Monday 15 February 2016

संघर्ष दारूबंदीसाठी !!

 दारूचा विषय आला की बव्हंशी पुरुषांची त्यावर एकछत्री मक्तेदारी असते. महिलांचा त्याच्याशी संबंध आलाच तर तो संघर्षाचा, दुःखाचा. दारूने आयुष्य उध्वस्थ होतात, संसार पणाला लागतात हे कितीही ओरडून सांगितले तरी त्याचा परिणाम नेहमी शून्यच. निव्वळ प्रबोधनाने बदल घडत नाही त्यासाठी लढा द्यावा लागतो, संघर्ष करावा लागतो, वेळ पडलीच तर त्यागही करावे लागतात. आणि असा लढा देणे सगळ्यांनाच शक्‍य होत नाही. नागपुर शहरालगतच्या हिंगण्यामध्ये निलडोह-डीगडोह परिसर आहे. तसे सुखासुखी जगणारी लोकं. भांडणतंटा नाही किंवा फार मोठ्या अडचणी नाहीत. एकदिवस मात्र अचानक मिळालेल्या एका बातमीने हादरला. गजानननगर मध्ये रहिवासी भागात जिथे सभ्य लोकांची वस्ती आहे, तिथेच शेजारी प्रार्थनास्थळ, शाळा आहे. अशा ठिकाणी दारूदुकान लागणार असल्याचे कळले आणि गावातील महिलांसमोर मोठा प्रश्‍न उभा ठाकला. सुखासुखी चाललेल्या आयुष्यात चटकन कुणीतरी मिठाचा खडा टाकावा, अशी स्थिती झाली. कुणालाच हे दुकान नको होते. पण पुढे होऊन लढणार कोण हा मोठाच प्रश्न होता. अशावेळी रचना कन्हेर पुढे सरसावल्या.

रचना मागील तीन वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. हिंगणावासीयांच्या मनात त्यांनी मानाचे स्थान मिळवले. प्लास्टिक बंदी, बाजारात महिलांसाठी शौचालय, महिलांसाठी व्यवसाय सुरु करून दिला, महिला समस्या निवारण आणि समुपदेशन केंद्र उभारलं, फिरते लोकन्यायालय उपलब्ध करून दिले. असे अनेक समाजपयोगी कामे त्यांनी केलीत. आणि आता दारू दुकानाच्या विरोधात सर्व महिलांना सोबत घेऊन त्यांनी लढा उभारला. नियमांची पायमपल्ली करून, खोट्या कागदपत्रांवर परवानगी मिळवून दुकान सुरु करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे त्यांच्या लक्षात आले. येथून सुरू झाला रचना आणि टीमचा संघर्ष. पहिला लढा द्यावा लागला तो यांच्याच सौरक्षणाची जबाबदारी असणाऱ्या स्थानिक पोलिस स्टेशनशी. स्थानिक पोलिसांचे सहकार्य तर मिळत नव्हतेच परंतु ह्यांचा लढा विचलित करण्याचा प्रयत्न होत होता म्हणून रचनाच्या पुढाकारात महिलांनी जिल्हा अधिकारी, राज्य उत्पादन शुल्क अधिकारी आणि सोबतच पालक मंत्र्यांना आणि पुढे थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊन त्यांना भेटून निवेदन दिले. दरम्यान दारू दुकानदाराचे आडून धमकावणे, प्रलोभनं देण सुरूच होते. जेवढा महिलांचा लढा तीव्र होत गेला तेवढेच विरोधकही आक्रमक होत गेले. गावात अफवा पसरून रचनावर आरोप झाले, लांछनही लावण्यात आले पण रचना न डगमगता झगडत होती. खोट्या कागदपत्रांचा आणि त्यावर अधिकाऱ्यांनी दिलेल्या परवानगीचा भांडा फोड केल्यावरही आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून स्थगिती मिळवूनही त्याच रात्री दुकान सुरु करण्याचा प्रयत्न केला गेला. ते थांबवण्याचा प्रयत्न केला असता महिलांवर खोटे आरोप लावून त्यांना अटक करून पोलिसी कलमा लावण्यात आल्या. दुकान पेटवून देऊन त्याचा आरोप महिलांवर लावण्याचे निष्फळ प्रयत्न झाले, माध्यमांना हाताशी धरून या आंदोलनाला चुकीचे स्वरूप देण्याचा महिलांना बदनाम करण्याचे षड्यंत्र रचले गेले. गावातल्या लोकांमध्ये राजकारणी खेळी सुरूच होती. महिलांच्या एकीचे बळ तोडण्याचा प्रयत्नही झाला पण रचना न डगमगता एक एक पाउल पुढे जात राहिली. महिलांनी रात्री बेरात्री सभा घेतल्या. रात्र रात्र जागून गश्त घातल्या.  हे सगळ कठीण होत, त्रासदायक होत पण महिलांनी रचनाला साथ दिली आणि संघर्ष सुरु ठेवला .प्रशासन, शासन, अधिकारी आणि नेते प्रत्येकांनी आश्वासन दिलीत. दुकान सुरु होऊ देणार नाही त्यासाठी आंदोलनात सहभागी असल्याचेही वर्तवले पण प्रत्यक्षात मात्र क्षणाक्षणाला विरोधक जिंकत असल्याचे जाणवत होते. त्याच्या हालचाली वाढल्या होत्या. आंदोलनकारी महिलांना दूर ठेवण्यासाठी कुटील खेळी खेळून त्यांचे मानसिक खच्चीकरण करून शेवटी दुकान उघडले गेले. या प्रकरणाला जवळ जवळ १० महिने होतायेत रचना आणि त्यांच्या महिला अजूनही लढा देत आहेत. निव्वळ एक गाव नाहीतर संपूर्ण तालुका दारूबंद करायचा असा त्यांचा ध्यास आहे. मुलींवर अत्याचार, घरगुती हिंसा, चोरी, दंगे या सर्व विकृतींच्या मागे दारू हे मुख्य कारण असेल तर मुळावरच घाव घालायला हवा असे रचनाचे मत आहे.

 ''खरतर नियमातच बदल करायला हवेत. नव्या दारू दुकानासाठी परवाने लागतात परंतु दुकान बदलीसाठी कुठलेही नियम नाहीत एकीकडे शासनाद्वारा व्यसनमुक्तीसाठी मोहीम राबवली जातात आणि दुसरीकडे नवनवीन दुकान नको त्या परिसरात थोपवली जातात त्यासाठी नियम शिथिल केले जातात. आणि याबाबत ग्रामपंचायतीकडे कसलेही अधिकार नसतात '' हे खरतर रचनाचं दुःख आहे. तालुक्याअंतर्गत येणाऱ्या सर्व ग्रामपंचायतीची मदत घेऊन त्या या नियमांमध्ये बदल व्हावा यासाठीही प्रयत्नरत आहेत. आणि जोपर्यंत तालुका दारूमुक्त होणार नाही तोपर्यंत हे सेवाव्रत निगुतीने करत राहण्याचे त्यांचे मानस आहे . श्रमसेवेच्या आस्थेपोटी सर्वस्व झोकून देऊनही प्रशंसा आणि प्रसिद्धीपासून दूर समाजासाठी वेगळ्या वाटा शोधणाऱ्या नागपूरच्या मुठभर माणसांमध्ये आज रचनाचे नाव गणल्या जातंय ते त्यांच्या सेवाभावी लढवैय्या प्रवृत्तीमुळेच.     

     
(दैनिक 'सकाळ' च्या ''हिरोज ऑफ द सिटी'' मालिकेसाठी लिहिलेला लेख.)                

No comments:

Post a Comment

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...