Tuesday 26 July 2016

वोह ना आयेंगे पलटकर ... अलविदा मुबारक

 काही माणसांच्या आयुष्याची नीट पडलेली घडी विस्कटते अन पुढे सगळी प्रमेयच चुकत जातात. गुणांची मूर्तिमंत प्रतीके असणारी हि माणसे ट्रॅजेडी मध्ये अशीकाही गुरफटली जातात की  गुणांहून अधिक त्यांच्या दुःखाचं पारडं कधी भारी होऊन पडतं कळतही नाही. 'कभी तनहाईयों में यु हमारी याद आयेगी, अंधेरे छा रहे होंगे, और बिजली कोध जायेगी ''
हे गीत गायिले तेव्हा या गायिकेला अंदाजही नसावा कधीतरी या दोन ओळींचे बोल तद्वतच आयुष्यात खरे उतरणार आहेत. आयुष्याच्या उतारवयात त्या अश्याच गुमनामींच्या 'अंधारा'त झाकोळल्या गेल्या अन आयुष्याच्या अंतापर्यंत कितीतरी दुःखाच्या 'बिजली' झेलत राहिल्या. त्यांच्या गाण्यांनी त्याकाळात मंत्रमुग्ध होणाऱ्या त्यांच्या चाहत्यांना मात्र ह्याचा थांगपत्ताही लागला नाही. वयाच्या 80 व्या वर्षी त्यांचे निधन झाले आणि आपल्या आवडत्या गायिकेचे झालेले हाल ऐकून सारेच संगीत प्रेमी हळहळले.

मुबारक बेगम यांचा जन्म राजस्थानच्या सुजनगढ झुंझुनू इथला. लहानपणापासूनच चित्रपटांचं वेड होतं त्यांना. त्यातल्या त्यात सुरैय्यावर विशेष प्रेम होतं. सुरैय्याला बघणे, दिवसरात्र तिचे गाणे गुणगुणणे त्यांना फार आवडायचं. त्यांनी कधीही शिक्षण घेतले नाही त्यांना लिहिता वाचताही यायचे नाही पण संगीत शिकणे हा एकमेव ध्यास लागला. पुढे रियाजुद्दीन खान सारख्या फणकार गुरूंकडून त्यांनी गायकीचे प्रशिक्षण घेतले. मुबारकजींचे काका त्यांच्या प्रतिभेने अचंभित झाले त्यांच्याच आग्रहावरून त्यांना घरून परवानगी अन रेडिओमध्ये गाण्याची संधी मिळाली आणि मुबारक बेगम चित्रपटसृष्टीत पोचल्या. 1949 मध्ये 'आईए' चित्रपटासाठी संगीतकार नाशाद ह्यांनी गाण्याची संधी दिली  'मोहें आने लगी अंगडाई' हे पाहिले गीत रेकॉर्ड झाले.  त्यानंतर एका पार्श्वगायिकेचा यशाच्या शिखराचा प्रवास सुरु झाला. 1949 ते 1972 या काळात  काही सुरेल गाण्यांची मेजवानी मुबारकजींनी रसिकांना दिली.  त्यांनी गायलेली गाणी अजरामर झाली अन तो काळ असा गाजला की सुमधुर आवाजाच्या धनी मुबारक ह्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले . लतादिदी, कैफी आजमी, एस. डी. बर्मन, खय्याम. मो.रफी अश्या दिग्गजांसोबत त्यांनी काम केले. हिंदीसोबतच मारवाडी, गुजराथी गाणीही त्या गायिल्या, त्यांच्या कंठातून उतरलेली काही गाणी जसे मधुमती चित्रपटातले 'हम हाले दिलं सुनायेंगे सुनीये की न सुनीये, हम हाले दिलं सुनायेंगे' हमराहीचे 'मुझको अपने गले लगालो ऐ मेरे हमराही' अशी अनेक सुरमयी गाणी पुढेही अनेक वर्ष संगीत प्रेमी गुणगुणत राहतील हे निश्चित.

''अगर इस जहाँ का मालिक कही मिल सके तो पूछे; मिली कौनसी खता पर हमें इस कदर सजाये'' त्यांनी गायिलेल्या या गाण्याचे शब्द खरे ठरले,  आयुष्याच्या शेवटी मुबारकजींचे आयुष्य फार हालापेष्टांमध्ये गेले. जावेद अख्तर आणि सुनील दत्त यांच्या मदतीने जोगेश्वरी इथे राहायला घर मिळाले होते पण राज्य सरकार कडून मिळणाऱ्या मासिक 700 रुपयांवर तरुण मुलीचे आजारपण अन इतर खर्च त्यांना चालवावा लागे. काही चाहत्यांनाही वेळोवेळी 'शुक्राना' पोहोचवून मदत केली होती, मधले अनेक वर्ष मात्र त्या विस्मरणात गेल्या होत्या. पण आयुष्याच्या शेवटाला आजारपणामुळे त्या पुन्हा प्रकाशझोतात आल्या. मनेका गांधींनी सरकारकडे मदतीचे आव्हान केले तर राज्यमंत्री विनोद तावडेंनीही त्यांना प्रत्यक्ष भेटून मदत दिली होती. आज मुबारक बेगम आपल्यात नसल्या तरी त्यांनी रसिकांना जगण्यासाठी दिलेल्या गीत संजिवणीमुळे त्या शतकांपर्यंत अजरामर ठरणार आहेत. 

(दि. २७/०७/२०१६ ला 'सकाळ' नागपूर आवृत्तीच्या 'मी' पुरवणीत प्रकाशित)


  

No comments:

Post a Comment

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...