून स्वतःचं विश्व उभं केलं, तर काहींनी शिक्षण, व्यवसाय, समाजसेवा यामध्ये आपलं स्थान निर्माण केलं. त्यांच्या जिद्दीने, आत्मविश्वासाने आणि न झुकणाऱ्या वृत्तीने त्या अनेकांसाठी आदर्श ठरल्या आहेत.
''स्त्रीने ठरवले तर ती काहीही करू शकते'' असे एक वाक्य सर्वश्रुत आहे पण हे ''काहीही'' म्हणजे शब्दशः काहीही नव्हे. ते म्हणजे सृजन, सर्जन, उत्पत्ती आणि कल्पकतेच्या अंगाने काहीही करणे असते. स्त्रीराग केवळ विद्रूपतेचा, दुःखाचा अथवा तक्रारीचा उद्रेक असू नये; तो परिवर्तनाची बीजं घेऊन येणारा, एक सृजनशील उर्जेचा प्रवाह असायला हवा. कारण हीच स्त्रीची मूळ प्रवृत्ती, महत्वाचा स्वभावधर्म आहे. राग येणे साहजिक असले तरी; जेव्हा या रागाला योग्य दिशा, समजूतदार व्यासपीठ आणि स्वीकार करणारा प्रगल्भ समाज लाभतो, तेव्हा तो संहारक न राहता समाज परिवर्तनाचा प्रेरणास्त्रोत बानू शकतो. म्हणूनच एक समाज म्हणून आजच्या काळात सर्वांत मोठी गरज आहे, ती स्त्रीच्या रागाकडे संवेदनशीलतेने, समजूतदारपणे आणि सहानुभूतीने पाहण्याची. अशा रागाला योग्य मार्गदर्शन आणि सकारात्मक ऊर्जा दिली, तर तो फक्त विरोध न राहता परिवर्तनाचे साधन बनू शकतो असा विश्वास वाटतो.
रश्मी पदवाड मदनकर
rashmi.aum15@gmail.com
Saturday, 17 May 2025
हायब्रिस्टोफिलिया समुदाय: गुन्हेगारांप्रती आकर्षण आणि नैतिक गुंतागुंत -
याकुब मेनन 1993 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी असूनही, काही व्यक्तींनी आणि संघटनांनी त्याच्या शिक्षेविरोधात सहानुभूतीने युक्तिवाद केला. त्याच्या शिक्षेपूर्वी अनेक नागरिकांनी त्याला बुद्धिमान, प्रतिष्ठित चार्टर्ड अकाउंटंट म्हणून गौरवले. त्याच्याबद्दलची सहवेदना, सहानुभूती, आणि गुन्ह्याच्या पलीकडे पाहण्याचा प्रयत्न या गोष्टी स्टॉकहोम सिंड्रोम आणि हायब्रिस्टोफिलिया या दोन मानसशास्त्रीय संकल्पनांच्या सामाजिक छटा दाखवतात.
चार्ल्स शोभराज, ज्याला "द सर्पेंट" आणि "बिकिनी किलर" म्हणून ओळखले जाते, हा एक कुख्यात फ्रेंच-भारतीय व्हिएतनामी सिरियल किलर आहे. त्याने 1970 च्या दशकात आशियातील विविध देशांमध्ये अनेक पर्यटकांची हत्या केली, शोभराजच्या गुन्हेगारी कारकीर्दीचे मानसशास्त्रीय विश्लेषण केल्यास, तो एक सायकोपॅथिक व्यक्तिमत्व होता, ज्याला इतरांच्या वेदनेत आनंद मिळत असे. त्याची आकर्षकता आणि चातुर्यामुळे तो लोकांना फसवण्यात यशस्वी होत असे. त्याच्या गुन्ह्यांमुळे त्याला 'द सर्पेंट' हे टोपणनाव मिळाले, कारण तो आपल्या शिकारांभोवती जाळे विणत असे. चार्ल्स शोभराज हे हायब्रिस्टोफिलिया या मानसशास्त्रीय संकल्पनेचं एक ठोस आणि उल्लेखनीय उदाहरण मानलं जाऊ शकतं विशेषतः त्याच्या गुन्हेगारी इतिहासाच्या पार्श्वभूमीवरही अनेक स्त्रिया त्याच्याकडे आकर्षित झाल्या, प्रेमाच्या भावना व्यक्त केल्या आणि काहींनी तर त्याच्याशी विवाह करण्याचा निर्णय घेतला. 2008 मध्ये, शोभराजने नेपाळमधील नीहिता बिस्वास हिच्याशी विवाह केला. ती त्याच्यापेक्षा 44 वर्षांनी लहान होती, आणि शोभराज तुरुंगात असतानाच दोघे भेटले. त्याचे सगळे गुन्हे माहिती असताना नीहिताने त्याच्यावर प्रेम असल्याचं खुलेपणाने जाहीर केलं आणि त्याची निर्दोषता सिद्ध करण्यासाठीही प्रयत्न केले.
रिचर्ड रामिरेझ हा अमेरिकेतील अत्यंत क्रूर आणि भयावह सिरीयल किलर होता, ज्याला "नाईट स्टॉकर" म्हणून ओळखले जाते. 1984 ते 1985 दरम्यान कॅलिफोर्नियामध्ये त्याने बलात्कार, हत्या, चोरी आणि अत्याचार यांसारखे अनेक गुन्हे केले. त्याच्या विकृत आणि सैतानी प्रवृत्तीमुळे संपूर्ण अमेरिका हादरली होती. तरीसुद्धा, रामिरेझ तुरुंगात गेल्यानंतर हजारो महिलांनी त्याच्यावर प्रेम व्यक्त केलं, त्याला प्रेमपत्रं पाठवली, आणि त्याच्या सैतानी व्यक्तिमत्त्वाला "आकर्षक" म्हटलं. 1996 मध्ये, डोरीन लिओय नावाच्या एका पत्रकार महिलेने त्याच्याशी तुरुंगात विवाह केला. ही घटना हायब्रिस्टोफिलिया या मानसशास्त्रीय विकृतीचं अत्यंत स्पष्ट उदाहरण आहे ... जिथे स्त्रिया गंभीर गुन्हेगारांच्या क्रौर्याऐवजी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाकडे आकर्षित होतात.
भारतातील पंजाब आणि हरियाणा राज्यांतील शेतकरी आणि अर्धिया (कमिशन एजंट) यांच्यातील संबंध स्टॉकहोम सिंड्रोमच्या उदाहरणासारखे आहेत. अर्धिया शेतकऱ्यांना पिकांची खरेदी आणि अनौपचारिक कर्ज देतात, ज्यामुळे शेतकरी त्यांच्यावर अवलंबून राहतात. शेतकऱ्यांना थेट बाजारपेठेत विक्री करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना विरोध केला जातो, कारण अर्धिया यांच्या माध्यमातून त्यांना तात्पुरती सुरक्षितता आणि आधार मिळतो. या संबंधांमध्ये शेतकऱ्यांचे मोठे प्रमाणात शोषण होऊनही अर्धिया यांच्याबद्दल प्रेमाचे नाते आणि विश्वास दिसून येतो, जे स्टॉकहोम सिंड्रोमचे मोठे लक्षण आहे.
सोशल मीडियावरील हायब्रिस्टोफिलिया समुदाय:
आजच्या युगात सोशल मीडियाचा मानवी वर्तनावर खोलवर परिणाम होत आहे. ही केवळ माहितीच्या देवाण-घेवाणीची जागा राहिलेली नसून, व्यक्ती आपल्या ओळखी, मतमतांतरे आणि भावना खुलेपणाने मांडताना दिसतात. या डिजिटल विश्वात एक आगळावेगळा आणि वादग्रस्त समुदाय पुढे येताना दिसतो आहे, तो म्हणजे "हायब्रिस्टोफिलिया समुदाय". या समुदायातील व्यक्ती गंभीर गुन्हेगारांप्रती प्रेम, आकर्षण वा सहानुभूती व्यक्त करतात. ही भावना केवळ वैयक्तिक मानसिक विचलन नसून, सोशल मीडियाच्या प्रभावाखाली सामूहिक ओळखीचं आणि उपसंस्कृतीचं रूप घेत आहे.
हायब्रिस्टोफिलिया म्हणजे काय?
सोशल मिडिया ही केवळ संवादाची जागा नाही, ती आता एक ओळख साकारण्याची जागा आहे असे समजले जाते. TikTok, Instagram, Tumblr, Reddit यांसारख्या प्लॅटफॉर्म्सवर लोक अनेकदा गुन्हेगारांविषयी आकर्षण व्यक्त करताना स्वतःची एक खास 'डार्क फॅन' ओळख निर्माण करतात. हे आकर्षण अनेक वेळा गुन्हेगाराच्या "वैयक्तिक बाजू" ला वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. उदाहरणार्थ, "तो गुन्हेगार आहे, पण त्याच्या डोळ्यात प्रेम आहे", "त्याची बालपणाची वेदना कुणी समजून घेतली नाही म्हणून बिचारा असा झाला", वगैरे.
अशा लोकांच्या नैतिकतेचा गोंधळ उडालेला असतो. या अशा मानसिक डिस्टर्ब् समुदायांमध्ये एक प्रकारची 'नैतिक तडजोड' (moral negotiation) दिसून येते. हे लोक वारंवार सांगतात की ते गुन्ह्यांना पाठिंबा देत नाहीत, पण गुन्हेगार म्हणून व्यक्तीमध्ये त्यांना काही "खास" दिसतं किंवा हा मानवी दयामायेचा मुद्दा आहे पण हीच मानवीयता किंवा दयामाया त्यांना त्या अन्यायाला बळी पडलेल्यांबद्दल किंवा अत्याचारग्रस्त माणसांबद्दल वाटत नसते. तेव्हा यांचा मानवतेचा बुरखा उघडा पडतो. काही वेळा हे आकर्षण केवळ व्यक्तिमत्त्व, रूप, किंवा प्रसिद्धीशी संबंधित देखील असते. असे असते तेव्हा ते अधिक मानसिक आजाराशी संबंधित असते.
हायब्रिस्टोफिलिया समुदाय अनेक वेळा सोशल मिडियावर गुन्हेगारांचे फोटो, त्यांच्या कुटुंबाचे फोटो, कोर्ट फूटेज, किंवा जुन्या मुलाखती वापरून त्यांचं 'एस्थेटिक रूपांतर' करतात. गडद संगीत, ब्लर फिल्टर्स, रोमँटिक कोट्स यांद्वारे गुन्हेगाराची प्रतिमा एखाद्या प्रेमळ, दयाळू, कुटुंबवत्सल व्यक्तींसारखी सादर केली जाते. यामुळे गुन्हेगारांची भीतीदायक प्रतिमा लुप्त होते आणि त्या जागी एक "आकर्षक विरोधाभास" उभा राहतो.
या समुदायांबाबत समाजात दोन प्रकारच्या प्रतिक्रिया दिसतात काहींना हे मनोरंजक वाटते, तर काहींना हे 'अतिशय चिंताजनक' वाटते. गुन्हेगारांविषयी सहानुभूती निर्माण होणं हे ''गुन्हेगारीचे सामान्यीकरण'' होणे असू शकते, जे समाजासाठी घातक आहे. विशेषतः जेव्हा पीडितांच्या वेदना दुर्लक्षित केल्या जातात आणि त्या ऐवजी गुन्हेगारांचे महिमामंडन केले जाते तेव्हा ते अधिकच गंभीर स्वरूपाचे असते.
हायब्रिस्टोफिलिया समुदाय हे सोशल मिडियाच्या काळात निर्माण झालेलं एक गुंतागुंतीचं, नैतिकदृष्ट्या गंडलेलं, आणि मानसशास्त्रीयदृष्ट्या साशंक असलेलं क्षेत्र आहे. या समुदायातील लोक फक्त गुन्हेगारांवर प्रेम करत नाहीत, ते सोशल मिडियाद्वारे त्या गुन्हेगाराशी स्वतःची ओळख वाढवणे, त्याच्या विचारसरणीशी सुसंगत वागणे आणि भरकटलेल्या भावनिक गरजा एनकेन पद्धतीने पूर्ण करून घेण्यासाठी असे वागत असतात. ही गोष्ट फक्त मानसशास्त्राच्या दृष्टीने नव्हे, तर समाजशास्त्र, डिजिटल माध्यमांचे विश्लेषण, आणि नैतिकता या सर्व अंगांनी अभ्यासण्यासारखी आहे. जरासे स्वतःच्या आत वाकून पाहण्याची तेवढी गरज आहे.
✍🏻 रश्मी पदवाड मदनकर
Friday, 9 May 2025
Operation Sindoor!
Monday, 3 February 2025
मुंबईला आमच्या सोसायटीत एक वयस्कर काका यायचे. फार दुरून लोकलने यायचे त्यांच्या हातात दोन मोठ्या पिशव्या असायच्या. एका दिवशी एका एरियात असे ते आठवडाभर सात वेगवेगळ्या एरियात फिरायचे. त्यांच्या पिशवीत सकाळचा लागणार नास्ता असायचा. म्हणजे सहा इडल्या आणि छाटणीचे पॅकेट, तसेच ढोकळ्याचे, ठेपल्याचे, उपमा, अप्पे, सँडविच. शिवाय अंडी, दही, फरसाण, चकल्या, शेव वगैरे असायचे. सकाळच्या नोकरीच्या घाईत असणारे अनेक जण पटापट पॅकेट उचलायचे. सकाळी ७ ला आलेले काका सकाळी १० वाजता दोन्ही पिशव्या घडी घालून गावाकडे परतायचे.
महिलांना औद्योगिक प्रशिक्षण देऊन त्यांचे आर्थिक सबलीकरण करण्याच्या हेतून नोकरीनिमित्त काम केल्यावर त्या त्या संस्थांशी अजूनही जुळून काम करते आहे. अनेकदा महिला काहीतरी हाताला काम हवे म्हणून विचारायला येतात. पायलीचे अनेक काम खरतर आजही उपलब्ध असतात त्यासाठीचे प्रशिक्षण देखील मोफत असते; त्यात उदबत्ती बनवणे, कागदाचे लिफाफे बनवून दुकानांना देणे, गृह उद्योग सारख्या गोष्टी असतात. मात्र प्रत्यक्ष काम करायची वेळ येते तेव्हा महिलांना अशी छोटीमोठी कामे करायला लाज वाटते. मला आठवतं आम्ही मुंबईला राहायचो तेव्हा भिजवलेली आणि मोड आलेली कडधान्ये बाजारात विकायला असायची. त्या विकणाऱ्या बायका अशी दहा भांडी मांडून दहा प्रकारची कडधान्ये विकायची. नोकरीपेक्षा बायकांना अशी आयती भिजवलेली मोड आलेली कडधान्ये, निवडलेल्या भाज्या, तोडलेल्या शेंगा मिळणार असतील तर त्या अनेकदा जास्तीचे पैसे द्यायलाही मागेपुढे पाहत नाही. अनेकींना हे करायचे सुचवले तेव्हा ''ही अशी कामे आम्ही करणार?'' असा अविर्भाव होता. कामाची पैशांची प्रचंड गरज आहे. मात्र काम करणार ते टेबलावर बसूनच उच्च पदाचेच असे अनेकींना वाटत असते, भलेही त्यासाठीची पात्रता त्यासाठी लागणारे स्किल आपण कधीच आत्मसात करण्याचा प्रयत्न केला नसेल.
मागे आणखी एक किस्सा ऐकला होता, हायवेवर असणाऱ्या ढाब्यांना लागणारे सोललेले लसूण, आल्याचे लच्छे एकेक किलोचे पॅकेट तयार करून ग्रामीण भागातील काही महिला त्यांना पुरवत असे. किती सोपे आहे.. रोज एका हॉटेलला एक किलो. पाच-सहा हॉटेलला तेवढेच. केवळ लसूण सोलून द्यायचा हा व्यवहार आहे आणि त्याबदल्यात जी काही मेहनत लागेल त्याचे पैसे मिळेल.. कुणाला बरं जमणार नाही हा व्यवसाय.
आमच्याकडे रोज एक भाजी विकणारा २२-२३ वर्षांचा चुणचुणीत उत्साही मुलगा येतो.. तो संध्याकाळी ठेलाभर सिजनल भाजी किंवा फळे (कोणतेही एकच) विकायला वेगवेगळ्या मोहोल्ल्यात फिरतो. त्याच्या कामाची यूएसपी म्हणजे तो त्याचे ग्राहक असणाऱ्या महिलांशी तो अत्यंत आदराने, प्रेमाने आपुलकीने वागतो. सगळ्या त्यांच्या ताई, वाहिनी, आत्या, मावशी झाल्या आहेत. कुठली वेगळी भाजी बाजारात आली कि ''ले जातो ना दीदी, तुमको पसंद है करके मै लाया खास, पैसे भी मत दो. तुम खाओगे तो मेरा पेट भरेंगा'' म्हणतो. कधी दोन काकड्या उचलून एखादीच्या पिशवीत घालतो. ''तुम्हारे लिये नही, ये मेरे भांजे के लिये दे रहा, उसको खिलाओ, धष्टपुष्ट बनाव'' म्हणतो. बायका चक्क दिवसभर त्याची वाट पाहतात पण दुसरीकडून भाजी घेत नाहीत. दिवसभरात त्याचा ठेला रिकामा होतो.
नोकरी पाण्याविषयी बेरोजगार असल्याचे लोकं जेव्हा बोलतात आणि तुम्ही त्यांना काही पर्याय सुचवता तेव्हा ते न करण्याचे त्यांच्याकडे अनेक कारणं असतात. लोकांना निकामी बसणं आवडतं पण मिळालेले काम कधी अंतर दूर पडतं म्हणून, कधी बॅकऑफीसचेच काम हवे म्हणून, कधी एरिया चांगला नाहीये म्हणून, कधी वेळा सोयीच्या नाही म्हणून, कधी हाताशी गाडी नाही म्हणून गमावणे ते पसंत करतात पण कुठलीही लाज न बाळगता जरा जास्तीचे कष्ट घेऊन जे मिळेल त्या कामातून ज्ञान आणि अनुभव वाढवून घेऊन पुढे हवे ते मिळवण्यासाठी प्रयत्न करणारी माणसे खरंच विरळा असतात.
Rashmi Padwad Madankar
Saturday, 1 February 2025
माझी शाळा
शाळा म्हणजे केवढा जिव्हाळ्याचा विषय असतो. ज्या शाळेच्या अंगाखांद्यावर खेळत-शिकत, पडत-झडत उभे राहून; आहे त्या उंचीवर पोचलो असतो त्या शाळेचे ऋण व्यक्त करण्याची संधी मिळत असेल तर त्यासारखा आनंद कुठला असेल. माझी शाळा म्हणजे नागपूरची प्रथितयश शाळा ''केशवनगर हायस्कुल''. शाळेच्या या वर्षीच्या स्नेहसंमेलनाची उदघाटक म्हणून जाण्याची संधी आमचे आवडते गणिताचे शिक्षक आणि आताचे मुख्याध्यापक श्री मिलिंद भाकरे सर यांच्यामुळे मिळाली. ते सगळ्या माजी विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवून असतात, त्यांच्याशी कनेक्टेड असतात. सरांनी या आधीही कार्यक्रमांना अतिथी म्हणून बोलावले पण माझ्याच काहीतरी अडचणींमुळे जाता आले नाही. यावेळी मात्र ही संधी मला गमवायची नव्हती. कित्येक वर्षांनी पुन्हा एकदा शाळेत पाय ठेवला आणि शाळेतले अनेक वर्ष, तेव्हाचे क्षण भरभर डोळ्यासमोरून सरकत गेले. तशा दोन प्रकारच्या शाळा असतात, एक शिकवणारी दुसरी घडवणारी. खरतर अनेक शाळांमध्ये फक्त पुस्तकी ज्ञान दिलं जातं तर एखाद्याच शाळेत ज्ञानासोबत संस्कारही दिले जातात, आपली संस्कृती, नीतिमत्ता शिकवली जाते, मातीचं ऋण, समाजाचं देणं, देशप्रेम या सगळ्या गोष्टी अंगात रुजवल्या जातात. कला, खेळ, संस्काराच्या माध्यमातून चारित्र्य घडवलं जातं. अशाच दुर्मिळ झालेल्या शाळांमध्ये अजूनही आपल्या मूळ तत्वांवर कायम राहून मुलांना घडवत असलेली शाळा म्हणजे माझी केशवनगर शाळा.
वेड्या माणसांच्या गोष्टी -
वेड्या माणसांच्या गोष्टी - #भेटलेलीमाणसे
Wednesday, 25 December 2024
Wednesday, 11 December 2024
मनातले काही
Tuesday, 19 March 2024
काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...
काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...
काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली
ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली !
झाडाचे जाडे खोड खोलले, सोलले, रंगवले
घराच्या दृश्य भागात निगुतीने सजवले.
इतर फांद्यांचा कोंडा केला, चुलीत घातला
चुलीवरच्या चविष्ट मटणावर मग यथेच्छ ताव मारला.
मी म्हणाले,
अहो दादा, तुम्ही झाडे तोडायला नको होती
पक्ष्यांची घरटी अशी मोडायला नको होती
बाग बघा कशी ओकीबोकी झाली
परिसरातली आपल्या हो रयाच गेली...रयाच गेली
दादा म्हणाले
ताई जरा इकडे या, मी काय म्हणतो कान देऊन ऐका..
तुम्हाला नसेल माहित, मी पर्यावरणवादी आहे
तुम्हाला नसेल माहित मी पर्यावरणवादी आहे
आणि काय सांगू अहो, निसर्गाच्या बाबतीत जरा जास्तच दर्दी आहे...
तशी माझी नजर पारखी आहे बरे
निसर्गात दिसतात मला चमचमते हिरे
हिऱ्यांना पेहेलू पाडल्याशिवाय चमक येते होय?
आणि हिऱ्यांशिवाय सौन्दर्याची मजा येते होय ??
वृक्षारोपण तर मी दरवर्षीच करतो..
आणि त्या वाढत्या वृक्षामध्येच सौन्दर्य घेरतो.
काय माहित वृक्षाला त्याची जागा कुठे असते
बघा आमच्या बंगल्यात कसा पठ्ठा शोभून दिसते
उभे राहून झाड थकले होते फार
म्हणून आम्हीच झालो त्याचा तारणहार
मी म्हणलं
बस झाले थांबा! तुमचे म्हणणे पटले
रजा द्या आता, तुमच्यासमोर हात टेकले
तुमच्यासमोर हात टेकले !
Thursday, 15 February 2024
चिमुकल्या देशाची रोमहर्षक कहाणी -
खाली फोटोत दिसतोय तो एक अक्खा देश आहे. जगातला सगळ्यात छोटा देश. हा देश आहे जो उत्तर समुद्रात, इंग्लंडच्या किनाऱ्यापासून सुमारे 12 मैलांवर दूर स्थित आहे. या देशाची संख्या एकेकाळी ५० होती आता आहे फक्त २७ माणसे.
या छोट्याश्या देशाची कहाणी देखील तशीच अजिब आणि रोमहर्षक आहे. पॅडी रॉय बेट्स एक निवृत्त ब्रिटीश सैन्य अधिकारी यांनी 1967 मध्ये त्यांच्या कुटुंबासह एचएम फोर्ट रफ्सजवळील एक निरुपयोगी नौदलाचा किल्ला ताब्यात घेतला जो एकेकाळी लष्करी किल्ला म्हणून वापरला जात होता आणि त्याला स्वतंत्र राष्ट्र घोषित केले.
असा देश निर्माण करण्याची कल्पना एका वेडातून साकार झाली, पॅडी ह्यांनी त्यांच्या बायकोला वाढदिवसाची भेट द्यायला म्हणून हे पाऊल उचलले होते. पुढे त्यावर फार वाद निर्माण झाला आणि पुढे शिक्कामोर्तब झाले. 1966 साली ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला, बेट्सने एक पडीत टॉवर घेतली आणि ती प्लॅटफॉर्मवर नेली. मग, ग्रॅपलिंग हुक, दोरी आणि त्याच्या बुद्धीचा वापर करून, तो प्लॅटफॉर्मच्यावर चढला आणि त्यावर हक्क घोषित केला. तो म्हणाला होता कि त्याने आपल्या पत्नीसाठी हा किल्ला भेट म्हणून जिंकला आहे.
गिफ्ट म्हणजे त्यात बायकोला आवडण्यासारखे खरतर काहीही नव्हते.. मात्र पॅडीच्या डोक्यात भविष्यासाठी काही वेगळ्या योजना होत्या. 1940 च्या दशकाच्या सुरुवातीला खरतर दोन काँक्रीटच्या खांबांवर उभारलेला तुटका-फुटका फोर्ड म्हणजे हिज मॅजेस्टीज फोर्ड (HMF) एक रफ टॉवर होते जे टेम्सचे रक्षण करणारी चौकी म्हणून कार्यरत होती. ५ टॉवरपैकी हाही एक टॉवर होता. हे दोन पोकळ काँक्रिट टॉवर्सच्या वर समुद्रापासून सुमारे 60 फूट उंचीवर असलेल्या दोन टेनिस कोर्टच्या आकाराचे होते. त्यावेळी यावर शंभरहून अधिक ब्रिटिश सैनिक संपूर्ण शस्त्रांसह तैनात असत.
1950 च्या दशकाच्या उत्तरार्धात, जर्मनच्या पराभवानंतर ब्रिटिश आर्मीने हा किल्ला सोडला आणि त्यानंतर अनेक वर्ष त्यांना ह्याचा विसर पडला. हीच संधी साधून पदी रॉयने त्यावर स्वतःचा दावा ठोकला. मुळात रॉय बेट्स हा एक कर्मठ माणूस होता ज्याने प्रथम स्पॅनिश गृहयुद्धात आणि नंतर WWII दरम्यान उत्तर आफ्रिका, मध्य पूर्व आणि इटलीमध्ये 15 वर्षांचा असल्यापासून लष्कर सेवा केली होती. तो कुठल्याही संकटांना घाबरत नसे. उलट रॉय बेट्सला नोकरशहांनी काय करावे हे जेव्हा सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला तेव्हा तो जिद्दीला पेटला आणि न घाबरता त्याने या किल्ल्यावर मालकीचा दावा ठोकला पुढेही सरकारच्या इशाऱ्यांकडे धमक्यांकडे दुर्लक्ष करत तो त्याच्या या छोट्याश्या देशासाठी काम करीत राहिला आणि परिणामी सीलँडची प्रतिष्ठा जगभरात वाढत गेली.
या सगळ्या प्रकरणाला सुरुवात झाली ती एका रेडिओ स्टेशनच्या अधिकारशाहीने आणि ती मोडून काढण्याच्या पॅडीच्या जिद्दीमुळे. त्या वेळी, ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (बीबीसी) हे एकमेव कायदेशीर रेडिओ स्टेशन होते आणि रॉयल चार्टरमुळे लोक काय ऐकू शकतात आणि काय ऐकू शकत नाहीत यावर त्यांचे पूर्ण नियंत्रण होते. त्यांना आव्हान देत बेट्सने या रिकाम्या पडलेल्या, पडीक किल्ल्यावर त्याचे पायरेट रेडिओ स्टेशन सुरू केले, लोकांना आवडेल ते संगीत ऐकता याय्ला पाहिजे एवढाच त्याचा हेतू होता. मात्र सरकारने त्याच्या कामात अडथळे आणून त्याचे रेडिओ स्टेशन इतरांपर्यंत पोचू नये अशी सोया केली. त्यानंतर बेट्स ती जागा सोडून निघून जाईल असे ब्रिटिशांना वाटले. मात्र झाले काहीतरी वेगळेच. पॅडीने त्या किल्ल्यावरच स्वतंत्र देशाचा दावा ठोकला.
असे म्हटले जाते की एका रात्री मित्रांसोबत आणि पत्नीसोबत गप्पा मारत असताना बेट्सने निश्चय केला आणि 2 सप्टेंबर 1967 रोजी किल्ल्याला “प्रिन्सिपॅलिटी ऑफ सीलँड” असे नाव दिले. तो त्याच्या पत्नीचा वाढदिवस होता. काही काळानंतर त्याचे कुटुंब त्याच्याबरोबर या जगातल्या सर्वात लहान देशात राहायला गेले
सफोकच्या किनाऱ्यापासून अवघ्या सात मैलांवर, सागरात असलेल्या या अपरिचित सार्वभौमत्वाच्या स्थापनेने यूके सरकारचे लक्ष वेधून घेतले. देशभर खळबळ माजली. ब्रिटीश पुढारी अधिकारी या घटनेमुळे अस्वस्थ झाले. त्यांनी सीलँडचे वर्णन "आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार बेट म्हणून मान्यता नसलेल्या संरचनेवर बेकायदेशीर कब्जा" असे केले..आणि त्यांनी उर्वरित चार चौक्या उद्धवस्त केल्या जेणेकरून पुन्हा कोणी असा दावा ठोकू नये. दुसरीकडे, बेट्स सर्व संकटांना सामना करायला तयार आणि स्वतःच्या निर्णयावर ठाम होते की सीलँड हा त्याचा स्वतःचा देश आहे तो त्यांनी संघर्षाने जिंकला आहे आणि तो त्याचा योग्य नेता आहे.
1978 मध्ये, अलेक्झांडर गॉटफ्रीड अचेनबॅच नावाच्या एका पश्चिम जर्मन व्यावसायिकाने स्वत: ला सीलँडचे "पंतप्रधान" घोषित केले आणि सत्तापालट केला.
कौटुंबिक आणीबाणीचा सामना टाळण्यासाठी बेट्सने कुटुंबासह सीलँड सोडले होते आणि त्याच्या अनुपस्थितीत, अचेनबॅच आणि काही जर्मन आणि डच भाडोत्रींनी हा किल्ला म्हणजे नवा देश ताब्यात घेतला.
त्यांनी बेट्सचा मुलगा प्रिन्स मायकेलला ओलीस ठेवले आणि त्याला चार दिवस कोंडून ठेवले. बेट्सने त्वरीत राज्य परत घेण्यासाठी माणसांना एकत्र आणलं. एक संघ तयार केला. युद्धदरम्यान अचेनबॅचच्या गटातील बरेच लोक पळून गेले, परंतु बेट्सने अचेनबॅचला ओलीस ठेवण्याचा निर्णय घेतला. जेव्हा यूकेच्या राजदूताने बेट्सशी वाटाघाटी केली तेव्हा कुठे त्याने शेवटी अचेनबॅकची सुटका केली.
1980 च्या दशकात, ब्रिटीश सरकारने सीलँडच्या दाव्यांची कोणतीही वैधता काढून टाकण्यासाठी आपल्या प्रादेशिक अधिकारांचा विस्तार केला. तरीसुद्धा, बेट्सने सीलँड हा स्वतंत्र देश असल्याचे ठामपणे सांगत असून राहिला. सीलँडचे चलन, पासपोर्ट आणि स्टॅम्प जारी करणे ही प्रक्रिया त्याने अधिक प्रखर केली. स्वतःचा ध्वज देखील त्याने तयार केला. दुर्दैवाने, 1990 च्या दशकात, लोकांनी काही गुन्हेगारी क्रियाकलापांसाठी वापरल्यामुळे सीलँडला त्याचे पासपोर्ट मात्र रद्द करावे लागले.
2006 मध्ये प्लॅटफॉर्मवर विध्वंसक आग लागली आणि मुख्य पॉवर जनरेटरचा नाश झाला, अनेकदा अनेक संकटं आलीत. सीलँडवर यूके सरकारकडून भाडोत्री आक्रमण आणि सतत धमक्या आल्या, परंतु ते ठाम राहिले, ही लोकं डगमगली नाहीत. सीलँड आजही तेथे आहे आणि मायकेल बेट्स आणि त्यांचे कुटुंब सीलँडच्या कल्याणात गुंतलेले आहेत आणि ते स्वतंत्र देश म्हणून चालवतात. त्यांनी प्लॅटफॉर्मवर पूर्णवेळ सुरक्षा देखील स्थापित केली आहे.
या स्वतंत्र रियासतची वेबसाइट देखील आहे आणि खर्चाला मदत करण्यासाठी नाणी, पॅचेस आणि टी-शर्ट यांसारखी स्मृतिचिन्हे ते विकतात. आश्चर्यकारकपणे, समुद्राच्या मध्यभागी असलेल्या अशा लहान संरचनेने 50 वर्षांहून अधिक काळ त्याचे सार्वभौमत्व टिकवून ठेवले आहे हे आश्चर्य आहे.
दुसरे महायुद्ध सुरु झाले तेव्हा रक्षक किल्ला म्हणून सुरू झालेला एक पडीक टॉवर पुढे एक कौटुंबिक प्रकल्प आणि त्याही पुढे जाऊन एक स्वतंत्र राष्ट्र बनला. खडतर भूतकाळ असूनही, सीलँड कधीच डगमगला नाही. तो देश अजूनही सुरूच आहे आणि जगभरातील सर्वात लहान देश म्हणून अनौपचारिकरित्या का होईना तो ओळखला जातो; आणि आजही ह्या देशाचा रोमांचक इतिहास जगभरातल्या लोकांना आकर्षित करीत राहतो..
Thursday, 25 January 2024
जगातील सर्वात घाणेरडा माणूस-अमो हाजीचा आंघोळ केल्याने मृत्यू -
#IntrestingStory #worldsdirtiestman #Iran
सध्या थंडीचे दिवस आहेत आणि फेसबुकवर अनेकदा अनेकजण आंघोळ न करण्यावरून जोक करताना दिसतात. म्हणजे या दिवसात रोज रोज आंघोळ केली नाही तरी फार फरक पडत नाही अशी जवळ जवळ मान्यता असल्यासारखे लोक बोलतात. कुणी गमतीने म्हणतात आज आंघोळीची गोळी घेतलीय. कुणी म्हणतात अंगावर चार थेम्ब शिंपडून घ्यावे. बर्याच लोकांनी त्यांच्या आयुष्यात अशी वेळ देखील अनुभवली असेल जेव्हा आंघोळ करणे हे सर्वोच्च प्राधान्य नव्हते. त्याहून महत्वाची कामे होती, आजारपण वगैरे.आंघोळीशिवाय काही दिवस चालूही शकत असेल पण जेव्हा तुम्हाला एक आठवडा किंवा त्याहून अधिक काळ आंघोळीशिवाय होतो तेव्हा गोष्टी थोड्या चिंताजनक आणि दुर्गंधीयुक्त होऊ लागतात, आणि अश्यात एखाद्याने वर्षभर आंघोळ केली नाही तर काय होईल ? अनेक वर्ष ? किंवा अगदी 67 संपूर्ण वर्षे?
#अमोहाजी या नावाने ओळखल्या जाणार्या इराणी माणसाची ही जीवनपद्धती होती, ज्याला “जगातील सर्वात घाणेरडा माणूस” म्हणूनही ओळखले जाते.
अमो हाजी (20 ऑगस्ट, 1928 - 23 ऑक्टोबर, 2022) यांनी आपले संपूर्ण आयुष्य इराणमधील देझ गाह गावात व्यतीत केले. त्याचे खरे नाव माहित नाही, आणि त्याचे अमो हाजी हे प्रत्यक्षात एक टोपणनाव आहे ज्याचे भाषांतर "जुना टाइमर" असे आहे.
अर्ध्या शतकाहून अधिक काळ, अमौ हाजी एक संन्यासी म्हणून जगला, जो कधीही आंघोळ करत नव्हता, हाजी शहराच्या काठावर एका सिंडर ब्लॉकच्या झोपडीत राहत होता, तो रस्त्यावरच जेवायचा आणि पाईपमधून जनावरांचे शेण काढायचे काम करायचा. अमो हाजीच्या सुरुवातीच्या जीवनाबद्दल फारसे माहिती नाही, परंतु त्याने घोषित केले की त्याने हृदयविकाराचा त्रास सहन केल्यानंतर संन्यासी म्हणून आपले जीवन सुरू केले आहे. आंघोळ न करण्याचे त्याचे कारण म्हणजे साबण आणि पाण्याने शरीर धुतल्याने रोग होण्याची शक्यता आहे त्यामुळे लवकर मरण येते असे तो म्हणत. हा विश्वास इतका दृढ होता की त्याने 60 वर्षांहून अधिक काळ आंघोळ केली नाही, त्याची त्वचा धूळ, माती आणि अगदी पिकलेल्या जखमांनी भरलेली असायची. अमौ हाजी हा गावकऱ्यांसाठी अतिशय ओळखीचा माणूस होता. अनेक दशके अंग न धुतल्यामुळे त्याची त्वचा जवळजवळ एकसमान राखाडी-तपकिरी रंगाची झाली होती आणि त्याचे केस विचित्र दिसायचे. तो अंघोळ करत नसला तरी त्याचे हे जगावेगळे सौंदर्य टिकविण्यासाठी तो त्याचे डोके आणि दाढीचे केस आगीत जाळून टाकण्यासाठी ओळखला जात असे. त्याच्या आंघोळीची भीती ही एकमेव गोष्ट अमो हाजीला इतर समाजापासून वेगळे ठरवणारी नव्हती, तर त्याचा आहार आणि छंद देखील विचित्र-आणि घृणास्पद-लक्ष वेधण्यासाठी पुरेसे होते. आंघोळ करताना हाजीला पाण्याची भीती वाटायची, पण पाणी पिण्याच्या बाबतीत तसे नव्हते. हायड्रेटेड राहण्यासाठी तो अनेकदा न धुतलेल्या, घाणेरड्या टिन डब्यातून मिळेल तिथून दिवसातून ५ लिटर पाणी प्यायचा. कुणीही देऊ केलेले अन्न तो नाकारायचा आणि स्वतः शोधून ताजे कच्चे अन्न, कच्चे मांस, कधीकधी अगदी सडलेले मांस तो खात असे. त्याला स्मोकिंग आवडत असे त्याच्याजवळ असलेल्या एका पुरातन पाईपमध्ये तो प्राण्यांची वाळलेली विष्ठा टाकून स्मोक करायचा आणि एकावेळी अनेक सिगारेट ओढत असल्याचे त्याचे फोटो देखील उपलब्ध आहेत.
सगळ्यात अषाचार्याची गोष्ट म्हणजे हाजी अविश्वसनीयरित्या 94 वर्षांचे आयुष्य जगला आणि त्यांच्या मृत्यूनंतर अंतिम तपासणीत त्याला कुठलाही रोग नसल्याचे आणि त्यांची तब्येत चांगली असल्याचे घोषित करण्यात आले..आश्चर्याची गोष्ट म्हणजे, गलिच्छ वापर, घाण पाणी आणि कुजलेले मांस अमो हाजीला कधीच आजारी बनवत नव्हते . मरेपर्यंत तो निरोगी होता. त्याला खरोखर आजारी बनवले असेल ते म्हणजे त्याचे इतक्या काळातील पहिले स्नान. वयाच्या 94 व्या वर्षी, काही गावकऱ्यांनी दयाळू दृष्टीकोन दाखवला आणि अमो हाजीला 67 वर्षांमध्ये आग्रहाने त्याची पहिली आंघोळ घातली.आंघोळीनंतर तो आजारी पडला आणि काही महिन्यातच त्याचे निधन झाले.
त्याच्या मृत्यूपूर्वी, तेहरान युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायन्सेस स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ येथील पॅरासिटोलॉजीचे प्रोफेसर डॉ. घोलामरेझा मोलावी यांनी हाजी यांच्यावर चाचण्या केल्या होत्या, ज्यामुळे त्याची अशी जीवनशैली असूनही त्यांच्या दीर्घायुष्याची आणि चांगल्या आरोग्याची गुरुकिल्ली शोधण्यात आली होती. डॉक्टरांनी असा निष्कर्ष काढला की अमौ हाजी इतकी वर्षे अस्वच्छ परिस्थितीत राहिल्यामुळे खूप मजबूत रोगप्रतिकारक शक्ती विकसित करू शकला, या मजबूत रोगप्रतिकारक शक्तीने त्याला अत्यंत अविश्वसनीय परिस्थितीतही निरोगी राहण्यास मदत केली.
एकंदरीत, अमौ हाजी एक निरुपद्रवी माणूस होता ज्याला कधीही नियमात जगण्यात किंवा स्वच्छतेत रस नव्हता. 67 वर्षांतील त्याच्या पहिल्या आणि शेवटच्या आंघोळीमुळे त्याचा मृत्यू झाला की नाही याची खात्री नाही, परंतु हे लक्षात येतंय की तो खूप दीर्घ आणि स्वतःच्या नियमांवर एक आनंदी, मनोरंजक जीवन जगला.
Rashmi Padwad Madankar
Featured post
रागातून जागृतीकडे : आधुनिक स्त्रीचा आत्मभानाचा प्रवास !
परंपरेनं स्त्रियांकडे नेहमीच नियमपालक, चारित्र्यसंपन्न आणि सामाजिक चौकटीत वावरणाऱ्या व्यक्ती म्हणून पाहिलं गेलं आहे. स्त्रियांबाबत त्यांच्य...
-
एक उत्तुंग व्यक्तिमत्व आणि व्यक्तीमत्वात भिनलेला एक उत्कृष्ट कवी. त्यांच्या लिखाणातली वैचारिक वीण नेहेमीच मराठी साहित्याला नवे परिमाण म...
-
फेब्रुवारी महिना संपून मार्च सुरु होतो आणि घरोघरी परीक्षेचे वेध लागतात. भरदिवसा वातावरणात एक गूढ गंभीरता भासू लागते, उष्णता जाणवू लागत...