Wednesday 2 September 2020

आयुष्यभर धावून धावून दमलेला असतो जीव .. त्यात तुम्ही नोकरी करणारे, घरचं बाहेरचं सगळंच सांभाळणारे असाल तर दमून, कावून, रापून गेलेला असतो जीव.. घरातल्या, गणगोतांच्या, संबंधातल्या, नात्यातल्या, माहितीतल्या, मैत्रीतल्या, भोवतालच्या सगळ्यांच्या फर्माईशी, इच्छा, अपेक्षा.. त्यांच्या त्यांच्या आपल्याबाबतीतच्या आकांक्षा पूर्ण करत राहणे, सगळ्यांची मर्जी सांभाळत जगणे .. अपरिहार्य असतं आॅफिस, तीथली कामं, कामाचा ताण, आॅफिस पाॅलिटीक्स, विवीध प्रकारची वृत्तीची माणसं सगळ्यांना फेस करणं, शिकणं शिकवणं, समजणं- समजावणं-समजून घेणं.. सतत गोतावळ्यात राहणं, सतत सगळं आणि सगळ्यांना ऍडजस्ट-मॅनेज करत राहणं .. पर्यायच नसतो तब्येतीच्या कुरकुरी तर कोपऱ्यातच ढकलायच्या .. या सगळ्यात मन दुखू द्यायचं नसतं .. दुखलं तरी दाखवायचं नसतं.. हसत राहायचं, सतत आनंदी दिसायचं .. या सगळ्यांवर उपाय म्हणून 'सुकून के पल' शोधत चार मित्र-मैत्रिणी शोधायच्या, एकत्र आणायच्या .. पण बरेचदा (नेहेमी नाही) इथंही फार वेगळं काही घडत नाही. माणसं कधी स्वार्थी असतात किंवा फार फार जजमेंटल निघतात.. कुठूनतरी कसेतरी पाठीत वार तरी होतात .. किंवा तुमच्या सहेतुक असण्यावरच प्रश्न चिन्ह उभे होऊन असला नसला सगळा डाव मोडून टाकतात. सगळं जोडून ठेवायचे, सगळ्यांना सोबत घेऊन चालायचे मैत्रीपूर्ण प्रेमपूर्ण वातावरणातील मूठभर आपल्या माणसांच्या सहवासाचे स्वप्नही भंगतेच कधीतरी .. पुन्हा नवा डाव.. पुन्हा पुन्हा तेच ..कंटाळतो जीव असे एक घर, एक दार - एखादी खिडकी, छोटेसे भगदाड तरी असावे वाटते .. आपल्या हक्काचे .. जिथून आत शिरताना आपण आहोत तसे स्वीकारले जावे, जिथे पूर्ण स्वातंत्र्याने वाटेल तसे वागता यावे - बोलता यावे. त्या दारानं-खिडकीनं-भगदाडानं आपल्याला जज करू नये, आपल्या वागण्या-बोलण्यावर प्रश्न उभे करू नये. तराजूत तोलून मापून धरू नये. आपल्या अश्या जश्या कश्या असण्यामागची कारणे समजून न घेता आपल्याला कसली कसली 'लेबलं' लावू नये. आपल्याला शिकवू नये आपल्याला बदलवू नये ...कुठल्या कुठल्या कथा-कादंबरीशी आपल्याला जोडून नसते दुषणं लावू नये. आयुष्याच्या संघर्षमय प्रवासात जे जे काही बरे-वाईट धगधगत असेल आतात खोल ते ते शमवता आले तर शमवावे किंवा शांतवावे जमल्यास; नाहीच तर निदान हवा देऊ नये. धरावा हातात हात आधाराचा .. नाहीच तर धक्का देऊ नये. दिसणं नाही असणं महत्वाचं आहे .. असण्याची जाणीवही पुरे आहे. या जाणिवा भक्कम करत राहणारे एखादे दार, एखादी खिडकी एखादे भगदाड भेटलेच कुठे तर ते जपावे ... नसेल तर आभासांच्या, मृगजळाच्या मागे धावून त्याच त्या पसाऱ्यात तसाच तसा पसारा वाढवत बसण्यात काय अर्थ आहे ?? असो .. आपल्यालाही कोणासाठी ते घर, दार .. नाहीच तर खिडकी किंवा भगदाड तरी होता यायला हवं .. निदान स्वतःसाठी तरी.. ©रश्मी पदवाड मदनकर

No comments:

Post a Comment

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...