तुझ्या डोळ्यांच्या कडा भिजल्या कि
माझ मनही ओलं गच्च होतं
तु गाळलेली नुसतीच टिपं …
'मन' पूर होऊन वाहायला लागतं  
तू निघून जातेस नंतर … अन तिथेच
अंशा अंशाने शिल्लक राहतं तुझं अस्तित्व
माझ्या मनातल्या थरथरत्या ओलाव्याचा
मग अपारदर्शी आरसा होतो
तुझ्या भावनांचा मग तोच वारसा होतो. 

तू निघून गेल्यावर झिरपत राहतो
आठवणींचा पाउस… न्हाऊन निघतो गारव्यात
आणि व्यापून राहतो उरात 
शुष्क श्वास, उसासे अन आर्त भाव
सांडून सगळे … पसरलेले असतात घरात
मी वेचत राहतो हे सारे कणाकणाने

 तुझ्या अश्रूंचा ओघ माझ्या नजरेत उतरतो
अवकाळी पावसाला जोर आता चढतो
रिमझिम रिमझिम झिरपत ठिबकत राहतो रात्रभर
भीजल्या मनाचा देह होऊन आखडून बसतो छतावर

तू निघून गेल्यावर … मी माझा उरत नाही
पापण्यांचा भिजका रंग पाठ माझी सोडत नाही
तू येउन पुन्हा एकदा अलगद हसू फुलवून जा
घरात पुन्हा तुझ्या आनंदाचे रंग उधळून जा

सखे एकदा येउन जा … !!

Comments

Popular posts from this blog

रागातून जागृतीकडे : आधुनिक स्त्रीचा आत्मभानाचा प्रवास !

राधा-अनय