Tuesday 29 September 2020

विस्मृतीचा श्राप ...

 अंधारलेल्या एखाद्या बोगद्यात शिरावे 

आणि एक एक पाऊल पुढे चालतांना 

घुप्प अंधार गवसत राहावा ... 

आकाश, जमीन, प्रकाश 

आणि सजीवांचे भास-आभास 

सगळंच दूर-दूर पुसट होत, 

ठिपका होत नाहीसे होण्यापर्यंत येऊन पोचावे .. 


नाव, गाव ओळख मिटू लागावी, 

भूत, वर्तमान भविष्याचा संदर्भच कळू नये 

माणसांच्या भेटण्याच्या, त्यांच्या निघून जाण्याच्या कथा 

कणकण आनंद, क्षणक्षण दुःखाच्या व्यथा 

घट्ट झालेल्या नात्यांच्या, निसटलेल्या हातांच्या.. आणि 

यासर्वात धडपडत तगून-जगून दाखवण्याच्या प्रथा 

विघटित होऊन उडून जाव्या  ..

 

 रंग, गंध, दृष्टी, स्पर्शाच्या पलिकडे कुठेतरी

वैचारिक भूमिका, बौद्धिक- मानसिक आंदोलनं

गहिवरलेली स्पंदन विरावीत ..

इच्छा-आकांक्षा,अपेक्षांची वाफ व्हावी  

अनोळखी होत जावे सारे .. 


अंधाराच्या पटलावर दूर चमकताना दिसेल काहीतरी

धाव घेऊ नये मृगजळ असेल ते ..

काळा कभिन्न परिसर, फसव्या दिशा 

अनिश्चित अंतरे, अनाकलनीय स्थिती 

अनासक्त प्रवास ... आणि 

अनवट भिवतीच्या अंधार वाटा .. 


कुठे घेऊन जातील... ?

बोगदा अनादी नसतो तसा अनंतही नसतो..

अफाट असतो पण अथांगही नसतो .. 

आपण चालत राहावे ... 

प्रकाशाचे किरण चमकून शेवटचे टोक गाठेपर्यंत

आकाश, जमीन, वारा, गवताची हिरवी गार कुरणं 

आणि सजीवांचे भास-आभास परत मिळेपर्यंत 

पुन्हा गाणी स्फुरेपर्यंत, पुन्हा सूर फुटेपर्यंत 

चालत राहावे .. अनिमिष .. 


बोगद्यातून बाहेर पडलो की मात्र ..  

मन निष्ठूर अन बुद्धी निबर होण्या आत 

भावनांचा चोळामोळा अन संवेदनांचा पाचोळा होण्या आत 

मागून घ्यावा बोगद्यातील भोगकाळाला विस्मृतीचा श्राप ... 


 रश्मी 

1 comment:

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...