Friday 5 May 2017



मुलाच्या सुस्थितीतल्या केवळ तोकड्या झाल्या म्हणून कित्तेक दिवसापासून आटाळ्यावर ठेवून दिलेल्या चपला, सॅंडल, बूट वगैरे गेल्या महिन्याभरापासून बाहेर काढून, स्वच्छ करून ठेवल्या आहेत. रोज एक-दोन जोड पॉलिथिनमध्ये डिक्कीत टाकून घेऊन जायच्या आणि जाता-येता निखाऱ्यासारख्या धगधगत्या उन्हात पाय भाजत चालणारी गरजू मुलं दिसली कि त्यांना द्यायच्या असं ठरवलं होतं. गम्मत अशी कि फक्त एक जोड देता आला आतापर्यंत. तेव्हापासून म्हणजे जवळ जवळ मागल्या 12 दिवसांपासून रोज वेगवेगळ्या रस्त्याने जाऊनही गरजू मुलं दिसत नाहीत. जी दिसतात त्यांच्या पायात पायताणं असतात. पण हि मुलं शोधण्याच्या नादात रस्त्यावरून चालत जाणाऱ्या जरा हलाकीची परिस्थितीत दिसणाऱ्या सगळ्या माणसांच्या पायाकडे आपसूक लक्ष जाऊ लागले आहे. यात भरदुपारी सामानाचा भारा, भाजीच्या टोपल्या डोक्यावरून वाहून नेणाऱ्या खेड्यातल्या बायका, ढोरं चरायला घेऊन जाणारे गुराखी, रोडसाईड्ला बसलेली काही विक्षिप्त मंडळी, हमाल, रिक्षा चालक अशी मोठी (अगदी शब्दशः मोठी) माणसेच विनाचप्पल या आग ओकणाऱ्या उन्हात भरदुपारी पाय भाजत चालताना दिसतायेत.मन चरचरतं पाहून. त्यातल्या त्यात मुलं दिसत नाहीयेत हि जरा समाधानाची बाब असू शकते.

यात काही गोष्टी लक्षात येतात,

>> पालक असतील तर परिस्थिती काहीही अगदी कशीही असली, आणि त्यासाठी काहीही करावे लागले तरी ते करून मुलांच्या निदान बेसिक गरजा आई-वडील पुरवतातच.

>> पालक नसलेली मुलं अशी बेवारस फिरतांना फारशी दिसत नाही ती कुठल्याश्या संस्थेत खितपत किंवा सुस्थितीत पडलेली असतात.

>> चौकाचौकात किंवा मंदिराबाहेर भीक मागताना दिसणाऱ्या मुलांना तुम्ही काहीही दिलं तरी उपयोगाचं नाही. कारण एकतर त्या गोष्टी ते वापरतच नाहीत कारण त्यांच्या तश्या कुपोषित आणि गरीब दिसण्यावरच त्यांची कमाई असते आणि तरीही तुम्ही दिलेच आग्रहाने तर ते विकून पैसे मिळवले जातात.

इथे आपला गरजूवंतांना मदत करण्याचा उद्देश पूर्ण होत नाही.

लहान मुलांपेक्षाही मोठ्यांनाच अश्या मदतीची जास्त गरज आहे हे आपल्या लक्षातही येत नाही.कारण त्यांना गृहीतच धरण्याची रीत आहे. गेल्या काही दिवसापासून ते मला प्रकर्षानं जाणवलं आहे. प्रचंड कष्ट उपसून कुटुंबासाठी राबणारी हि मंडळी स्वतःकडून आणि इतरांकडूनही उपेक्षित राहते. म्हणूनच गाडीच्या डिक्कीत मोठ्यांच्या टाकून दिलेल्या सुस्थितीतल्या चपलांसाठी वेगळी जागा करून घेतली आहे. रखरखत्या उन्हात भाजणाऱ्या पायांना जुन्या चपलांचाही दिलासा फार असतो. देणाऱ्याला प्रचंड समाधान लाभतं. करून बघाच


Rashmi / 22.04.17

No comments:

Post a Comment

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...