Saturday, 1 February 2025

माझी शाळा

 शाळा म्हणजे केवढा जिव्हाळ्याचा विषय असतो. ज्या शाळेच्या अंगाखांद्यावर खेळत-शिकत, पडत-झडत उभे राहून; आहे त्या उंचीवर पोचलो असतो त्या शाळेचे ऋण व्यक्त करण्याची संधी मिळत असेल तर त्यासारखा आनंद कुठला असेल. माझी शाळा म्हणजे नागपूरची प्रथितयश शाळा ''केशवनगर हायस्कुल''. शाळेच्या या वर्षीच्या स्नेहसंमेलनाची उदघाटक म्हणून जाण्याची संधी आमचे आवडते गणिताचे शिक्षक आणि आताचे मुख्याध्यापक श्री मिलिंद भाकरे सर यांच्यामुळे मिळाली. ते सगळ्या माजी विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवून असतात, त्यांच्याशी कनेक्टेड असतात. सरांनी या आधीही कार्यक्रमांना अतिथी म्हणून बोलावले पण माझ्याच काहीतरी अडचणींमुळे जाता आले नाही. यावेळी मात्र ही संधी मला गमवायची नव्हती. कित्येक वर्षांनी पुन्हा एकदा शाळेत पाय ठेवला आणि शाळेतले अनेक वर्ष, तेव्हाचे क्षण भरभर डोळ्यासमोरून सरकत गेले. तशा दोन प्रकारच्या शाळा असतात, एक शिकवणारी दुसरी घडवणारी. खरतर अनेक शाळांमध्ये फक्त पुस्तकी ज्ञान दिलं जातं तर एखाद्याच शाळेत ज्ञानासोबत संस्कारही दिले जातात, आपली संस्कृती, नीतिमत्ता शिकवली जाते, मातीचं ऋण, समाजाचं देणं, देशप्रेम या सगळ्या गोष्टी अंगात रुजवल्या जातात. कला, खेळ, संस्काराच्या माध्यमातून चारित्र्य घडवलं जातं. अशाच दुर्मिळ झालेल्या शाळांमध्ये अजूनही आपल्या मूळ तत्वांवर कायम राहून मुलांना घडवत असलेली शाळा म्हणजे माझी केशवनगर शाळा.

मी शाळेत आली तेव्हा रेशीमबागेच्या संघाच्या इमारतीत ही शाळा भरत होती. लांबलचक कित्येक खोल्यांची भव्य इमारत, मोठाले दोन मैदान आणि स्मृती भवनाचे शांत सुंदर पवित्र वातावरण आम्हाला या काळात लाभले. पुढे मी सातव्या वर्गात असताना नंदनवन येथील स्वतःच्या इमारतीत शाळा शिफ्ट झाली. इथेही चार मजली मोठी इमारत होती. पुढे आमच्यासमोरच त्याच प्रांगणात दुसऱ्या इमारतीचे बांधकाम देखील सुरु झाले. आता केशवनगर शाळेची इमारत त्याच प्रांगणात चारही बाजूने चौकोनी बांधली गेली आहे. म्हणजे ज्या शाळेने आम्हाला मोठे होताना घडताना पाहिले; त्याच शाळेला आमच्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी देखील मोठी होताना घडताना याची देही याची डोळा पाहिले, अनुभवले आहे.
स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने यावेळी जवळजवळ २७-२८ वर्षानंतर शाळेला जवळून आतबाहेर न्याहाळता आले. बराच बदल झाला आहे पण तो वरवरचा आहे. मुळात शाळा तशीच आहे जशी ती मनात घर करून बसली आहे. या शाळेने खूप काही दिले. मुख्य म्हणजे आयुष्याचा पाया मजबूत करून दिला ज्यावर आम्ही आज पाय रोवून, तग धरून घट्ट उभे आहोत. सकाळी सात वाजता त्यावेळचे आमचे मुख्याध्यापक पाचपोर सरांनी शिकवलेल्या प्रार्थना-ध्यान साधनेने होणारी दिवसाची सुरुवात व्हायची. त्या साधनेचे महत्त्व आज या टप्प्यावर येऊन कळले आहे. वर्गशिक्षिका वझलवार मॅडमने केवळ जीवशास्त्र शिकवले नव्हते, आयुष्याला वळण देण्याचे कठोर कार्य त्यांनी अत्यंत मृदूपणे केले होते. शारीरिक शिक्षणाच्या केचे सरांनी शिस्त अंगात भिनवली. त्यांचा दरारा असा होता की त्यांच्या मेन गेटवर झालेल्या केवळ प्रवेशाने देखील अक्खी इमारत चिडीचूप होऊन जायची. सरांच्या मार्गदर्शनात कित्येक खेळात प्राविण्य मिळवले, कित्येक राज्यस्तरीय, राष्ट्रस्तरीय कार्यक्रमात सहभागी होता आले.. त्यांच्यामुळे आत्मविश्वास दुणावला. मुजुमदार बाईंनी शिकवलेलं संस्कृत असेल किंवा भाकरे सरांनी शिकवलेलं गणित.. आजही बुद्धीची ताकद नाही ते विसरण्याची, इतके ते पक्के मांड मांडून बुद्धीत घट्ट बसले आहे. धर्माधिकारी मॅडमने विज्ञानाबरोबर कलेत गती मिळवून दिली. दंताळे (कुलकर्णी) मॅडम, मलिये मॅडम तारे मॅडम या सगळ्यांनीच आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन दिला. यावेळी कार्यक्रमात आजच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना आमच्या त्या त्या वेळच्या अनेक गमतीजमती सांगण्याची संधी मिळाली. त्यांना मी अनेक किस्से सांगू शकले, त्यातून आम्हा सगळ्यांच्या घडण्याचा प्रवास मला सांगता आला. आणि हे क्षण, हे प्रसंग, हे शिक्षण, ज्ञान, कला आणि शिस्त या शाळेने आम्हाला दिली, आमचा पाया मजबूत केला, म्हणूनच जमिनीवर घट्ट उभे राहूनही आम्हाला आकाशात भरारी घेण्याचे बळ मिळाले असल्याची कबुली मला देता आली, या कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेचे, एकूणएक शिक्षकाचे, इतर कर्मचाऱ्यांचे आणि माझ्यासोबत शिकणाऱ्या त्यावेळच्या माझ्या सहविद्यार्थ्यांचे, ज्यांनी ज्यांनी या घडण्यात योगदान दिले त्या सगळ्यांचे ऋण व्यक्त करता आले.
हा अतिशय आनंदाचा दिवस होता. मी माझ्या वर्गखोलीत माझ्या बाकावर जाऊन बसले होते. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. गणित लॅब, विज्ञान लॅब, ग्रंथालय पाहिले. जुन्या-नव्या शिक्षकांच्या सगळ्यांच्या भेटी-गाठी झाल्या. नव्या कार्यकारिणीची ओळख झाली. मिलिंद भाकरे सरांनी नव्या उपक्रमांची माहिती दिली. विद्यार्थ्यांचे नृत्य, नाट्य कलांचा आस्वाद घेता आला; आणि विद्यार्थी ते मार्गदर्शक पाहुनी म्हणून जाण्याच्या या योगामुळे अनेक वर्षांपासून वाट पाहणारे एक वर्तुळ पूर्ण झाले.

वेड्या माणसांच्या गोष्टी -

 वेड्या माणसांच्या गोष्टी - #भेटलेलीमाणसे



हा आहे विशाल टेकाडे ! त्याच्या नावात जो विशाल शब्द आहे तो त्याने सार्थक करून दाखवला आहे. विशाल चार वर्षांपूर्वी आयुष्य शोधायला म्हणजे "सर्च ऑफ लाईफ'' मिशनसाठी सायकल प्रवासावर निघाला होता. कुठे जायचे कसे जायचे काहीही डोक्यात नव्हते.. घरातून बाहेर पडल्यावर टप्प्याटप्प्यावर मार्ग सापडत गेला.. मदत मिळत गेली, माणसे भेटत गेली आणि त्याचा एकट्याचा कारवा अखंड पुढे पुढे सरकत राहिला. अंगावर एक ड्रेस आणि एक पिशवीत, एक जुना मोबाईल आणि चार्जर घेऊन तो निघाला होता. निघताना खिशात दहा हजार रुपये होते पण प्रवासात सुरुवातीलाच आयुष्याचा पहिला धडा मिळाला. एका स्वयंसेवी संस्थेच्या संचालकाने, समाजसेवकाने सांगितले. ''आयुष्य असे शोधून सापडत नसते रे. लग्झरी सोबत घेऊन फिरलास तर कधीच आयुष्य सापडणार नाही, जोपर्यंत रस्त्यावरच्या कुत्र्यासारखी वाताहत होत नाही तोपर्यंत आयुष्य कळत नसते'' हे वाक्य मनाला लागले आणि त्या क्षणात निर्णय घेऊन सोबत आणलेली सगळी रक्कम त्याने संस्थेला दान केली. यापुढचा सगळा प्रवास शून्य पैसे घेऊन करायचा. रस्त्यात लागणारी मदत देखील पैशांच्या स्वरूपात घ्यायची नाही हे ठरवून तो पुढल्या प्रवासाला निघाला. भारतातले एकूण १८ राज्य आणि ३ देश आणि अवघे ४ वर्ष त्याने सायकलवर पालथे घातले. मार्गात कुणी राहायला जागा दिली तर राहायचे, पोटापुरते अन्न दिले तर खायचे...आणि मिळाले नाही तर ? या आहे आणि नाहीच्या मधलाच हा प्रवास होता. या प्रवासात त्याने कुठला अनुभव घेतला नसेल ?? कोव्हीड काळात कित्येक गावातून हाकलून लावले असताना वेशीवरच्या मंदिरात रात्र काढण्यापासून ते गावाबाहेर मंदिर नाही म्हणून स्मशानात भर पावसात पूर आलेला असताना निथळत राहून आजच डुबून मृत्यू येईल की काय याची वाट पाहण्यात काढलेली रात्र. अनेकांच्या घरी एका रात्रीचा आसरा घेण्यासाठी विनवणी करण्यापासून ते अनेकांच्या मनात कायम घर करण्यापर्यंतचा प्रवास. ४ दिवस पोटात अन्न गेलेले नसताना, भुकेने पोट तोडत असताना, आता जिवंत राहणे शक्य नाही असे वाटत असताना भिक्षा मागण्याखेरीज उपाय नसताना नाईलाजाने पसरलेला हात ते कुठेतरी कुणाच्यातरी घरी प्रेमाने आग्रहाने पोट तुडुंब भरेपर्यंत अन्न आणि प्रेम मिळवण्याचा प्रवास. प्रवास वरवर स्वतःपासून सुरु होऊन स्वतःच्याच खोलवर आत आत घेऊन जाणारा, प्रगल्भ करून सोडणार प्रवास.

कौटुंबिक वादातून निराशेने ग्रासलेल्या विशालने मनात अतीव दुःख घेऊन घर सोडले होते. विशालला नेपाळला गेल्यावर एका जोडप्याने दत्तक घेतले. तिथे त्याने नेपाळ प्रवासातले एक वर्ष त्यांच्या सोबत घालवला. बांगलादेशात ऐन दंगे सुरु असताना प्रवास केला. ओडिसा आसाम नागालँड सारख्या ठिकाणचे अनुभव ते छत्तीसगढ मधल्या गावांमध्ये प्रत्यक्ष नक्सल गावांत राहण्याचा अनुभव. एकेक माणसांच्या हजारो कथा त्याच्या गाठोड्यात जमा झाल्या आहेत. आयुष्यभर जगल्यावरही घेता येणार नाही असे सगळे अनुभव चार वर्षाच्या सलग सायकल प्रवासातून घेऊन परत आलेला विशाल. या जगात ''प्रेम'' ही एकमेव शाश्वत गोष्ट आहे हे सांगणारा विशाल. जाताना असलेला आणि आता परतलेला विशाल अंतर्बाह्य बदलला आहे. आता तो लवकरच पुन्हा प्रवासावर निघणार आहे. आजवरच्या प्रवासातून फक्त घेत आलो आता ते परत करण्यासाठी प्रवास करायचा आहे असे तो म्हणतो. आम्ही एकाच प्रदेशातले एकाच शहरातले असताना पूर्वी त्याची माझी भेट नव्हती, ओळख नव्हती. ३ वर्षांआधी तो दूरवर प्रवासात असताना त्याला तिथे कुणीतरी माझी ओळख सांगितली. आम्ही फोनवर बोललो आणि मला त्याचे अनुभव ऐकत राहण्याचे वेडच लागले. तो जिथे कुठे जायचा तिथले किस्से फोनवरून सांगत राहायचा. पुढे दोन वर्षांपूर्वी ''अनलॉक'' दिवाळी अंकात त्याची विशेष स्टोरी आम्ही प्रकाशित केली होती. तेव्हापासून विशाल कधी परत येतो आणि भेटतो, कधी त्याला मुलाला, कुटुंबाला जवळच्या मित्रपरिवाराला भेटवते असे झाले होते. अखेर तो दिवस उगवला. २५ डिसेंबर ख्रिसमसच्या संध्याकाळी हा असा एक सांताक्लॉज भेटला आणि त्याचे अनुभव ऐकण्याची, गप्पांची अशी मैफल सजली की ५ तास कसे निघून गेले लक्षात सुद्धा आले नाही. त्याने घेतलेले अनुभव आणि त्यातून त्याला मिळालेलं ज्ञान अनुभूती खरोखर समृद्ध करणारे आहेत हे मात्र निश्चित.

Featured post

माझी शाळा

  शाळा म्हणजे केवढा जिव्हाळ्याचा विषय असतो. ज्या शाळेच्या अंगाखांद्यावर खेळत-शिकत, पडत-झडत उभे राहून; आहे त्या उंचीवर पोचलो असतो त्या शाळेचे...