Wednesday 25 September 2019

लढा स्त्रीवादाचा !


'फेमिनिज्म म्हणजे ब्रा जाळून मिश्या वाढवणे नव्हे' - sonam kapoor
- रश्मी पदवाड मदनकर



'फेमिनिज्म म्हणजे ब्रा जाळून मिश्या वाढवणे नव्हे' असे वक्तव्य करणारी सिने अभिनेत्री सोनम कपूर हिने पुन्हा एकदा हा सार्वकालीन वाद पटलावर आणला आहे. स्त्रीवाद हा विषय तसा आजचा नाही. स्त्रीस्वातंत्र्य आणि समानतेसाठी पुरुषप्रधान समाजाशी दोन हात करण्याची स्त्री चळवळ अनेक दशकांपासून चालूच आहे. स्त्रीवादी चळवळीचा हेतू स्त्रियांना राजकीय, आर्थिक व सामाजिक हक्क आणि समान संधी याची जाणीव करून देणं, तिला आत्मनिर्भर बनवणं इतकाच नाहीये, तर हे साधताना आर्थिक स्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य आणि निर्णयस्वातंत्र्य म्हणजे नेमके काय याचे स्पष्टीकरण करणे आहे,’ असे एकदा अरुणा ढेरे म्हणाल्या असल्याचे आठवते. चित्रपट, साहित्य, कलाक्षेत्रातील अनेक नामवंतांचे याबाबतचे मत-मतभेद अनेकदा चर्चेचा विषय होत राहिलेला आहे. आजही स्त्रीवादाचा प्रश्न निर्माण झाला की त्याची परिभाषा अनेक स्तरातून होत असते. गेले वर्षभर महिलांशी जुळलेल्या प्रश्नांनी सोशल मीडिया ओसंडून वाहत होता, गेल्या वर्षभरात 'हैशटैग मी टू' ने सोशल मीडियाचा फार मोठा भाग आणि काळ व्यापला होता. हॉलिवूड चित्रपट निर्माता हार्वे विंस्टीनवर अनेक महिलांनी लैंगिक अत्याचाराचे आरोप लावले होते आणि तिथून सुरु झालेल्या आरोप प्रत्यारोपाचे रूपांतर आंदोलनाच्या स्वरूपात जगभर पसरत गेले, वर्ष सरता सरता हे आंदोलन फक्त चित्रपट सेलिब्रिटीजपुरते मर्यादित न राहता, लेखक, पत्रकार, सैन्यातले अधिकारी, राजकारणापासून ते न्यायमूर्तीपर्यंत चिघळत गेले. अंतर्राष्ट्रीय खेळाचे रिपोर्टींग करणाऱ्या महिलांचे व्हिडीओ वायरल झाले, अनेक एमएमएस, ऑडिओ नोट, मॅसेजेस चव्हाट्यावर आणले गेले. पण हे किती महत्वाचे होते हे हळूहळू लक्षात येऊ लागले आणि ही साधी दिसणारी मोहीम जगव्यापी आंदोलनात परावर्तित झाली. हा ट्रेंड सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरु झाला होता, हे आठवण्याचे विशेष कारण म्हणजे सोनम कपूरने लग्नानंतर सासरचेही नाव तिच्या नावासह जोडले आणि स्त्रीवादींनी तिच्या नावाने शंख फुंकायला सुरुवात केली. त्याचे प्रत्यत्तर म्हणून हल्लीच एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सोनमने 'स्त्रीवाद' म्हणजे फेमिनिज्मचा खरा अर्थ काय हे प्रत्येकीने समजून घेणे आवश्यक आहे स्त्रीवादाचे ढोंग करणे म्हणजे स्त्रीवाद नाही असे परखडपणे सांगितले. स्त्रीवादी असण्याचा खरा अर्थ आहे प्रत्येक गोष्टीत समानता. तुम्ही तुमची ब्रा जाळून मिशा वाढवणे हा काही स्त्रीवादाचा अर्थ नाही. अनेक अभिनेत्रींना स्त्रीवादाचा खरा अर्थच माहीत नाही. आता बदलत्या काळानुसार सर्वांनीच स्त्रीवादाचा अर्थ समजून घेतला पाहिजे. समाजात स्त्री-पुरूष असा भेदभाव आहे. यात बदल होईल अशी आशा आहे. अनेकांचा हा फरक दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे.' 'फेमिनिज्म म्हणजे ब्रा जाळून मिश्या वाढवणे नव्हे' तिच्या या वाक्याचा बुरा-भला प्रभाव व्हायचा तो झालाच आणि सोशल मीडिया पुन्हा एकदा ढवळून निघाले. स्त्रीवादाचा जो काही नवा अर्थ सोनमच्या वक्तव्यातून उद्धृक्त होतो आहे त्याचे महत्व समजून घेणे महत्वाचे ठरते.


योगायोगाने १९६८ साली ७ सप्टेंबर रोजी अमेरिकेतील एका सौन्दर्यस्पर्धेत स्त्री-समानतेच्या हक्कासाठी २०० स्त्रीवादी महिलांनी अंतर्वस्त्र जाळून निषेध व्यक्त केला होता, अमेरिकेतील 'ब्रा बर्निंग' या प्रातिनिधिक घटनेला ५१ वर्षे पूर्ण झाली आहेत. या निषेध आंदोलनाचा उद्देश ''स्त्रियांच्या शरीरापेक्षा तिच्या बुद्धीवर लक्ष केंद्रित व्हावे आणि तिच्याकडे मानवतावादी दृष्टीने पाहिले जावे'' असा होता.

काळ सरता सरता आज इथवर पोचेपर्यंत अश्या चळवळीचे स्वरूप बदलत गेले असले तरी समस्या सुटली नाही, मुद्दा कायम आहे बदललेल्या काळाचे स्वरूप समजून घ्यायला अलीकडच्या काळात होऊन गेलेल्या स्त्री आंदोलनांची काही उदाहरण पाहणं महत्वाचं ठरेल.

> २०१० ऑगस्टमधे लॉस अ‍ॅन्जलेसच्या सुप्रसिध्द व्हेनिस बिचवर एक मोठा चळवळीचा ग्रुप, विशेष म्हणजे स्त्री -पुरुष दोन्ही समान संख्येनी एकत्र जमला होता. स्त्रियांच्या हक्कांसाठी लढा देणारे हे संघटन होते. 'गो टॉपलेस इक्वालिटी राइट्स' हा या आंदोलनाचा विषय होता.
त्यांच्या म्हणण्यानुसार 'अ‍ॅज लाँग अ‍ॅज मेन आर अलाउड टु गो टॉपलेस इन पब्लिक विमेन शुड हॅव द सेम कॉन्स्टिट्युशनल राइट ऑर एल्स मेन शुड हॅव टु वेअर समथिंग टु कव्हर देअर चेस्ट्स.' त्यांच्या वेबसाइट वर लिहिलल्याप्रमाणे, अमेरिकेसारख्या समान हक्काचा दावा करणार्‍या देशात स्त्रियांना या गोष्टीसाठी दंड होणे, हाकलून लावणे, अपशब्द ऐकावे लागणे अश्या अपमानास्पद गोष्टींना सामोरे जावे लागते त्याच गोष्टीसाठी पुरुषांना मात्र पूर्ण मान्यता आहे ही गोष्ट त्यांना इक्वल राइट्सवर आणलेली गदा वाटते.

> या विरुद्धही काही पाश्चात्त्य देशात 'बुरखा न घालु देणे' ही मुस्लिम स्त्रियांच्या हक्कावर आणलेली गदा असे वाटणार्‍या बऱ्याच मुस्लिम महिला आहेत, 'इफ आय कान्ट वेअर बुरखा, इट्स नॉट माय रिव्हॉल्युशन' या विचारांच ते समर्थन करतात. त्या स्वतः बुरखा घालतातच असेही नाही, काही हिजाबही घालतात. पण पाश्चात्य लोकांनी बुरख्यावर बन्दी घालणे हे त्यांना कट्टरपंथीय मुस्लिम देशांच्या बुरखा कंपलसरी करणे, किंवा इतर कडक कायद्या इतकेच अन्याय झाल्यासारखे वाटते !

पुरुषप्रधानतेच्या इतर सिद्धांतांच्या इतिहासात उदारमतवादी स्त्रीवादाचा इतिहास खूप जुना आहे. अठराव्या शतकाच्या सुरूवातीस, स्वातंत्र्य आणि समानता या लोकशाही मूल्यांनुसार स्त्रियांच्या बाबतीतला विरोधाभास उदारमतवादी स्त्रीवादींनी अधोरेखित केला. मेरी वॉलस्टोन क्राफ्टने १७९० च्या दशकात लंडनमधून पहिल्यांदा प्रकाशित झालेल्या 'सपोर्टिंग द राईट्स ऑफ वुमन' या लेखात महिलांच्या हक्कांसाठी परखडपणे लिहिले. संयुक्त राष्ट्रात १८४८ मध्ये सेनेका फल्स संमेलन झाले ज्यात महिलांच्या अधिकारांसाठी पहिल्यांदाच आंदोलन झाले होते. भारतीय स्त्रीवादाची सुरुवात मात्र त्यामानाने सुदैवी होती एकतर ती स्त्रीवादापेक्षा स्त्रीमुक्तीची लढाई होती आणि त्यासाठी महिलां पुरुषांचा सहभाग होता, अनेक बुरसटलेल्या प्रथा परंपरेच्या जोखडातून इथल्या स्त्रीला स्वातंत्र्य मिळालं असलं तरी मानसिकता बदलण्याचा संघर्ष तिचा अजून संपलेला नाही. मुस्लिम समाजातील महिला त्यांच्या हक्कांसाठी पुढाकार घेऊ लागल्या तो अगदी आत्ता आत्ताचा काळ, याची सुरुवात झाली ३ ते ५ ऑगस्ट २००७ रोजी पुण्यात एका राष्ट्रस्तरीय बैठकीत ३० महिलांनी एकत्र येऊन केली होती. या आंदोलनानंतर मुस्लिम महिलांचे धाडस वाढले, युगानुयुगे जखडलेल्या बेड्या गळून पडू लागल्या, लादलेली बंधने झुगारली जाऊ लागली आणि अन्यायाला वाचा फुटू लागली.


गेल्या अनेक वर्षात स्त्री पुरुष असमानतेचे कवच भेदून हे दोन्ही वर्ग सहशिक्षण, सहकारी म्हणून एकत्र कार्य करीत आहेत. स्त्री-पुरुष मैत्री हा देखील आता अचंभित करणारा विषय राहिला नाही. पण म्हणून एवढ्याने परिस्थिती बदलली आहे का? महिलांच्या शिक्षणाचे प्रमाण वाढले पूर्वीपेक्षा तिच्या स्वातंत्र्यताही वाढ झाली असली तरी स्त्रीकडे पाहण्याच्या समाजाच्या दृष्टिकोनात-मानसिकतेत बदल झाला आहे का? हा कळीचा मुद्दा आहे. आजही निरनिराळ्या कवितांमधून लेखांमधून ' आई -बहिण-पत्नी-सखी' अश्या अपेक्षा अधोरेखित करत 'स्त्रीत्त्व' बंदिस्त करण्यात येतेच.. ते बदलून मुळात आधी एक 'माणुस' म्हणून समाजाने स्त्रीचा आदर करणे महत्वाचं आहे. पात्रता असताना समाजात समान वागणुक न मिळणे, रुढी परंपरांच्या नावाखाली आपेक्षांची ओझी लादणे, हुंडा, सेक्शुअल हॅरेसमेन्ट, विचार आणि निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य अजिबात नसणे, या गोष्टी आधी बदलल्या पाहिजेत. आजही एकविसाव्या शतकात तिला तिच्या हक्कांसाठी, तिच्यावर झालेल्या अन्यायांसाठी-अत्याचारांवर शासनाने, समाजाने दखल घ्यावी म्हणून आंदोलनं करावे लागणार असतील. तिच्या हक्कांसाठी न्यायासाठीचे निर्णय पुरुषांच्या संघटना घेणार असतील तर आमचा समाज कितीही विकसित झाला तरी काय उपयोग, खरच, स्त्रियांचे समान ह्क्क खूप दूरची गोष्ट आहे मुळात मुलीने जन्म घ्यावा कि नाही, मुलगी जन्मलेली जगू द्यायची कि नाही, तिच्या अथपासून इतिपर्यंत समाज मुलीला मुठीत ठेवू इच्छितो. स्त्रीच्या आयुष्याचं, तिच्या अस्त्तित्त्वाचं दृष्य थोडंफार बदललं असलं, तरी इथे 'पेला अर्धा भरलाय' म्हणून समाधान मानता येत नाही. खूप काही व्हायचं आहे. एकूणच वैश्विक समाजाची मानसिकता बदलण्याची, या दिशेनं सुसंस्कार घडवलेली पिढी तयार होण्याची नितांत गरज आहे. म्हणजेच अजून थकून थांबता येणार नाहीये .. प्रवास अजून चालू आहे.

हा सुरुवातीपासूनचा सगळा काळ स्त्रीअधिकाराच्या आंदोलनाच्या संघर्षाचाच काळ नव्हता तर प्रस्थापितांच्या आखून दिलेल्या लक्ष्मण रेषेला मोडणारी स्त्री म्हणून त्या मोबदल्यात पुरुषसत्ताक समाजाकडून अवहेलना सहन करण्याचाही काळ होता. हि जखडलेली बंधने झुगारतांना तिने उचललेला पवित्रा हा त्या स्त्रियांना पुरुषविरोधी स्त्री किंवा समाज चौकट लांघणारी बाई असं संबोधन करू लागली तिच्याबाबत नकारात्मक भाव पोसू लागला. इतकेच कशाला, तिच्या केसांच्या-कपड्यांच्या लांबीवरून, लिपस्टिकच्या रंगावरून किंवा चपलांच्या हिलवरून तिच्या चारित्र्याची मोजमाप करण्याची मानसिकता आजही दिवसेंदिवस वाढतच आहे. म्हणूनच सुरुवातीपासून समानतेचा लढा देतांना स्त्री-पुरुष समान कसे ह्याचे पुरावे देण्यासाठी अनेक सोंगे तिला घ्यावी लागली. पुरुषांच्या सवयी स्वीकारण्यापासून त्याच्यासारखा पेहेराव करण्यापर्यंत.. त्याच्यासारखी नोकरी-व्यवसाय करण्यापासून ते त्याच्यासारखी व्यसनं कारण्यापर्यंतही तिने मजल मारली. मात्र हे करतांना स्त्रीची नकारात्मक छबी प्रस्थापित होऊ लागली. या सर्वांपलीकडे पाहणारी आजची स्त्री पुन्हा बदलतांना दिसते आहे. मी पुरुषासारखीच आहे म्हणून मला समान अधिकार द्या असे म्हणून लढा देणारी स्त्री आज मी स्त्री आहे मला त्याचा अभिमान आहे एवढेच नाही तर स्त्री म्हणून पूर्ण स्वतंत्र आणि मनासारखे जगायचं अधिकारही आहे हे निक्षून सांगते आहे. आज तिचा लढा प्रथा-परंपरा किंवा पुरुषविरोधी नाही, तर त्या पलीकडचा कायदेशीर हक्कांचा आहे तसा तो तिच्या जन्मजात मिळालेल्या नागरिकत्वाचा, मानवी हक्कांचा आणि अस्तित्वाचा आहे आणि त्याची आत्मप्रतिष्ठा, बाईपणाचं स्वत्व जपण्याचा देखील आहे. 

(२५ सप्टेंबर २०१९ च्या  दैनिक सकाळ 'मी' पुरवणीत प्रकाशित )



- रश्मी पदवाड मदनकर

No comments:

Post a Comment

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...