Thursday 13 August 2015

स्वगत .. डेस्टीनेशन !

पावसाळ्याचे दिवस अतिशय देखणे, ओले-गार अन हिरवाईने नटलेले असतात पण कधी लक्षात आलंय का तुमच्या ह्याच दिवसात अनेकदा एक अनामिक उदासीनता जाणवते. जसजसे वातावरण आर्द्र होत जाते उन्ह गळून पडतं अन भरदिवसा अंधारून येतं. घरातून बाहेर पडण्याचे मार्ग बंद झालेले असतात आणि खिडकीत बसून सारख्या पडणाऱ्या पावसाकडे पाहण्याचाही कंटाळा येतो. घरात दडून बसावं वाटत नाही आणि बाहेर पडणेही शक्य नसते अश्यावेळी मरगळ येते. इकडे आकाशात ढग अन मनावर मळभ एकत्रच दाटून येऊ लागतात. विचारांचे वारे वाहू लागतात आणि आपण आपल्याही नकळत आयुष्याचे वादळ आपल्याच पुढ्यात मांडून बसतो. काय चाललंय आपलं नेमकं आपल्यालाच कळत नाही. प्रचंड आवडणारा पाऊस; हवाहवासा वाटणारा, वर्षभर वाट बघायला लावणारा पाऊस आज असा उदासवाणा का वाटतोय ह्याचं उत्तर आपलंच आपल्याकडे नसतं. मग आणखी बऱ्याच गोष्टी आठवू लागतात. आयुष्यात कधीपासून आपल्याला काय काय 'इगरली' हवं होतं. आयुष्याकडून आपली हट्टाची मागणी काय होती? ह्याची यादी मनात-डोक्यात जागा घेऊ लागते. एक एक मागणी एक एक गरज.. अश्या गोष्टी ज्याशिवाय मला जगणे शक्य नाही किंवा जगायचेच नाही असे वाटायचे.. ते ते सगळे मिळाले का ? सगळ्या नसतील झाल्या मागण्या पूर्ण पण..पण बऱ्याचअंशी झाल्यातच कि .... ज्या नाही झाल्यात त्या शिवायही आज जगता येतयच ना आपल्याला. मग ते 'न' मिळवून असं काय गमावलंय? नाहीच काही... मग का त्रास करून घेतला आपण मनाला-जीवाला त्या त्या वेळी. कित्तेक महिने कित्तेक काळ दुःखात काढले ....आणि 'त्या' न मिळालेल्या गोष्टींशिवायाही आज सुखी असू तर तो तेव्हाचा त्रास ती जीवाची तगमग सारं फुकटच गेलं म्हणायचं का ??
 
आणि ज्या गरजा ज्या मागण्या पूर्ण झाल्यात त्याचं काय केलं आपण ?? 'त्या' मिळवून असा काय तीर मारून घेतलाय किंवा 'जे' मिळालंय त्या मागे लागलेली धावपळ, केलेले कष्ट, तीव्र इच्छाशक्ती या सर्वांना प्रामाणिक जागतोय का आपण. 'ते' मिळवण्यासाठी आयुष्याचा वेळ, श्रम अन एनर्जी घालवलीय त्याची आजही तितकीच Value आहे का आपल्या लेखी ? कि जी काही धडपड होती, जीवाची तगमग होती, जेवढे दिवस कष्ट घेतलेत जेवढ्या रात्री काळजीत काढल्या ते सगळं सगळं केवळ अन केवळ 'हवं ते' मिळेपर्यंत / मिळवेपर्यंतच होतं. ते मिळाले अन तत्क्षणीच त्याचे पूर्वी असलेले महत्व, ती गरज आपल्यालेखी संपुष्टात आली होती. मग पुन्हा नवी मागणी, नवी इच्छा, नवी गरज घेऊन आपण नव्याने आतुर झालो. नव्याने बेचैन होऊन कामाला लागलो. पुन्हा रात्र जागल्या अन दिवसा दगदगीत काढू लागलो. कष्ट उपसु लागलो... तहान भूक विसरलो.

हो ... होतंय खर असंच ना ?? जे आता या क्षणी आहे जे मिळालंय ते मिळाल्याचं सुख तर त्या त्या वेळी उपभोगायचं राहूनच गेलं. ज्या सुखासाठी तडफडत होतो ते सुख दारात असतांना आपण एक पायरी ओलांडून व्हरांड्यातून पुढे निघून गेलोत. ते प्रचंड हवं असलेलं, गरजेचं, आवडीचं  आपल्या दारात आलंय एवढंच कसकाय पुरे होतं आपल्याला. एवढी जीवाची तगमग बस एवढ्याचसाठी होती...असं कस? ह्याचा विचार केलाच नाही कधी. जे मिळालंय त्याचा आनंद उपभोगायचा नव्हताच तर कशासाठी जीवाला एवढा त्रास दिला? आपण नुसतेच धावतोय का? कुठे जातोय, कशासाठी, कुठे पोचणार ह्याचा विचार न करता पळतोय नुसते. डेस्टीनेशन माहितीच नसेल तर धावण्याचाही उपयोग काय ?  जे मिळालं नाही त्यासाठी भोगलेलं दुःख अन जे मिळालंय त्यासाठी उपसलेले कष्ट सारंच कसं पाण्यात जातंय आपलं का ?

ऊम्म्म्हं ! असं नाहीये खरतर ..जे मिळालं नाही त्याशिवायही जगता आलं सर्व्हाइव केलं हीच आपण त्या क्षणांतून मिळवून घेतलेली 'स्ट्रेन्थ' आहे... जीवन जगण्यासाठी शिकलेला एक नंबरी 'फोर्मुला' जो आयुष्यभर कामी येणारेय. अन जे मिळवलंय त्याचा आनंद घेताच आला नसेल तर मिळवूनही स्वतः स्वतःच्या हातानं स्वतःच सुख आपण घालवलंय, मिटवून टाकलंय . म्हणजेच मिळवणे हे नेहेमी मिळवणे असतेच असे नाही आणि गमावणे म्हणजे मिळवणे नसतेच असेही नाही. किंवा अगदी ह्या उलट देखील.

हे सगळं असंच आहे कि मी उगाच बडबडतेय ... बापरे ...  वेडगळ विचार ऐकून पाउसही थांबलाय आता. निघायला हवं खूप कामं पडलीत ... बाकी पुन्हा कधीतरी

क्रमशः          


रश्मी / 12-08-15       

4 comments:

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...