प्रतिथयश कवयित्री, लेखिका मिनल येवले यांनी #कायांतर कादंबरीवर लिहिलेले हे पुस्तक समीक्षण.. मिनल ताई आणि देशोन्नती मनःपूर्वक आभार
मुक्तांगण
मनातले खूप काही मनातच मांडतांना मनाचा तळ मात्र कधीच गाठता आला नाही म्हणूनच 'मना तुझे मनोगत मला कधी कळेल का?' हाच शोध मनात येणाऱ्या विचारांच्या माध्यमातून घेण्याचा हा साधासा प्रयत्न …
Tuesday, 12 May 2026
कायांतर : अस्वीकृतीच्या जखमेतील स्वीकृतीची कहाणी
नसरापूर घटनेच्या निमित्ताने...
ज्या दिवशी ही घटना घडली, अगदी त्याच दिवशी माझी अडीच वर्षांची भाची दिवसभर राहायला घरी आली होती, सोबत दहा वर्षांची मोठी भाची. आमचा अक्खा दिवस या चिमुकल्यांचे चैतन्याने भरलेले वावरणे, त्यांचा खळाळता आनंद पाहण्यात गेला. खेळता खेळता या देवाच्या फ़ुलपाखरांना टेबलाचा कोपराही लागू नये, जरा खरचटूही नये म्हणून केवढं जपत होतो आम्ही. इतक्या नाजूक. इतक्या कोवळ्या की आयुष्यात त्यांना जराशीही इजा पोहोचू नये...त्यांचा आनंद चिमूटभरही कमी होऊ नये, त्यांच्या वाट्याला सदैव भली माणसे यावीत असं वाटत राहिलं. आणि म्हणूनच त्याच दिवशी घडलेली ती घटना फारच जिव्हारी लागली.
Friday, 24 April 2026
कायांतर : देहाच्या कैदेतून माणुसकीच्या मुक्तीकडे
“कायांतर” ही रश्मी पदवाड मदनकर लिखित तृतीयपंथीयांच्या वेदना आणि संघर्ष मांडणारी प्रभावी कादंबरी आहे. अश्विन वर्मा ते आंचल वर्मा असा तिचा जीवनप्रवास अत्यंत खडतर असून समाजमान्य नसलेल्या किन्नर समूहाच्या यातना यात वास्तववादी पद्धतीने उलगडल्या आहेत. ही कथा काल्पनिक नसून सत्य घटनेवर आधारित आहे; स्वतः आंचल वर्माने लेखिकेशी संवाद साधत तिची जीवनगाथा सांगितली आहे. “कायांतर” हे शीर्षक अत्यंत समर्पक आणि प्रतीकात्मक असून, मुखपृष्ठही स्त्री-पुरुषांतील द्वंद अधोरेखित करत विषयाला पूरक ठरते.
भूतकाळ आणि वर्तमानकाळ यांची सुरेख सरमिसळ या कादंबरीत अत्यंत लयबद्धपणे घडताना दिसते. कादंबरीचा सूर आणि ताल एकरूपतेने पुढे सरकत राहतो, त्यामुळे वाचकाची उत्सुकता प्रत्येक पानागणिक वाढत जाते. आंचलच्या यशापासून सुरू होणारा प्रवास हळूहळू तिच्या बालपणात शिरतो आणि अश्विनच्या रूपात, पुरुषी देहात स्त्रीत्वासाठी चाललेली आतली धडपड लेखिकेने अत्यंत संवेदनशीलतेने रेखाटली आहे.
दुःखातून भोगाकडे आणि पुढे यशाकडे वाटचाल करणारी आंचल आणि बालपणीचा अश्विन ही एकच व्यक्ती नव्हे तर जणू दोन वेगवेगळी रूपं वाटतात, तरी ती एकाच अस्तित्वाच्या दोन बाजू आहेत हे समजेपर्यंत आपण बदललेलो असतो.. एका पुरुषाच्या शरीरात कैद झालेली स्त्री बाहेर पडण्यासाठी तडफडत असल्याची जाणीव या कथनातून तीव्रतेने उमटते. आंचल आणि अश्विन या दोन्ही रूपांमधील हा प्रवास लेखिकेने प्रकरणागणिक अत्यंत प्रभावी आणि प्रवाही शैलीत उभा केला आहे. त्यांची पडझड पाहून वाचकाच्या संवेदना जागृत होतात आणि समाज म्हणून या समाजाला समजून घेण्यात आमची चूक झाली असा एक क्षमाभाव निर्माण झाल्याशिवाय राहत नाही.
लेखिकेची भाषा अत्यंत साहित्यिक, संवेदनशील आणि मनाचा ठाव घेणारी आहे. त्या आंचलबद्दल लिहिताना म्हणतात, “शरीर कुठलंही असलं तरी तिने शंभर टक्के २४ कॅरेट सोन्यासारखं मन मिळवलं होतं,” तसेच “स्थापत्यकलेतील चूक रंगरंगोटीने झाकता येते, डॉक्टरांची चूक टाळता येते; पण नियतीची चूक कुणाकडे मांडायची?” अशा ओळींतून आंचलची वेदना अत्यंत प्रभावीपणे व्यक्त होते. लेखिकेच्या भाषेतलं सौष्ठव आणि अलंकारिकता ही कृत्रिम न वाटता स्वाभाविकपणे उमटते. एका ओळीत व्यक्तिमत्त्व उभं करण्याची त्यांची हातोटी विशेष लक्षवेधी आहे. अश्विनच्या आयुष्यात येणाऱ्या अनेक व्यक्तींचं चित्रण त्यांनी विस्ताराने न करता, अत्यंत थोडक्यात पण नेमक्या शब्दांत उभं केलं आहे. त्यामुळे त्या व्यक्तिरेखा वाचकांच्या डोळ्यासमोर जिवंत होतात. आंचलसोबतच खातिमा, रेशमा, अम्मा आणि आनंद चांदराणी यांसारख्या पात्रांच्या माध्यमातून अनेकांच्या वेदना या कादंबरीत प्रभावीपणे प्रकट होताना दिसतात.
अश्विनचा पुरुषत्वातून स्त्रीत्वाकडे जाणारा प्रवास अत्यंत बोलका आणि अंतर्मुख करणारा आहे. आयुष्यभर प्रेमाच्या अभावाने हळवा झालेला अश्विन खातीमामध्ये जणू मातृत्व शोधतो. लेखिकेने वापरलेल्या प्रतिमा अत्यंत प्रभावी आणि अर्थपूर्ण आहेत. दिल्लीला जाताना अश्विन जणू आपल्या तुडवलेल्या, पडझड झालेल्या बालपणाचे तुकडे गाठोड्यात बांधतो; ही प्रतिमा मनाला खोलवर स्पर्श करून जाते. एखादं नकोसं झुडूप उपटून टाकावं आणि पुन्हा कुठेतरी रुजावं, तसं अश्विनचं आयुष्य उखडत, तुटत आणि तरीही पुन्हा उभं राहत राहणारं, अत्यंत संवेदनशीलतेने उभं केलं आहे.
अश्विन जेव्हा आंचलमध्ये रूपांतरित होतो, तेव्हा त्याच्या मनातील भावनांचा आवेग आणि बदलत जाणाऱ्या आयुष्याचा प्रवास लेखिकेने रेल्वेप्रवासाच्या प्रतीकातून अत्यंत प्रभावीपणे उभा केला आहे. या प्रतीकात्मक मांडणीतून अंतर्मनातील हलचाली आणि आयुष्याच्या वळणांची जाणीव अधिक तीव्रतेने जाणवते.
ही कादंबरी केवळ अश्विन किंवा आंचलच्या जीवनकथेत मर्यादित राहत नाही; ती संपूर्ण किन्नर समाजाच्या वेदना आणि वास्तवाला स्पर्श करते. त्यांच्या प्रथा, परंपरा, श्रद्धास्थाने, दैवतं, तसेच त्यांच्या आयुष्यातील नियम आणि वास्तव यांचा अभ्यासपूर्ण आणि सखोल परिचय लेखिकेने वाचकांना करून दिला आहे. त्यामुळे ही कथा केवळ वैयक्तिक अनुभव न राहता एका संपूर्ण समुदायाची जाणीव करून देणारी ठरते.
रश्मी या लेखिका होतात, कारण समाजातील संघर्ष, दुःख आणि अन्याय त्यांना सतत अस्वस्थ करत राहतात. यापूर्वीची त्यांची #पद्मकोश ही कादंबरी त्याचीच साक्ष देते. संघर्षमय आयुष्याला आवाज देताना त्या केवळ वेदना मांडत नाहीत, तर करुणेने ओथंबलेलं मनही वाचकांसमोर ठेवतात आणि त्यामुळे वाचक नकळत अंतर्मुख होतो. चित्रपटातील कॅमेऱ्यासारख्या नेमकेपणाने, अलिप्त पण संवेदनशील दृष्टिकोनातून त्या पात्रांचे बहिरंग आणि अंतरंग उभे करतात. त्यामुळे #कायांतर ही कादंबरी केवळ वाचनीय राहत नाही, तर ती अनुभवण्याजोगी ठरते. अनेक वाचकांनी प्रत्यक्षात किन्नर समुदायाला जवळून पाहिलेलं नसतं; पण ही कादंबरी वाचताना त्यांचं वास्तव डोळ्यांसमोर उभं राहतं. त्या प्रक्रियेत आपल्या संकुचित, कधी जाचक ठरलेल्या दृष्टिकोनातून बाहेर पडल्याची जाणीव होते. किन्नरांच्या अस्तित्वाच्या लढ्याला सामोरं जाताना मन हेलावून जातं आणि आपण त्यांच्याकडे ‘माणूस’ म्हणून कधीच पाहिलं नव्हतं, ही जाणीव ठसठशीतपणे समोर येते. हीच जाणीव समाजापर्यंत पोहोचवण्याचं अत्यंत महत्त्वाचं कार्य “कायांतर” ही कादंबरी प्रभावीपणे पार पाडते.
घरातून हाकललेला अश्विन, आणि तरीही आंचल झाल्यावरही कुटुंबाशी असलेली नाळ जपण्याची तिची ओढ; ही भावना माणुसकीचा खरा अर्थ अधोरेखित करते. शेवटी कथा जिथून सुरू होते, तिथेच येऊन पूर्ण होते; मात्र वाचकाच्या मनात अनेक प्रश्न, वेदना आणि नव्या जाणिवांची ठिणगी पेटवून जाते. “कायांतर” ही कादंबरी वाचून संपत नाही, ती मनात दीर्घकाळ रेंगाळत राहते, माणूस म्हणून जगण्याचा अर्थ नव्याने उलगडून दाखवते.
सुरुची डबीर
+91 93706 96117
*****************************
पुस्तकाचे नाव - कायांतर
लेखक - रश्मी पदवाड मदनकर
प्रकाशक - पद्मगंधा प्रकाशन
प्रकार - कादंबरी
विषय - तृतीयपंथी वास्तवावर आधारित
संपर्क - ७७२०००११३२
Wednesday, 1 April 2026
साहित्यिक नकाशावर हरवलेली ओळख : वैदर्भीय स्त्री साहित्यिक !
Tuesday, 24 March 2026
संघर्ष, स्वाभिमान आणि मानवतेच्या वाटा - तृतीयपंथी समुदाय
आपण आपल्याच विश्वात इतके मश्गुल असतो की या दुनियेत आपल्यासारखीच दिसणारी; पण नियतीनं वेगळा बेत आखला म्हणून संघर्षमय आणि नाईलाजास्तव सामान्यांपेक्षा वेगळं आयुष्य जगण्यास भाग असणारी अनेक माणसे आहेत याकडे आपले लक्षही नसते किंवा लक्ष असले तरी अंगाला-मनाला काहीही लावून न घेता बिनदिक्कत झापडे पांघरून आपल्याला निघून जाता येते. पण अशी झापडं सगळ्यांनाच लावता येत नाही; अगदी त्यांनाही नाही ज्यांना स्वतःच मदतीची गरज असते; आपलीच झोळी फाटली असतांना ती उरलेली लक्तरं घेऊन इतर गरजुंच्या मदतीसाठी पुढे येतात. नागपूर शहराच्या वर्दळीमध्ये अनेक समाजघटक आपापल्या संघर्षांसह जगत आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचा, पण दुर्लक्षित समाजघटक म्हणजे तृतीयपंथी समुदाय. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर गेलेले हे लोक आजही स्वतःच्या अस्तित्वासाठी, सन्मानासाठी आणि समान हक्कांसाठी झुंज देत आहेत.
आपल्या समाजाने स्त्री आणि पुरुष अशा दोन ठराविक चौकटी उभ्या केल्या; मात्र त्या चौकटीत न मावणाऱ्या तृतीयपंथीयांकडे अनेकदा संशय आणि उपेक्षेच्या नजरेने पाहिले गेले. शिक्षण, नोकरी, निवारा आणि आरोग्य यांसारख्या मूलभूत हक्कांसाठीही त्यांना सतत संघर्ष करावा लागतो. त्यामुळे उपजीविकेचे स्थिर मार्ग नसल्याने अनेकांना भीक मागणे किंवा मंगलकार्यांमध्ये नाच-गाणे करण्यावर अवलंबून राहावे लागते. तरीही गेल्या काही वर्षांत परिस्थितीत सकारात्मक बदल दिसू लागले आहेत. विविध संस्था आणि प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे शिक्षण, रोजगार आणि समाजातील स्वीकाराबाबत जागरूकता वाढत आहे आणि काही तृतीयपंथी विविध क्षेत्रांत आपली स्वतंत्र ओळख निर्माण करताना दिसतात.
नागपूरमध्येही या समुदायातील अनेक जण स्वकष्टाने, जिद्दीने आणि आत्मविश्वासाने स्वतःचा मार्ग घडवत आहेत. समाजाने जर पूर्वग्रहांच्या चौकटी मोडून त्यांच्याकडे माणूस म्हणून पाहिले आणि सन्मानाने जगण्याची संधी दिली, तर त्यांच्या आयुष्यातील संघर्ष निश्चितच कमी होऊ शकतो. तृतीयपंथी समाज वेगळा नाही; तोही आपल्या समाजाचाच एक महत्त्वाचा घटक आहे. त्यांना समजून घेणे, स्वीकारणे आणि सन्मान देणे ही केवळ सामाजिक जबाबदारी नाही, तर आपल्या माणुसकीची खरी कसोटी आहे. यानिमित्ताने नागपुरातील काही तृतीयपंथींची ओळख करून घेऊया..
विद्या कांबळे या नागपूरमधील तृतीयपंथी सामाजिक कार्यकर्त्या आहेत, त्या अनेक वर्षांपासून आपल्या समुदायाच्या हक्कांसाठी आणि सन्मानासाठी काम करत आहेत. शिक्षण, आरोग्य, कायदेशीर मदत आणि रोजगाराच्या संधींबाबत त्या जनजागृती करतात. विशेष म्हणजे, त्या लोकअदालतमध्ये पॅनल सदस्य म्हणून सहभागी होणाऱ्या महाराष्ट्रातील पहिल्या तृतीयपंथी ठरल्या. तृतीयपंथीयांना ओळखपत्रे, शासकीय योजना आणि आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठीही त्या सातत्याने प्रयत्नरत आहेत. त्यांच्या कार्यामुळे समाजात या समुदायाविषयी स्वीकाराची भावना हळूहळू वाढताना दिसते.
ट्रान्सजेंडर आंचल वर्मा यांनी संघर्षातून आपलं आयुष्य घडवलं. किन्नर समाजाला ज्या कठीण वाटा पार कराव्या लागतात, त्या सगळ्या अनुभवूनही त्या कधी खचल्या नाहीत. नाच-गाण्यापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज समुपदेशन आणि LGBTQAI समुदायासाठी सामाजिक कार्यापर्यंत पोहोचला असून त्या देशभर जनजागृतीसाठी प्रवास करतात. सौंदर्यस्पर्धेत “मिस महाराष्ट्र” ठरलेल्या आंचल सामाजिक कार्यासाठी मॉडेलिंगही करतात. विशेष म्हणजे अवघ्या एकोणिसाव्या वर्षी त्यांनी कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडलेल्या एका मुलीला वाचवून तिचा सांभाळ केला आणि एका वृद्ध देवदासी महिलेलाही आधार दिला. त्यांच्या या प्रेरणादायी आयुष्यावर “कायांतर” हे पुस्तक प्रकाशित झाले, जे आज राज्यभर चर्चेचा विषय ठरले आहे.
शिवानी सूरकर या विदर्भातील तृतीयपंथी समाजातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जातात. समाजातील उपेक्षा आणि भेदभावाचे चटके सहन करूनही त्यांनी शिक्षणाचा मार्ग निवडला. B.Com, MBA, LLB अशी उच्च शिक्षणे पूर्ण करत २०२० साली बार कौन्सिलकडून वकिलीची सनद मिळवून त्या विदर्भातील पहिल्या तृतीयपंथी वकिल ठरल्या. त्या तृतीयपंथीयांना कायदेशीर मार्गदर्शन, ओळखपत्रे मिळविण्यास मदत आणि विविध सामाजिक प्रश्नांवर आधार देत आहेत. त्यांच्या कार्यातून शिक्षण आणि स्वावलंबनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचत आहे.
ट्रान्सजेंडर मोहिनी या किन्नर समाजातील स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या नृत्यांगना आहेत. मंगलकार्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमांतील नृत्य-गायनाच्या परंपरेला त्यांनी केवळ परंपरेपुरते मर्यादित न ठेवता त्यात कलात्मकतेची भर घालून वेगळी ओळख मिळवली. विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांतून नृत्य सादर करत त्या किन्नर समुदायाच्या प्रतिभेकडे समाजाचे लक्ष वेधतात. कलेच्या माध्यमातून तृतीयपंथीयांविषयीचे गैरसमज दूर करून समाजात स्वीकार आणि सन्मान वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न उल्लेखनीय आहे.
कल्याणीगुरु या नागपूरमधील तृतीयपंथी समाजातील ओळखल्या जाणाऱ्या किन्नर गुरु आहेत. सन्मानाने आणि स्वावलंबीपणे जगण्याचा संदेश देण्यासाठी त्यांनी वेगळी वाट निवडत नागपुरात “चाय वीला” या नावाने चहाचे दुकान सुरू केले, ज्याची ख्याती आज सर्वदूर पसरली आहे. पारंपरिक मंगती किंवा मंगलकार्यांपुरतेच आयुष्य मर्यादित नसते, तर व्यवसायाच्या माध्यमातूनही स्वाभिमानाने जगता येते, हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले. त्यांच्या या उपक्रमामुळे अनेक तृतीयपंथीयांसाठी स्वावलंबनाची नवी प्रेरणा निर्माण झाली आहे.
तृतीयपंथीयांना नोकरीच्या संधी कमी मिळतात, या वास्तवावर खंत व्यक्त करत बसण्याऐवजी ट्रान्सजेंडर संजना हिने वेगळी वाट निवडली. तिने स्टॉक मार्केट ट्रेडिंगचे पद्धतशीर प्रशिक्षण घेत सातत्याने सराव करत या क्षेत्रात प्राविण्य मिळवले. आज ती शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून सन्मानाने उदरनिर्वाह करते. विशेष म्हणजे, ती आपल्या समुदायातील इतर इच्छुकांना देखील ट्रेडिंगचे प्रशिक्षण देत स्वावलंबनाचा नवा मार्ग दाखवत आहे.
याशिवाय नागपूरमध्ये काही तृतीयपंथी HIV-जागरूकता, आरोग्य मोहिमा आणि सामाजिक जनजागृतीसाठी स्वयंसेवी संस्थांसोबत काम करतात. आरोग्य शिबिरे, समुपदेशन आणि जनजागृती कार्यक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. काहींनी छोट्या व्यवसायांद्वारे स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारला आहे.. जसे की ब्युटी पार्लर, मेकअप सेवा, कार्यक्रम व्यवस्थापन. काही तृतीयपंथीनी लॉकडाऊन किंवा आपत्तीच्या काळात गरजू लोकांना अन्नवाटप, कपडे आणि आवश्यक वस्तू देण्याचे मानवतावादी काम केले. त्यामुळे समाजात त्यांच्या भूमिकेबद्दल सकारात्मक दृष्टीकोन तयार झाला. अनेकांनी सिद्ध केले "माणुसकीच्या वाटेने चालण्यासाठी माणसांनी घालून दिलेल्या चौकटीत जन्मणे आवश्यक नसते. मानवता लिंगावर अवलंबून नसते; ती मनाच्या विशालतेतून आणि संवेदनशीलतेतून उमलते. माणुसकी जपण्यासाठी जे धाडसी, नि:स्वार्थ आणि करुणेने भरलेले हृदय लागते, ते त्यांच्या जवळही ताकदीने धडधडत असते.'' पण आजही कितीही चांगलं वागण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्या वाट्याला काय येते ? वंचना आणि उपेक्षा!
अशावेळी फ़िराक़ गोरखपुरी यांचे शब्द आठवतात....
“हर ज़ोर-ए-ज़माने का सहा हमने बड़ी मुश्किल से,
हम लोग मगर आदमी कहलाए बड़ी मुश्किल से…”
या ओळीत ज्या वेदना दिसतात, त्या आजही तृतीयपंथीच्या संघर्षांना तंतोतंत लागू पडतात.
या सर्व उदाहरणांकडे पाहिले की एक गोष्ट ठळकपणे जाणवते; तृतीयपंथी समाजाला संधी, आधार आणि स्वीकार मिळाला, तर तेही इतरांप्रमाणे स्वाभिमानाने आणि स्वावलंबीपणे आयुष्य जगू शकतात. उपेक्षा आणि भेदभावाच्या अंधाऱ्या वाटा पार करत त्यांनी जिद्दीने स्वतःसाठी नवे मार्ग तयार केले आहेत. थोडा विश्वास, थोडी साथ आणि समानतेची दृष्टी मिळाली, तर ते केवळ स्वतःचे आयुष्य घडवत नाहीत, तर समाजालाही संवेदनशीलतेचा नवा धडा देतात. कारण शेवटी प्रश्न वेगळेपणाचा नाही, तर स्वीकाराचा आहे आणि तृतीयपंथी समाज हा आपल्या समाजाचाच एक अविभाज्य भाग आहे.
रश्मी पदवाड मदनकर
rashmi.aum15@gmail.com
7720001132
Tuesday, 10 March 2026
आपल्या संवेदना न मरो...
शताब्दी चौकात दोनदोनच्या जोडीत त्या चौघी आळीपाळीने दिसत राहतात. पहिली जोडी आहे १३-१४ वर्ष वयाची आणि दुसऱ्या दोघी असाव्यात २२-२५ तल्या. विशेष म्हणजे चौघींजवळ चार बाळ आहेत.. अगदी छप्पर फाड के दिलंय बघा त्यांना देवाने. ही बाळं झोळीत निपचित पडलेली असतात किंवा कडेवर रडत, पेंगत बसलेली असतात, उन्हातान्हात, पावसात, धुळीत. दुसऱ्या १३-१४ वर्ष वयाच्या ज्या दोघी आहेत. त्या स्वतःच किशोरी असताना त्यांच्याजवळ प्रत्येकी एकेक चिमुकलं असतं. सिग्नल लागला की त्या पुढे येतात, काच ठोठावतात. तुम्ही 'ये किसका बच्चा उठाकर घुमते हो' असं विचारलं की त्या 'मेरा बच्चा है' असं सांगतात आणि तुम्ही पुढला प्रश्न विचारण्याच्याआत भरभर चौक सिग्नल ओलांडून निघून जातात. मग पुढले काही दिवस गुडूप होतात. दिसत नाहीत... मग पुन्हा येतात. पुन्हा झोळीत बाळं; तीच का नवी…? माहिती नाही.
प्रश्र्न असा की प्रत्येकीकडे एक या दराने असे किती चिमुकले
असतात यांच्याकडे.. इतक्या
ठोक भावाने कुठे मिळतात इतकी लहान मुले ? एका
चौकात इतकी तर शहरात किती? आणि
राज्यात?
देशात? ही मुले जरा मोठी झाली की काय
होतं यांचं?
कुठे जातात ही? यात मुली असतील तर त्यांचं काय
होतं…? यांचं भविष्य काय ? दिवसा सिग्नलवर दिसणाऱ्या या वेदना... तर रात्रीच्या अंधारात काय
होत असेल ?
उत्तरं नाहीत, वाली नाही, तक्रार नाही, पुरावा नाही.
पण म्हणून प्रश्न थांबत नाहीत. त्या बाळांचे मिटलेले डोळे, उन्हाने काळवंडलेली गालं आणि स्वतःचं बालपण हरवलेल्या त्या मुली; हे सगळं मनात ठसत राहतं. आपल्याला कदाचित फारसं
काही करता येत नाही. आपण
गाडीत बसतो, काच वर करतो, सिग्नल हिरवा झाला की पुढे निघून जातो. पण निदान प्रश्न विचारता
येतात. निदान
अस्वस्थता शब्दात मांडता येते. कारण कधी कधी बदलाची सुरुवात उत्तरांपासून होत नाही; ती अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नांपासूनच होते; आणि म्हणूनच हा प्रपंच. ही तळमळ. तुमच्यापर्यंत
पोहोचवण्याचा एक प्रयत्न.
एखाद्या दिवशी मन खूप उद्विग्न करणारं काहीतरी नजरेत पडतं
आणि सगळंच कसं फोल वाटायला लागतं. काही महिन्यांआधीची गोष्ट असेल; रोज
ऑफिसला जाण्याच्या वाटेत व्हेरायटी चौक नावाचा प्रशस्त चौक लागतो. चौकाच्याच बाजूला मोठ्ठं 'मुख्य' पोलिस स्टेशनही आहे. ५-६ वर्षाच्या मुलीचा
खांद्यापासून ढोपरापर्यंत कट झालेला हात दाखवत बाराएक वर्षांचा मुलगा पुढे आला, हिला औषधीला पैसे द्या म्हणाला. रक्ताळलेला पूर्ण फाटून फाकलेला
हात बघून फार कसनुसं झालं. हातात येईल ती शंभरेक रुपयांची नोट त्या पोराच्या
हातात ठेवली आणि सिग्नल सुटताच निघून गेले. त्या दिवसभर तो लाललाल हात नजरेसमोर दिसत राहिला. काय झालं असेल… का झालं असेल? अनेक तर्कवितर्काचे सत्र मनातच
रंगत राहिले. पण
झाला असेल अपघात काहीतरी म्हणून मग संध्याकाळपर्यंत सगळं विस्मरणात गेलं. झाला गेला दिवस निवळला. त्यानंतरच्या चौथ्या दिवशी
पुन्हा ५ वर्षांच्या नाजुकश्या मुलीचा पूर्णतः भाजलेला हात पुढे करत ८-९ वर्षांचा वेगळाच एक
मुलगा पुढे आला. त्या
एवढ्याश्या चिमुकलीचा हात इतका भाजला होता जणू उकळत्या तेलात तळून काढलाय. जीव कळवळला, भोवळ यायची बाकी राहिली. त्या पोराला बोलले, चल दवाखान्यात जाऊ. हिच्यावर
उपचार करू, तर ''पैसे दो, नहीं तो जाओ'' म्हणत
भरभर चालत रस्ता ओलांडून तो निघून गेला. मी पाहतच राहिले. राहवले नाही म्हणून लगेच वळवून
सरळ गाडी पोलिस स्टेशनात घेतली. आत जाऊन रीतसर तक्रार नोंदवली... दिवसभर मन लागलं नाही. इतक्या चिमुकल्या मुलींसोबत
काय होतंय, हे इतकं बाहेर दिसतंय तर
एकट्यात आत कायकाय होत असेल? विचार करून डोक्याचा भुगा. आत आत खूप गहिवरून येत
होतं, चलबिचल चलबिचल होत राहिली. स्वतःच स्वतःचा राग आला. बाहेर हे सगळं असं काय काय
चाललंय आणि आपण काय करतोय? आभासी जगात दाखवल्या
जाणाऱ्या कित्येक गुडी गुडी गोष्टींना सत्य मानून आनंदात जगतोय. डोळे झाकल्याने सत्य
बदलणार आहे का? डोळ्यावरची झापडं काढायला हवीय...
तर मी तक्रार नोंदवल्यानंतर ऑफिसला जाता येता या चौकात
आवर्जून लक्ष देणं सुरु होतं... पूर्ण १२ दिवस लहान मुलं तर सोडा साधे दुसरे भिकारीही
दिसले नाहीत. वाटलं, चला आपल्या तक्रारीने काहीतरी
सकारात्मक फरक पडला असावा, चिमुकल्यांना पोलिसांनी या
दुष्टचक्रातून बाहेर काढले असावे…पण तसे नव्हते. एका सकाळी पुन्हा अगदी 5-6 वर्षांची नवी पोर हात पूर्ण लदलद जळालेल्या अवस्थेत
पुढ्यात आली. पोलिस
स्टेशनला जाऊन मी पुन्हा जरा आठवण देऊन आले… त्याचा उपयोग पुन्हा ४ दिवस होईलही, पण अश्या किती चिमुकल्या नरकयातना भोगत राहणार आहेत, हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. मी एकटीने तरी काय करावे? हवे तसे उत्तर सापडतच नाही.
नागपुरातील अनेक सिग्नल्सवर, रेल्वे
स्थानकांवर, मंदिरात, लहान-मोठा ताजबाग अश्या कित्येक ठिकाणी लहान मुले भीक
मागताना आढळतात. ऊन-पाऊस-गारवा कुठल्याही वातावरणात उघडे-नागडे, उपाशी-तापाशी, पिंजारलेले
केस, जखमा-जखमा झालेलं अंग... वेदनेने-दुःखाने पिचलेले किंवा मग
त्यापलिकडे गेलेले. कुणाचे आहेत, कुठून
आले, कुठे गेले ह्याचा कुणाला
थांग पत्ता नसतो. त्यातील
बरीच मुले ही माफिया लोकांनी गरीब वस्तीतून भीक मागण्यासाठी अपहरण केलेली किंवा
परराज्यातून पळवून आणलेली असतात. या मुलांच्या संरक्षण आणि
उत्तम नागरिक बनण्याच्या हक्काबद्दल सरकार, प्रशासन
काही करणार आहे का? की,
रस्त्यावरच्या मोकाट श्वानांसारखी यांच्या आयुष्याला काहीच किंमत नाही?
कित्येक आई-वडील याच रस्त्याने रात्रंदिवस प्रवास करीत असतील. यांच्या कुणाच्याच मनाला हे सारे प्रसंग कधीच खटकत नसतील का? आम्ही कोडग्या मनांनी, उघड्या डोळ्यांनी हा तमाशा पाहत राहणार आहोत… पाहतो आहोत. आमच्या संवेदना न मरो हीच प्रार्थना...!
अनेक वेळा सिग्नलवर दिसणाऱ्या, भीक
मागणाऱ्या बालकांमागे केवळ दारिद्र्य नसून एक संघटित साखळी कार्यरत असल्याची चर्चा
समाजात ऐकायला मिळते. काही
प्रकरणांत मुलांना पळवून आणणे, त्यांना जाणीवपूर्वक
असुरक्षित परिस्थितीत ठेवणे किंवा त्यांच्याकडून भीक मागवून आर्थिक फायदा मिळवणे
अशा प्रकारचे गंभीर गुन्हे उघडकीस आलेले आहेत. भीक मागण्यासाठी लहान मुलांना
जाणीवपूर्वक इजा करणे किंवा त्यांना मारणे हा केवळ गुन्हा नाही, तर मानवतेलाच काळीमा फासणारा प्रकार आहे. भारतात अशा प्रकारच्या
गुन्ह्यांवर भारतीय दंडसंहितेनुसार (IPC) कठोर कारवाई केली जाते. ही बाब केवळ कायद्याचा प्रश्न
नाही; ती मानवी हक्कांची पायमल्ली आहे. अशा प्रकारांना आळा
घालण्यासाठी पोलीस यंत्रणा, प्रशासन आणि बालकल्याण
संस्था यांनी समन्वयाने आणि ठोस कारवाई करणे अत्यावश्यक आहे. कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, जनजागृती आणि नागरिकांची सतर्कता यामुळे अशा
गुन्हेगारी साखळ्या मोडून काढणे शक्य आहे. प्रत्येक मुलाला सुरक्षित बालपण मिळणे हा केवळ सामाजिक
नव्हे, तर नैतिक कर्तव्याचा विषय आहे.
काय करता येईल?
• संशयास्पद घटना त्वरित पोलिस किंवा बालकल्याण समितीकडे कळवा.
• ‘चाईल्ड हेल्पलाईन १०९८’ वर संपर्क साधा.
• भीक देण्याऐवजी पुनर्वसन
संस्थांना पाठिंबा द्या.
• सजग नागरिक बना; दुर्लक्ष करू नका.
• प्रशासन-पोलिस-संस्था यांनी संयुक्त कारवाई मजबूत करावी.
संवेदनशीलतेला कृतीची जोड देऊया. कारण प्रत्येक मूल भीक नव्हे, तर सुरक्षित, सन्मान्य
आणि यशस्वी आयुष्याचा अधिकारी आहे. ते देण्यात आपण अपयशी ठरलो, तर ते केवळ व्यवस्थेचा नव्हे, तर समाज म्हणून आपल्या सामूहिक विवेकाचा पराभव ठरेल. एक पिढी सिग्नलच्या लाल दिव्यात
अडकून राहू नये,
एका पिढीचे बालपण हातात
झोळी घेऊन रस्त्यावर हरवू नये, गुन्हेगारीकडे वळू नये; यासाठी आपण शांत राहू नये. नाहीतर उद्या इतिहास विचारेल “तुम्ही पाहत होतात… पण तुम्ही केलं काय?”
रश्मी पदवाड मदनकर
7720001132 / 8208920440rashmi.aum15@gmail.com
(लोकसत्ता ''शहरनामा'' मालिकेत दि.२ मार्च २०२६ मंगळवार रोजी प्रकाशित लेख)
Featured post
कायांतर : अस्वीकृतीच्या जखमेतील स्वीकृतीची कहाणी
प्रतिथयश कवयित्री, लेखिका मिनल येवले यांनी #कायांतर कादंबरीवर लिहिलेले हे पुस्तक समीक्षण.. मिनल ताई आणि देशोन्नती मनःपूर्वक आभार ********...
-
एक वर्तुळ पूर्ण झालं ! #छोटी_छोटी_बाते आयुष्य स्वतःजवळ काहीच ठेवत नाही.. तुम्ही जे जे बरं-वाईट वाटून दिलेलं असतं ते ते कधीतरी तुमच्याकडे प...
-
परंपरेनं स्त्रियांकडे नेहमीच नियमपालक, चारित्र्यसंपन्न आणि सामाजिक चौकटीत वावरणाऱ्या व्यक्ती म्हणून पाहिलं गेलं आहे. स्त्रियांबाबत त्यांच्य...
