Friday 7 September 2018

नक्की कुणाचा दोष आहे ??

चला कोणीतरी बोललं म्हणायचं - न भिता, न घाबरता, कोपऱ्यात बातमी न लावता कुठल्याही राजकारणाचे दडपण न ठेवता - माध्यमाची जबाबदारी बाळगत सत्य ठामपणे उघडावं वाटलं.... हितवाद तुम्ही अभिनंदनास पात्र आहात.



स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला नागपुरात झालेल्या त्या तीन विद्यार्थिनीच्या अपघाताबाबत शहरभर गदारोळ माजला, राजकारण पेटले, आरोप प्रत्यारोपाचा धुराळा उडाला. मोर्चे, आंदोलनं, धरणे आणि काय काय.. त्या दिवशी पूर्णसत्य माहिती नसल्याने बातम्यांचे पेव उठणे, वाऱ्याच्या वेगाने खोट्या अफवा पसरणे साहजिक होते, त्या अनुषंगाने दुसऱ्या दिवशी बातम्या छापून आल्या .. मान्य. पण नंतर सीसीटीव्हीचे फुटेज बाहेर आले. दूध का दूध आणि पाणी का पाणी व्हावं इतकं सगळं स्पष्ट झालं. प्रत्यक्षदर्शींचे स्टेटमेंट आणि पोलीस तपासणीतूनही अनेक बाबी समोर आल्या. इतकं सगळं खरं-खोटं कळाल्यावर आणि अपघातग्रस्त मुलींची नुसती चूकच नव्हती तर दखलपात्र गुन्हा होता हे लक्षात आल्यावरही कुठल्याच दुसऱ्या वृत्तपत्रांना त्यावर सत्य प्रकाशात आणणारी बातमी करावी वाटली नाही ?? अपघाताच्या दिवशी जे काही राजकारण झाले मृतदेहाला कार्यालयात ठेवून पैश्यांसाठी बारगनिंग करत व्यापार मांडण्यात आला, मृतदेहाच्या नावानं नोकऱ्या देण्यासाठी धमक्या देण्यात आल्या त्यावर कुणालाच आक्षेप घ्यावा वाटू नये?? पैसे एकदा ठीक आहे, पण... नोकरी का ? एखाद्या कामगाराचा कार्याच्या ठिकाणी जीव गेल्यास त्याच्या पाठी राहणाऱ्या घरच्या मुख्य व्यक्तीस नोकरी दिली जाते कारण गेलेली व्यक्ती हि त्यांच्या घरची उपजीविका चालवणारी मुख्य व्यक्ती होती असे गृहीतच असते...ह्याला आक्षेप असण्याचे कारणच नाही ..पण अपघात झाला म्हणून नोकरी ?? हा कोणता नवा नियम आहे?? एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्याबद्दल काहीही वाईट बोलू नये हे आपले संस्कार आहेत हे मान्य असले तरी, जाणारा व्यक्ती गुन्हा करून जात असेल आणि त्याच्या गुन्ह्याची शिक्षा दुसरं कुणाला तरी भोगावे लागणार असतील तरीही बोलू नये का ?? कॉलेज मधून बंक करून पळून जाणाऱ्या ३ मैत्रिणी, लायसन्स नसतांना एका गाडीवर ट्रिपल सीट बसून हेल्मेट न घालता ८० च्या वेगाने मागल्या ५० गाड्यांना ओव्हर टेक करत रस्त्याच्या शेवटच्या टोकावरून धुंदीत मस्तीत गाडी पळवत आणतात, वेग इतका कि रस्त्याच्या फुटपाथला टेकलेल्या अगदी टोकाशी असलेल्या नाल्याच्या झाकणापर्यंत आल्यावर वेगावर कंट्रोल करता येत नाही मग पुढे असलेला विजेचा खांब आणि ऑटोला ओलांडताना ब्रेक लागत नाही वेगावर कंट्रोल होत नाही, तोल जातो आणि पोरी भरधाव गाडीसह घसरून घासत सरळ क्रेनच्या खाली फेकल्या जातात, आपल्या सरळ मार्गाने ठराविक वेगात जाणाऱ्या क्रेनखाली.
जीव गेले .. एक नाही तीन तीन .. दुःख आहे खूप आहे सगळ्यांना आहे ... गेलेला जीव कशानेही भरून देता येत नाही पण, दाक्षिण्य नावाचा प्रकार असतो म्हणून शासन किंवा संस्था दवाखान्याचा होणारा खर्च वगैरे भरून देतात ... पण मृतदेह दारात ठेवून आत्ताच्या आत्ता एक करोड आणि नोकरीचे कागद हातात द्या असं शिवीगाळ करत सांगणारा भाऊ आणि दुसऱ्या मुलीचे आईवडील कशाच्या बदल्यात नोकरी मागतात हा प्रश्न अजून अनुत्तरित आहे.
घरच्यांनी मुलींना कधीही नियमात राहा असं खडसावलं नाही किंवा त्या रहदारीचे नियम पाळतात का याकडे लक्ष दिले नाही याची बक्षिसी हवीये का ?? कि मुलींनी भर रस्त्यावर एक सोडून अनेक चुका केल्या त्यांच्या त्या चुकीने पुढल्या मागच्या अनेक जणांचेही जीव जाऊ शकले असते... त्याबदल्यात त्यांच्या सत्काराप्रीत्यर्थ त्यांच्या घरच्यांना नोकऱ्या द्यायच्या ?? नोकरी कुणाला द्यावी ... जो डिझर्विंग कॅन्डिडेड आहे त्याला कि त्याला जो आयुष्यभर सगळ्या सरकारी सोयी सवलती मिळूनही ना शिक्षणासाठी ना स्वतःला कशाच्या लायकीचे बनवायला मेहेनत करतात फक्त संधीची वाट पाहतात .. संधी मिळाली कि लगेच त्याचे भांडवल करून स्वतःचे भविष्य सेक्युर करून घेतात.. अगदी अगदी बहिणीच्या किंवा मुलीच्या मढ्यावर बसून बोली लावावी लागली तरी चालणार असतं त्यांना.. कारण असंच नाकारात्मकतेची राजनीती करून एक एक पायरी वर चढून बसलेली राजकारणातली बांडगुळे असतातच कि मदतीला. या राजकारण्यांच्या खिशातलं काय जाणार असतं.. यांचं काय नुकसान आहे यात ? राजकारणातून तमाशे उभे करून कुणाच्यातरी खिशातून ५० जणांचं काढायचे आणि पुढे दोघांची झोळी भरायची, मग त्या दोघांच्या जातीवर पुन्हा भाकऱ्या भाजायच्या, संपूर्ण समाजाचे समर्थन आणि मतं लाटत राहायचे जन्मभर. बाकी जातीयवादी किती आंधळे असतात हे वेगळे सांगायला नकोच... पण या साऱ्यात प्रामाणिक कष्ट उपसून अभ्यास करून, कुठल्याही राजकारणात न पडलेल्या, नाकाच्या सरळ रेषेवर चालून स्वतःला सक्षम बनवण्यात आयुष्याचे अनेक वर्ष खर्ची घातलेल्या अनेक डिझर्विंग कॅन्डीडेटचे हक्क हिसकावले जातात त्याचे काय ??
कसलं उदात्तीकरण चाललंय हे ? कुठला समाज .. काय वातावरण निर्मिती करतोय आपण आपल्या पुढल्या पिढीसाठी ? काय शिकवण घ्यावी आजच्या पिढीने यातून ? चूक हि चूकच असते आणि चुकीला बक्षीस नाही शिक्षाच मिळते ... कि मग रोहित वेमुला सारख्यांनी आत्महत्या केली कि त्यांना घरोघरी दारोदारी प्रसिद्धी प्राप्त होते, ते लोकांसाठी हिरो ठरतात ... तुम्ही चुका चुका, चुकत राहा आणि मृत्यू जा.. काही फरक पडत नाही तुमचे ना सही तुमच्या कुटुंबाचे पुढल्या पिढीचे भविष्य सेक्युर होईल ?? मग उद्या त्यांना अभ्यास मेहनत करून, कष्ट उपसून नोकरी मिळवण्यापेक्षा, काहीतरी चांगले करून नाव कमावण्यापेक्षा .. नाव कमावण्यासाठी अपघाती मृत्यूचा किंवा आत्महत्येचा मार्ग सोपा नाही का वाटणार ? चुका झाल्यावर सरकार, राजकारणी मदत करणार असतील, नोकऱ्या मिळवून देणार असतील तर कशाला करा मेहनत, कशाला स्वबळावर जग जिंकण्याचे स्वप्न बाळगा .. स्वाभिमान-स्वसन्मान घालूया खड्ड्यात,, देऊया ना एखाद्याचा बळी किंवा स्वतःचाच देऊया कुटुंबासाठी तेवढंच पुरे... हेच नाही का उदाहरण कायम होतंय ? आपण आपल्या हाताने आपली पुढली पिढी नासवतोय का ? विचार करा जरा..
कुठे जाते आहे आजची पिढी. घरात मिळणारे संस्कार, घरातल्या मोठ्यांच्या वागणुकीतून दिसणारे आत्मसात होणारे तत्वमूल्य संपुष्टात आले का? आणि म्हणून समाजात राहण्यासाठी सगळ्यांसाठी सोयीचे असणारे कायदे जाचक वाटू लागले आहेत. आम्हाला आमचे अधिकार फार प्रखरतेने ठाऊक आहेत आणि आम्ही त्यासाठी आग्रही देखील आहोत पण कर्तव्याचे काय?? संस्कार-मूल्य-तत्वांनाही जातपात, भगवा-निळा-हिरव्याशी जोडण्यापर्यंत राजकारण आमच्या बैठकीतून शयनकक्ष आणि माजघरापर्यंत येऊन पोचला आहे. राजकारण आमच्या घरात शिरले नाहीये, कदाचित आम्हीच राजकारणात गरज नसतांना नको तितके हस्तक्षेप करू लागलो आहे.. आमची मानसिकता बरबटली, तशीच मानसिकता सेट होत चाललीय का आजच्या पिढीत .. आम्ही पालक म्हणून कुठेतरी चुकतोय आणि त्यात राजकारणातल्या कोणत्याही पार्टीचे नाहीतर आपल्याच कुटुंबाचे नुकसान होत चाललेय हे लक्षात का येत नाहीये कुणाच्या ? आजच्या पिढीतल्या मुलांच्या वैचारिक बौद्धिक, मानसिक जडणघडणीत या साऱ्यांचा फार विपरीत परिणाम होत आहे हे कधी कळेल आम्हाला ??
हे सगळं खरतर कुणीतरी लिहायला, प्रकाशित करून लोकांपुढे आणायला हवं होतं... कुणीतरी तर राजकारण कोपऱ्यात ढकलून अनवट वाट धरावी .. खऱ्याची सत्त्याची बाजू मांडण्याचे जिगर ठेवावे. पण असे होतांना दिसत नाही. जेव्हा जेव्हा वातावरण तापेल तेव्हा आम्ही फक्त आमच्या भाकऱ्या भाजून घेणार .. वातावरण तापवणाऱ्याच्या विरोधात कसे बोलायचे बरे.. बऱ्याचअंशी कमाई त्याच्यावर पण तर अवलंबून आहे ना.. तत्व बाळगणारे पत्रकार आणि तत्वांवर चालणारे माध्यम कल्पनेतच उरणार आहेत एकदिवस. लोकांचा पूर्ण विश्वास गमावल्यावरच डोळे उघडून परतीचा मार्ग धरेल पत्रकारिता असं वाटू लागलंय.
तर ...असो ...

No comments:

Post a Comment

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...